पासपोर्ट

परदेशात पासपोर्ट हरवल्यावर काय होतं त्याची कथा

वसंत राव नुकतेच निवृत्त झाले होते. फंडांची  रक्कम अकाऊंट मध्ये जमा झाली होती. भरगच्च पेंशन दर महिन्याला मिळणार होती. म्हणजे तशी आर्थिक सुबत्ता होती. एका financial expert शी  बोलून त्यांच्या सल्याने त्यांनी फंडातली बरीचशी रक्कम कुठे कुठे गुंतवली होती. अशी सगळी व्यवस्था झाल्यावर, त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता बाई, एक दिवस रात्री जेवण झाल्यावर वसंत रावांना म्हणाल्या –

अहो, मी काय म्हणते,

अग म्हणल्यावरच कळेल न, आधीच कसं कळणार ? .

आणि असं म्हणून जोरात हसले. त्यांच्या मते त्यांनी मोठाच विनोद केला होता. पण सुनीता बाईंना तसं वाटलं नाही.

अहो, काय हे, प्रत्येक  गोष्ट कशी हसण्या वारी नेता तुम्ही ? ते काही नाही. आता माझं ऐकाच.

बरं ऐकतो , सांग काय म्हणतेस.

मी काय म्हणते,

अग पुन्हा तेच, काय ते बोल ना.

सांगतेच आहे पण तुम्ही बोलू द्याल तेंव्हा ना. आता मधे मध्ये बोलू नका. आणि मी काय सांगते ते ऐका.

ओके. बोल

रिटायर झाल्यावर आपल्याला बरेच पैसे मिळाले आहेत तेंव्हा आपण फिरायला जाऊ शकतो. थोडा फार खर्च करू शकतो. काय म्हणता ?

कुठे जायची इच्छा आहे तुला ?

आपण मध्यम वर्गीय आहोत, आणि तसं म्हंटलं तर आयुष्य गेलं, रोजच्या कटकटी आणि मुलांची दुखणी खुपणी आणि त्यांच्या खर्चाला प्राधान्य देऊनच. आता सगळे आपापल्या संसारात रमले आहेत. तेंव्हा आपण “आपलं” असं आयुष्य जगू की. आपल्या मनाला वाटेल, आपल्या मनाला भावेल असं काही तरी करू की. होईल थोडा खर्च, काय फरक पडतो ?

आता वसंत राव पण विचारात पडले. सुनीता बाईंच्या बोलण्यात तथ्य होतं.

खरच काय हरकत आहे कुठे जाऊया ? काश्मीर ?

अं हं, माझी इच्छा आहे युरोप टूर करायची. ट्रॅवल कंपनी सगळी व्यवस्था  आणि

सोय करते म्हणतात. मागच्या वर्षी, त्या सुधा ताई जाऊन आल्या त्या खूप तारीफ करत होत्या. आपण पण जाऊन चौकशी करूया का ?

अग आपण एकदा अमेरिकेला आणि Australia ला दोनदा जाऊन आलो आहोत. आता युरोप ला जाऊन काय वेगळं पहाणार ?

असू द्या हो, युरोप हे युरोप आहे आणि इंग्लंड पण आहे त्या पॅकेज मध्ये.

किती दिवसांचा टूर असतो ? तुझ्या त्या सुधा ताईंना जरा डीटेल मधे विचार मग ठरवू.

चालेल. उद्याच विचारते

दुसऱ्या दिवशीच सुनीता बाई, सुधा ताईकडे गेल्या. त्यांना तर खूपच आनंद झाला. त्यांच्या युरोप ट्रीप बद्दल कोण इंट्रेस्ट दाखवला आहे हे कळल्यावर त्यांच्या  जि‍भेवर जणू काही सारस्वतीच अवतरली. त्यांच्या ट्रीप मध्ये सुनीता बाईंना काडीचाही इंट्रेस्ट नव्हता पण माहिती हवी असेल तर थोडं सहन करावंच लागणार होतं.

रात्री जेवणानंतर त्यांनी पुन्हा विषय काढला.

अहो सुद्धा ताईंशी बोलून आले मी.

काय म्हणताहेत त्या ?

