नवरंग.... नवरात्र संकल्प

Women's group planning for this Navratri

नवरात्रात अनेक जणी त्या त्या दिवशीच्या त्या त्या रंगाच्या साड्या घालून देवीची आराधना करतात, पण "सखी-सहेली"या मैत्रिणींच्या गटानं या वर्षीच्या नवरात्रात केला आहे एक निराळाच संकल्प



१. "अग आज पिवळा रंग ना ग्रुप मधली आहार तज्ञ मैत्रीण म्हणाली","यावर्षी आपण पिवळी साडी तर घालूच पण त्याचबरोबर आपल्या रोजच्या दैनंदिन आहारात पिवळ्या फळांचा आणि भाज्यांचा समावेशही करू".



२. ग्रुप मधली पर्यावरणस्नेही सखी म्हणाली "नव सृजनाचा हिरवा रंग. आपण आपल्या बगिच्यात, बाल्कनीतल्या छोट्या कुंड्यांमध्ये छान झाडं लावूया , शिवाय पिकनिकला किंवा लॉंग ड्राईव्ह ला जाताना झाडांच्या बिया पण सोबत नेऊ या.



३. प्रोफेसर सखी म्हणाली,"अगं राखाडी रंग हा वैराग्याचा प्रतीक, तसंच नव उमेद-उभारी चा ही. मला तर राखाडी रंग म्हंटला की स्वतःच्याच राखेतून आकाशात पुन्हा भरारी घेणारा फिनिक्स पक्षी च आठवतो, कोरोना च्या दुसऱ्या लाटेत आपल्या आजूबाजूच्या अनेकांनी त्यांच्या जवळची माणसं गमावली चला तर त्यांना मानसिक आधार देऊ या".



४. ग्रुप मधली एक देश प्रेमी मैत्रिण मिळाली,"नारंगी रंग तर त्यागाचे प्रतीक आहे, आपल्या घरासाठी आपण सार्‍याच जणी लहान-मोठा त्याग करतो पण या दसरा दिवाळीला स्वदेशी वस्तू घेऊन "लोकल फोर वोकल" ला मदत करूया.



५. एक कवी मनाची मैत्रीण म्हणाली, "पांढरा रंग हा सात्विक तेचं , पावित्र्य आणि सहजतेचं प्रतीक आहे". "आकाशात पौर्णिमेचा चंद्र कसा शांत, शीतल, कोमल प्रकाश देतो". "आपणही आपल्या आयुष्यात ही सात्विकता जपूया, निदान स्वतःशी तरी प्रामाणिक राहू या".



६. ग्रुप मधली एक समाजसेवक मैत्रीण म्हणाली,"लाल रंग हा सौभाग्याचं, वीरतेचं आणि जीवनाचे प्रतीक आहे, वर्षातून एकदा तरी रक्तदानाचा संकल्प करूया.



७. गृहीणी असणारी ग्रुप मधली एक सखी म्हणाली, "निळा रंग म्हंटला की मला आठवते डोक्यावरचं स्वच्छ निळं आकाश, आणि सागराचं अथांग निळं पाणी". यावेळी मी संकल्प केला आहे की, भाज्या ,फळं आणि धान्य धुण्याचे पाणी घरातल्या कुंड्यांमध्ये टाकायचं, पाण्याचा अपव्यय अजिबात करायचं नाही आणि पाणी अगदी काटकसरीनं जपून वापरायचं.



८. नवपरिणीत ग्रुप मधली मैत्रीण म्हणाली,"गुलाबी रंग -गुलाबी थंडीचा, प्रेमाचा, निरागसतेचा". "माझं हे पहिलंच नवरात्र म्हणून मी असा संकल्प केला आहे की,"सासरच्या लोकांची काळजी तर मी घेईनच पण माहेरच्या लोकांनाही कधीही अंतर देणार नाही".



९. मैत्रिणीच्या या गप्पा ऐकत बसलेली बाजूच्या खुर्चीवर ची आजी त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली,"अग पोरींनो तुम्ही नवरात्रात रोज नवनवीन साड्या घाला किंवा नका घालू पण तुमच्या असल्यानेच सासरी माहेरी अनेक रंग खुलतात आणि फुलतात". "अगं तुम्ही उपवास करा किंवा स्तोत्र म्हणा पण  अहोरात्र तुम्ही मुलाबाळांची आणि घरातल्या आबालवृद्धांची काळजी घेताना तीच खरी देवीची पूजा". "भोंडला म्हणा किंवा गरबा खेळा पण समस्त पुरुष जात तुमच्या रागा- लोभावर तरुन जाते बरं! "आणि हो तुमचा दागिन्यांचा सोस हे तुमच्या पतीच्या आर्थिक समृद्धीचे प्रतीक असतं हे कधीही विसरू नका!","म्हणूनच जांभळ्या पैठणीचा हट्ट करून तुम्ही अवश्य मिरवा!"



      आजीं चे हे शब्द ऐकून साऱ्याजणीना वाटलं, "नवरंग -नवरात्र-नव संकल्प"यावेळची नवरात्र जरा निराळी आहे नाही!





(सदर लिखाण हे मोबाईल मधून केले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व)


(वाचक हो तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर मला फॉलो करा आणि तुमचे अभिप्राय नक्की कळवा)




🎭 Series Post

View all