विभक्त कुटंबपद्धती - आजकालची सोयीस्कर रीत (२)

प्रस्तुत लेख विभक्त कुटुंबपद्धतीचे फायदे काय आहेत हे सांगतो.

राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा 

विषय: विभक्त कुटुंबपद्धती - आजकालची सोयीस्कर रीत (२)

जिल्हा : नाशिक


         खर तर मला असे ऐकून खूप बरे वाटते जेव्हा लग्नानंतर मुलगा आणि त्याची पत्नी दोघेही कुटुंबाच्या सहमतीने विभक्त राहून आपला संसार फुलवतात.या गोष्टीचे किंवा एका अर्थाने आजकालच्या या रीतीचे अनेक फायदे आहेत.

१. घटस्फोटांचे वाढते प्रमाण आटोक्यात आणले जाऊ शकते:

      आता बघा आपल्या सर्वांच्या कानावर हल्ली सतत घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत.बरोबर ना? जसे महागाईने सामान्य माणसाला त्रस्त करून सोडले आहे त्याप्रमाणे मुलीचे किंवा मुलाचे लग्न झाले की चार - सहा महिन्यात घटस्फोटाचे प्रमाण जणू काही एक चिंतेची बाब बनली आहे.म्हणजे आजकालचे आई वडील आपल्या मुलीचे किंवा मुलाचे लग्न लावताना खूप जागरूक झाले असल्याचे भासतात.नव्हे व्हायलाच हवेत,या मताची मी आहे.

     मग सर्व प्रथम या वाढत्या घटस्फोटांचे कारण काय असू शकते? तर सारासार विचार केला किंवा आतापर्यंत चे लोकांचे अनुभव ऐकले की एकत्र कुटुंब पद्धती याचे प्रामुख्याने कारण आढळते. माझ्या जवळच्या व्यक्तींच्या अनुभवावरून सांगते,एक जोडपे नुकतेच घटस्फोट घेऊन वेगळे झाले,कारण काय तर म्हणे सासू आणि नणंद खूप त्रास देत होत्या.दुसरे जोडपे घटस्फोट घेऊन विभक्त झाले कारण सासू सतत उणे दुणे बोलणे करायची आणि नवरी मुलगी यामुळे चक्क मानसिक रुग्ण बनली. तिसरे एक जोडपे पुन्हा घटस्फोट घेऊन विभक्त झाले कारण नवीन सूनेला एवढ्या जणांचा सुंदर स्वयंपाक करून सुद्धा सतत,\" हिच्या हाताला चवच नाही\", असे हिणवले जायचे.चौथे एक जोडपे विभक्त झाले कारण सासूच्या मैत्रिणीला नवीन सुनेने लवकर पाणी दिले नाही; त्यामुळे सासूने मुलास फर्मान सोडले की,\" हीची आपल्या घरात राहण्याची लायकी नाही,ही माझे ऐकत नाही,त्यामुळे तू तिला घटस्फोट दे.\" बघा म्हणजे ही कारणे काही गंभीर पण काही अतिशय अवाजवी किंवा गमतीशीर आहेत.

       म्हणूनच लग्नानंतर नवरा मुलगा आणि नवरी मुलगी वेगळे राहायला गेले तर बिघडले कुठे? आता माझीच एक मैत्रीण नवऱ्यासोबत बाजूच्याच बिल्डिंग मध्ये राहते,आणि सण वार असेल की सासूच्या घरी म्हणजे शेजारच्या बिल्डिंग मध्ये जाऊन मदत करते आणि एकत्र साजरे सुद्धा करते.मग बघा बर आहे की नाही इथे सामंजस्य?मला वाटतं आजकालची ही वाढलेली घटस्फोटाची प्रकरणे विभक्त कुटुंब पद्धती अंमलात आणली तर नक्कीच बऱ्यापैकी  आटोक्यात येतील .

२.नात्यात एकमेकांना स्पेस दिला जातो:

विभक्त कुटुंबपद्धती मध्ये नात्यात एकमेकांना स्पेस दिला जातो.याउलट एकत्र कुटुंबपद्धतीत प्रत्येक नात्यातील ओलावा हा केवळ नी केवळ सूनेनेच जपावा अशी मागणी नव्हे अपेक्षाच केली जाते. मी हे पटवून देण्यासाठी एक सत्य उदाहरण देऊ इच्छीते.