माणशी सव्वा लाख लागतात म्हणाल्या त्या. पण हे डॉलर आणि रुपया च्या रेट वर अवलंबून असतं असं म्हणाल्या. सध्या ४३ रुपये चालू आहे म्हणाल्या. मग काय म्हणता ?

सुनीता, सव्वा लाख खर्च करणं हा काही प्रॉब्लेम नाहीये. पण मला फारशी इच्छा नाहीये युरोप ला जायची. तुझी एकट्याने जायची तयारी असेल तर तू जाऊ शकतेस. पहा.

अहो, असं काय करता ? आजवर मी एकटी, तुम्हाला सोडून  कधी कुठे गेली आहे का ? दोन वर्षा पूर्वी, त्या अनिकेत च्या लग्नाला जायचं माझ्या खूप मनात होतं पण तुम्ही येणार नव्हता म्हणून मग मी पण गेले नव्हते. ते काही नाही, मी कधी तुम्हाला यापूर्वी आग्रह केला का ? नाही ना, मग आता चलायचच  तुम्ही पण युरोप ट्रीप ला.

मग बरीच भवती न भवती होऊन वसंत राव ट्रॅवल ऑफिस मध्ये यायला तयार झाले.

सगळी माहिती दिल्यावर तो एजेंट म्हणाला की पुढच्या महिन्याच्या १८ तारखेला निघतोय. पण एकच जागा शिल्लक आहे.

आता प्रॉब्लेम झाला. सुनीता बाई म्हणाल्या दूसरा ग्रुप केंव्हा जाणार आहे ? त्या मध्ये बघा.

असं बघा आता ऑगस्ट चालू आहे आणि सप्टेंबर पर्यन्त तिथला बेस्ट सीजन असतो. तेंव्हा यांच्या नंतर कदाचित डिसेंबर उजाडेल.

बरं आम्हाला कोण कोण जातं आहे हे कळेल का ?

हो, ही बघा लिस्ट.

त्या लिस्ट मध्ये सुनेत्रा वाडकर चं नाव दिसलं.

अहो हे बघा सुनेत्रा पण जाते आहे असं दिसतंय.

असं ? बघू. मग आता तू एक काम कर सुनेत्राशी बोल. आणि मग तुला वाटलं तर जा. तिची कंपनी असेल तर तुला एकटीला जायला काहीच प्रॉब्लेम नाहीये.

सुनीता बाईंना वसंत रावाचं बोलणं काही आवडलं नाही, पण त्या गप्प बसल्या. उद्या सांगतो असं सांगून ती दोघं निघाले.

घरी आल्यावर सुनीता बाई म्हणाल्या

तुम्ही सुनेत्राशी बोल असं का म्हणाला हो ? तुम्हाला खरंच यायची इच्छा नाहीये का ?

असं बघ, जर तुला चांगली कंपनी मिळत असेल तर काय हरकत आहे ? मला  खरंच युरोप मध्ये इंट्रेस्ट नाहीये. तू बोलून तर बघ, जर नाही जुळलं तुला, तर मी आहेच.

सुनेत्राशी बोलणं झाल्यावर सुनीता बाई म्हणाल्या की ती पण एकटीच जाते आहे. आणि मी येण्याचा विचार करते आहे म्हंटल्यांवर तर फारच खुश झाली.

म्हणाली बरं बाई तू येणार आहेस. मला पण सुटल्या सारखं झालं नाही तर परदेशात एकटीने जायचं धाडस तर केलं, आणि बूकिंग पण केलं, पण जरा धाक  धुकच होत होती. आता बरं वाटतंय. तू पण येच नक्की. मी तुझ्या फोन ची वाट पाहते.

मग ? काय विचार ठरतोय ?

काय करू ? तुम्हीच सांगा.

अग बिनधास्त जा. सुनेत्रा तुझी बाल मैत्रीण आहे आणि आज तागायत तुमचे

संबंध टिकून आहेत. तुम्ही दोघी बरोबर असल्या तर तुम्हाला पण वावरणं सोपं होईल.

खरं आहे तुमचं म्हणण पण अहो, मी आजवर एकटी कुठेच गेले नाहीये, नेहमी तुम्ही बरोबर असताच.

