Login

परकी भाग ४ अंतिम भाग ( सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे)

परकी
जलद कथा
परकी (सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे)
भाग ४


राधाच्या मुलीकडून तिचे हाल आणि सख्ख्या भाऊभावजयींचे तिच्याशी वागणे ऐकून यमुनाताईंना खूप वाईट वाटले. जसे आपण वांगोटी आहोत म्हणून आपल्याला वाळीत टाकले तसे राधाची जबाबदारी झटकून तिला परके केले. “कदाचित आपण असतो तर असे झाले नसते.” असेही त्यांच्या मनात येऊन गेले. राधाची मुलगी सांगत होती, “मी लग्नाच्या वयाची झाल्यावर मोठ्या आत्याच्या आणि आजीच्या मनात काय आले देव जाणे. मी पदवीधर झाल्याबरोबर त्यांनी माझ्या आणि मोठ्या आत्याच्या मागे भुणभूण सुरू केली की मी मोठ्या आत्याच्या मुलाशी लग्न करावे. खरतरं माझ्या आणि आईच्या दोघींच्या मनात हे अजिबातच नव्हते. धाकट्या आत्या कडून आम्हाला खरे समजले. मोठ्या आत्याला आणि आजीला आपली मालमत्ता दुसऱ्या कुणाच्या नावे व्हावी असे वाटत नव्हते. म्हणून माझे लग्न आत्याच्या मुलाबरोबर करण्याचा दोघींचा मनसुबा होता. मग मी आणि आईने विचार केला की, “ कुणाशी तरी लग्न करायचे, मग माहितीतला बरा. आणि कमीतकमी मुलगा तरी चांगला आहे. त्याची नोकरी चांगली आहे.’ पण आम्ही दोन अटी घातल्या. मी आधी ह्यांच्याशी सविस्तर बोलले. त्यांना आजी आणि आत्या आमच्याबरोबर कशा वागल्या, कशा वागत होत्या ते सांगितले आणि मग अटी सांगितल्या. “आई कायम माझ्याबरोबर राहिल. मी तिला माझ्यापासून कधीही लांब ठेवणार नाही. आणि मी तुमच्याशी लग्न केले तरी मी आत्या आणि आजी बरोबर कधीही रहाणार नाही.’ त्यांनी ताबडतोब दोन्ही अटी मान्य केल्या. त्यांनाही त्यांच्या आईचे वागणे आवडत नव्हते. खरतरं मी कायम नोकरी करणार असे ही सांगितले होते, पण मुलांसाठी मला नोकरी सोडावी लागली. आमच्या लग्नानंतर हे आईशी खूप प्रेमाने वागत, बोलत होते. कधी चुकूनही ते आईचा अवमान करीत नव्हते. सगळ्यात आधी ते आईचा विचार करत. पण पाच सहा वर्षांनी त्यांची आणि आत्याची काही बोलाचाली झाली आणि यांचे मन बदलले. ते आईशी जरा फटकून वागायला लागले. तिच्याशी कमीत कमी बोलू लागले. कामावरून आल्या आल्या आई कुठे आहे विचारणारा एकदम बदलला. त्याना आई डोळ्यासमोर ही ते सारखे आईला वृद्धाश्रमात ठेव म्हणत होते. त्यावरून आमची भांडणे होत होती. ती आईने ऐकली. ती मला म्हणत होती “मी जाते वृद्धाश्रमात”, पण मीच “नाही” म्हणाले. “माझ्या आयुष्यात तिच्यामुळे काही होऊ नये” असे ती सारखी म्हणायची. म्हणून तिने हे पाऊल उचलले असावे. मी यांच्यावरही चिडले, खूप बोलले पण आता काय उपयोग? मुलांसाठी मी परत शांत झाले.” ती हमसून हमसून रडायला लागली. यमुनाताईंनी तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिला म्हणाल्या, “बाई दोन्हीकडे परकीच असते, होते. लग्न झाल्यावर ती माहेरच्या माणसांसाठी परकी होते आणि बाहेरून आली म्हणून ती सासरच्या लोकांना कायम परकीच असते. पण हे चित्र बदलायला हवे आणि स्त्रियांनीच ते बदलायला हवे. स्त्रीच स्त्रीची वैरी होते, म्हणून असे होते. कधी सासू म्हणून, कधी नणंद म्हणून तर कधी सून म्हणून. त्यांनीच एकमेकींना समजून घ्यायला नको का? स्त्री मुळेच वंशाला दिवा मिळतो, घरादाराची उद्धार होतो, मग तीच सासर आणि माहेर दोन्हीकडे परकी का होते? कारण ती इतरांवर अवलंबून राहते. म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. वेळ पडली तर आईचे नाहीतर दुर्गेचे रूप घेता आले पाहिजे. सगळे हळूहळू बदलेल पण बदलेल नक्की, आणि मग सगळ्यांना ती आपलीशी वाटेल, परकी नाही.”


समाप्त

©️®️सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज