जिवाभावाच्या मैत्रिणी
पहिल्या भागात आपण पाहिलं की श्री आणि अक्षरा च लग्न झालं. अक्षरा सासरी तर आली पण मनात ऋता विषयी कींतु घेऊनच. कसं असेल ऋता आणि अक्षरा च नातं बघुया या भागात.
लग्नानंतरचे नव्या नवलाईचे दिवस सरले. आलेले पाहुणे मंडळी आपापल्या गावी परतले. अक्षरा चे पाच मुळ सुद्धा झाले. आता वेळ होती घरातल्या याचं पाच लोकांमध्ये रुळण्याची, संसाराला खऱ्या अर्थाने सुरूवात करण्याची. अक्षरा बोलकी असल्यामुळे संगीताताई, अशोकराव, श्री, यश यांच्यासोबत लवकरच तिचे छान बंध निर्माण झाले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत अबोल असलेली ऋता सुद्धा तिच्याशी स्वतःहून येऊन बोलू लागली. अक्षरा घरातली कामं करू लागली की ऋता तिला मदत करत असे. अक्षरा साठी हा अगदीच सुखद धक्का होता. संगीताताई प्रेमळ असल्या तरी स्पष्टवक्त्या होत्या. बऱ्याच वेळा कामात झालेली दिरंगाई त्यांना आवडत नसे. मग अक्षरा ला ओरडा बसे. त्यावेळी ऋता अक्षरा ची बाजू घेऊन बोलू लागे. अक्षरा ला ऋता च्या रूपाने जणू बहिणच मिळाली. हळूहळू कायम सोबत राहण्याने त्या एकमेकींना अगदी मनातलं सांगू लागल्या. त्यांचं नातं घट्ट होऊ लागलं. मग एकदा अक्षरा ने न राहवून ऋता ला एवढे दिवस मनात असलेला प्रश्न विचारलाच, "दीदी तुम्ही लग्नानाधी माझ्याशी बोलत का नव्हत्या?" ऋता म्हणाली, " अग वहिनी मला फोन वर फार बोलायला सुचत नाही आणि मैत्री झाल्याशिवाय मी स्वतःहून फार कुणाशीही बोलत नाही. एकदा माणसाच्या स्वभावाची पारख झाली की मग मात्र मी निःसंकोचपणे सगळंच बोलू शकते." एवढे दिवस आपण ऋता बद्दल किती चुकीचा विचार करत होतो याचं मात्र अक्षरा ला खूप वाईट वाटत होत. अक्षरा ने मनोमन ऋता ची माफी मागितली. आता मात्र ऋता आणि अक्षरा अगदी जिवाभावाच्या मैत्रिणी झाल्या. मग पुढे अगदी सगळीकडे त्या सोबतच असायच्या. सगळ्या ठिकाणी एकमेकींना सोबत घेऊनच जायच्या. त्यातच अक्षरा ला दिवस गेले. घरात सगळेच खूप आनंदी होते. सगळेच जण अक्षरा ची खूप काळजी घेऊ लागले. ऋता तिची विशेष काळजी घेई. घरातले इतर लोक कामानिमित्त बाहेर जात पण ऋता मात्र घरात राहून अक्षरा ला काय हवं नको ते बघत असे. तिसरा महिना लागला. एक दिवस अक्षरा जिना चढत असताना पाय सटकून वरच्या मजल्यावरून घरंगळत खाली आली आणि पोटात दुखायला लागले. ऋता ने कसलाही विचार न करता लगेच रिक्षा बोलवून अक्षरा ला हॉस्पिटल मध्ये नेले तोपर्यंत घरातल्या इतरांना सुद्धा फोन करून तिने तिकडेच बोलावले. तिथे गेल्यावर सोनोग्राफी करताच डॉक्टरांच्या लक्षात आले की बाळाच्या हृदयाचे ठोके थांबले आहेत आणि सोबतच अक्षराला रक्तस्त्राव सुरु झाला. अक्षराला सुद्धा अचानक पोट अगदीच रिकाम झाल्याचं जाणवू लागलं आणि अक्षरा जोरजोरात रडायला लागली, जीवाच्या आकांताने ओरडू लागली. जीव पिटवळून टाकणारा तिचा आक्रोश कुटुंबीयांसमवेत संपूर्ण हॉस्पिटल ला अश्रुमय करून गेला.
क्रमशः