हो, पण आता तुम्ही दोघी असाल नं, आणि दोघी ग्रॅजुएट आहात, अडाणी नाही. सुनेत्रा तर नोकरी करते आहे. आणि मैत्रीण बरोबर असल्यावर तुला माझी आठवण सुद्धा येणार नाही. परत फक्त १५ दिवसांचाच तर प्रश्न आहे. ते ही तुम्ही ट्रॅवल कंपनी बरोबर जाणार आहात, सगळी काळजी घेतीलच ते. हे १९९० साल आहे, आपण एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. अठराव्या शतकात नाही. आता सगळ्या सोई झाल्या आहेत.

त्या रात्री सुनीता बाईंना नीट झोप लागली नाही. कसं होईल, काय होईल याचाच विचार रात्रभर डोक्यात चालू होता.

दुसऱ्या दिवशी दोघंही जाऊन सुनीता बाईंचे पैसे भरून आले.

ट्रॅवल कंपनी च्या ऑफिस मध्ये त्यांनी एक क्लास घेतला. त्यात कुठल्या देशातले लोक कसे असतात, सामानाची काळजी कशी घ्यायची, सामान किती आणि कोणचं घ्यायचं आणि पासपोर्ट, विसा आणि बाकीचे पेपर्स  कसे सांभाळायचे यांच्या सूचना दिल्या. विशेषत: पासपोर्ट हा गळ्यातल्या पिशवीतच ठेवा असं सांगितलं. ही खास पिशवी सुद्धा त्यांनी दिली होती. आणखीही बऱ्याच सूचना होत्या आणि ह्या सगळ्यांचं प्रिंट आउट पण दिलं.

सुनीता बाई, दोनदा, तीनदा परदेश वारी करून आल्या होत्या. त्यामुळे त्यांना या सगळ्या माहितीचं विशेष काही वाटलं नाही. पण घरी गेल्यावर वसंत राव म्हणाले की दिलेल्या सर्व सुचनांच तंतोतंत पालन कर. आधी मी तुझ्या बरोबर होतो सगळी काळजी घ्यायला. आता तुझं तुलाच सांभाळायचं आहे.

सगळी तयारी झाली. आणि निघण्याचा दिवस पण उजाडला. आणि सर्व सोपस्कार होऊन विमान उडालं सुद्धा. हा संपूर्ण वेळ सुनेत्रा आणि सुनीता बाई बरोबरच होत्या.

लंडन ला सगळे जणं हॉटेल वर पोचले.. थोडं फ्रेश होऊन आणि ब्रेक फास्ट करून बकिंगहॅम पॅलेस बघायला सगळी वरात निघाली.  

सगळ्यांनी पासपोर्ट गळ्यातल्या पिशवीत ठेवला होता पण सुनेत्राने मात्र पर्स मध्ये ठेवला होता.

सुनेत्रा, पासपोर्ट पर्स मध्ये का ठेवते आहेस.

अग, ते मला आवडत नाही बिल्ला लटकवल्या सारखं. कैदी नंबर २०३ असल्या सारखं वाटतं. मग सुनीता बाईंनीही आपला पासपोर्ट पर्स मध्येच ठेवला.

पॅलेस वर पोचल्यावर सुनेत्रा आणि सुनीता बाईंच्या बरोबर एक वेगळीच बाई चालत होती. हिन्दी सायडर दिसत  होती. सुनेत्राने हिंदीतच विचारलं सुद्धा की

तुम्ही आमच्या ग्रुप बरोबर आहात ? तुम्हाला आज प्रथमच पाहते आहे.

मी तुमच्या बरोबरच आहे पण मी दुबई हून आल्या मुळे आत्ता जॉइन झाले आहे.

माझं नाव सिमरन कौर पण सगळे मला सिमी म्हणतात. तुम्ही पण सिमी  च म्हणा. आणि मग चालता चालता  बराच वेळ गप्पा झाल्या. दोघींनाही तिचा स्वभाव आवडला.

तिची जणी मग वॉश रूम  मधे  जायचं होतं म्हणून तिकडे गेल्या. तिथे बरीच रांग होती म्हणून रांगेत उभ्या राहिल्या. सुनीता बाईंचा नंबर लागल्यावर त्यांनी आपली पर्स सुनेत्रा जवळ दिली आणि त्या आत गेल्या. थोड्या वेळाने पाहतात तो सुनेत्रा पण आत आलेली दिसली.

