आज सकाळपासूनच घरात लगबग सुरू होती. नातेवाईकांनी घर भरले होते. शेजारमंडळी जमली होती. कारणही तसेच होते. वसुच्या सासऱ्यांना जाऊन वर्ष लोटले होते आज त्यांचे वर्षश्राद्ध होते. पुजापाठ झाल्यावर अल्पोहार घेऊन शेजारी परतायला तर लागली पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्न होते. कारण रात्रीच्या जेवणाचे रीतसर निमंत्रण कोणालाच नव्हते.
प्रकाश सगळयांसमोर नम्रपणे हात जोडून उभा होता. कोणी त्याच्या निर्णयाचे कौतुक केले तर कोणी नाक मुरडली.
वसुही त्याच्याबाजूला हात जोडून उभी होती.
महिन्याभरापूर्वीचा त्यांच्यातील संवाद तिला आठवला.
"प्रकाश माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं, बघ तुला पटते काय तर?" ती.
"काय?"
"घरी जेवणाचा कार्यक्रम करण्यापेक्षा एखाद्या अनाथाश्रमाला किंवा वृद्धाश्रमाला भेट देऊन ही रक्कम तिथे दान दिली तर? तुला काय वाटतं?" तिने त्याच्या कोर्टात चेंडू भिरकावला.
"वसू, खूप चांगली कल्पना आहे. माझी बायको शोभतेस बघ. माझ्या मनातदेखील काहीसे असेच होते." तिच्याकडे बघून तो म्हणाला.
"पण घरचे? ते तयार होतील ना?" तिचा प्रश्न.
"म्हणजे तुम्ही तिथल्या आजी आजोबांना त्यांचे नाव, वय विचारू शकता. तू ते नोट करू शकतेस." वसू रोहिणीकडे बघून म्हणाली. रोहिणीला मम्माचा प्लॅन आवडला हे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
तेथील वृद्धांचे चेकअप, त्यानंतर सहभोजन असा कार्यक्रम ठरला होता.
एक पिंजरलेली आजी तिच्या मते तर चक्क शंभरी पार केलेली. तरीही तिच्या चेहऱ्यावर सळसळता उत्साह होता.भूतकाळातील घटना जशाच्या तशा आठवणीत.
"बाबासाहेब आंबेडकरांनी दिक्षा दिली तेव्हा मी सहा वर्षांचे होते."दोन्ही हातांची सहा बोटे नाचवत ती सांगत होती.
अलीकडे तिला मात्र साऱ्यांचे विस्मरण होऊ लागले होते. तिचा गाणारा गोड गळा, पण तिला लळा लावणारे असे कुणीच नव्हते. कितीतरी जुनी गाणी तिने गाऊन दाखवली पण वसूने दिलेली औषधं कशी घ्यायची हे अर्ध्या तासात दहा वेळा तरी विचारून झाले. अगदी छोट्या छोट्या गोष्टीही ती विसरून जात होती.
अशा कितीतरी तिथे होत्या. कुणी मुलबाळ नसल्याने कोणाचाच आधार नाही म्हणून आलेल्या तर कोणी स्वतःच्याच मुलांनी घराबाहेर काढलेल्या. एक आजी जवळपास साठीची. चेहरा सुजलेला. विचारल्यावर कळलं की आठ दिवसांपूर्वी मुलाने मारहाण केली. सरकारी इस्पितळात भरती झाल्यावर सरळ इकडे दाखल झाली.
बायका निदान त्यांची दुःख तरी सांगत होती. पुरुषांचे काय? मुलाने रडायचे नसते हे बालपणापासून मनावर बिंबलेले. ह्या वयात त्यांच्या डोळ्यात कसे पाणी येईल? मनावर दगड ठेऊन तिथे राहणारे, नातवंडांच्या आठवणीत व्याकुळ होणारे अनेक आजोबा तिथे होते. पण सांगणार कोणाला?
इथेच भेटली एक पंच्याहत्तरीची आजी, प्रभाआजी! पांढऱ्याशुभ्र केसांची, गोऱ्यापान चेहऱ्याची. मुखावर एक प्रसन्नता त्यामुळेच की काय ती सर्वांच्यात वेगळी भासत होती.
"मला कसले टेंशन? इथे मस्त मला खायला प्यायला मिळते. गप्पा मारायला मैत्रिणी आहेत. आणखी काय हवे?" तिनेच वसुला उलट प्रश्न केला.
"तुला तुझ्या घराची आठवण येत नाही का?" छोट्या निनादने विचारले. त्याच्या प्रश्नावर वसूने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिले. आपले काय चुकले हे त्या लहानग्याला समजेना.
"नको गं त्याच्यावर रागाऊ. आता सवय झाली या प्रश्नाची." त्याच्या केसांना कुरवाळत वसुकडे बघून प्रभाआजी म्हणाली.
"सुरुवातीला यायची आठवण. खूप यायची. मग एकदा इथून घरी गेले. आत नाही, अंगणातच. तिथे असलेल्या मोगऱ्याचे रोपटे इकडे घेऊन आले. तेव्हापासून नाही येत मला त्या घराची आठवण."
वसुला काही कळले नाही. 'मोगऱ्याचा नी घराच्या आठवणीचा काय संबंध?'
इथल्या कित्येकांची हीच कहाणी आहे."
किती भरभरून ती बोलत होती.
आँचल में चांदणी
चुपकेसे देखेगी साजन को सजनी..'
आज तिच्या अंगणातला मोगरा पुन्हा फुलला असावा.. कदाचित!
-समाप्त -
******************
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*******
वृद्धाश्रमाची खरंच गरज असावी का? हा मनाला पडलेला प्रश्न.
ह्या म्हाताऱ्या माणसांना काय हवे असते? दोन वेळचे जेवण आणि प्रेमाचे दोन शब्द! ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, आपल्या पायावर उभे राहायला शिकवले. त्यांनाच त्यांच्या आयुष्याच्या सांजवेळी अशी वागणूक का मिळावी? होतही असेल त्यांच्या हातून कधी चूक, करत असतील आपल्या मुलांच्या आयुष्यात ते लुडबुड म्हणून त्याची एवढी मोठी शिक्षा? लहान असताना मुलांनी केलेल्या लुडबुडीला, त्यांच्या चुकांना आईवडिलांनी माफ न करता त्यांनाही असेच आपल्यापासून दूर ठेवले तर..?
मनात आलेला हाही एक अनुत्तरीत प्रश्न!
*******
फोटो गुगल साभार.