नात्यांची वीण (शुभांगी)भाग ४,अंतिम

एक नवीन सुरुवात होऊच शकते? "आयुष्याच्या एका टप्प्यावर सारे सुख एकीकडे आणि जोडीदारची साथ एकीकडे. जो फक्त आपल्या सुख दुःखाचा भागीदार असतो. ज्याला आपल्यासाठी पुरेपूर वेळ असतो..

नात्यांची वीण

भाग ४

अष्टपैलू लेखक करंडक स्पर्धा

फेरी - दुसरी

-©®शुभांगी मस्के...



एक नवीन सुरुवात होऊच शकते? "आयुष्याच्या एका टप्प्यावर सारे सुख एकीकडे आणि जोडीदारची साथ एकीकडे. जो फक्त आपल्या सुख दुःखाचा भागीदार असतो. ज्याला आपल्यासाठी पुरेपूर वेळ असतो..

मिहिरने मधुराला लगेच कॉल लावला.. "ताई, फ्री का गं? थोडं बोलायचयं तुझ्याशी!" मिहिर बोलला.

"ताई, सुमित, .. मित्र माझा.. त्याचे काका!!" अडखळत, अडखळत.. मिहिर बोलत होता.

"अरे काय झालं.. रिया सिया.. त्यांची आई.. त्यांना सोडून गेली... तेच काका ना! काय झालं त्यांना".. त्यांचं काय? काय झालं असेल विचाराने, मधुरा विचलित झाली.. क्षणभर भांबावली...

"ताई, आपण करायचा का, आईच्या लग्नाचा विचार?" मधुराला आश्चर्य झालंच नव्हत, उलट मिहिरच बोलणं, ऐकताच मधुराचा कंठ दाटून आला आणि तिला रडू आवरलच नाही...

"गेली कित्येक दिवस मी, याच द्वंद्वात अडकले होते मिहिर आईचं एकटेपण आणि आईसाठी अस्वस्थ होताना, माझ्या मनात हाच विचार डोकावतोय". "मधुराचे आर्त स्वर खोल गेले होते.

"आपलं भवितव्य उज्वल करण्यासाठी आपल्या पंखात बळ देणाऱ्या आईने स्व:तचे पंख छाटून टाकलेत"... "आयुष्य बंदिस्त करून टाकलंय तिने तिचं!"..
"आपलं हवं नको ते बघताना, ती स्वतःलाच विसरली!" ..
"आपण असूच!!!आईसोबत नेहमी!" पण एक कोणीतरी, असावा.. जो तिच्या आयुष्यात तिच्या सहजीवनाचा वाटेकरी असेल... बोलताना मीहिरच्या डोळ्यात आसवं दाटून आले होते.

"जवळ जवळ, वीस वर्ष विरह वेदनेत होरपळलेल्या आणि नशिबाने वाट्याला आलेल्या वैधव्याला आपलंसं केलेल्या पन्नाशिला पोहचलेल्या आईच .... लग्न!".. " तेही समाजाच्या विरोधात जावून". भावंडांच एकमत झालं असलं तरी सोप्प नव्हतं.

"ताई.. निदान आपण प्रयत्न तरी करू"... म्हणत खूप समाधानाने दोघांनी फोन ठेवला.

"सुमित... तुझे काका, करतील माझ्या आईशी लग्न!" मिहिरने दुसऱ्याच क्षणी, सुमितला विचारून टाकलं. सुमितसाठी हा आश्चर्याचा धक्का होता..

"काय बोलतोस यार मिहिर".. सुमित

"खरं तेच बोलतोय".. मिहिर उद्गारला

"किती छान होईल?".. " आपल्या दोघांची कुटुंब एकमेकांना ओळखतातच".. सुमित बोलला.

"काकू गेल्या तेव्हा, आमच्या रिया सियाला तुझ्या आईने किती सावरलं होत".

"मला आनंद होईल, यार... असं झालं तर".. आमच्या रिया सियाला काकू कधीच अंतर देणार नाही माहिती आहे मला"... सुमित खूश होऊन बोलला.

पुढच्या महिन्यात, परीक्षा संपली की.. घरी जाणार आहोत.. नक्की विषय काढू आणि पुरेपूर प्रयत्न करू... हा योग जुळवून आणण्याचा.. सुमित आणि मिहिरने एकमेकांना घट्ट मिठी मारली.

आईला कसं समजवायचं?... मिहिर आणि मधुरा समोर, खूप मोठा प्रश्न उभा होता. आईची समजूत काढणं वाटत तेवढं सोप्प नव्हतं..

