सारेजण कधीतरी एकत्र प्रवास सुरु करतात,
नवख्या प्रवासात खूप धम्माल मस्ती करतात,
हळू हळू प्रवास वेगाचा होतो,
वळणं नीटशी कळतच नाहीत, रस्त्याची आणि माणसांची सुद्धा...
कोणी एखादा मग मागेच राहतो, नव्या वाटांचा शोध त्याला घायचा असतो,
त्याच्या नसण्याने कोणाचं काही अडणार नसतं,
पण नात्याचं पहिलं पान गळू लागलंय हे कोणाच्याही ध्यानी नसतं....
अलगद प्रवास गंभीर होतो, मुखवट्यांचा जोश संपून जातो,
उघडी पडतात मग अनेक उसनी अवसाने,
दोष-आरोपांच्या फैरी झडतात, नात्यांचे बंध नकळत तुटतात,
पण कुणाचंच कशाने अडणार नसतं कारण कोणाविना काही अडत नाही हे प्रत्येकाला ठसवायचं असतं....
नवा नकाशा ठरतो, नवे जोडीदार ठरतात पण प्रवास चालूच राहतो,
नव्या मार्गाने पुढे जाता, कोणी दबक्याने आठवणीत रमतो पण मीच का म्हणून बळीच भावना दाबून ठेवतो,
वाटा ठरवून पण जुळत नाहीत कारण प्रत्येक वेळेस आपल्या अहंकारालाच पुढे जायचं असतं....