निरोप घेतांना

Story Of Women Who Loves Her Home
कथेचे नाव :- निरोप घेतांना 

विषय :- काळ आला होता पण...

फेरी :- राज्यस्तरीय लघु कथा स्पर्धा 



"आदिनाथ, काय ठरलं तुमचं ? येत आहात ना यंदा दिवाळीला साताऱ्याला." 
" दादा, आठ दिवसात कळवतो तुला ऑफिसचे शेड्युल बघून. मुलांच्या शाळेचे पण बघावे लागणार ना. तेव्हा थोडा वेळ दे, लागलीच तुला सांगतो. " इतकं बोलून आदिनाथने फोन ठेवला. 

" आदि, जाऊया ना साताऱ्याला यंदा दिवाळीला. हवं तर लवकर परत येऊ. परत ती गावतली मजा आपली मुलं कधी बघतील कोणास ठाऊक." लग्न करुन आल्यावर जान्हवीने त्या घराला कधी आपलेसे केले तिलाच कळाले नव्हते. जान्हवीचे डोळे भरून आलेले बघताच फार काही विचार न करता दुसऱ्या दिवशी आदिनाथने गुरुनाथला फोन लावला आणि जायचे नक्की केले. सगळे  सुख अनुभवत असतांना सुद्धा हीचे में मात्र अजुनही भारतातच अडकून आहे,हे बघून स्त्रीला समजून घेणं खरचं किती कठीण असतं, असं आदिनाथ जान्हवीला बोलता बोलता हळूच म्हणाला. बघता बघता दिवस कसे निघून गेले कळलेच नाही आणि आदिनाथची जायची वेळ आली. 

" गुरुनाथ दादा आम्ही उद्या निघतोय.बाकी साताऱ्याला आल्यावर सविस्तर चर्चा करु." आदिनाथने एवढं बोलून फोन ठेवला. 

जान्हवीने पटपट आवरायला  घेतले. लॉस एंजेलिस ते सातारा असा प्रवास लांब असल्याने फ्लाईट मध्ये खायला मिळत असेल तरी जवळ आपली शिदोरी हवीच म्हणून तिची तयारी सुरू होती. कचरा गोळा करून ठेवला. फ्रीज रिकामं केलं, भांडी स्वच्छ करून एका डब्यात घालून ठेवली, घरातील सगळे दार खिडक्या व्यवस्थित लॉक करून दोनदा तपासून घेतले. सामानाची यादी बघून सगळं सामान चेक करुन घेतले. आणि टॅक्सी मध्ये बसून एकदाचे एअरपोर्टला  आदिनाथ, जान्हवी, ईशान आणि स्वेहा  सहकुटुंब रवाना झाले. इकडे गाडीने वेग धरला आणि जान्हवीला एकदाचे कधी घरी जातो असे झाले.

एअरपोर्टला  पोहोचल्यावर  फ्लाईट दोन तास उशिराने झाली. आलिया भोगासी म्हणत फार काही प्रश्न न करीत दोन तास कसे जातील म्हणून सगळे त्रस्त झाले. तरीही वेळ जाता जात नव्हता. जान्हवी मात्र एकदम शांतपणे जणू वेळेशी संवाद साधत होती.  सारखं लक्ष घड्याळाकडे होत. कोरोना नावाच्या महामारीने प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही तरी बदल घडवून आणले होते. त्यात  मुलांना बाहेर घेऊन जाण्याची फारच भीती वाटत होती. शेवटी अनाउन्समेंट झाली आणि आपसूकच सगळ्यांचे चेहरे खुलून दिसले. लॉस एंजेलिस ते पुणे आठ्ठावीस तास आणि त्यानंतर पुण्यावरून बसने साताऱ्याचा प्रवास सुरू झाला.  