मदन आणि दिपाली यांचे लग्न झाले.तसे पाहिले तर दोघेही उच्चशिक्षित.दोघेही जॉब करत होते.पण घरातील प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत दिपालीने जॉब सांभाळून लक्ष द्यावे ही सासू सासऱ्यांची अपेक्षा.शिवाय तिने धाकट्या दीराला सतत चहा, नाश्ता,जेवण विचारले पाहिजे,अशीही सासू सासऱ्यांची एक तऱ्हेने बाळजबरीच असायची.मग चुकून एखाद्या दिवशी तिने घरातील कोणाच्याही आधी जेवायला घेतले की सासू मदन जवळ बायकोचे गाऱ्हाणे करत असे.मग मदन मी माझ्या आईपुढे काहीही बोलू शकत नाही ,तुला सर्व काम नोकरी सांभाळून करावेच लागेल असे म्हणू लागला,प्रसंगी तिच्याशी अबोलाही धरू लागला.मग या सर्व परिस्थितीला घाबरून दिपाली सर्वांना कितीही काम असले तरी ऑफीस वरून येवून मग रात्रीचे १० वाजले तरीही  छान जेवण बनवायची.आश्चर्य म्हणजे तोपर्यंत ज्यांना भूक लागायची ते मात्र चक्क मॅगी करून खायचे.

      पण दिपाली मात्र सर्वांना आपल्याबद्दल हेवा वाटावा म्हणून सतत राबू लागली.दिवसभर ऑफिस मध्ये आणि रात्री घरी.रविवार तर ती पूर्ण घरातील कामांमध्ये खूप व्यस्त असायची.म्हणजे दिपाली ही कुटुंबाची सून नव्हे तर मोलकरीण बनली होती.

३.आजकालचे आजी आजोबा मुले सांभाळण्यास असमर्थ ठरल्याने एकटे आई वडील दोघे मिळून उत्तम संस्कारी पिढी घडवू शकतात:

सोमेश आणि पूजा यांचे नवीन  लग्न झाले.पूजा तशी वाणिज्य शाखे पदवीधर होती,पण लग्नानंतर ती गृहिणी बनली.मग सासू सासऱ्यांच्या साहजिक तिच्याकडून अपेक्षा वाढल्या.मग दररोज काय नवीन मेन्यू बनवायचा हे तिला वेळापत्रकासारखे ठरवून देण्यात आले.घरातील संपूर्ण कामे तिच्याकडून केली जायची.जरा कधी ती निवांत बसली की सासू किंवा नणंद तिला काही तरी काम सांगून सतत व्यस्त ठेवायचे.त्यात सोमेश बाहेर गावी नोकरीला असल्याने तो पूजाला माझ्या घरच्यांना माझ्या विरहित नीट सांभाळ असे सतत सांगायचा.म्हणून पूजा सुद्धा तिच्यावर होणारा अन्याय नवऱ्याला वाईट वाटेल म्हणून  सहन करीत होती. तसा सोमेश रविवारी न चुकता घरी यायचाच.अशातच अती कामाच्या ताणामुळे तिला लवकर दिवस राहत नव्हते.घरातले तिला राब राब राबवत आहेत,हे सोमेशच्या लक्षात आले.

       त्याने त्वरित पूजाला आपल्यासोबत नोकरीच्या गावी शिफ्ट केले.त्याने तिथे व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली.त्यानंतर त्यांना दोन मुली झाल्या.पण पूजाची सासू मात्र मुलींना सांभाळायला आली नाही.इतक्या दिवस ज्या सासू सासऱ्यांसाठी,ज्या कुटुंबासाठी पुजाने आपले कष्ट दिले ते आता कोणीही तिच्या मदतीला पुढे येत नव्हते.कारण त्यांनी तिला गरज सरो वैद्य मरो या उक्ती प्रमाणे ,"तू तुझे बघून घे आम्हाला म्हातारपणात आता मुलांना सांभाळणे कठीण जाते," असे सांगितले. सोमेश ला मात्र त्याच्या आईवडिलांचा आता खूप राग आला होता पण शेवटी जन्मदाते असल्याने तो त्यांच्यापुढे हतबल होता.शेवटी त्याने व पुजाने आळीपाळीने आपल्या मुलींना सांभाळायचे ठरवले.मग आता सांगा असे आजी आजोबा काय कामाचे? इथे नॉर्मल मुले आजकालच्या आजी आजोबांना सांभाळण्यास जड होतात,तर स्पेशल किंवा मतिमंद मुलांना सांभाळणे तर यांच्याकडून अगदी अशक्यप्राय गोष्ट आहे.या स्पेशल मुलांच्या आई वडिलांना विशेष करून आईला मात्र सासू सासरे असूनही संसार सांभाळत,नाती जपत कठीण मातृत्वाची अग्नीपरिक्षा द्यावी लागते,हे मी अनेकदा पहिले आहे.

विभक्त कुटुंबपद्धती मध्ये मुलांच्या पोषणाकडे नीट लक्ष दिले जाते. याउलट एकत्र कुटुंब पद्धती मध्ये मात्र मुलांचे खाण्याचे बऱ्याचदा हाल होतात,त्यावरून भांडणे देखील होतात म्हणून त्यांचे पोषण नीट होत नाही. म्हणून विभक्त कुटुंबात प्रसंगी स्वतःचे करिअर पणाला लावून आई मुलांचा सांभाळ करते आणि त्यांना प्रगतीपथावर नेते.

