प्रेम हे 5

Marathi katha

आपण मागील भागात पाहिले की, कार्तिक मनस्वीच्या हातातून पेपर नेतो.. मग मनस्वी रूसून बाहेर जाते.. कार्तिक तिला मनवायला जातो.. नंतर ते दोघे आत आल्यावर सगळे फिरायला जातात.. आता पुढे..

सगळेजण सर्वप्रथम मंदिरात जातात.. लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन मग पुढे जाऊ असे मनस्वीच्या आईने सांगितल्यामुळे ते मंदिरात जातात.. मंदिरात गेल्यावर मनस्वीची आई मनस्वीला म्हणाली, "मनू, अगं डोक्यावर काहीतरी घे बाळ.. देवीचे दर्शन घेताना डोक्यावर पदर असावा असे म्हणतात.." असे म्हणून मनस्वीची आई डोक्यावर ओढणी घेते..

मनस्वी पण तिच्या डोक्यावर स्कार्फ घेते आणि देवीचे दर्शन घेते.. मग ती तिच्या आईच्या सांगण्यावरून भटजींना नमस्कार करत असते इतक्यात कार्तिक देखील नमस्कार करण्यासाठी येतो.. त्यामुळे होते काय? तर दोघेही एकत्र नमस्कार करतात.. आणि आपसूकच भटजींच्या तोंडातून 'सौभाग्यवती भव' असा शब्द निघाला..

सगळेच थोडा वेळ स्तब्ध झाले.. कुणाला काहीच समजेना.. मनस्वी तर एकदम दचकली.. तिलाही काय बोलावे? तेच कळेना.. कार्तिक तर नुसता बघतच बसला.. मनस्वीचे बाबा शिरीष काका म्हणाले, "त्या दोघांचे लग्न झाले नाही.. तुम्ही असा आशीर्वाद देऊ नका.."

"माफ करा.. आजकाल कुणाचे लग्न झाले आहे आणि कोणाचे नाही हेच समजत नाही.. कोणी मंगळसूत्र घालत नाही, ना पायात जोडवी.. त्यामुळे माझी चूक झाली.. मी आधी विचारायला हवं होतं.. परत औक्षवंत व्हा.. यशस्वी भव.. हा आशीर्वाद देतो आता.." असे म्हणून भटजी आशिर्वाद देतात..

मग काय सगळ्यांना चिडवायला एक नवीन विषयच मिळाला.. पण मनस्वी खूप चिडली.. तिला हे अजिबात आवडले नाही.. त्यामुळे नंतर कोणीच चिडवले नाही.. एका सेकंदासाठी कार्तिकला वाटले की, "खरंच आम्ही दोघे एक झालो तर.. ही मला होकार देईल की नाही.. की हिच्या मनात दुसरं कोणी आहे? हिच्या मघासच्या वागण्यावरून तरी ही होकार देईल असे वाटत नाही.. "

पण मनस्वीच्या मनात नक्की काय होतं? हे कार्तिकला समजू शकले नाही.. त्याला तर तेव्हाच प्रपोज करावे असे वाटत होते.. पण तो शांत बसला.. मग सगळे एका स्पॉटवर जायचे ठरवले आणि गाडीत जाऊन बसले.. मग ठरल्याप्रमाणे ते तिकडे निघाले.. गाडीत बसल्यावर दंगा मस्तीत गाणी म्हणू लागले.. गप्पा मारू लागले.. फायनली त्या स्पाॅटवर गेले..

तेथे एक डोंगर होता आणि तो डोंगर चढून वरती जाऊन सुंदर असा नजारा पाहायचा होता.. इतके मनमोहक वातावरण होते ते.. निसर्गाचे सौंदर्य, झाडे असा नयनरम्य देखावा होता तो.. सगळेजण गाडीतून उतरले.. पायर्‍या चढून वरती जायचे होते.. मनस्वीचे आई बाबा आणि कार्तिकचे आई-बाबा असे चौघेजण बोलत बोलत हळूहळू पायर्‍या चढून वर जात होते.. मनस्वी आणि कार्तिक दोघे भरभर चढून जात होते.. मनस्वीला तर कधी एकदा वरती पोहोचतोय असे झाले होते.. त्यामुळे ती एकदम फास्ट जात होती..