जागच्या पाठीवर कोठेही गेलो तरी मातृभूमीसाठी असलेलं प्रेम आणि ते जिव्हाळ्याचे नातं कुठेही असू शकत नाही हे जान्हवीला प्रत्येक वेळी आल्यावर जाणवतं होतं. हिरवाशालू पांघरलेला निसर्ग, झाडे डोंगर बघुन मन खुश झाले होते. मधेच सुंदर धुकही निसर्गाच्या सौंदर्याला चाँद लावत होते. तिने विचार केला, आपल्याला हे लवकर परत दिसणार नाही.  इकडे दरवर्षी प्रमाणे यायला मिळणार नाही, आपलं घर परत आपल्याला बघायला मिळणार नाही, म्हणूनच कदाचित देवाने अचानकपणे आपली भेट आपल्या घराशी घडवून आणली आहे." विचारात मग्न असताना एकदाची  टॅक्सी बस स्टॅन्डवर येऊन पोहोचली, तिथून  दोन- अडीच तास प्रवास  करून सकाळी आठच्या सुमारास साताऱ्याला थेट घरी घराजवळ बस थांबली.
 
घरी आलो आणि आई- वडील, दादा वहिनी, रोहन- मनाली सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद दिसत होता. दोन वर्षांनी संपूर्ण कुटुंब भेटले होते त्यामुळे तो आनंद कुठेतरी ओसंडून वाहत होता. मुलांनी तर एकमेकांना बघून धावत जाऊन घट्ट मिठी मारली होती. इतक्या दिवसांनी गाठी भेटी झाल्यामुळे घरात आनंदाचे तुषार अंगावर पडत होते. 

आदिनाथ आणि जान्हवी तातडीने भारतात आले, कारणही तसंच होतं. इतक्यात वयोमानानुसार आईची तब्बेत खलावल्याने एकट्या आईकडून घरची कामे होत नव्हती. सगळ्या कामांना नोकरांची रेलचेल असली तरीही साफसफाई तर करावीच लागायची. त्यात घर जुनं असल्याने आईला धुळीची ॲलर्जी झाली आणि अस्थमाचा त्रास सुरु झाला गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे गुरुनाथ दादाचे सुद्धा पुण्यावरून घरी येणे कमी झाले.

वडिलोपार्जित घर आता जुने झाले होते आणि आई बाबांनी एकटं राहणं आता दोघा भावांना ही पटत नव्हते. आलटून पालटून दादाकडे आणि आदिनाथ कडे आई राहायला तयार झाली. बाबांचा हट्ट कायम होता. परंतु परीस्थीतीनुरूप त्यांनी स्वतःला नमत घेतेल आणि  साताऱ्याचा घराला कुलूप लावून मुलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. 

खरतंर आज सगळं कुटूंब तिथे जमलं होतं ते  परत  सगळ नाही अनुभवता येणार हा विचार सतत मनात घेऊनच. जान्हवीला मात्र हे सगळं पचवणं अवघड जात होते. प्रवास करून आल्यावर सगळे फ्रेश झाले. चहा घेतला आणि आपसुकच जान्हवीचे पाय  हिरवगार झालेल्या  अंगणाकडे वळले. अंगण बघून मन खूप प्रसन्न झाले होते.  रंगीबेरंगी फुलं, बोगनवेल, चाफा आणि लाल पिवळ्या रंगाचे गुलाब बहरून आले होते. लिंबाचे मोठे झाड, आणि चिक्कुचे झाड बघून तर छान वाटतं होत.आता तर लिंबाच्या झाडाला पण भरपूर लिंब लागले होते. ते बघून मन अगदी खुश झाले होते. मध्यभागी असलेले तुळशी वृंदावन संपूर्ण बागेची शोभा वाढवत होते.पप्पांनी स्वतःच्या हाताने ती बाग लावली होती. ते जीवापाड जपत होते .अगदी रोज त्याची काळजी घेत होते. 

