साक्षीला जाग आली ती बाबांच्या हाकेनेच.
तसं तिला बाबा कधी उठत नसत पण आज तिला बाबांनीच उठवलं.
बाबा म्हणाले, " सकाळी लवकर जरा उठत जा, आईला कामात मदत करत जा. तू आता मोठी झाली आहेस " .
साक्षीला वाटले , ' बाबांनी काही निर्णय घेतला असेल, त्यासाठीच उठवलं असेल '.
पण तसं काही झालं नव्हतं.
बाबा आवरून ऑफिसला निघून गेले.
साक्षी आणि साक्षीची आई दोघीही मिळून घर काम करत होते.
आईसारखी च साक्षी ही कामात चपळ होती. पण तिचं कामात लक्षच नव्हतं.
तिला घर काम खूप कंटाळवाणे वाटत असे. अभ्यास करताना तिला कधीही कंटाळा येत नसे. शरीराने आणि अभ्यास करून करून मन थकत असे पण दुसऱ्या दिवशी अभ्यासाला नव्या जोमाने लागत असे.
तिच्या आजूबाजूला तिच्याच वयाच्या मुली घरकाम खूप आनंदाने करत असताना दिसायच्या.
साक्षीला वाटत असे की , ' त्यांचा इतका उत्साह माझ्यात का नाही ' .
कारण निसर्गाने प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीत तरबेज बनवलेलं असतं.
फक्त ती दिशा ओळखून त्या दिशेने चालत राहणं आपलं कर्तव्य आहे.
साक्षीला शिक्षणामध्ये रस होता आणि त्यातूनच स्वतःला काही तरी सिद्ध करू शकली असती. कारण तिला घर कामामध्ये जास्त रस नव्हता.
अशातच जर तिचं शिक्षण बंद करून घरीच बसवून नंतर लग्न करून दिलं तरी तिचं घरा मध्ये लक्ष लागणार नाही.
थोडे दिवस कसातरी संसार करेल पण तिचं मन तिला खात राहिल .
त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या आवड ओळखून त्यादृष्टीने त्यांना योग्य ती दिशा दाखवून द्यावी.
जरी त्यांना शक्य नसले तरी सासरच्या लोकांशी तसं बोलणं करूनच संबंध जुळवावे. कारण मुलींचा परत कोंडमारा सुरू होतो.
लग्नानंतर तर जबाबदाऱ्या वाढत जातात आणि आर्थिक परिस्थिती ठीक नसेल तर संसार करताना ओढाताण होते.
जर मुलीचे अगोदरच शिक्षण पूर्ण केलेले असेल तर पुढे जाऊन ती नोकरी पण करू शकेल जर गरज असेल तर.
साक्षीच्या डोक्यातील विचार चक्र काही थांबत नव्हते.
ती आणि तिची मैत्रीण वर्ग शिक्षिकेच्या घरी गेल्या.
साक्षीने बाईंना सगळी परिस्थिती सांगितली. वर्गशिक्षिका ह्या मनाने चांगल्या होत्या पण किती दिवस त्या आर्थिक मदत करणार सगळ्यांना.
वर्ग शिक्षिकेने शिक्षणासाठी कर्जाच्या सुविधा उपलब्ध असतात असं साक्षीला सुचवलं.
साक्षीने ही गोष्ट घरी आल्यावर तिच्या बाबांना सांगितली.
बाबांनाही जरासं पटलं पण ते व्यावहारिक दृष्टीने विचार करत असायचे , ' कर्ज म्हणजे एक प्रकारचं चक्रव्यूह च आहे. एकदा का माणूस त्या कर्जाच्या सापळ्यात अडकला तर अडकत जातो जर त्यातून लवकर बाहेर नाही पडता आले तर.
मुलीला शिकवून , तिला नोकरी मिळवून , कर्ज फेडता येईल का?
मला तर ते शक्य होणार नाही माझ्या जेमतेम पगारामध्ये ' .
साक्षी चे वडील जरा शांतच राहिले.
