Login

मूल्य उशीराचं...भाग 3 अंतिम

स्वतः साठी जगायला हव
मूल्य उशीराचं...भाग 3 अंतिम

घरी आल्यावर दोघांनी एक नवा उपक्रम सुरू केला – "तुमचं नातं, तुमची गोष्ट" – ज्यात ते जोडप्यांना नात्यांमधलं समजूतदारपण, संवाद आणि माफ करण्याची कला शिकवायचे.

ते दोघं एकमेकांचे नव्याने मित्र झाले होते.

देवेंद्रने एक दिवस मुलांना मेसेज केला –

"माझं आणि तुझ्या आईचं नातं, मुलांनो, केवळ लग्नाचं नव्हतं… ते आता मैत्रीचं, समजूतदारपणाचं, आणि नव्याने फुललेल्या प्रेमाचं आहे.
उशिरा का होईना, पण मला तिचं खरं मूल्य कळालं आहे – आणि त्याचं ऋण मी शेवटच्या श्वासापर्यंत फेडत राहीन."

एक संध्याकाळ अशी आली, जिथे दोघं गच्चीवर पुन्हा झुल्यावर बसलेले होते. हातात हात, डोळ्यात शांततेची भाषा.

"मंजिरी, आता जर तुझं आयुष्य पुस्तकासारखं असतं, तर मी कोण असतो?"

ती हसून म्हणाली,
"कदाचित तू सुरुवातीचा थोडासा कठोर अध्याय असतास… पण शेवटी तूच 'पसंतीचा शेवट' झाला असतास."

कारण जेव्हा नातं तुटत असतं ना तेव्हा त्या शिवणीत माणसांची खरी जवळीक तयार होते.
फक्त, किंमत वेळेवर समजली पाहिजे… आणि जर उशीरा समजली, तरी तिचं प्रायश्चित्त ‘नवे पान’ बनून भरून काढता येतं.

मंजिरी आणि देवेंद्रचं नातं आता फक्त पती-पत्नीपुरतं उरलं नव्हतं. ते खऱ्या अर्थाने जीवनसाथी झाले होते.

देवेंद्र आता सकाळी उठल्यावर चहा बनवायचा प्रयत्न करायचा.
कधी साखर कमी, कधी जास्त.
मंजिरी त्याच्याकडे पाहून हसायची –
"हे काय? हॉटेलमध्ये ठेवायचंय का आता 'देवेंद्र टी स्टॉल'?"

"तू कधी घर सोडून जाशील या भीतीनं मी आता सगळं शिकून घेतोय." तो मिश्किलपणे म्हणायचा.

मंजिरी हसून त्याला एक हलकं फटका मारायची आणि म्हणायची,
"उशिरा का होईना, शहाणा झालास."

एका दिवशी घरातली जुनी ट्रंक उघडताना मंजिरीला काही जुने कागद सापडले – ती लिहायची ती डायरी.

देवेंद्रने ती हातात घेतली. वाचायला परवानगी मागितली. मंजिरीने एक क्षण विचार केला आणि मान हलवली.

पहिलं पान –
“आज देवेंद्र माझ्यावर खूप रागावला… पण मला त्याच्या डोळ्यांत थकवा दिसतो. कदाचित तो फक्त मला व्यक्त करायचा मार्ग शोधू शकत नाही.”

पुढचं –

“कधी वाटतं, मी त्याचं आयुष्य आहे, पण तो माझं अस्तित्व विसरतोय…”

ते वाचून देवेंद्र गप्प झाला. डोळे भरून आले.
"तू हे सगळं सहन केलंस आणि कधी सांगितलंसही नाहीस?"

"कारण मला त्या नात्यावर विश्वास होता."

"हो आणि हरवलाही… पण मी तुला पुन्हा शोधण्याची हिम्मत ठेवली."

मंजिरीच्या या प्रवासानं अनेक स्त्रियांना प्रेरणा दिली. तिचं नाव 'सखी संवाद' या संस्थेशी जोडलं गेलं.
तिने महिला संवाद सत्रं घ्यायला सुरुवात केली – "स्वतःचं अस्तित्व आणि नात्यांतील समतोल"

देवेंद्र तिच्यासोबत जात असे.
एका सत्रात त्याने एका तरुण पतीला सांगितलं –
"साथ म्हणजे फक्त जबाबदारी नाही… ती ओळख आहे.
मी उशीरा ओळखलं – पण आज मी स्वतःला अधिक पूर्ण वाटतो… कारण मंजिरी आज माझ्या सोबत आहे."

त्यांच्या लग्नाचा ३०वा वाढदिवस होता.

मुलं परदेशातून परत आली होती. घरात आनंद होता.
एका छोट्याशा समारंभात, देवेंद्रने सगळ्यांसमोर मंजिरीच्या गळ्यात पुन्हा मंगळसूत्र घातलं.

"हे त्या दिवसासाठी आहे – ज्या दिवशी तू माझ्या आयुष्यात पुन्हा परत आलीस.
माझ्या चुका, माझा अहंकार… सगळं विसरून, तू मला पुन्हा एक संधी दिलीस.
आज मी तुझं नव्याने मनापासून स्वागत करतो."

मंजिरीचे डोळे भरले. ती हळूच म्हणाली,
"आता तू हरवला तरी चालेल… कारण मी तुला माझ्या हृदयात पुन्हा शोधून ठेवलेलं आहे."

संध्याकाळी दोघं परत त्यांच्या आवडत्या झुल्यावर बसले होते.

आज देवेंद्रच्या हातात एक डायरी होती – नवी सुरुवात
त्याने लिहायला सुरुवात केली होती.

“ही कथा आहे त्या स्त्रीची जी समोर असतानाही दुर्लक्षित राहिली… पण हरवली तेव्हाच खरी ‘ओळख’ झाली.

प्रेम हे गोंजारणं नसतं… ते ओळखणं असतं.

आणि मंजिरी… तू माझं आयुष्य आहेस. मला उशीरा कळालं – पण आता आयुष्याचा प्रत्येक क्षण तुझ्यासोबतच जगायचाय…”

मंजिरीने हळूच डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं. गच्चीवर वाऱ्याचा मंद आवाज… आणि दोघांचं नवं, हळवं, सुंदर नातं.