nadi che maher

it is the relevant behaviour of the river n the married woman

  माहेर

       " नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर

         अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर"

     

       कुसुमाग्रजांची 'माहेर' ह्या कवितेतल्या पहिल्या दोन ओळी, एक सर्वसामान्य नैसर्गिक घटना- कुठल्याही नदीला आपण सगळ्यांनीच कोणत्यातरी सागरात किंवा समुद्रात विलीन होताना पाहिलं आहे. आणि एकदा का नदी सागरात विलीन झाली की बाहेर येत नाही हेही आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे, तरीही कुसुमाग्रजांची 'माहेर' ही कविता मला जणू एखाद्या  कुलीन कन्येचे, घरंदाज सासुरवाशिणी चे च रूपक वाटते. आणि मला असे का वाटते ते कवितेच्या पुढच्या काही कडव्या मधून तुम्हाला ही पटेल.

              

              " काय सांगू रे बाबांनो तुम्ही आंधळ्याचे चेले

               नदी माहेरला जाते म्हणूनच जग चाले

      

    या कडव्यात कवी सर्वसामान्य माणसांच्या, लोकांच्या संकुचित विचार सरणीवर, आधीपासून चालत आलेल्या मान्यतान वरच जणू टीका करतो आहे. कविचे म्हणणे एवढेच आहे की, नदी- जी संपूर्ण जगाची माता आहे, जननी आहे ती तर नक्कीच माहेरी जाते, आणि म्हणूनच जगरहाटी अव्याहतपणे सुरू आहे. असं बघ हा! मुलगी जेव्हा सासरहून माहेरी जाते तेव्हा तिला कोण आनंद झालेला असतो, सासरच्या साऱ्या वंचना, चिंता ती माहेरी विसरून जाते, माहेरच्या जिव्हाळ्यानं, प्रेमाने ती परत उत्साही होते, तिच्या दुःखीकष्टी मनाला माहेरी धीराची, आत्मीयतेची उब मिळते आणि ती कन्या  परत आपल्या सासरी नव्या उमेदीने ,आनंदाने नवे सृजन करते.

          

           " सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर

             तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर"

       

               इथे तर प्रत्येक शब्द नवपरिणीता  वधूसाठीच आहे. जणू सागर -समुद्र नदीचा पती किंवा जोडीदार आहे आणि तो नदीला ती जशी असेल तसं स्वीकारतो आहे. म्हणजेच जणू एकदा विवाह झाल्यावर नवरा जसं आपल्या बायकोला तिच्या गुणदोषांसकट स्वीकारतो आणि पत्नीसुद्धा पतीला  स्विकारते अगदी तसंच. पण तरीही कुठल्याही नववधूला सासरी इतरांबरोबर, तिथल्या चालीरीती, सर्व नात्यांचे स्वभाव समजून घेताना, जुळवून घेताना तिची दमछाक होतेच. आणि मग एखाद्या भाउक क्षणी किंवा मिळालेल्या निवांत क्षणात, तिला तिचे माहेर आठवते, लग्नाआधीचे जीवन स्मरते आणि ती अधीर झालेली नववधू माहेरी जाण्यासाठी अगदी आसुसलेली असते.



           " डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन

            नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लेवून"

        

          किती सुंदर कविकल्पना आहे, आई-वडिलांच्या ओढीनं अधीर झालेली नववधू किंवा एखादी सासुरवाशीन अनेक कारणं शोधत असते आई-वडिलांना भेटण्यासाठी, माहेरी जाण्यासाठी. म्हणूनच विवाहानंतर मांडव परतणं, पहिली आषाढी, पहिला दिवाळी सण, आणि पहिलं बाळंतपण असं सगळं पहिलं पहिलं माहेरीच करायची रूढी किंवा चाल असावी, सासरी सगळं जुळवून घेता घेता सुनेच्या, वहिनीच्या, बायकोच्या जबाबदाऱ्या पेलताना ती सासुरवाशिणहि शीणत असेल, थकत असेलच ना! किंबहुना तसंच होतं म्हणून मग सगळे ताण- कर्तव्य- परंपरा समजून घेऊन त्यांच्याशी समरस व्हायला लागणारा धीर -उत्साह -मनाची उभारी असं सारं मनोबल तिला माहेराहून मिळतं आणि म्हणूनच ती माहेरी जाते. अशीही सासुरवाशीण  कधी गृहिणी -आदर्श माता, पत्नी सून होते ते कळतच नाही.


