प्रेमाचा चकवा भाग - ८

ही एक सामाजिक कथा आहे

प्रेमाचा चकवा  भाग- ८

विषय- कथामलिका


बाबा अतुलचे फोनवरचे बोलणे ऐकून निःशब्द झाले होते.
त्यांना निशाच्या प्रेग्नेंसी बद्दल ऐकून जबरदस्त शॉक बसला. आई त्यांना काय झालं म्हणून विचारू लागली पण ते काहीच बोलत नव्हते.

"निशा sssss " बाबा निशाकडे बघून मोठ्याने ओरडले.


बाबाच्या अचानक ओरडण्याने निशा, तिची ताई आणि आईसुद्धा दचकल्या.

बाबा ताडकन उठून निशाच्या दिशेनी झपाझप पावलं टाकत आले. त्यांचे डोळे रागाने लालबुंद झाले होते.
रागाने त्यांचे पुर्ण शरीर थरथरत होते.


सटाकssss


कुणाला काही कळायच्या आत बाबांनी निशाच्या श्रीमुखात जोरदार भडकावली. त्यांनी इतक्या जोरात मारले होते की निशा डायरेक्ट मागच्या भिंतीला जाऊन आपटली गेली, निशा तर भीतीने थरथरायला लागली आणि रडायलासुध्दा लागली. तिच्या बाबांनी आज पहिल्यांदा तिच्यावर हात उगारला होता. बाबांनी पुन्हा तिला एका हाताने पकडून स्वतःकडे ओढून घेतले आणि पुन्हा दुसऱ्या गालावर ठेवून दिली आणि यावेळेस लागोपाठ मारत सुटले.

आई आणि ताई पळत त्यांच्याजवळ आल्या. आईने बाबांचा हात पकडला तर ताईने निशाला कुशीत घेतलं.

निशा तर मोठमोठ्याने रडू लागली, तिचे हुंदके थांबायचे नाव घेत नव्हते.

"अहो काय चाललंय तुमचं? कुणी असं तरण्याताठ्या मुलीवर हात उचलतात का? काही कमी जास्त झालं म्हणजे काय करणार आपण?" आई त्यांना समजावण्याच्या स्वरात म्हणाली.


"तू गप्प बस एकदम" बाबांनी आईवर बोट उगारून दरडावले. तशी आई शांत झाली.


"आपल्या अती लाडामुळेच ह्या दोन्ही कार्ट्या शेफारून गेल्या आहेत. मुली असून आपण ह्यांना गरजेपेक्षा जास्त स्वातंत्र्य दिले कारण आपण मुला - मुलीमध्ये कधी भेदभाव केला नाही. आपल्या मुलीचं आपली मुले आहेत असे समजलो, इथेच आपण चुकलो. समाजात वावरतांना मी खूप अभिमानाने सांगायचो की माझ्या दोन्ही मुली माझ्या शान आहेत. मला गर्व वाटायचा की मला एक नाही तर दोन मुली आहेत याचा. ह्यांना आपण मुलांसारखी वागणूक दिली तेच तर चुकलं आपलं. मला वाटायचे आपल्या मुली कधीच आपल्याला सगळ्यांसमोर खाली मान घालावी लागेल अशा वागणार नाहीत, इतका विश्वास होता मला पण झालं उलटं. माझा विश्वास आधी तर तुझ्या ह्या मोठ्या कार्टीने खोटा ठरवला. जेव्हा तिने आपल्या इच्छेविरुद्ध जाऊन त्या नालायक मुलासोबत पळून लग्न केले. एकीने केलं तर केलं, मला दुसरीकडून आशा होती ती काही असं करणार नाही पण ती तर तिच्याही दोन पावलं पुढे निघाली. आपल्याला आता कुठेच तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवली नाही हिने." बाबा पुन्हा निशाच्या दिशेने चालत गेले आणि त्यांनी पुन्हा तिला एक सणसणीत कानाखाली लगावली.


"अहो तुम्ही काय बोलत आहात मला काहीच कळत नाही? नेमकं काय झालं स्पष्ट सांगा मला?" आईने न समजून विचारले.


\" ऐकायचं आहे तुला ? मग ऐक! तुझी ही नालायक मुलगी लग्नाच्या आधीच पोटुशी होती आणि म्हणून अतुलने घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे." बाबा अजूनही रागात थरथरत होते.

आईने ते ऐकून तोंडावर हात ठेवला. बाबांनी रागात निशाचा गळा आवळून धरला.

"बोल कोण होता तो ज्याच्या सोबत तोंड काळं केलीस? बोल.. नाही तर जीव घेणार तुझं आणि एकदा नाव सांग, त्याचाही जीव नाही घेतला तर माझं नाव बदलून घेईल मी." बाबा रागा रागात बोलत होते.


"बाबा सोडा तिला प्लिजssss  सोडा तिला. तिच्याकडून चुक झाली हो, आता ती पुन्हा चूक नाही करणार, एकदा माफ करा तिला, मी हात जोडते." ताई रडत रडत म्हणाली.


आई पण रडू लागली, बाबांनी निशाचा गळा सोडला आणि तिला एक हिसका दिला. निशाचा गळा आवळून धरल्याने श्वास फुलला होता म्हणून ती खोकू लागली. ताईने पटकन जाऊन तिला पकडले.

"बघा बघा मांजराला उंदीर साक्ष! ह्या दोघींनी मिळून मला कुठेच तोंड दाखवण्याच्या लायकीचे ठेवले नाही. बाहेर लोकांना कळलं ना तर शेण घालतील आपल्या तोंडात.
निर्लज्ज कार्ट्याssss.  लाज वाटते मला यांना आपल्या मुली म्हणून घेण्याची. आमच्या प्रेमाचा यांनी असा गैरफायदा घेतला, चांगले पांग फेडले तुम्ही दोघींनी. अशाच कारणांनी बहुतांश आई - वडील मुलगी नको म्हणत असणार. काय गुन्हा होता आमचा जी आमच्या पोटी ही अशी कार्टी निपजली." बाबा निशाला उद्देशून बोलत होते.


"असं करतांना एकदा पण आमचा विचार नाही आला?
आई बाबा म्हणून आम्ही प्रेम केले हा गुन्हा होता काय आमचा? की तुम्हाला गरजेपेक्षा जास्त सूट दिली हा गुन्हा होता? की आम्ही विश्वास करत होतो हा गुन्हा होता?
मला वाटायचं माझ्या मुली आयुष्यात असं काही करून दाखवतील की माझा ऊर अभिमानाने भरून येईल.
हे केलं माझ्या मुलीने की मी आता कधीच कुणासोबत मान वर करुन बोलू शकणार नाही." यावेळेस बाबांचा कंठ दाटून आला.

"तुमचे माय - बाप होण्याची शिक्षा आम्हाला मिळाली.
खूप चुकलो ग आपण." असे म्हणून बाबा ओक्साबोक्सी रडू लागले.

आई त्यांना शांत करू लागली, बाबांना रडतांना बघून निशा आणि तिची ताई पण रडू लागली.


"बस! आता खूप झालं, खूप सूट दिली आतापर्यंत निशा तुला पण यानंतर खबरदार घरातून एक पाऊल पण बाहेर टाकलास तर. जायचं झालं तर एक तर आई किंवा मी तुझ्यासोबत येऊ, मला तुझ्या ह्या ताईवर पण विश्वास नाही. समजलं काय मी काय बोलत आहे ते?"  बाबा अगदी करारी आवाजात निशाला बोलले.

निशाने मानेनेच होकार दिला.

"जा, चालत्या व्हा दोघीही माझ्या डोळ्यांसमोरून."

बाबाने रागात म्हटले म्हणून ताई निशाला खांद्याला धरुन तिच्या रुममध्ये निघून गेली. त्या गेल्यावर बाबा मटकन सोफ्यावर बसले आणि रडू लागले. आई पण त्यांच्या शेजारी बसून डोळ्याला पदर लावून आसवं गाळत होती.
तर निशा ताईला बिलगून खूप रडत होती, तिला खूप वाईट वाटत होते. ताई तिला धोपटून शांत करत होती.
दिवसभर कुणीच अन्नाचं एक कणही खाल्ला नाही.


घरचे वातावरण एकदम तंग झाले होते. निशा दिवसभर बेडरूममध्ये रडत बसली होती. रात्री ताई तिला जेवायला घेऊन गेली, तिच्या आई - बाबांनी तर तिच्यासोबत बोलणे टाकले होते. जेवतांना कुणीच कुणासोबत बोलत नव्हते.
रोज ज्या घरी चिवचिवाट असायचा, निशा आणि ताईच्या बडबडण्याने घर गजबजल्यासारखे असायचे, तेच घर आज अगदी भकास वाटू लागले होते.


निशाने कसेबसे दोन घास खाल्ले आणि हात धुवून रुममध्ये निघून गेली आणि आतून दरवाजा लावून घेतला.
स्वतःला बेडवर झोकून देऊन रडू लागली.

थोड्या वेळात तिचा मोबाईल वाजू लागला. नितीनचा कॉल होता म्हणून तिने लगेच उचलला.


"लवकर ये मी वाट बघत आहे." नितीन तिला म्हणाला.


"नितिन .." ती रडत रडत त्याचं नाव घेऊ लागली.

"काय झालं? लवकर ये, माझ्याजवळ जास्त वेळ नाही." तो तिचं रडणं बघून वैतागत म्हणाला.

"मी नाही येऊ शकत रे." तिने रडता-रडता सांगितले.

"का? काय झालं?" त्याने आश्चर्याने विचारले.

"ते आज घरी.... " असं म्हणून तिने सुरुवातीपासून जे जे झाले ते जशाचे तसे सांगितले.

आधी तर नितीन सटपटला पण त्याचं नाव नाही घेतले म्हणून रिलॅक्स झाला. त्याला या प्रकरणात गुंतायचे नव्हते.


"आई - बाबा बोलत नाही रे माझ्यासोबत, मी काय करू ? मला खूप त्रास होतो आहे. मला तू आणि ते दोघेही सारखेच प्रिय आहात. मी तुम्हा तिघांशिवाय नाही राहू शकत." निशा ओक्साबोक्सी रडू लागली.


"अरे निशु, तू प्लिज रडू नकोस, शांत हो. कोणत्याही आई- वडिलांना त्यांच्या मुलीबद्दल असे माहिती झाल्यानंतर ते चिडणे साहजिकच आहे." तो तिला समजावू लागला.

"तू स्वतःला त्यांच्या जागेवर ठेवून बघ ना! एका तिसऱ्याने त्यांना हे असे सांगितले आणि नको नको ते त्यांना बोलून गेला. वरून लग्न होऊन काही दिवस झाले नाही तर घटस्फोट होत आहे.  त्या आई - वडिलांच्या काळजावर तर कट्यार चालवल्यासारखं झालं ना?"


"ते सध्या तुझ्यावर चिडून आहेत म्हणून बोलत नाही आहेत पण याचा अर्थ हा नाही की त्यांनी तुझ्यासोबत कायमचे संबंध तोडले. काही दिवस जाऊ दे, त्यांचा राग आपोआप कमी होणारं मग ते आधीसारखे तुझ्यासोबत बोलायला लागतील. तोपर्यंत आपण नको भेटायला. तू सध्या त्यांचं ऐक पुढचं पुढे बघू, ओके!" तो अगदी लाडीगोडी लावत आणि प्रेमाने तिला समजावत म्हणाला.


"ह्मम" निशाला त्याचं मत पटलं.


थोडं बोलून नितीनने फोन ठेवले. काही दिवस न भेटण्यात त्याने हुशारी मानली.


निशाच्या बाबांनी ठरवल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा निशाला बाहेर जायचं असेल तेव्हां बाबा किंवा आई सोबत असायची. ते दोघे तिला एकटीला सोडत नव्हते, रात्री शतपावली करतांना आजी तिच्यासोबत असायची.


अशात एक महिना उलटून गेला. या एका महिन्यात नितीनने एकदा पण निशाला भेटायला बोलवले नाही.
निशाच्या आई - बाबांचा राग थोडा थोडा कमी होऊ लागला, ते आधीसारखे तिच्यासोबत बोलू लागले.


निशा आणि अतुलच्या सहमतीने त्यांचे घटस्फोट झाले.
निशाच्या आजीची तब्येत बिघडली त्यामुळे ती तिच्यासोबत शतपावली करायला येऊ शकत नव्हती.
घराच्या आसपास फिरायचे ते म्हणून तिच्या बाबांनी तिला एकटी फिरायला परवानगी दिली आणि इथेच चुकले.


नितिन तर टपून होता एका संधीची वाट बघत की कधी निशाचे आई - बाबा तिला एकटीला सोडतात. आता तर आयती संधी चालून आली त्याच्याकडे. निशाच्या बाबांनी सूट दिल्या बरोबर नितिन तिला भेटू लागला. निशाला तिचा घटस्फोट झाला ते योग्यचं वाटत होते कारण तिला अतुल तसाही आवडला नव्हता.


तिला वाटू लागले की तिची लग्नगाठ नक्की नितिनसोबत बांधली गेली आहे म्हणूनच अतुलला लवकर कळले आणि त्याने तिला त्या बंधनातून मुक्त केले.


आता ती कधीही नितिनसोबत लग्न करायला मोकळी आहे असे तिला वाटले म्हणून मनोमन ती देवाचे आभार मानत होती.


क्रमशः

✍️ अश्विनी कांबळे

ठाणे विभाग

🎭 Series Post

View all