अग, सुनेत्रा, पर्स कुठे आहे ?

सिमी बाहेर आहे तिच्या जवळ दिल्या आहेत.

ठीक आहे.  

सगळं आटोपून, फ्रेश होऊन दोघी जणी बाहेर आल्या. सिमी कुठेच दिसेना.

अग बाई, ही सिमी कुठे गेली ? सुनीता बाई बोलल्या.

असेल इथेच कुठे तरी.

पांच मिनिटं वाट पाहून सुद्धा सिमी दिसली नाही, तेंव्हा मात्र दोघी घाबरल्या.

रांगेतल्या एक बाईनी त्यांची अवस्था बघितली आणि विचारलं की

Are you searching anybody ?

मग सुनेत्राने त्यांना सिमी बद्दल सांगितलं आणि तिच्या जवळ आमच्या पर्स दिल्या होत्या असं सांगितलं.

She left, but your purses are kept there.

दोघी धावल्या. आधी पर्स उघडून बघितली. सुनेत्राचा होता पण सुनीता बाईंचा पासपोर्ट गायब होता. पुन्हा पुन्हा पर्स चेक केली पण व्यर्थ.

आता काय करायचं ग ?- सुनीता बाई बोलल्या. हवालदिल झाल्या होत्या बिचाऱ्या.

आधी आपण ग्रुप जिथे आहे तिथे जाऊ आणि . caretaker  ला सांगू असं सुनेत्रा म्हणाली.

Caretaker  ला सांगितल्यावर तो म्हणाला की,

तुम्हाला बजावून सांगितलं होतं की पासपोर्ट गळ्यातल्या . पिशवीत ठेवा म्हणून

ते याच कारणं साठी. तुम्ही ऐकलं नाही. आता कठीण परिस्थिती उद्भवली आहे. आता तुम्ही इथेच बसा. तुम्हाला पॅलेस मध्ये जाता येणार नाही. आता आधी FIR

दाखल करावा लागेल. तुम्ही थोडा वेळ इथेच बसा. माझा सहकारी येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल.

त्याचा सहकारी आल्यावर तो बाकी सगळ्यांना पॅलेस दाखवायला घेऊन गेला. आणि सुनीता बाई पोलिस स्टेशन मध्ये. तिथे गेल्यावर त्यांना सांगण्यात आलं की ही FIR ची कॉपी घ्या आणि embassy मध्ये जा आणि प्रोविजनल पासपोर्ट घ्या. त्या पासपोर्ट वर तुम्हाला वापस इंडियात जाता येईल. पण U. K. मध्ये आता फिरता येणार नाही. तुम्ही ज्या हॉटेल वर उतरला आहात तिथेच थांबा. हा FIR जवळ ठेवा. म्हणजे कोणी तुम्हाला embassy मध्ये जातांना अडवणार नाही.

आता काय ? – सुनीता बाई

आता embassy.

Embassy मध्ये त्यांना आत तर जाऊ दिलं. पण बऱ्याच वेळ बसल्यावर सुद्धा त्यांच्याकडे कोणी लक्षच दिलं नाही. Caretaker ला सुनीता बाईंनी विचारलं की इथे तुमची कोणाशी ओळख नाहीये का ?

नाही तसा मी नवीनच आहे इथे, त्या मुळे माझी कोणाशीच ओळख नाहीये.

सुनीता बाईंनी कपाळाला हात लावला. हेच व्हायचं बाकी होतं.

शेवटी एक जण त्यांच्या कडे आला आणि म्हणाला की जे लॉस्ट पासपोर्ट चं काम बघतात, ते आज अत्यंत बिझी आहेत त्यामुळे तुम्ही उदया या. तुमचं काम होऊन जाईल. त्यांनी एका कागदावर उद्याच्या प्रवेशा बद्दल लिहून दिलं. सुनीता बाई, हॉटेल वर परतल्या. Caretaker नी हॉटेल च्या मॅनेजर ला सांगितलं की यांचा पासपोर्ट हरवला आहे. आणि उद्या त्यांना embassy मधून प्रोविजनल मिळणार आहे.

पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ग्रुप ला फ्रांस ला जायचं होतं, म्हणून सगळा हिशोब करून झाला होता. आता संध्याकाळ पासून जर सुनीता बाईंना हॉटेल वर राहायचं असेल तर १०० पौंड पर डे पडणार होते. ट्रॅवल मॅनेजर ने सांगितलं की ही सोय त्यांनाच करावी लागणार आहे म्हणून. सुनीता बाईंच्या जवळ फक्त २५० पौंड होते. त्यांनी ट्रॅवल एजेंट ला विचारलं की आता काय करू तर त्यांनी खांदे उडवले आणि म्हणाला, की तुम्ही आमच्या सुचनांच पालन केलं नाही. आणि पासपोर्ट हरवला. आता ही तुमची जबाबदारी आहे. मी काही करू शकत नाही. आणि पासपोर्ट मिळाल्या शिवाय तुम्ही इथे फिरू शकत नाही आणि इंडियात पण जाऊ शकत नाही.

आज तुम्ही embassy त जा आणि बघा काय होतेय ते. माझा सहकारी येईल तुमच्या बरोबर embassy मध्ये पण आज संध्याकाळ पासून तो पण असणार नाहीये. You will be on your own. आता मात्र सुनीताबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. वसंत रावांना फोन करायची पण सोय नव्हती कारण घरी फोनच नव्हता. त्यांना रडायला येत होतं पण रडून भागणार नव्हतं. सुनेत्रा ला थांबणं शक्य नव्हतं. तिच्या ही जवळ इतके पैसे नव्हते. तिला फार वाईट वाटत होतं पण तिचाही नाईलाज झाला होता. ट्रॅवल कंपनी बरोबर जायचं आहे आणि सगळी सोय ते लोकच करणार आहेत म्हंटल्यांवर कोणीच फारसे पैसे बरोबर घेतले नव्हते.

Embassy त गेल्यावर कालचाच माणूस भेटला. केरळी माणूस होता. रंगनाथन  नाव होतं त्याचं. त्यांनी सुनीता बाईंची नीट चौकशी केली. मोडक्या तोडक्या हिंदीत त्यांनी सुनीता बाईंना धीर दिला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. आणि मग सांगितलं की हे काम इतक्या सहजा सहजी होत नाही. तुम्हाला पासपोर्ट मिळेल पण आठवडा तरी लागेल. तुमचे पेपर इंडियात जातील तिथे scrutiny होईल मगच तुम्हाला प्रोविजनल पासपोर्ट मिळेल. आता काय करायचं ? सुनीता बाई जवळ इतके दिवस हॉटेल मध्ये राहण्या साठी पैसेच नव्हते. त्यांना रडायला यायला लागलं. रंगनाथन ला काही माहीत नव्हतं. त्यानी खोदून खोदून  सुनीता बाईंना विचारलं की काय प्रॉब्लेम आहे म्हणून.

हॉटेल वाला म्हणतो की ट्रॅवल चं बूकिंग आज संध्याकाळ पर्यंतच होतं. आता तुम्हाला इथे राहता येणार नाही कारण तुमच्या जवळ पासपोर्ट नाहीये. आणि तरीही राहायचंच असेल तर दिवसाचे १०० पौंड पडतील, आणि माझ्या जवळ एवढे पैसे नाहीयेत.

तुमचं इथे कोणी ओळखीचं किंवा कोणी नातलग आहे का ?

अग बाई हो, ते माझ्या लक्षातच आलं नाही. चला हा प्रश्न सुटेल आता. माझा पुतण्या असतो इथे, आणि माझ्या भावजईच्या भावाचा मुलगा पण असतो इथे. पण मी फोन कुठून करू त्यांना ?

तिथे पे फोन होता. रंगनाथन सुनीता बाईंना तिकडे घेऊन गेला. ही नाणी आहेत, ही टाकून फोन लावा. वेळ संपल्यावर पुन्हा टाका.

सुनीता बाईंनी पुतण्याला फोन लावला.

मी सुनीता काकू बोलते आहे.

कुठून बोलते आहेस ?

मी लंडन हूनच बोलते आहे. जरा प्रॉब्लेम झाला आहे, माझा पासपोर्ट हरवला आहे आणि नवीन मिळायला आठ दिवस लागतील असं म्हणताहेत. मला तुझ्याकडे घेऊन जातोस का ?

पुतण्या काही बोलणार त्यांच्या आधीच त्याची बायको बोलली आणि सुनीताबाईंना ते स्पष्ट ऐकू आलं. किंवा त्यांना ऐकू जावं म्हणून ती मुद्दामच मोठ्याने बोलली. काही असो, तिने नवऱ्याला झापलं. मतितार्थ  इतकाच होता की सुनीता बाईंनी त्यांच्या कडे यायचा विचारही करू नये. आणि तिनेच फोन बंद पण केला. याचीच पुनरावृत्ती भावजईच्या भावाच्या मुलाशी बोलतांना झाली. रंगनाथन ला सुनीता बाईंचा चेहरा पाहूनच कळलं की काय झालं असेल ते. त्यांना अश्या गोष्टींची सवय होती. असे नाकारणारे बरेच लोकं लंडन मध्ये राहत होते.

आता काय करायचं ? सुनीता बाई आता खरोखरी निराधार झाल्या होत्या. त्यांच्या मनात येऊन गेलं की वसंत राव बरोबर असते तर ही परिस्थिती कधीच आली नसती. त्या तिथल्या खुर्चीवर बसून राहिल्या. त्यांचं डोकं आता काम करत नव्हतं. अश्या विचित्र परिस्थितीत आपण सापडू असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं. त्याची कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. त्यांना असं असहाय्य बसलेलं बघून रंगनाथन ला सुद्धा खूप वाईट वाटलं. तो शेजारीच चूप चाप उभा होता.

इतक्यात त्याचा एक सहकारी त्याला शोधत आला. त्याच काही काम अडलं होतं

आणि ते विचारायला तो आला होता. त्यांनी सुनीता बाईंना पाहीलं आणि त्याला थोडा फार अंदाज आला. त्यांनी रंगनाथन ला मल्याळम भाषेतून विचारलं आणि रंगनाथनने त्याला मल्याळम मध्येच काय घडलं आहे ते सांगितलं. एक सधन घरातली बाई  आणि  कोणच्या अवस्थेतून जावं लागतेय हे पाहून त्याला सुनीता बाईंची कीव आली. तो म्हणाला की त्याचा एक मित्र आहे, त्याला विचारून बघू का ? तो जरा दूर राहतो पण आठ दिवस राहायचा प्रॉब्लेम सुटून जाईल. आणि तेवढ्या वेळात तू यांचा पासपोर्ट बनवून ठेव. रंगनाथन पण त्याच्या मित्राला ओळखत होता, त्याला पण ते पटलं. तो म्हणाला विचार. सुनीता बाईंना त्यांचं काहीच बोलणं कळत नव्हतं. त्या विमनस्क अवस्थेत तशाच बसून होत्या. त्यांना सगळा अंधारच दिसत होता त्यांच्या डोळ्या समोर.

रंगनाथन च्या सहकाऱ्याने त्यांच्या मित्राला फोन केला. त्याला सर्व परिस्थिती समजावून सांगितल्यावर तो तयार झाला. मग रंगनाथन ने सुनीता बाईंना सांगितलं की

माझ्या एका मित्रा कडे तुमची  आठ एक दिवस राहायची सोय होऊ शकते. तो पर्यन्त मी तुमचा  पासपोर्ट बनवतो. तुमची तयारी आहे का ?

सुनीता बाईंच्या जवळ हो म्हणण्या शिवाय काही पर्यायच नव्हता. पण त्या म्हणाल्या

माझ्या जवळ फारसे पैसे नाहीएत. मग कसं करणार ?

तुम्हाला एकही पैसा खर्च पडणार नाही. मग तर चालेल ?

अनोळखी माणसाकडे राहायचं ? त्यांना विचार पडला, पण जवळच्या लोकांनी धुडकावून लावलं होतं, त्यामुळे अजून काही शक्यता दिसत नव्हती. त्यामुळे सुनीता बाईंनी मान डोलावली.

मग रंगनाथन त्यांना म्हणाला की ऑफिस संपे पर्यन्त इथेच थांबा. मग मी तुम्हाला त्याच्या कडे घेऊन जाईन.