४.विभक्त कुटुंबपद्धती खऱ्या अर्थाने स्वावलंबन शिकवते:


कत्र कुटुंबात वडीलधारे नेहमी एकमेकांची तुलना मुलांवरून करताना आढळतात. आता दोन भाऊ  असतील तर त्यातील एक नेहमी ,"त्याचा मुलगा इंजिनियर आहे मग त्याला काय कमी आहे?ते पैसा फेको तमाशा देखो या उक्तीप्रमाणे त्यांच्या त्यांच्या समस्या सोडवतील , आपल्याला आपले व्याप कमी आहेत का?" अशी विचारसरणी असणारे आहेत.त्यामुळे आपापल्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो.

विभक्त कुटुंबपद्धती मध्ये लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही स्वावलंबन खूप आधीच कळते; याउलट एकत्र कुटुंब पद्धती मध्ये मात्र एकमेकांवर प्रत्येक कामासाठी विसंबून राहावे लागल्याने स्वावलंबन अस्तित्वात येतच नाही,आणि आपसुकच मुलांवरही याचा परिणाम होतो.

५.आर्थिक नियोजन कधीच कोलमडत नाही:

 विभक्त कुटुंबपद्धती मध्ये आर्थिक नियोजनाचे बजेट कधीच कोलमडत नाही ;याउलट एकत्र कुटुंब पद्धती मध्ये मात्र फक्त एकालाच संपूर्ण घर चालवावे लागल्याने प्रचंड आर्थिक ताण सहन करावा लागतो.

६ एकमेकांना समजून घेत पुरेसा वेळ दिला जातो: 

विभक्त कुटुंबपद्धती मध्ये आई वडील कुठल्याही कौटुंबिक तसेच मुलांच्या समस्या एकमेकांना पुरेसा वेळ देऊन सोडवू शकतात.याउलट एकत्र कुटुंबपद्धती मात्र आई वडील दोघेही घरातील इतर कामे करण्यात ,सर्वांची मने सांभाळण्यात खूप व्यग्र असतात,म्हणून एकमेकांना तसेच मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही.त्यामुळे मुले बिघडली जाऊ शकतात किंवा सख्ख्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.

७. जुन्या चालीरीतींना झुगारून आधुनिकतेकडे वाटचाल करता येते :

 आजकालच्या तरुण मुलींना स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी, ध्येयप्राप्तीसाठी नोकरी करावी लागते. अशा मुलींवर लग्न झाल्यावर एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये  विशिष्ट सणवार असले की साग्रसंगीत पूजा करणे, दिवसभर निरंकार उपवास करणे, पाळी आली असेल तर स्वयंपाक घरात प्रवेश न करू देणे, साडी घालण्याची सक्ती करणे या गोष्टी बंधने म्हणून लादली जातात. आता अशा जॉब करणाऱ्या मुली एवढी बंधने पेलवू शकत नाहीत. मग  जर या मुलींनी नाही म्हणण्याची हिंमत केली तर त्यांना नास्तिक ठरवले जाते किंवा हिच्या आई-वडिलांनी हिच्यावर काही संस्कार केले नाहीत असे ऐकवले जाते. आता मग एकत्र कुटुंब पद्धतीतील मोठ्यांचे असे वागणे नोकरी करणाऱ्या मुलीचे स्वावलंबन प्रसंगी हिरावूनही घेऊ शकते. मग विभक्त कुटुंब पद्धतीत राहून जसे जमेल तसे सणवार साजरे केले तर बिघडले कुठे?

८. घरामध्ये विविध आधुनिक प्रयोग करता येतात:

एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मसाला वाटायला पाटा वरवंटा मोठ्या प्रमाणात आजही वापरला जातो. मग अशावेळी जर कोणी मिक्सर वापरले तर वादावादीही होऊ शकते. घराच्या रचनेत जर नवीन सुनेने घराच्या हितासाठी उदाहरणार्थ किचनमध्ये जर एक्झॉस्ट फॅन लावण्याची मागणी केली,  एखादी भाजी किंवा पदार्थ जरा वेगळा बनवला किंवा काही बदल सुचवले तर तिला कानामागून आली आणि तिखट झाली असे हिणवले जाते. मग विभक्त कुटुंबपद्धतीत जर आधुनिकतेचे विविध प्रयोग अवलंबले आणि जरा स्मार्ट पद्धतीने कामे केली तर नक्कीच कुटुंबातील सर्वांचाच विकास वेगाने होऊ शकतो. घरातील स्त्रीला देखील घरातील कामांच्या व्यापातून काहीतरी वेगळे करण्यास वाव मिळू शकतो.

        म्हणूनच कालपरत्वे प्रत्येकाने संभाव्य धोके ओळखुन विभक्त कुटुंबपद्धतीला प्राधान्य दिले तर लहानग्यांसोबत मोठ्यांचेही आयुष्य सुखकर होईल यात शंका नाही.

म्हणूनच 

करा स्वीकार विभक्त कुटुंबपद्धतीचा,

दिसेल मार्ग प्रगतीचा!!

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे