ओलांडला मी माझा उंबरा (भाग-2)

A Story Of Shy Girl
(मागल्या भागात आपण पाहिले की अर्णव असे अचानक शारिवाला डोळ्यासमोर पाहून संभ्रमात पडला. तो तिला काही विचारणार पण तिने तो विषय तूर्तास टाळला. ) आता पुढे....



    " फाफडा,  फाफडा, बोलो जेठालाल.स्पेशल फाफडा...! खास अहमदादसे आया है.. ढोकला गरमागरम... बोलो पानी की बोतल... चाॅकलेट मस्त , मस्त बच्चों का फेवरेट.... " फेरीवाल्यांचा आवाज ऐकून ती खडबडून जागी झाली. बघितले तर अर्णव मस्तपैकी तिच्या बॅगवर लॅपटॉप ठेवून काम करत होता आणि पाठीला आधार म्हणून स्वतःची बॅग ठेवली होती. तिला जरा विशेष वाटले की बॅग अशी कशी तो घेऊ शकतो...? म्हणजे आपण इतके बेसावध कधी झोपतच नाही. तिने एकवार तिच्या बर्थकडे पाहीले तर एक मऊ उशी तिच्या डोक्याशी होती आणि तो सोबत असतानाच ती इतकी बेसावध असायची.
       जुनी आठवण येताच तिच्या ओठावर मोहक हसू आले. त्याने चुटकी वाजवून तिची तंद्री भंग करत तिला विचारले, " अगं सकाळी आठ वाजता ट्रेन पकडली तू... तेव्हा झोपली ती आत्ता दोन वाजेपर्यंत .... अगं खाण्याची पण शुद्ध नाही का तुला...?"

"असे नाही रे रात्रभर काम करत होते. झोपलेच नाही. आमचं तुमच्यासारखं म्हणजे जाॅब करणार्‍या चाकरमान्यांसारखे नसते. एका आखलेल्या वेळेत काम करावे. नंतर सुट्टी...! असो मला मजा येतेय माझ्या कामाची...!" दिर्घ श्वास घेऊन  मनवा बोलली.

"ते जाऊ दे... तू आधी खाऊन घे.. बाहेरचे हवे की पॅन्ट्री मधून काही घेतेस..?." आर्यवीरने काळजीच्या स्वरात तिला विचारले.

"अरे इतकी काय काळजी करतोय तू अर्णव... माझी कोणी काळजी घेत आहे ही सवय मुळी सहा वर्षांपूर्वीच मोडली आणि मी इंटरमिडीएट फास्ट करत आहे. उपाशी राहण्याची सवय आहे मला...! " निर्धास्तपणे शारिवा उत्तरली.

   सांगून काहीही उपयोग होणार नाही अशा अविर्भावात अर्णव बर्थ वरून खाली उतरला. तिने त्याच्या बर्थ वर ठेवलेली तिची बॅग घेतली. स्वतः घरून आणलेले जिन्नस खाता खाता डाव्या हाताने सोबत ठेवलेल्या डायरीची पाने मनात येणाऱ्या विचारांनी खरडून भरत होती. अचानक गाडी सुरू झाली आणि तिच्या हातातून ती डायरी निसटली आणि नेमकी अर्णवच्या डोक्यावर पडली. बिचारा अर्णव...! शारिवाच्या विचारांचं ओझं तिच्या डोक्यावर येऊन आदळलं. त्या डायरीच्या आतील काही वस्तू खाली पडल्या. त्यात असलेले मोरपीस, आणि वाळलेले गुलाबाचे एक फूल दिसले. त्याने एकवार शारिवाकडे पाहिले तर तिच्या डोळ्यात पाणी तरळत होते.

     त्याने अलगद त्या वस्तू डायरीत ठेवल्या आणि डायरी तिच्या हाती सुपूर्द केली. कितीतरी वेळ अर्णव त्या भांबावलेल्या शारिवाकडे एकवार बघत होता. न ती काही बोलत होती ना त्याच्या नजरेला नजर मिळवत होती. असाच बराच वेळ गेला. बाकिचे आसपासचे काहूर  प्रवासी वामकुक्षी घेत होते तर काही आपापला प्रवासातला विरंगुळा म्हणून आवडती गोष्ट करत होते. अर्णवला राहून राहून ते मोरपीस डोळ्यासमोर येत होते. त्या विचारात तो सारखी कुस बदलत होता, पण काही केल्या त्याला मुळी झोप लागलीच नाही. तो तसाच बर्थ वर उठून बसला तर शारिवा आपली गपगुमान डायरी लिहिण्यात गुंग होती.

" अजुनही तू  तुला नको असलेल्या आठवणी का जपून ठेवल्या आहेत." न राहवून अर्णवने तिला विचारले आणि तिच्या हातातून डायरी काढून घेतली.

"कारण त्या जुन्या आठवणी पुन्हा सजीव होऊन डोळ्यासमोर आल्यानंतर त्या त्रासदायक होऊ नयेत म्हणून..." निर्विकारपणे तिने तिची डायरी पुन्हा स्वतःकडे घेतली आणि हलकेच गालातल्या गालात हसली.

" म्हणजे ?"  त्याने संभ्रम भावात येऊन तिला विचारले.

"म्हणजे..? म्हणजे .....वाघाचे पंजे .. कुत्र्याचे कान... शेळीचे दात आणि उंटाची मान..." तिने हसतच त्याला उत्तर दिले.

काही होऊ शकत नाही ह्या अविर्भावात अर्णवने मान डोलावली आणि स्वतःच्या सीटवर पहुडला.
क्रमशः


🎭 Series Post

View all