पिंजरा सोन्याचा अंतिम भाग

कथा पिंजऱ्यात अडकलेल्या तिची


पिंजरा सोन्याचा भाग ६


मागील भागात आपण पाहिले की निमिषा अखिलच्या बोलण्यात येऊन नोकरी सोडायचा निर्णय घेते. आता बघू पुढे काय होते ते..


अखिल आणि पियुच्या प्रेमासाठी निमिषा जॉब सोडून घरी बसली. पियुमध्ये तिचा वेळ कसा जायचा हे तिला समजत नसले तरी तिच्या ऑफिसची तिला आठवण येत होती. पियु शाळेत जायला लागली की परत ऑफिसला सुरुवात करायचा तिचा बेत होता. पण पुन्हा एकदा बाळाची चाहूल लागली. एकाला एक असावे या घरातल्यांच्या आग्रहाला ती परत बळी पडली. याही गरोदरपणात अखिल तिची मनापासून काळजी घेत होता. पियुचे सगळे करत होता. तिला त्याच्या वागण्यावर बोट ठेवता येत नव्हते पण काहीतरी खटकत नक्कीच होते. काय ते तिचे तिलाच सांगता येत नव्हते. अवघड जागेचे दुखणे झाले होते हे सगळे. तिच्या घरातले तर अखिलवर खूपच खुश होते. त्यामुळे त्यांनाही काही सांगता येत नव्हते. सांगायचे तरी काय? अखिल खूप प्रेम करतो, सगळी काळजी घेतो. नोकरी सोडण्याचा, बाळ होऊ देण्याचा निर्णय हा सर्वस्वी तिचाच होता. पण कुठेतरी तो आपल्यावर लादला गेला आहे असे तिला वाटत होते. दुसरा मुलगा झाला. त्याच्या बारशाला परत दादावहिनी आले होते. पियुच्या बारशानंतर वहिनी निवांत भेटल्याच नाहीत. सणासुदीला गावी गेले तरी निमिषा पियुच्या पाठी असायची. आणि वहिनींच्या डोळ्यात एक मूक भिती जाणवायची. बारशाला आलेल्या वहिनींच्या डोळ्यात निमाषाला सतत एक प्रश्न दिसत होता. " बजावले होते, तरिही अडकलीस ना या पिंजऱ्यात?" यावेळेस तर निमिषाला कोणाशीच काही बोलता आले नाही. पार्थचे नाव ठेवून मंडळी नेहमीप्रमाणे दुसर्‍याच दिवशी निघून गेली..
पियु मोठी झाली.. पार्थही मोठा होत होता.. आता हळूहळू निमिषाने यातून बाहेर यायचे ठरवले. आता अखिलने स्टॅन्ड बदलला होता. आधी निमिषाच्या प्रत्येक गोष्टीला मान्यता देणारा तो आता नकार देऊ लागला. त्यातूनच घडलेला सकाळचा तो प्रकार.. गेल्या पाच वर्षातल्या सगळ्या घटना निमिषाच्या डोळ्यासमोरून गेल्या. तिने स्वतःशीच ठरवले आणि निर्णय घेतला.
संध्याकाळी अखिल घरी आला तेव्हा घर शांत होते. तो आत आला. कधी नव्हे ते पार्थ आणि पियु यावेळेस झोपले होते. निमिषा बॅग भरत होती. झोपलेल्या मुलांना बघून अखिल थोडा घाबरला.

" मुले बरी आहेत ना?"
" हो.." निमिषा त्याच्याकडे न बघता बोलली.
" मग यावेळेस झोपली?"
" मुद्दाम झोपवले.."
" कशासाठी?" कधी नव्हे ते अखिल चिडला होता.

" मला तुझ्याशी बोलायचे आहे म्हणून.."

" त्यासाठी मुलांना झोपवायची काय गरज? आणि तू बॅग का भरते आहेस?"

" आपली बोलणी अयशस्वी झाली तर लगेच निघून जाण्यासाठी.."

" काय?" अखिल हादरला होता..
" तू असे काहिही करणार नाहीस.." अखिल बॅगमधले कपडे बाहेर काढत म्हणाला. "तुला माहित आहे मी नाही तुझ्याशिवाय राहू शकत."

" तसे तर मी ही तुझ्याशिवाय नाही राहू शकत. पण तू माझ्याकडे दुसरा पर्यायच ठेवला नाहीस."

" मी काय केले?"