संध्याकाळी सहा वाजे पर्यन्त सुनीता बाई तिथेच बसून होत्या. त्यांच्या चहा पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था रंगनाथन ने केली होती. त्यामुळे काही त्रास झाला नाही पण सलग इतका वेळ बसून राहिल्यामुळे अंग मात्र अखडून गेलं होतं.

ऑफिस टाइम संपल्यावर, रंगनाथन आला आणि सुनीता बाईंना घेऊन त्यांचं सामान ताब्यात घेण्या साठी, प्रथम हॉटेल वर गेले. तिथे थोडी झंझट झाली. मॅनेजर म्हणाला की चेक आउट करायला उशीर झाला आहे त्यामुळे, एक दिवसाचे १०० पौंड आणि आमचा कस्टमर वापस गेल्यामुळे, ३०० पौंड एक्स्ट्रा असे ४०० पौंड द्यावे लागतील.

सुनीताबाईंना त्यांच्या बोलण्याचा आशय कळला  पण त्यांच्या जवळ केवळ २५० पौंड होते, काय करायचं आता ? त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने रंगनाथन कडे पाहीलं. रंगनाथन ला त्यांचा प्रॉब्लेम माहीत होता, त्यांनी मॅनेजरला पटवून देण्याचा प्रयत्न केला पण तो मुळीच बधत नव्हता.

शेवटी रंगनाथनने हॉटेलच्याच फोन वरुन सरकार मधल्या एका उच्चपदस्थ व्यक्तीला फोन केला.

पाचच मिनिटांनी मॅनेजरला हॉटेल मालकांचा फोन आला आणि मग एकही पैसा न देता सुनीताबाईंची सुटका झाली. त्यांचं सामान वापस मिळालं. आणि ते रंगनाथन च्या मित्रांच्या घरी जायला निघाले.

आपण कोणाकडे चाललो आहोत ? सुनीताबाईंनी विचारलं.

शेखरन नाव आहे त्याचं. तो आणि त्याची बायको हेमांगीनी अशी दोघंच राहतात नुकतच लग्न झालं आहे त्यांचं.

ते लोकं कसे तयार झालेत ? माझ्या माणसांनी तर मला ओळख सुद्धा दाखवायचं नाकारलं.

केरळी लोकं जग भरात पसरले आहेत. त्यामुळे कोणा न कोणावर असे प्रसंग कधी ना कधी येताच असतात. आपणच आपल्या माणसांना मदत केली नाही तर ते बरोबर होणार नाही. आता तुम्ही मल्याळी नाही पण भारतीय तर आहात, आणि एका असहाय्य महिलेला मदत केली नाही तर वरती आम्हाला जागा तरी मिळेल का ? खरं म्हणजे मी मा‍झ्याच घरी तुम्हाला नेलं असतं पण माझी  फॅमिली मोठी आणि घर अगदी छोटं आहे म्हणून शक्य झालं नाही. पण तुम्ही चिंता अजिबात करू  नका. ही माणसं चांगली आहेत. याचही घर छोटच आहे पण ते दोघंच आहेत ना, मग तुम्ही सामावून जाल.

शेखरन च्या घरी पोचले. सुनीताबाई, जरा भीत भीतच घरात  शिरल्या. समोरच हेमांगीनी उभी होती. ती सुनीताबाईंना आत घेऊन गेली. पाहता क्षणीच हेमांगीनी, सुनीताबाईंना आवडली. शांत सोज्वळ चेहरा पाहून सुनीताबाईंना जरा बरं वाटलं. दुधात साखर म्हणजे ती मुंबईची होती तिचं आणि सगळं शिक्षण मुंबईतच झालं होतं त्यामुळे तिला चांगलं मराठी आणि हिन्दी येत होतं. सुनीताबाईंना पाहिल्यावर तिने ओळखलं की सुनीताबाई मराठी आहेत म्हणून. तिने एकदम मराठीतच बोलायला सुरवात केली. आता सुनीताबाईंना आश्चर्याचा धक्का बसला.

थोड्याच वेळात त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. हेमांगीनीला तर माहेराचाच भास झाला. थोड्या वेळाने सुनीताबाईंना सांगून रंगनाथन निघाला. पासपोर्ट झाल्यावर काळवतो म्हणाला. आता सुनीताबाईंना कसलीच चिंता नव्हती. थोड्या वेळाने हेमांगीनी किचन मध्ये गेली, तिच्या पाठोपाठ सुनीताबाई पण गेल्या. हेमांगीनी म्हणाली की अहो तुम्ही बसा.

अग मी मदत करते ना तुला. सकाळ पासून नुसतं बसून बसून कंटाळा आलाय.

सुनीता बाई आल्या होत्या म्हणून हेमांगीनीनी खास बॉम्बे स्टाइल स्वयंपाक केला. शेखरन ला पण जरा बरं वाटलं की जेंव्हा सुनीताबाई आल्या तेंव्हा किती हवालदिल दिसत होत्या, पण आता त्या अगदी घरच्या सारखं वावरत होत्या. चेहऱ्यावर काळजीचा माग मूस पण दिसत नव्हता सुनीताबाईंच्या मधे हा बदल इतक्या लवकर कसा  झाला असं त्यांनी हेमांगीनीला विचारलं. आणि तिने उत्तर दिलं की हा सगळा भाषेचा परिणाम आहे. आम्ही मराठीत बोलतो आहे म्हणून त्यांना अगदी घरच्या सारखं वाटतंय. सुनीताबाईंची हकीकत ऐकून  हेमांगीनीला खूप वाईट वाटलं. पण ती म्हणाली की रंगनाथन साहेब सर्व ठीक करतील याची तिला खात्री आहे. सुनीता बाईंना कुठे बाहेर जाणं शक्य नव्हतं म्हणून हेमांगीनी सुद्धा कुठे जात नव्हती. दोघींची इतकी घनिष्ट मैत्री झाली की आठ दिवस कसे निघून गेले ते कळलंच नाही.

मधल्या काळात, वसंत रावांना  फोन करावा असं सुनीताबाईंना वाटलं होतं, पण ते शक्य झालं नाही. वसंतराव काळजी करण्याचा प्रश्नच नव्हता कारण त्यांच्या मते त्या टूर एंजॉय करत असणार होत्या.

आठ दिवसांनी रंगनाथन घरी आले आणि त्यांनी सुनीताबाईंच्या हातात पासपोर्ट आणि विमाना चं तिकीट ठेवलं. सुनीताबाईंच्या डोळ्यात अश्रु आले. आणि त्यांनी ते थांबवण्याचा आजिबात प्रयत्न केला नाही. त्या भरलेल्या गळ्याने म्हणाल्या

माझ्या माणसांनी तर मला धुडकावूनच दिलं होतं. पण रंगनाथन साहेब, तुम्ही आणि हे पती पत्नी देवा सारखे धावून आलात हो, तुम्ही भेटला नसता तर माझं काय झालं असतं त्याचा विचार पण करवत  नाही.

आणि करूही नका. हेमांगीनी म्हणाली. तिच्याही डोळ्यात पाणी होतं. सुनीता ताई, तुम्ही भेटल्या आणि माझं माहेरच मला भेटायला आलं असं वाटलं. मी दोन वर्षांची असतानाच आई गेली. त्यामुळे आईची माया कशी असते हे तुम्ही भेटल्यांवरच कळलं.

रंगनाथन साहेब, या सगळ्याला किती खर्च झाला ते सांगा म्हणजे मी परत गेल्यावर ह्यांना सांगून तुमचे पैसे पाठवून देईन.

त्याची नका काळजी करू. आम्हीच वर्गणी करून हा सगळं खर्च केला आहे. आता परवाची फ्लाइट आहे ती  मात्र वेळेवर गाठा  आणि हा पासपोर्ट आता मात्र गळ्यात अडकावा, म्हणजे झालं. बरं येतो मी.

शेखरन आणि हेमांगीनी दोघेही त्यांना पोचवायला एयरपोर्ट वर आले होते. हेमांगीनी आणि सुनीता बाई दोघीही रडत होत्या. त्यांच्यात माय लेकीचं नातं निर्माण झालं होतं. हिंदुस्तानात आल्यावर नक्की नागपूरला येईन असं वचन घेऊन सुनीताबाई, चेक इन करायला आत शिरल्या.

**समाप्त**

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all