नैराश्यावर मात

Parents role, how to improve childrens mental health and how they stand strong in any situation...

आई अग कृपा कर अन मला एकटीला राहूदे... नेहा चिडूनच म्हणाली. 

अग बाळा तुला बरे वाटेल मामाकडे जाऊन  थोड्यावेळात परत येऊ आपण. मेघना बोलतच  होती की नेहाने  तिच्या रूमचे दार लावून घेतले. 

मेघनाला खूप वाईट वाटले पण सध्या बऱ्याचदा आई वडीलही मुलांपुढे हतबल होतात तसेच झाले होते मेघनाचे . काय चालूय ह्या मुलीचे काहीच समजत नाही...मेघना स्वतःशीच पुटपुटली अन मनातच, आपल्यावेळी एकाच खोलीत सर्व भावंड किती आनंदात, हसत खेळत  राहायचो पण आताच्या पिढीला एकुलते एक असून साधं आई बाबा सोबत ही नको वाटते.

मेघना अन समीर नेहाचे आई बाबा दोघेही दिवसभर नोकरी निमित्त बाहेर असल्यामुळे नेहा खूपच एकलकोंडी झाली होती. कोणाशीच जास्त बोलायचे नाही की काही नाही. पण येवढयात तर तीची प्रत्येक गोष्टीवर चिडचिड वाढली होती.शाळेतील प्रगतीचा आलेख जरा जास्तच खाली झुकला होता. नेहमी पहिल्या पाच मध्ये असलेली नेहा ह्यावर्षी खूप मागे पडली होती. पुढच्या वर्षी दहावीचे महत्वाचे वर्ष असल्यामुळे तिच्या वर्ग शिक्षकाने तक्रार केली  होती. 

दोन दिवसापूर्वी अभ्यासात लक्ष नाही म्हणून मेघना रागावली तर नेहा चक्क रागातच घराबाहेर पडली. समीर अन मेघनाला खूप ताण आलेला, किती शोधले तिला.नको ते विचार डोक्यात डोकावून जात होते .. कोणत्याही मैत्रिणीकडे नव्हती. दिवसभर वेड्या सारखे शोधले पण नाहीच सापडली .. देव कृपेने मग एका ओळखीचा आजींचा फोन आला मेघनाला..... 
अग तुझी लेक ह्या ह्या मंदिरात एकटीच बसलीये, तुही नाही दिसली म्हणून तुला फोनच केला.... 
तुमचे खूप आभार आज्जी, आम्ही लगेच येतो तिला घ्यायला,  तुम्ही थांबता का तोपर्यंत.. मेघनाचे  रडके बोल ऐकून आज्जी ही थांबायला तयार झाल्या.
दोघांचा जीव भांड्यात पडला अन ते लागलीच नेहा जवळ पोहोचले. तरी ही नेहा फारशी नाहीच बोलली. आज्जीचे आभार मानून ते ताबडतोब घरी पाहोचले. दोघेही तिच्यावर रागावले नाही कारण त्यांच्या मनात भीती होती की तिने पुन्हा चुकीचं पाऊल उचलले तर... 

समीर अन मेघनाने समजूतदारपणे घेतले. नेहा बाळा पुन्हा असे नको करुस, तुझ्या मार्कांपेक्षा ही तू खूप महत्वाची आहेस आम्हाला, माफ कर मी तुला रागवायला नको होते.
सॉरी मी ही असे घर सोडून गेले चुकले माझे, नाही करणार पुन्हा असे. पण हो छान वाटले मला की मी मार्कांपेक्षा ही महत्वाची आहे. इतकेच बोलून गेली सुद्धा रूममध्ये. 

त्यानंतर मात्र मेघनाने काही दिवस सुट्टी घेतली. कारण आता तिला मनात नेहाला एकटे सोडायची भीती वाटत होती.नेहमी हसतखेळत,  बिनधास्त  असलेली नेहा आताशा गंभीर भासू लागली होती.आत्मविश्वास तर जणु गळून पडला होता. एकटी असतांना काही जीवाचे बरे वाईट केले तर अशा  शंकानी मेघनाच्या मनात भीती निर्माण झाली होती. 

नेहमी मामाकडे जाऊ असा हट्ट करणारी नेहा  आज मात्र  नकार देते हे पाहून मेघनाने मनोमन ठरवले की नेहाला  यातून लवकरात लवकर  बाहेर काढायचेच.

नेहा फक्त थोडावेळ बाहेर ये... मेघनाने अगदी हळुवारपणे बोलावले. 

काही मिनिटात ती समोर आली. 
मेघनाने तिला समोर बसवत तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून बोलू लागली. 
काय झालंय मला निसंकोचपणे सांग.... तू हुशार आहेस... 

बोलणे मध्येच तोडत नेहा तुटकपणे ... वाह, नेहमीच मला ऐकवणारी आज माझे सुद्धा ऐकणार तर. माझ्यासाठी तुम्हाला वेळ मिळाला?? आई हुशार असावे असा अट्टाहास काग नेहमीच. सामान्य असणे काही चुकीचे असते का?? 
 