सुरुवातीपासूनच भरभर गेल्यामुळे निम्मे अंतर चालून गेल्यावर मनस्वीला थोडा दम लागला.. आणि ती थांबली..
"कार्तिक, थांब ना रे माझ्यासाठी.. मला खूप त्रास होतोय चालताना.. थोडा वेळ उभा राहून मग जाऊया ना.." मनस्वी

"बरं, थांब थोडा वेळ.. मग आपण जाऊया.." कार्तिक

बराच वेळ थांबून देखील मनस्वी पुढे जायचे नाव घेईना.. म्हणून कार्तिक तिला बोलावतो, "चल मनू.. इतका वेळ थांबलो तर आपल्याला उशीर होईल.. आई-बाबा पण येतच असतील.. एकदा थांबलो की थांबावं असं वाटतं.. त्यापेक्षा हळूहळू जाऊ.. भरभर जाण्याची काही गरज नाही.. हळूहळू चालत गेलो तरी लवकरच पोहोचू.." कार्तिक

"थोडा वेळ थांब ना रे.. माझी चूक झाली.. सुरुवातीला इतकं गडबड करून निघायला नको पाहिजे होते.. आता पाय खूप दुखत आहेत.. पाच मिनिटाने निघूया.." मनस्वी

"अगं थांब काय? बसलो तर थांबतच बसावे लागते.. चल लवकर.." असे म्हणून कार्तिक तिचा हात पकडतो आणि हळूहळू चालू लागतो.. कार्तिक पुढे आणि मनस्वी त्याच्या पाठीमागे त्याच्या हातात हात घालून ती पण हळूहळू चालू लागते.. जेव्हा कार्तिक मनस्वीचा हात पकडतो तेव्हा त्याच्या हळूवार स्पर्शाने ती शहारली.. तो तिचा हात धरून चालत असताना तिला त्याच्यामध्ये एक चांगला, आयुष्यभर साथ देणारा असा कोणीतरी भेटला, जो फक्त तिच्यासाठी बनलेला आहे असे तिला वाटले.. आणि ती त्याच्याकडे बघत बघत त्याच्या मागून पायऱ्या चढू लागली.. कार्तिककडे बघता बघता आपण इतक्या पायऱ्या कशा काय चढू शकलो? याचेच तिला नवल वाटू लागले..

फायनली ते दोघे डोंगर चढून गेले.. वर गेल्यानंतर मनस्वीला खूप आनंद झाला.. ती इकडे तिकडे पाहत जणू आनंदच लुटत होती.. तिथे बरेच लोक आले होते.. जे ते त्या निसर्गाच्या सान्निध्यात आनंद लुटत होते.. जणू स्वर्गसुखच.. मनस्वी पण छान निसर्ग न्याहाळत होती.. तिथे भरपूर वारा सुटला होता.. मनस्वीला तो वारा जणू सुखदच भासत होता..

तो नयनरम्य देखावा आणि सोबत कार्तिक.. मनस्वी इकडे तिकडे करून सगळा निसर्ग न्याहाळत होती आणि कार्तिक तिच्या मागे जात होता.. भरभर जात असतानाच मनस्वी एका दगडाला ठेच लागून पडणार इतक्यात कार्तिक तिला पकडतो.. मग काय? दोघेही तेथे निवांत क्षणी एकमेकांच्या डोळ्यांत एकटक पाहत होते.. कार्तिक तर तिच्या आणखीनच प्रेमात पडतो.. तेवढ्यात त्या दोघांचे आईबाबा येतात.. त्यांचे आवाज ऐकून दोघेही सावरले..

"काय रे? काय चाललंय? झालं का सगळं बघून?" कार्तिकचे बाबा

"हो बाबा, आता तुम्ही बघून घ्या.. मग थोडा वेळ थांबून आपण निघूया.." कार्तिक

"बरं.." म्हणून त्या दोघांचे आईबाबा गेले.. आणि कार्तिक मनस्वी कडे बघू लागला.. पण मनस्वी तिच्याच तंद्रीत होती.. तिचे नेमके कार्तिकवर प्रेम होते की नाही हेच कळेना..

कार्तिक थोडा गोंधळला होता.. त्याला त्या क्षणी परीची आठवण आली.. ती असती तर अशा रोमँटीक क्षणी ती भरभरून लिहिली असती.. आणि तिच्या मनातलं बोलून देखील दाखवली असती.. पण परी कोण आहे? हेच समजेना..

"प्रेमा तुझा रंग कसा?
प्रेमा तू असा कसा?
कोणामध्ये तुझा वसा?
अन् तू होतोस कसा?"

काय सुंदर लिहिते ना परी...
क्रमशः





🎭 Series Post

View all