परीक्षा संपली आणि सगळे सुट्ट्यांमध्ये घरी आले. मिहिर मधुरा, दोघेही जवळजवळ,दोन वर्षानंतर, असे एकत्र घरी भेटले होते. घराचं जणू गोकुळच झालं होत. सुमनला, मुलांसाठी आता काय करू काय नको असं झालं होत.

मधुराने, प्रतीक आणि सासूबाईंना ही मुद्दाम बोलून घेतलं. मधुराच्या सासूबाईंनी, लग्नाचा विषय विहिनबाईसमोर काढण्याची जबाबदारी स्वीकारली. तेवढ्याच जुक्तीने विषय हाताळून, त्यांनी सुमनताईंची समजूत काढली. खूप प्रयत्नांनी अखेर त्या लग्नाला तयार झाल्या होत्या.

"आईचं लग्न!!", या वयात सुमनच लग्न, ऐकताच, भाऊमामा सर्वांवरच खूप चिडले.. मामींनी तर, बोलायला, टोमणे खेचायला काहीच कसर सोडली नव्हती..

"या वयात लग्नाची गरज काय?" ," म्हातारजाळ लागलंय वगैरे वगैरे" वेणू वाहिनीच्या शब्दांचे घणाघाती वार मन सुन्न करणारे होते.

कमाई करण्या लायकीचा झालाय, तर आईची जबाबदारी नकोय... डावच आहे लेकरांचा, भाऊ मामाच्या शब्दांनी, सगळेच दुखावल्या गेले होते...

असचं घडणार, विरोध होणारचं.. या सगळ्याची जाणीव सर्वांनाचं होती .. आईची जबाबदारी टाळण्यासाठी म्हणून नाही तर.. या वयात तीला तिच्या हक्काचं आपलं म्हणून आमच्याशिवाय ही कुणी मिळावं यासाठी हा अट्टाहास होता...

आजवर आपल्या मनस्तापाच कारण झालेल्या नातेवाईकांना आईच्या सुखाच्या आड येऊ द्यायचं नाही. मिहिर, मधुरा आणि प्रतीकच्या कुटुंबाने ठरवलं होत..

एकीकडे, सासर माहेरचे सगळेच विरोधात उभे होते तर.. दुसरीकडे, मुलांनी आईसाठी घेतलेला निर्णय, आयुष्य थ्री सिक्टी डिग्रीमध्ये, बदलून टाकणारा होता.

एकसुरात, सगळेच विरोधात उभे होते.

"माफ करा भाऊमामा, पण आता स्पष्टच बोलतो".

"सुमनताई आता, माझी बहिण आहे समजा हवं तर".
"एवढीच नामुष्की येत असेल तर, काही एक गरज नाही संबंध ओढत नेण्याची"

"मनापासून, बहिणीच्या आनंदात सहभागी होता येणार नसेल तर चला, सैल करा ही नात्यांची वीण"

"हा भाऊ समर्थ आहे, बहिणीच्या पाठी उभा राहायला" या परखड शब्दात मधुराच्या सासऱ्यांनी, सगळ्याची बोली बंद केली...

---------

आणि, सुमित आणि त्याच्या आई बाबांच्या मध्यस्थीने सगळं ठरवण्यात आलं.

"मिहिर दादाची आई, आता आमची पण आई, होणार".. रिया सिया तर खूपच खुश झाल्या होत्या.

आणि ठरल्याप्रमाणे रिया सियाच्या बाबांचं आणि मधुरा आणि मिहीरच्या आईचं म्हणजे प्रमोदराव आणि सुमंताईंच लग्न ठरलं.

आयुष्यात सहचर, सोबती महत्वाचा असतो. सुखाचा संसार सुरू असतो आणि एक दिवस अचानक प्रवासात आपल्याला एकटं सोडून जोडीदार निघून जातो. नशिबी आलेलं वैधव्य, विधुरपण, आपल्याच माणसांच्या केविलवाण्या नजरांना, तोंड देत..मागे राहिल्याने जगत राहायचं..

एकमेकांचे सुख दुःख वाटून घेण्यासाठी, पुन्हा एकदा नव्याने, एक संधी मिळत असेल तर.. एक नवी सुरवात समजून, त्या दृष्टीने .. एक पाऊल .. त्यात वाईट ते काय?
आपली मतं, समृध्दपणे पटवून द्यायला ही नवी पिढी समर्थ होती. हळूहळू सर्वानाच म्हणणं पटायला लागलं.

छोटेखाणी कार्यक्रम पार पडला आणि सुमन आणि प्रमोद रावांनी एकमेकांना सहचर रुपात स्वीकारलं..