 झाडांची निगा राखणं हे जान्हवी तिच्या सासऱ्यांकडूनच शिकायला मिळाले होते. लग्न करुन आली तेव्हा आदिनाथला साताऱ्यात नोकरी होती. पेशाने ती एक शिक्षिका असल्याने सतत काहीतरी नवीन शिकण्याचा उत्साह तिला होताच. हळू हळू वेळ मिळेल तसा ती सुद्धा सासऱ्यांना कामात हातभर लावत असे. आदिनाथने नोकरीसाठी मुंबई गाठली तेव्हा सगळ्यात जास्त दुःख जान्हवीला झाले होते.


दुसऱ्या दिवशी पासून सामानाची बांधाबांध सुरू झाली. काय हव नको ते बाजूला काढले. मोठ्या वस्तू न घेण्याचा निर्णय घेतला आणि  बाकीच्या वस्तू गरजू लोकांना वाटप करण्यासाठी वेगळ्या केल्या. जीवापाड जपलेल्या वस्तू देऊन द्यायला मन खरचं तयार  होत नव्हते. पण करणार तरी काय? दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. काळ आला होता पण जान्हवीला त्याचा सामना कसा करावा हेच कळेनासे झाले होते.

" मी तरी आठ वर्षच इथे राहिले . पण आई आणि पप्पांसाठी तर  हे फार कठीण होते. पप्पांनी तर वयाची सत्तर वर्ष तिथे काढली अगदी बालपणपासून ते रिटायर्ड होईपर्यंत, त्यांना हा निरोप घेणं अगदी जीवघेणा असेल.!" असं क्षणभर जान्हवीला वाटून गेलं. 

जायचा दिवस जवळ येत होता तशा सगळ्या आठवणी डोळ्यासमोर  गर्दी करीत होत्या. आदिनाथचा हात धरुन ज्या घरात गृहप्रवेश केला होता, सगळे सणवार, महालक्ष्मीचा उत्सव, लग्नानंतर पहिली दिवाळी, डोहाळ जेवण , बाळंतपण , बारसे सारे काही आनंदोत्सव साजरे केल्याचे हे घर साक्षीदार होते. ह्याच घरात सासू बाईने आईची माया लावली, सासऱ्यांनी  लेकीसारखे प्रेम केले. नवर्‍याने तर तुला हवं तसंच रहा म्हणत खूप साथ दिली अशा  आठवणीने  भरलेल्या घराला, घरातल्या सगळ्या आठवणींना सोडून जायचे होते, त्यामुळे मनातील डोळ्यात गंगा जमुना अखंड वाहत होत्या. सारं सुख सुविधा असुनही काही तरी सुटत चालले आहे,असे सतत वाटत होते. वाटेल तेव्हा घरी येऊ असे अंतर ही आता नव्हते. 

दिवाळीच्या दिवशी जान्हवीने आणि तिच्या जावेने पूर्ण घराला दिवे लावून तेजोमय केले. घरातल्या प्रत्येक कोनाड्यात दिवा लावून येणाऱ्या काळानुरुप बदलला सामोरे जाण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना केली. 
     ‌    दिवस कसे निघुन गेले कळलेच नाही आणि जान्हवी आणि आदिनाथचा जायचा दिवस उजाडला. सासू सासऱ्यांना नमस्कार केला. घरातील देव्हाऱ्यात दिवा लावला. घराच माप ओलांडून बाहेर येताना ज्या घरान  तिला अखंड आठवणींचा खजिना दिला त्याला खाली वाकून  हात जोडून नमस्कार केला. धकाधकीच्या जीवनात एकमेव हक्काचं स्थान असलेलं घर आता आठवणींचे घरटे झालेले होते. सामान गाडीत भरले. डोळे भरलेले होते अन् पायही निघत नव्हते. निरोप द्यायला शेजारी देखील जमले होते. लवकर भेट होणार नाही ह्याचे दुःख फार होते. कधी ना कधी सगळ्यांनाच जावेच लागते असे तिने स्वतःच्या मनाला सांगितले आणि आपला परतीचा प्रवास सुरू केला.

©® नेहा खेडकर 
टीम :- नागपूर जिल्हा