               " पुन्हा होउन लेकरु नदी वाजवते वाळा

                 पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा

            

         " पावसाळा" निसर्गातील, जीवसृष्टीतील एक साधी घटना- उन्हाळा ,पावसाळा ,हिवाळा पण या निसर्गचकराचं सारं नव- सृजन ह्या पावसाळ्या वरच अवलंबून असते. पावसाळ्यात बळीराजा आतुरतेने ढगांकडे डोळे लावून बसलेला असतो, मनोमन प्रार्थना करतो की " देवा यंदा तरी चांगला पाऊस होऊ दे, माझ्या शेतात चांगलं पीक येऊ दे.

            मुलीचं लग्न, मुलाच्या शिक्षणाची फी, म्हाताऱ्या आईचं आजारपण ,औषध पाणी, मोडकळीला आलेल्या घराची डागडुजी किती जबाबदाऱ्या, किती प्रश्न आणि किती स्वप्न असतात त्याच्या डोळ्यात. आणि मग मेघ बरसतात, तहानलेली धरणी-पशुपक्षी-झाडं वेली तृप्त होतात. जणु नदीच्या पायातला वाळा पाण्याच्या आवाजाच्या रूपात वाजतो आहे आणि तापलेल्या ,रापलेल्या उजाड- ओसाड डोंगर ,माळराणावर  नवी हिरवाई रांगते आहे. किती सुंदर भाव -कल्पना आहे.

               सासरी जाताना मुलगी जेव्हा वडिलांना बिलगुन रडते -दुःखी होते, त्यावेळी बापाचं ही काळीज तुटतं च पण तसं तो दाखवत नाही. आणि मग जेव्हा मुलगी लग्नानंतर पहिल्यांदा घरी येते सासरची तारीफ करते, नवऱ्याचं कौतुक सांगते, तेव्हाही बापाचा ऊर भरून येतो तोच. आणि जेव्हा ह्या हळव्या बापाचा "आजोबा" होतो तेव्हा तर आनंदाला उत्साहाला उधाणच आलेलं असतं.

                  मानवी जीवन सृष्टीच्या -निसर्ग चक्राच्या

वर्तुळा सारख आहे , जन्माला येताना लहान- मुल, मग तारूण्य, विवाह ,पालकत्वाचा महत्त्वाचं कर्तव्य, आणि शेवटी 'आजोबा' किंवा 'आजी' होऊन अनुभवास परत मिळणार बालपण. एक वर्तुळ पूर्ण झाल्याचा आनंद आणि समाधान.

                  गदिमांनी नदी ,सागर ,डोंगर या नैसर्गिक घटकांना घेऊन जणू मानव जातीची कधीही न संपणारी    ,अव्याहत चालणारी, जीवन सृजनाची कथाच लिहिली आहे. या कथेचं मुख्य ,केंद्रीय पात्र आहे नदी -माता- जननी. सिंधू संस्कृती ,ग्रीक संस्कृती किंवा इतर कुठलीही मानवी वसाहत ही नदी किनारीच होती आणि असते. ही नदीच माणसाची माता पालक रक्षण करती होती आहे आणि नेहमी राहील, आणि म्हणूनच जेव्हाही नदी असो किंवा कुठलीही नवपरिणीत आ, किंवा एखादी सासुरवाशीण जर ती माता आहे ,जननी आहे तर तिलाही माहेर असणारच आणि हे माहेरच तिला नव सृजनाची प्रेरणा देणार.


🎭 Series Post

View all