उंबरठा ओलांडून समारी जाताना, बाबा आता एकटे नसतील, तर आता आई त्यांच्या सोबत असेल.. माहेरपणाला चार दिवस आलो की आमचं माहेरपण निभवयला आता या घरात आई असेल.. रिया सियाला आता आई मिळाली होती. त्या दोघी तर खूप खूश होत्या.

मिहिरला आता, सेमीस्टर संपली की, हक्काच्या दोन दोन घरांची भेट घ्यावी लागत होती.. "ताई ताई म्हणत, मधुरा ताईवर हक्क गाजवणाऱ्या रिया सिया आणि मिहिर आला की हक्काने लाड पुरवून घेणा ऱ्या छोट्या बहिणी.... एकत्र भेटले की मज्जा मस्ती नुसता गोंधळ असायचा...

मधुराला दिवस केले तेव्हा वडील म्हणून, मधुराला आपल्या घरी पहिल्या बाळंतपणासाठी हक्काने माहेरी घेऊन आले... ताई ताई करत... मागे पुढे करणाऱ्या रिया सिया.. "अगं अगं हळूहळू, दो जीवाची आहे ती", म्हणत आई बाबांचा ओरडा खाणाऱ्या.. रिया सिया.. लवकरच प्रमोशन होऊन बाळाच्या मावशा झाल्या....

मिहिर डॉक्टर झाला आणि आता एका मोठ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये डॉक्टर करत होता. डॉ. सई आणि मिहिरने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आज, सगळे मिहिर आणि सईच्या, लग्नासाठी जमले होते.
पाहुण्यांनी घर कसं गजबजून गेलं होतं ... कुठलं सासर आणि कुठलं माहेर, ओळखुच येत नव्हत.. सगळीच नाती आता, प्रेम आपुलकीच्या नात्यात गुंफल्या गेली होती.

अंगणात मंडप, दाराला तोरण, पाहुण्यांची लगबग, आणि कोणत्याही क्षणी उठून ताल धरून थीरकाव अस मधुर संगीत.. लग्नघरी आल्हाददायक वातावरण तयार झालं होत.

"घे ग बाई तुझ्या लेकराला, दे इकडे वही आणि पेन".. मी लिहीते नाव... बागड्या भरणाऱ्या बायकांची... सासूबाईंच्या बोलण्याने आणि झोपेतून उठलेल्या लेकाच्या रडण्याच्या आवाजाने मधुरा भानावर आली.

जरी काठाची पिवळी साडी नेसलेली, मोत्याची ठसठशीत नथ घालून आई, पाटावर बसलेली आई.. कासारिन बाई आईला हिरवा सौभाग्य चुडा भरून देत होती.

"वरमायचा हिरवा चुडा माहेरचा बरं का?" भाऊ मामाने, कोरी करकरीत पाचशेची नोट झब्ब्यातून काढून, मामींच्या हाती कासारिनला देण्यासाठी दिली...

" ईडा पीडा टळू दे म्हणत", भाऊ मामांनी, एक नोट सुमन आणि बांगड्या भरायला बसलेल्या सर्वांवरून ओवाळली.. लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्या आयुष्यातलं सौख्य. भाऊ मामाच्या डोळ्यातून आनंद आसवांच्या रुपात दाटून आल होतं.

गृहलक्ष्मीच्या स्वागतासाठी, एक गृहलक्ष्मी सज्ज होती. रुसवे फुगवे विसरून सारी नातीगोती आज पुन्हा एकत्र होती... नव्या पुरान्या नात्यांची वीण घट्ट बांधून ठेवली जाणारं होती..


जोडीदार सोडून जातो आणि आयुष्यात एकटेपण स्थिरावत. जबाबदाऱ्या कर्तव्ये निभावताना, मुलांसाठी जगताना... आयुष्याच्या एका टप्प्यावर .. नव्याने सुरूवात करण्याचा विचार, मागे राहिलेल्या एकाने केला तर हरकत ती काय?
अशाच एका, मिहिर आणि मधुराने, प्रत्यक्षात एक नवी सुरुवात केली.. रंजकता वाढवण्यासाठी काही प्रसंग, नव्याने जोडावे लागले असले तरी.. कथेला वास्तविकतेची किनार आहेच.
कथा रुपात, " नात्यांची वीण" कशी वाटली.. प्रतिक्रिया जाणून घ्यायला नक्की आवडेल.. आवडल्यास एक लाईक नक्की द्या.
समाप्त
-©® शुभांगी मस्के...

🎭 Series Post

View all