मेघना निःशब्द झाली अन तिचे ऐकून आश्चर्यचकित ही... किती खळबळ चालू आहे माझ्या लेकीचा मनात. पण तरी तिला तसे जाणवू न देता तिने विचारलं बोल तुझी आई नाही तर मैत्रीण समजून सांग  .... 

थोडावेळ नेहा शांत बसली पण आई चिडचिड न करता बोलतीये हे पाहून तिला ही बरे वाटले, अन बोलू लागली. मी खूप एकटी पडलीये ग...
नेहमीच फक्त स्पर्धा अन त्यात मिळालेले यश अन अपयश. बाकी गोष्टी  आहे की नाही ह्या जगात.  तुम्ही दोघेही फक्त मार्क्स, स्पर्धा यावर जास्त बोलतात पण कधीतरी प्रेमाने आजचा दिवस कसा गेला, तू कशी आहेस, असे प्रेमाने विचारलं? तू ऑफिसहून आल्यावर अभ्यास घ्यायला बसतेस पण त्यातही घरातील नाहीतर ऑफिस चे राहिलेले काम करत असतेस. तुम्हाला माझ्यासाठी वेळच नाही..मला खूप वाटते घरी आल्यावर दिवसभर काय झाले ते सांगावे कोणालातरी पण कोणाला वेळच नसतो माझे ऐकायला. 
आई नको करुस ना नोकरी. मला माहिते की तुम्ही किती कष्ट घेता माझ्यासाठी. मी काहीही खर्चिक मागणार नाही पण मला तुझा वेळ हवाय ग. नेहा रडतच सांगत होती. 

मेघनाच्या तर मनात खूप गोंधळ उडाला होता तिचे विचार ऐकून तरी तिने तिला मायेने जवळ घेतले अन मनसोक्त रडू दिले.
आता जरा मोकळी झाली होती नेहा ती तशी पुढे सांगू लागली, आई काही दिवसापूर्वी मला एक मित्र  भेटला, माझाच ट्युशन मध्ये मला सिनियर आहे . तुम्हाला माझ्यासाठी वेळ नाही हे पाहून मी ही नवनवीन मित्रमैत्रिणी बनवत असते. आमची छान मैत्री झाली होती,  तो मला आवडतो पण त्याला कोणी दुसरीच मुलगी आवडते असे त्यादिवशी मला अगदी सहजपणे सांगितले ग. मला खूप वाईट वाटले ग.
 मी इतकी वाईट आहे का ग की, तुम्ही सर्व माझ्याजवळ असून ही माझ्यावर प्रेम नाही करत. मी खूप अनलकी आहे ना की माझ्या इतर मित्रमैत्रिणी सारखे माझे आई बाबा मला वेळ देत नाहीत. ती खूप अस्वस्थ झाली होती सांगताना. 

मेघनाच्या डोळ्याचा कडा ओल्या झाल्या. तिला खूप भरून आले होते. खरंच रोजची कामे अन जबाबदाऱ्या यंत्रवत पूर्ण करता करता आमच्यातला संवादच हरवला आहे. माझ्या लेकीचा मनात इतके युद्ध चालू असेल असे कधी कल्पनाही केली नव्हती.नेहमीच तिला काय हवे ते तिच्या पुढ्यात हजर करणारे आम्ही वेळ द्यायला मात्र सपशेल कमी पडलो होतो. त्यांच्यातील दुरावा वाढला होता. म्हणूनच  तर ह्या वयात मुलगी असो वा मुलगा त्यांची प्रेमाची, मायेची गरज बाहेरच शोधतात अन कधी फसलेही जातात. पण तरी ही परिस्थिती खंबीरपणे हाताळली पाहिजे हे ती जाणून होती. 
विचार करता करताच ती पुढे बोलू लागली. 
सॉरी, मी समजू शकते हे बघ बाळा कोण म्हणाले की आमचे प्रेम नाही तुझ्यावर. तू तर आमची परी आहेस. तुला आत्ता असे वाटते ग पण जेव्हा तू मोठी होशील तेव्हा तुला कळेल की आम्ही तुझ्यासाठी काय काय केले ते. राहिला तो मुलगा तुला आवडण्याचा, तर मी समजू शकते की आपल्याला कोणीही कधीही आवडु शकते पण त्यासाठी वय ही योग्य असणे गरजेचे असते. हे वय प्रेमात पडण्याचे नाही तर तुझे शिक्षण पूर्ण करुन करिअर घडवून दाखवायचे आहे. बाकी गोष्टीसाठी तर पूर्ण आयुष्य आहे. प्रेमापेक्षाही मैत्रीचे नाते हे नेहमीच मोठे असते .  सर्वात आधी तू स्वतःवर प्रेम करायला शिक, तुझे स्वप्न, इच्छा. जे काही करशील ते मनापासून कर. 
असे आई बाबा विषयी तुला काही वाटले तरी असा टोकाचा विचार कधीही करू नकोस. तू तर जग आहेस आमचे. 