निमिषाने त्याच्यासमोर गोळ्यांचे प्रिस्क्रीप्शन ठेवले.
" मी कामाला जाऊ नये, गरोदर रहावे म्हणून तू गोळ्या बदलल्यास माझ्या? आणि मी मूर्ख या सगळ्याला योगायोग समजत बसले. एकदा नाही दोनदा.." ते बघून अखिलच्या पायाखालची जमीनच सरकली..

" तुला हे कुठे सापडले?"

" तुझ्या कपाटात आतमध्ये. बहुतेक पार्थचा जन्म झाल्यावर तू या गोळ्यांबद्दल विसरला होतास. एवढा मोठा विश्वासघात. का? कशासाठी?" निमिषा रडत होती.

" प्लीज.. नको ना रडूस. मी नाही बघू शकत तुला रडताना.." अखिल निमिषाच्या जवळ जात बोलला.

" काय बाकी ठेवले आहेस तू माझ्याकडे? किती विश्वास होता माझा तुझ्यावर. किती अभिमान होता तुझा. असे वाटायचे की तुझ्याएवढे माझ्यावर कोणी प्रेम करूच शकणार नाही. का? का केलेस हे? काय मिळाले तुला माझे आयुष्य उद्ध्वस्त करून?" निमिषा तोंड हाताने झाकत म्हणाली.

" माझ्या लहानपणी आम्ही चौघे शहरात रहात होतो. गावी आजीआजोबा आणि धाकटे काकाकाकू रहात होते. मध्येच काय झाले माहित नाही. पण हे सगळे सोडून आम्ही गावी गेलो. तिथे काय झाले होते आम्हाला समजले नाही. पण काका खूप दारू प्यायला लागला होता. काकू सतत बाहेर असायची. वर्ष पण झाले नव्हते त्यांच्या लग्नाला. काकूचे आजीशी सतत भांडण चालू असायचे. काकू एक दिवस कोणालाच न सांगता निघून गेली ती परत आलीच नाही. त्या दुःखात काकाने आत्महत्या केली. आजी खूप रडली. रडताना सतत म्हणत होती. तिला बाहेर सोडले म्हणून ही वेळ आली. घरात बंद करून ठेवले असते तर ही वेळच आली नसती. तीच वाक्ये माझ्या आणि दादाच्या डोक्यात फिट्ट बसली. बायकोला बंद करून ठेवायचे. तिला बाहेर सोडायचे नाही. दादाने एका अनाथाश्रमात वहिनीला पाहिले. वहिनीशी लग्न करून त्याने तिला धाकात ठेवले, प्रसंगी मारलेही. ही पद्धत मला आवडली नाही. मी तेव्हाच ठरवले होते. माझ्या बायकोवर मी इतके प्रेम करीन की तिने मला सोडून बाकी कोणाचाच विचार नाही केला पाहिजे." अखिल डोकं हातात धरून बोलत होता. त्याच्या डोळ्यातून पाणी वहात होते. क्षणभर निमिषाला त्याची दया आली. पण तिने स्वतःला सावरले.

" तुमच्या काकूने असे पाऊल उचलले म्हणून माझ्यावर आणि वहिनींवर अन्याय केलात तुम्ही? वहिनींचे मला माहित नाही पण या पिंजऱ्यात अडकून जर मी जीव दिला असता तर तू काय केले असतेस अखिल?"

" तू, तू असे काही केले नसतेस.. मी नसते करू दिले.." अखिल निमिषाला घट्ट मिठीत घेत म्हणाला.

" तू विसरतो आहेस अखिल. तू जर हे अजून काही दिवस चालू ठेवले असतेस तर मी हे पाऊल उचलू शकले असते. त्या घर सोडून गेल्या म्हणून मी कोणाशी बोलायचे नाही , घराच्या बाहेर पडायचे नाही हा कोणता न्याय? हा असा विचित्र विचारच मी करू शकत नाही. तू मला पिंजऱ्यात ठेवू बघत होतास तुझ्या प्रेमाच्या. पण पिंजरा हा पिंजराच असतो. सोन्याच्या पिंजऱ्यात तू सोन्याचे दाणे जरी खायला दिलेस ना, तरी तो पक्षी जगूच शकणार नाही. आता विचार तू कर.. तुला या नको त्या विचारांच्या, मानसिकतेच्या पिंजऱ्यात रहायचे आहे की आपल्या सुखी कुटुंबासोबत?" निमिषाने विचारले.

अखिलने तिच्याकडे डबडबलेल्या डोळ्यांनी पाहिले. तिचे हात हातात घेतले. आपला चेहरा तिच्या हातात लपवला. निमिषाला तिचे उत्तर मिळाले. तिच्या सोनेरी पिंजऱ्याचा दरवाजा शेवटी उघडला होता..


कथा कशी वाटली ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all