पण तसं चेहऱ्यावर न दाखवता ती म्हणाली.
" कोणाशी बोलू?"
" उद्या बाबांसोबत तुला शेजारच्या गावात जायचे आहे. तिथे एक वैद्य आहेत , त्यांच्याकडे बाबांच्या पक्षाघातावर इलाज करायचा आहे. त्यामुळे ते बरे होईपर्यंत तुला तिथेच थांबावे लागेल."
" अहो पण, मी त्यांच्या सोबत एकटी कशी राहू?"
" तुझ्या बापाने हुंडा दिला असता तर ही वेळ आलीच नसती." असे बोलून त्याने जोराने दार आपटत निघून गेला.
नवऱ्याने सोडलेल्या नवीन फर्मानामुळे माधवीवर आभाळच कोसळले. आताच कुठे आई वडिलांशी हितगूज चालू झाले होते. मनाला एक प्रकारची उभारी मिळाली होती. ती ज्या गावी जाणार होती. तिथे एक त्यांच्या मालकीचे छोटंसं शेतघर होते आणि काही शेतजमीन. तिथून जवळच पक्षाघातावर प्रभावी इलाज करणारा शंक्या वैद्य राहत होता. एवढी माहिती तिला शेजाऱ्यांकडून मिळाली. त्याच रात्री तिने नलूला इन्स्टाग्राम मेसेजेसवरून सर्व सांगितले. हे नलूचे प्लान बी होते. माधवीच्या नवीन छळाबद्दल ऐकून नलूलाही वाईट वाटले.
त्याचदिवशी दुपारी माधवी, श्रीपतराव आणि श्रीकांत शेजारच्या गावात जायला निघाले. माधवीला त्यांच्या शेतातल्या घरात सोडून ते दोघे वैद्याकडे गेले.
मागची पडवी, जेवणाची खोली आणि मधला भाग असे बऱ्यापैकी घर होते. तिने घराची साफसफाई करायाला सुरुवात केली. बाजूलाच असलेल्या छोटखाणी विहिरीतून पाणी आणले. तासाभरात तिचे बरेचसे काम उरकले.
थोड्याच वेळात सासरे आणि नवरा घरी आले. मागाहून एक पोरगा घरातील सामान घेऊन आला. माधवीला भराभर सूचना देत श्रीकांत निघून गेला. उरले फक्त माधवी आणि सासरे. अंधार पडला तसा तिच्या मनात एक भीती दाटली. सासऱ्यांना औषध देऊन माधवी स्वयंपाकाला लागली. काहीवेळाने मागच्या दारी दबक्या पावलांनी येणारी नलूही दिसली. तिचा भाऊ तिला माधवीच्या सोबतीला सोडून गेला होता. माधवीला ते खरंच वाटत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी सासरे उठायच्या अगोदर नलू निघूनही गेली. पण हे सगळे सासऱ्यांपासून लपले नाही. तिसऱ्या रात्री त्यांनी नलूला तिथे पाहिले. ते काहीच बोलले नाही. माधवीकडे एकवार पाहत अंथरुणावर जाऊन पडले. त्या दिवसापासून नलू रोज येऊ लागली. माधवी सासऱ्यांची मनापासून करत असलेली सेवा आणि शंक्या वैद्यांच्या औषधाची मात्रा लगेच लागू पडली. श्रीपतरावांची प्रकृती झपाट्याने सुधारली. माधवीला सासऱ्यांचा धीर मिळू लागला.
दोन महिने झाले तरी श्रीकांत फिरकला नव्हता. घरातील सामान आणि जवळचे पैसेही संपत आले होते.
" बाबा, पंधरा दिवस झाले , हे इकडे फिरकले नाहीत." श्रीपतरावांच्या हातावर रात्रीच्या वेळेच्या गोळ्या देत माधवी म्हणाली.
" तो आता नाही येणार".
" म्हणजे ?"
" पोरी, आपले गावातील घर जप्त झालंय. श्रीकांत मुंबईला गेलाय."
" काय ? "
" हो पोरी, माझ्या दोन पोरींच्या लग्नासाठी बँकेजवळ आपले घर गहाण ठेवून कर्ज घेतले आणि दोन्ही पोरींना बक्कळ हुंडा देत उजवले. त्यावेळी आम्हाला वाटले श्रीकांतच्या लग्नात हुंडा घेऊन कर्ज फेडता येईल. तुझ्या बाबांचे सरकारी नोकरीत असलेला हूद्दा आणि खातं पाहून आम्हाला भरपूर हुंडा मिळेल हा अंदाज लग्नानंतर
फोल ठरला...
क्रमश: