प्रेमाचे बंध (भाग/४)

कथा मालिका
भाग/४

माई आणि अप्पांनी काय ठरवले..

पुढे..

घरात झालेल्या प्रकारामुळे माई आणि अप्पा खूप दुखावले गेले होते. त्यामुळे ते सांभाळून राहू लागले. आपल्या हातून परत एकही चूक होणार नाही. याची ते दोघेही पुरेपूर काळजी घेत होते.

त्यामुळे ते बाहेर फिरायला गेले की लवकर घरात येत नसत. आले जेवले की खोलीत निघून जात. त्यामुळे घरात काही काळ शांतता होती. हळुहळु राजेशही सगळं विसरून गेला. पण, एके दिवशी नुपूरच्या मनाविरुद्ध एक घटना घडली. माई आणि अप्पा बाहेर फिरायला जातांना त्यांच्या हातून घराची किल्ली आत राहिली आणि बाहेरून दार लाॅक होऊन गेले. त्यात राजेशही एका मिटींगसाठी बाहेरगावी गेला होता. मग त्यानंतर तिने जे काही तोंड सुख घेतले की माई आणि अप्पा काहीही न सांगता घरातून निघून गेले.

नुपूरने लाॅकवाल्याला बोलावून दुसरी किल्ली बनवून घेतली. बराच वेळ झाला तरी माई अप्पा परतले नव्हते. नुपूरला वाटले येतील थोड्या वेळाने. पण, संध्याकाळ झाली तरीही ते परतलेच नाही. तेव्हा मात्र ती घाबरली. घरात येरझाऱ्या घालत होती. अजुनही राजेशला तिने काहीच सांगितले नव्हते. तिचा धीर सुटत चालला होता. त्यामुळे तिने फोन हातात घेतलाच की तिच्या फोनची रिंग वाजली.

"हॅलो, नुपूर बोलत आहात?"

हो ,आपण कोण?

मी सुशांत देशमुख. राजेशचा बाॅस बोलतोय. आपण माई आणि अप्पांची वाट बघत आहात ना? ते सुरक्षित आहे. काळजी करू नको."

"पण, ते कुठे आहेत? घरी सांगून सुध्दा नाही गेलेत. परत कधी येणार? मी कधीची वाट बघतेय सर. तुम्हांला कसे भेटले."

"उद्या सकाळी राजेश आल्यानंतर तुम्ही घरी या सगळे समजेल आणि हो तुमच्या मुलांनाही आणा. असे म्हणत सरांनी फोन कट केला."

कधी एकदाची सकाळ होते. असे नुपूरला होऊन गेले. सकाळी सात वाजता राजेश आला.आल्या आल्या सरांचा फोन‌ आला.

"हॅलो सर ,गुडमाॅनिंग. आमची मिटींग खूप छान झाली. ते प्रोजेक्ट आपल्यालाच मिळाले सर. अभिनंदन."

"राजेश ,गुडमाॅनिग. आता मी काय सांगतो ते ऐक आणि ताबडतोब माझ्या घरी ये. हो आणि एकटा नाही विथ फॅमिली."

"हो सर येतो. एक दीड तासात पोहोचतो आम्ही."

"नुपूर चल आपल्याला निघायचे आहे. सरांनी अर्जंट बोलावले आहे. माई ,अप्पा कसे आहेत गं. मी येतो भेटून."

"अरे ते घरी नाही. फिरायला गेले ना. येतीलच. चल आपण जाऊ तोवर."

नुपूरने वेळ टाळून दिली.

"बरं ठीक आहे चल."

काहीवेळातच ते सरांच्या घरी पोहोचले.

"सरांनी आणि नलिनी ताईंनी छान हसून स्वागत केले. चहा पाणी झाले."

पण नुपूरला सरांशी बोलायचे होते. तिची तगमग तिच्या नजरेत जाणवत होती.

"राजेश माझ्या घरी एका मित्राचे आई वडील आले आहेत. त्यांना गावाकडे एखादे घर विकत घ्यायचे आहे. मला आठवले की तुझे घर आहे. ते विकायचे होते ना तुला. काय झाले त्याचे."

"सर ते मी मागेच विकले. म्हणजे तरी झाले असेल सहा महिने."

"अच्छा, ठीक आहे‌. मी त्यांना काही दिवस माझ्याकडेच ठेवतो. मग दुसरे घर बघतो."

"कोण आहे सर ? मी त्यांना भेटू शकतो का? कोणी ओळखीचे सुध्दा असू शकेल माई अप्पांच्या."

"हो , हो बोलावतो मी."

"नलिनी घेऊन ये बाहेर त्यांना."

"हो आता आणते."

राजेश वाट बघत असतो. बाहेर कोण येतंय त्याची...

©® आश्विनी मिश्रीकोटकर





🎭 Series Post

View all