काही वेळातच समीर ही ऑफिसहून  आला त्यालाही मेघनाने थोडक्यात सांगितले. दोघांनीही नेहाला जवळ घेऊन चूक मान्य केली, खरंच तुझे केवळ अभ्यासातले यश पाहून तुझे भविष्य उज्वल राहील यातच समाधान मानले आम्ही. पण तुझे मन जाणून घेण्यात कमी पडलो आम्ही...तुझ्या फक्त गरजा भागवत असताना तुझी महत्वाची गरज ती म्हणजे वेळ, दिलाच नाही.. तुझे बालपण हरवून बसलो आम्ही. रोजच्या व्यापात इतके गुंतलो की संवादच हरवून बसलो... 

तिघेही त्यादिवशी शांतच होते.ती  शांतता तोडत मेघना बोलू लागली, पण अजूनही वेळ आहे , अजून पुढे भरपूर आयुष्य जगायचं राहिलंय , तेही एकमेकांच्या साथीने. नव्याने सुरुवात करूया. घरी असल्यावर ऑफिस काम बंद अन लॅपटॉप, मोबाइलला सुट्टी. 
 हे बघ नेहा, असे बऱ्याच घरात घडते पण तुम्ही मुलांनीही असा गैरसमज नाही करून घ्यायचा आई बाबाविषयी. हे आयुष्य एकदाच मिळते आपल्याला ते मस्त आनंद घेऊन जगावे. आयुष्यात अनेक प्रसंग येतात पण तेव्हा इतरांनी आपल्याला समजून घ्यावे अशी अपेक्षा करत बसण्यापेक्षा स्वतः स्वतःला समजून घे. स्वतःसाठी जग. आपल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा योग्य असा उपयोग कर, नक्कीच यशवंत होशील.तुला वाचन करायला आवडते ते कर, तुझे पेंटिंग चा छंद जोपास. आम्ही तर आहोतच पण तरी तू रोज डायरी लिहीत जा याने सुद्धा तुझे मन खूप हलके होईल. 


त्यानंतर नेहा हे सर्व ऐकून बरीच रिलॅक्स झाली. त्यानंतर ती हळूहळू मोकळे पणाने घरात वावरु लागली. 
मेघनाही तिच्या सोबत  मैत्रिणीप्रमाणे संवाद साधू लागली. हे वयचं असे असते त्यात फक्त धाक नाही तर समजून घेणे जास्तच महत्वाचे असते. समीरही अधून मधून तिला आवडणारा चेस तिच्यासोबत खेळत असे. या सर्वांचा परिणाम म्हणजे ती पूर्वीपेक्षा चांगल्या मार्क्सने पास झाली.तसेच तिला हेही लक्षात आले की तो मुलगा फक्त मित्र म्हणूनच छान आहे. 

कोणताही प्रसंग असो दोघेही तिला विश्वास देत की ती एकटी नाही ते सदैव तिच्या सोबत आहेत. तिला तिचे करिअर निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. 
 अशा प्रकारे विस्कटलेली घडी पुन्हा वेळीच सावरली. 

मेघना अन समीर दोघांनाही त्याची चुकी वेळीच कळाली अन त्यांना त्यांची नेहा पुन्हा पूर्वीसारखी मिळाली. पालकांनी फक्त चिडचिड न करता मुलांचा कलेनं घेतले तर नक्कीच पुढचा अनर्थ टळतो. 

सध्याच्या काळात ताणतणाव अन त्यामुळे येणारे नैराश्य हे खूप सामान्य झाले आहे... अगदी नर्सरी चा मुलापासून प्रत्येकालाच थोडाफार ताण असतो. ताणतणाव छोटा आहे की  मोठा हे खरंतर त्या व्यक्तीवर, व्यक्तीचा मानसिकतेवर अवलंबून असते.म्हणूनच पालकांनी  मुलांना अगदी लहानपणापासून स्वतःवर विश्वास अन स्वतःवर प्रेम करायला शिकवलं पाहिजे.स्वतःला स्वतःच्या नजरेने पाहिले पाहिजे. इतरांकडून अपेक्षा, तुलना न करता आयुष्यात येणारा प्रत्येक नवा दिवस आनंदी, उत्साही जोशपूर्ण घालवण्यासाठी प्रत्येक क्षण भरभरून जगता यायला हवा.
आजच्या धावत्या जगात जेव्हा आई बाबा दोघेही नोकरी करतात, तेव्हा मुले कशी एकटी पडतात, नकारात्मकतेचे  बीज नकळत पेरलं जाते पण जर वेळीच पालकांनी योग्य ते पाऊल उचलले तर नक्कीच त्यांचे भविष्य उज्वल होऊ शकते. 

प्रत्येकाने   एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की, "ह्या जगासाठी आपण केवळ एक सामान्य व्यक्ती असतो पण आपल्या कुटुंबासाठी आपण त्यांचे संपूर्ण जग असतो". ????