नाते प्रेमाचे तुझे नी माझे...भाग 1
जलद लेखन स्पर्धा
विषय- अरे संसार संसार
मालतीताईंचे डोळे पाणावले होते.
‘देवा हा दिवस कुणालाही दाखवू नको रे. या वयात हे सगळं बघवत नाही. आज हे माझ्या सोबतीला आहेत म्हणून बर आहे नाहीतर मी एकटीने काय केलं असतं?’ मालती ताई मनातल्या मनात विचार करत होत्या.
बाजूला वामनराव बसले होते.
“मालती किती वेळ त्यांना आत डांबून ठेवणार आहेस. अग येऊ दे बाहेर.” त्यांनी मालतीचा हात हातात घेतला.
“अहो, तुम्ही पण ना..” असं म्हणत मालतीने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
मालतीताईने वामनरावांजवळ मन हलकं केलं.
त्यांनी मागे वळून बघितलं, मागे लावलेली पाटी वाचली.
“आनंदाश्रम सदन”
“आभाळ फुलले आणि विरले
कधी उलटली साठी
वृद्धाश्रमाच्या वाटेवरती
साथ देते मोडकी काठी..”
“मालती आता हेच आपलं गोकुळ, आणि हीच आपली नवी नाती.
आता आसवं गाळायची नाही त्यांना डोळ्यात जपून ठेवायची मोत्यासारखी, हो ना..”
दोघांनी वृद्धाश्रमात पहिलं पाऊल ठेवलं आणि सगळे त्यांच्या स्वागतासाठी दारात आले. दोघांची ओवाळणी झाली, मालती ताईंनी उखाणा घेतला आणि त्यांचा गृहप्रवेश झाला.
सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून हे दोघेही आनंदित झाले.
त्यातल्या रमा ताईंनी त्यांना त्यांची खोली दाखवली आणि त्या निघून गेल्या.
मालती ताईंनी बॅग उघडली, बागेतून त्यांचा फॅमिली फोटो काढला. त्यावरून हात फिरवू लागल्या आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
मालती आणि वामनराव सुखी जोडपं, लग्नाला तीस वर्षे उलटून गेली होती.
वामनराव सरकारी अधिकारी होते आणि मालती गृहकाम करायची.
मालतीला दोन मुले आणि एक मुलगी आणि दोघे असं पंचकोनी कुटुंब होतं.
मालतीताई लग्न होऊन सासरी आल्या, खुप मोठं कुटुंब होतं. मालतीताईंना इतक्या माणसाची सवय नसल्यामुळे आधी त्या खूप घाबरल्या. पहिले आठ दिवस त्यांच्यासाठी कठीण गेले. घरचे सगळे खूप छान होते पण मालती ताईंच्या मनात भीती घर करून होती.
“काय झालं मालती? अशी उदास होऊ नकोस ग, होईल तुला सवय हळूहळू.”
“नाही तस नाही हो, मला नर्व्हस फिल होतंय. माझ्याकडून काही चूक झाली तर?”
“नाही होणार, तू हुशार आहेस. तुला सगळं जमेल आणि तू सगळ्यांची मन जिंकशील.”
वामनरावांचं बोलणं खर झालं, मालतीताईंनी महिन्याभरातच सगळ्यांची मन जिंकली. वामनरावांच्या सुट्ट्या संपल्या, त्यांना ड्युटी जॉईन करायची होती. वामनराव तिला नोकरीच्या ठिकाणी घेऊन गेले.
दोघांचा नवीन संसार सुरू झाला. दोघेच असल्यामुळे एकमेकांना वेळ देता येत होता. वामनराव ड्युटीवर गेले की मालतीला सवळ मिळायची. त्या वेळेत ती तिचे छंद जोपासत असे. कुशन वर्क, झाडे लावणे त्यांचे आवडीचे काम. त्यांना हे काम करण्यात खूप समाधान मिळत असे.
दिवस छान आनंदात चालले होते. सुट्ट्यामध्ये ते गावाला जायचे, मालती सासरी आणि माहेरी राहून यायची.
काही महिन्यातच मालतीला दिवस गेले. सुरुवातीचे तीन महिने कठीण गेले, उलट्या मळमळ मुळे मालतीला सगळं नकोस व्हायचं, पण फोटोतले बाळ बघून ती स्वतःला आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न करायची.
सोनोग्राफी मध्ये कळलं की मालतीला जुळे होणार आहेत. दोघांच्याही आनंदाला उधाण आले.
“अहो दोन्ही मुले होतील की दोन्ही मुली की एक मुलगा एक मुलगी. आपण त्यांची नावे काय ठेवायची.”
मालतीला सगळ्याची खूप उत्सुकता लागलेली होती.
“मालती आधी त्यांना या जगात येऊ तर दे.”
“अहो मला कधी ते येतात आणि कधी मी बघते अस झालं.”
मीरा बाळांच्या स्वप्नात रंगून जायची.
क्रमशः