साक्षी च्या आईने मार्ग सुचवला , ' सध्या तिला अकरावी- बारावी पूर्ण करू द्या पुढचं पुढे बघू ' .
तिचे बाबांनाही थोडंसं पटलं.
तिचे बाबांनाही वाटलं , ' दोन वर्षांमध्ये आपण ही कुठेतरी चांगलं स्थळ बघून पक्क करून ठेवावं ' .
" मुलगी अभ्यासामध्ये हुशार आहे, त्यामुळे थोडीशी अजून जबाबदारी तिच्या बाबतीत आपण ही घ्यावी. तसं ही तिला शिकवून तिच्या नोकरीचा आपल्याला काहीही फायदा होणार नाही " , हे सर्व साक्षीचे वडील तिच्या आईला सांगत होते.
आईलाही ते पटत होते.
शेवटी संसार हा दोघांनाच करायचा होता, त्यामुळे ते दोघेही एकमेकाला समजून घेत.
आर्थिक चणचण असेल तर आहे त्या गोष्टींमध्ये समाधान मानून घ्यावे लागेल. अशी शिकवण साक्षीच्या आईला मिळाली होती. त्यामुळे साक्षीची आई तिच्या बाबांना जास्त विरोध करत नसायची.
साक्षीच्या आईच्या मध्यस्थीने तिची अकरावी सायन्स शाखेमध्ये सुरू झाली.
साक्षी ही तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला जाऊ लागली.
कॉलेज ही फार मोठं नव्हतं जेमतेमच होतं. कॉलेजमध्येही देखाव्यापेक्षा ज्ञानावरच भर दिला जात होता.
आजूबाजूच्या गावातील मुले त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. मुलांचेही राहणीमान साधारणच होते. त्यामुळे साक्षीला त्या कॉलेजमध्ये जुळवून घेणं जास्त अवघड गेलं नाही.
अभ्यासामध्ये तर ती पहिल्यापासूनच हुशार होती . त्यामुळे सायन्स शाखेमध्ये तिला अवघड असा कोणताही विषय जात नव्हता.
सर्व मुले साधारण दिसत असली तरी तिला सगळे हुशारच वाटत होते. कारण मुलांची एकमेकांमध्ये स्पर्धा सुरू झाली होती.
साक्षी तिच्या बाबांच्या गाडीवर बसून कॉलेजला येत होती. त्यामुळे तिला कॉलेजला वेळेत पोहोचता येत होते व घरीही वेळेत जाता येत होते.
तिचा आता बाबांशी रोज सहवास होत होता. पण बाबांशी तिचा कधी मन मोकळा संवाद झाला नाही.
तिला सतत वाटायचे कि, ' बाबा - आई, आजी-आजोबांशी कसे मनमोकळे बोलतात , तसे माझ्याशी का बोलत नसतील ' ?
तिचा हा प्रश्न तिच्या जवळच राहिला.
पण ती अशा सगळ्या गोष्टी मागे सोडून कॉलेजमध्ये -अभ्यासामध्ये रमून गेली.
कॉलेजमध्येही तिला बऱ्याच मैत्रिणी भेटल्या. तिचा मनमोकळा स्वभाव होता.
ती हळव्या मनाची होती, त्यामुळे तिला कोणालाही मदत करायला आवडत असे.
अभ्यासात हुशार असल्यामुळे बऱ्याच मैत्रिणी तिला अभ्यासातील शंका विचारत असे. ती ही मनापासून सर्वांना शंका निरसन करण्यात मदत करत असे.
दिवस असेच पटापट निघून जात होते.
ती चांगल्या मार्कांनी अकरावी पास होऊन बारावी मध्ये गेली.
कॉलेजमध्येही तिच्या लक्षात आलं , ' की बऱ्याच जणांना डॉक्टर व्हायचे आहे. त्यामुळे स्पर्धा खूप आहे आपल्याला जीवाचं रान करून अभ्यास करावा लागेल. काहीही झालं तरी मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे ' .
साक्षीची आईही मेहंदी काढण्याचे ऑर्डर घेत असे व उन्हाळी काम ही शहरातील बायकांना करून पूरवत असे. त्यामुळे तिच्याकडे ही चार पैसे येऊ लागले.
घरातील वातावरण ही आनंदात होऊ लागले.
आर्थिक चणचण जर उरली नाही तर घरातील वातावरण ही पूर्णपणे आनंदामध्ये बदलत जाते.
समाजामधील बहुतेक सगळ्या स्तरातील लोकांमध्ये त्यांच्या संसारात आर्थिक चणचण निर्माण झाल्यामुळे भांडण जास्त होत असतात.
त्यामुळे जर प्रत्येक मुलीला चांगले शिक्षण देऊन तिच्या स्वतःच्या पायावर उभे केले तर तीही संसारामध्ये चार पैसे कमवू शकेल.
प्रत्येक घरातील आर्थिक परिस्थिती सुधारली तर घरातील भांडणे ही कमी होतील. त्यामुळे भारत देशातील लोकांनी स्त्रियांच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष द्यावे.
भारत देशामध्ये खरंच प्रगती साध्य करायची असेल, तर खेड्यापाड्यापासून सुरुवात करावी. कारण आपला भारत देश हा जास्त खेड्यांमध्ये मागासलेला दिसतो.
प्रगती करण्यासाठी खेड्यांमध्ये जास्त सुविधा उपलब्ध नसतात. आर्थिक प्रगती जर करायची असेल तर जनजागृती करायला हवी. त्यासाठी शासनाने पाऊल उचलायला च हवे.
शिक्षण नसल्यामुळेच स्त्रियांचा सासरची मंडळी जास्त छळ करतात.
शिक्षण न घेतलेल्या स्त्रिया ह्या ' अडाणी गटात ' मोडतात. त्यामुळे त्यांच्याकडे तुच्छतेने बघितले जाते.
सासरची मंडळी ही अशिक्षीत असतील तर घरामध्ये काही बरे वाईट झाले तर सर्व दोष आपल्या घरातील स्त्रियांना दिला जातो. हे सर्व अज्ञानामुळे होते.
त्यामुळे मुलगा असो किंवा मुलगी त्यांना प्राथमिक शिक्षणाबरोबरच महाविद्यालयीन शिक्षण ही द्यायला हवे. त्यामुळे समाजातील बरेच अज्ञान दूर होईल.
कारण महाविद्यालयीन शिक्षणामध्ये आरोग्य व आर्थिक बाबतीत विषय शिकवले जातात. त्यामुळे नक्कीच फायदा समाजाला होतो.
समाज सुशिक्षित झाला तर ' भारत देश ही आपला पूर्णपणे स्वावलंबी ' बनू शकतो.
आपला भारत देश ही आर्थिक दृष्ट्या सुदृढ बनू शकतो.
त्यामुळे ' शिक्षण म्हणजे फक्त लिहिता-वाचता येणे ' , एवढेच नव्हे तर आपल्या विचारांमध्ये ही बदल व्हावा.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर जसा आपण पाश्चिमात्य शिक्षणाचा अवलंब केला तसा विचारांमध्ये ही बदल करायला हवा.
शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्यासाठी नसून आधुनिक काळाप्रमाणे विचारांमध्ये ही बदल व्हायला हवा.
कारण फक्त खेड्यामध्ये अशिक्षित घरामध्येच स्त्रियांचा छळ होतो असे नाही शहरांमध्येही सुशिक्षित कुटुंबांमध्ये ही स्त्रियांचा छळ होतो.
म्हणून सुरुवातीपासूनच माझा भर हा फक्त विचार नसून ' सुशिक्षित विचार ' यावरच आहे.
कारण सुशिक्षित विचार असतील तरच ' समाजामध्ये उच्च क्रांती निर्माण होईल ' नाहीतर समाज हा विचाराने मागासलेला -बुरसटलेलाच दिसेल.