जलद कथा
परकी (सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे)
भाग ३
परकी (सौ.हर्षाली प्रसन्न कर्वे)
भाग ३
पारूने समजावले तरी यामिनीताईंच्या आठवणी थोड्याच पुसल्या जाणार होत्या. त्यांच्या डोळ्यासमोर त्या आठवणी सतत येत होत्या, दिसत होत्या. “ जेव्हा त्या लग्न करून घरी आल्या तेव्हा सगळ्यात छोटी ही मुलगी, सतत माझ्या मागेपुढे करायची. मी हसले की हसायची, मी रडले की रडायची. सतत नवनवीन गोष्टी ऐकायला हव्या असायच्या तिला आणि आपण ही नवीन गोष्टी रचून सांगत होतो. अगदी खूप सुंदर नाते झाले होते आमचे आणि मला “मुलबाळ होत नाही म्हणून सगळ्यांनी वाळीत टाकले, तसे राधालाही माझ्यापासून दूर केले. तिला माझ्याकडे यायची, माझ्याशी बोलायची बंदी घालण्यात आली. बिचारी सारखी रडायची. तिचे रडणे ऐकून माझ्या पोटात कालवाकालव व्हायची, पण इतर कुणाला पाझर फुटायचा नाही. मला वाळीत टाकले, पण ह्यांनाही त्याचा त्रास व्हायचा. राजाला माझ्यापासून तोडले आणि एका क्षणी ह्यांनी बाहेरच्या देशात जायचे ठरवले. आणि राधा माझ्यापासून कायमची दूर झाली.” विचार करता करता यमुनाताईंचा डोळा लागला. सकाळी झोपेतून जागा झाल्या तर त्यांना धड उठवत ही नव्हते. कसेबसे उठून त्यांनी आवरून घेतले. चहा करून घेतला आणि परत जाऊन पलंगावर आडव्या झाल्या.
पारू आली तेव्हा त्या झोपल्याच होत्या. पारूला उठवताना तिला त्यांचे अंग गरम लागले. तिने त्यांना उठवले, चहा करून दिला आणि डाॅंक्टरांना फोन करायला लावला. औषध घेतल्यानंतर दोन तीन दिवसात त्यांना बरे वाटले. चार दिवसांनी राधाबाईंची मुलगी अचानक यमुनाताईंना भेटायला आली. त्यांना वाकून नमस्कार केला आणि म्हणाली, “मामी, तुला आश्चर्य वाटलं असेल ना मी आले म्हणून. माझ्या आईला डायरी लिहायची सवय होती. आई गेल्यानंतर ती मला वाचायला मिळाली. त्यात तुझा उल्लेख अनेकदा आला आहे. अगदी तिने हे आत्महत्येच धाडस करण्यापूर्वी सुद्धा आहे. म्हणून मी आज मुद्दामहून भेटायला आले आहे. मला हेच कळत नाहीये, इतके प्रेम होते तुमचे आईवर मग तुम्ही आईपासून लांब का गेलात आणि कशा गेलात?’ तिच्या प्रश्नाने यामिनीताईंच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि त्यांनी सर्व हकिकत तिला सांगितली. डोळ्यातले पाणी पुसले आणि तिला विचारले. “आईने हे पाऊल का उचलले? ती तुझ्याकडे का रहात होती?”
“आईचे लग्न आजोबांनी खूप चांगले स्थळ बघून करून दिले. माझे वडील एका सरकारी कार्यालयात कामाला होते. घरची परिस्थिती सुद्धा चांगली होती. पण घरात माझ्या आजीचा हुकूम चालत असे. तिने आईला कधीच आपले मानले नाही. त्यामुळे माझे वडील पण फक्त कामापुरते आईशी बोलत. तिच्या सुखदुःखाशी त्यांना काही देणे घेणे नव्हते. मुलगी झाली म्हणून माझ्या जन्माचे ही कुणाला कौतुक नव्हते. माझी आई फक्त त्या घरात मोलकरीण म्हणून रहात होती. तशीच वागणूक तिला दिली जात होती. माझ्या आजीने व वडीलांनी कधी माझे लाड केलेले मला आठवत नाही. मी दहा अकरा वर्षांची असताना त्यांनी अफरातफर केली म्हणून त्यांची नोकरी गेली. त्यात दारूचे व्यसन लागले होते. त्यामुळे घरातील त्यांना मिळणारा भाव आपोआप कमी झाला. त्यांच्या तीन बहिणींनी घरात आणखी भांडणे लावायला सुरुवात केली. आईला तिथे काहीच स्थान नव्हते मग मी तर फारच लांब. आजोबा आजी गेल्यावर सगळ्या मामा मामींनी संबंध कमी केलेच होते, त्यात वडीलांची नोकरी गेल्यावर त्यांनी पूर्ण संबंध तोडले. माझी आणि आईची जबाबदारी घ्यावी लागते की काय अशी भिती त्यांना वाटत होती. वडील गेले तेव्हा माझी बारावीची परीक्षा चालू होती. वडील गेल्यानंतर आत्यांनी सर्व मालमत्तेवर ताबा मिळवला आणि मला व आईला घराबाहेर काढले. ती कधीच त्या कुणासाठी ‘आपली’ नव्हती. घरातून बाहेर काढून त्यांनी आम्हांला पूर्ण परके केले. पण घरातून बाहेर काढल्यावर ही आई माहेरी गेली नाही. ती खूप स्वाभिमानी होती. आणि एकाही मानाने आमची साधी चौकशी सुद्धा केली नाही. मी छोटी मोठी नोकरी करत आणि आईने चार घरी स्वयंपाक करून आम्ही कसेतरी दिवस काढले.” सांगता सांगता तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
क्रमशः
©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
… … …
मिरज
… … …
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा