हे नाते टिकवण्यासाठी

Nate Tikvnyasathi

ती जेव्हा मत मांडते तेव्हा तिला समजून नाही घेतले तर ती भांडण करण्याच्या पायरीवर येते...
आणि का येऊ नये तिने भांडणाच्या पायरीवर...
तिला बोलण्याचा हक्क आहे किंवा नाही हे नाही ठरवू शकत कोणी..तशी ती अवाजवी बोलत ही नाही फक्त जे पटले नाहीच अगदी तिथे मात्र मत मांडते ते ही अगदी कोणाला दुखावले जाईल अश्या हेक्यात नाही आणि तरी तू म्हणतोस..माझ्या गोष्टीत तू पडू नकोस...तुला काय कळते ?? काही विचारले तरच मध्ये बोलत जा नाहीतर गप्प बस..! तुला कोणी दिला हक्क मध्ये पडण्याचा, तू जाऊन तुझी कामे बघ जा स्वयंपाक घरात..! तिला हक्क नाही हे ही तूच ठरवतोस, तिला घराचे कर्तव्य ही तूच सांगतोस...तिच्या मर्यादा ही तिच्यापेक्षा तुला माहीत असतात मान्य आहे रे, पण हे करतांना तिला मत मांडायचा हक्क देणारा किंवा न देणारा तू कोण असतो...पती !! हो ना..

पण पती असून ही जर तूच तिला वेळी कुठल्या प्रसंगानुसार समजून घेतले नाही तर ती कुठे तरी स्वतःहून येणारच आणि मत मंडणारच , तिथे तू मग तिला अधिकार दिलेला असो वा नसो ती न पटलेल्या गोष्टीवर योग्य काय अयोग्य काय समजून संगणारच ना !! आणि समजदारीने तू म्हणालास की तुझे मत मला पटले आहे पण माझ्या काही अडचणी आहेत , त्यावर मी लगेच तुझे मत घेणे योग्य वाटेल तेव्हा घेईल अगदी जरूर घेईल..तिथे तुझी साथ ही मला हवीच असणार आहे ,असे म्हंटल्यावर ती एक पायरी भांडणाच्या मुद्द्यावर न येता तुला समजून घेत मागे जाईल ही.. पण त्यासाठी तुला ही इतकेच नम्र ,विनम्र व्हावे लागेल...

मग तीच तुझ्या मताचा आदर करेन..पण हे तेव्हाच होईल जेव्हा तिच्या मताला ही तू किंमत देशील ,तिचा ही आदर करशील...

तूच तर तिची ह्या तुझ्या घरातील एकमेव हक्काची जागा आहेस ,त्या जागेवर तिला मनमोकळे करून बेफिकीर मत मांडता येते पण तिथे ही जर तू तुझी हुकूमत चालवणार असशील तर नात्याला मानसिक पातळीवर तडा जायला सुरुवात होत जाते हे नाजूक नाते जोडायचे काम तुझ्याकडून ही व्हायला हवे हे लक्षात ठेवशील...

तुझ्या घरातील सगळ्या स्त्री मालेचा आदर ठेवतोस जशी तुझी आई तिचा आदर ,बहिण तिचा आदर ,आणि मुलीला आदर मिळावा यासाठी जसा झटतोस तसा तिच्या साठी ही तुझ्या घरात एक आदराचे स्थान निर्माण करून बघ ,तिच्यासोबत रहा ना उभा जरा कधी...तिला खास वाटू दे तुझ्या सोबत ..

ती विरोधक आहे असेच का समजायचे, ती चुकीचे सांगते हे का समज करून घ्यावे...तिचे मत ही बहुमोल आहे हे कधी कळायचे...तिला समजते तुला आवडेल तशी वागण्यात तू खुश आहेस ,पण हे तू ही करून बघ..

वय उलटून गेल्यानंतर कळून काही उपयोग नसतो...मग ती ही दुराव्यात सन्मान समजते...मग विचार कर तू काय कमवलेस तिच्या मनातून उतरून...

किती स्थान मिळवलेस इतरांच्या मनात तुझे खास स्थान निर्माण करून ....जर तिनेच तुला मनातून काढून टाकले ..काय मान मिळवलास

कट टू कट वागायला नाते म्हणत नसतात...हृदयाची भाषा हृदयाला समजली म्हणजे नाते सहज फुलतात ,टिकतात आणि आयुषच्या शेवटपर्यंत चालतात... आणि चालतात ते फक्त दोघेच हे लक्षात राहू दे...

©®अनुराधा आंधळे पालवे