Login

प्रेमाचे बंध

लघुकथा


श्रावण महिना सुरू झाला. की ओढ लागते ती माहेरी जाण्याची. पण, कधी कधी कर्तव्यापुढे माहेरी जाणे होत नाही. अशीच पुर्वा लग्नानंतर पहिला सण आला रक्षाबंधनाचा. तशी ती उत्सुक होती.
"सासुबाई , आज रक्षाबंधन आहे. मी उभ्या उभ्या माहेरी जाऊन येऊ का?

"रक्षाबंधनाला तू माहेरी का जाते ? तुला कुठे भाऊ आहे? आणि जायचेच असेल तर नंतर जा. कारण, आपल्याच घरी रक्षाबंधनासाठी सगळे जण येतात."

पुर्वा अजून काही बोलणार तर तेवढ्यात अगं आई, दिप्ती किती वाजता येणार आहे. प्रथमेश बाहेर आला आणि विचारू लागला.

" अरे, दिप्ती सहा वाजता येणार आहे. आता थोड्याच वेळात आक्काच्या घरचे आणि दुपारी तुझा मामा ,मामी येणार आहेत आधी ,".... सुजाता

"म्हणजे आज धम्माल , मस्ती मजाच मजा. म्हणून तर मी सुट्टी घेतली मी. चला पुर्वा बाई लागा स्वयंपाकाला. काय बनवणार आहे आज." प्रथमेश

नकळत डोळ्यांत आलेला ओलावा टिपत ती बोलली. एक काम कर. "मी पुऱ्या , बटाट्याची भाजी, कोशिंबीर घरी करते. तू श्रीखंड आण बाहेरून."

बरं तू म्हणशील तसं. असे म्हणत तो निघून गेला.
पुर्वा स्वयंपाकाच्या तयारीला लागली. पण, मात्र कुठेतरी भरकटले होते.
मला भाऊ नसला म्हणून काय झाले ? मी तर माझ्या वडीलांनाच राखी बांधत होते ना आतापर्यंत. मला कधीच भावाची उणीव भासली नाही. पण, आज असे का वाटत आहे. ही जाणीव का होत आहे.?डोळ्यांत दाटलेले भाव कोणीच ओळखले नाही का?
पण, प्रथमेशच्या ते आधीच लक्षात आले. त्याने आधीच नियोजन करुन ठेवले होते. तिला सरप्राइज द्यायचे ठरविले.

पुर्वा शामराव आणि वनिताची लाडाची लेक. भाऊ नसल्याने आयुष्यात कोणालाच राखी कधीच बांधली नाही. पण, अगदी तीन चार वर्षांची असल्यापासून ती तिच्या वडीलांना ती नेहमी राखी बांधायची. कारण, वडीलांकडून पैसे किंवा ओवाळणी मिळायची आणि मग तो चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता. तेव्हा फक्त हौस म्हणून पण जसजशी मोठी होत गेली तरी ती प्रथा तिने सोडली नाही. बालपणी अनुभवलेली मजा आणि हट्ट काही कमी केलेला नव्हता आणि वडीलांना एक वचन दिले होते.
"बाबा, मी तुम्हाला शेवटपर्यंत साथ देईल. सुख असो वा दुःख मी तुमच्या डोळ्यांत कधीच अश्रु येऊ देणार नाही. "

लेकीचे बोलणे तिच्या वडीलांनी कधीच मनावर घेतले नाही. कारण, लग्नानंतर हे सर्व बदलणार हे ते जाणून होते.

कारण, भाऊ असला तरच आपली रक्षा करेल किंवा ओवाळणी मिळेल. अशी संकल्पना तिने कधीच केली. ज्या वडीलांनी तिला आज पर्यंत फुलाप्रमाणे जपले होते. ते देखील तिकडे आठवण काढत होते. पण, सणावाराचे लेकीच्या घरी कसे जायचे? त्यामुळे पुर्वा आल्यानंतरच राखी बांधायची असे त्यांनी ठरविले.

पण, प्रथमेशने पुर्वाला न सांगता शामराव आणि वनिता ताईंना आधीच आमंत्रण दिले. ठरल्याप्रमाणे ते वेळेवर येणार होते.

इकडे पुर्वा मात्र शरीराने तर थकलीच होती. पण मन जास्त खट्टू झाले होते. पण, तिला माहीत नव्हते की संध्याकाळी काय घडणार आहे.

सगळे पाहुणे येत होते. तिच्या हातचा स्वयंपाक खाऊन खुष होत होते. घरात चाललेला हा रक्षाबंधनाचा सोहळा पाहून तिचे मन कासावीस होत होते. पण, आता काय करणार?

संध्याकाळचे साडेसात वाजत होते. सगळे पाहुणे निघून गेले. सगळे आपापल्या खोलीत. तिला आता स्वयंपाक करायचा नव्हता. म्हणून ती थोडावेळ निवांत झाली. एक क्षण विसावले की दारावरची बेल वाजली.

यावेळी कोण आले असेल ? मनात विचार करीतच दार उघडायला गेली. तर समोर शामराव आणि वनिता.

"आई ,बाबा तुम्ही",....पुर्वा

पुर्वा आई वडीलांच्या गळ्यात पडली आणि डोळ्यांतला आसवांना मोकळी वाट करून दिली.

हो बेटा जावई बापूंनी आम्हांला आधीच बोलावले होते. आम्हांला इथे बोलावून घेतले.
तेवढ्यात सगळेजण बाहेर आले. तिच्या डोळ्यांतला आनंद बघून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
" कसं वाटलं सरप्राइज?" पुर्वाच्या सासुबाई बोलल्या.

"आई, तुम्हांला माहित होते. माझे आईबाबा येणार म्हणून."... पुर्वा

"हो बेटा , आम्हांला माहिती होते. सकाळी मी जे बोलली त्या बद्दल साॅरी. तू घेतलेला वसा आम्ही कसा मोडणार बरं . असे प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात आणि ते जपावेच लागते.आम्हांला राखी बांधतांना बघून तुझे मन काय बोलत होते कळत होते आम्हांला. म्हणून आम्ही सकाळीच बोलावले. पण, तुझे आईवडील मानाचे. त्यामुळे त्यांनी सगळे पाहुणे गेल्यानंतरच येऊ असे आम्हाला सांगितले."


"चला आता राखी बांधून घ्या पटकन. नंतर सोबत जेवण करू या.".... प्रथमेश

पुर्वा बोलली, "पण आता स्वयंपाक करावा लागेल."

"अगं त्याची गरज नाही. हे बघ सगळं तयार आहे. प्रथमेशने आधीच जेवणाचे पार्सल मागवून घेतले. तू फार थकली होती . त्यामुळे आता गरमा गरम जेवण करू या."

पुर्वाने शामरावांना राखी बांधली आणि सगळ्यांनी सोबत जेवण केले.

"आई, साॅरी. माझा तुमच्या बद्दल गैरसमज झाला होता. पण, आता नाही. आपले हे प्रेमाचे बंध असेच कायम राहोत."

असेही एक रक्षाबंधन साजरे झाले होते.