मुलगीच हवी आहे..!

Mulgich


मुलगीच हवी आहे....!

"स्मिता ,अग पुन्हा मुलीचाच गर्भ जर असेल तर तुझी सासू तुला घरातून बाहेर काढणार आहे असे मी ऐकले आहे..." स्मिताची आई जरा घाबरत म्हणाली..

स्मिता जरा धाकात होती...आधीच एक मुलगी आहे आता ही जर मुलगीच झाली तर, मला सासरचे घ्यायला येणार नाहीत... ह्यात रवी ही इथे नाहीत...मी कशी सहन करू हा धाक..

स्मिता भरल्या डोळ्याने आईकडे बघत होती ,तिची ती हतबलता आईला स्पष्ट दिसत होती, सासू कडक स्वभावाची...

स्मिताला नेहमी , तू लेकीसारखी आहेस माझ्या असे म्हणणारी सासू, आज किती तोडून बोलली होती माझ्या लेकीच्या ह्या नाजूक अवस्थेत.....आणि हे ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आले.

आपल्या काळजाचा तुकडा इतका कधीच हतबल झालेला पहिला नव्हता. तिला पहिल्या बाळंतपणाच्या वेळी किती लाड केले होते त्या सगळ्यांनी...वरचे वर सगळ्यांना वाटत होते मुलगाच होईल...तसे त्यांच्या बाबा,बुवा यांनी ही सांगितले होते...म्हणून त्यांना आस होती मुलगा होईल...

आई, "स्मिता अग मुलगी जर झाली तर तुझ्या सासरचे तुला पुन्हा घ्यायला येवो ना येवो ,तू इथेच रहा माझ्या सोबत, मी खूप खमकी आहे मी सांभाळ करेन तुझ्या लेकीचा..लेकरू देवाची देण असते त्यात मुलगी जन्माला घालणे हे बाईच्या कुठे हातात असते...मी ही मुलीच जन्माला घातल्या...पण मला कसले दुःख नाही की कसली खंत नाही..मी नशीबवान समजते हो स्वतःला.. तू आणि राणी माझे जग आहेत...मी पाहिले तुझ्या काकुला मुलगा झाला तेव्हा आपल्या घरच्यांनी किती जोरदार बरसे केले होते ,सगळ्या गावाला जेवण घातले होते... गावातील प्रत्येक सुवासींनीला साडी दिली होती...गावातील एकूण एक देव पुजला होता...काय तो थाट केला होता..तू ही त्याच्या सोबत जन्माला आली होतीस ,पण तुझे जरा ही कौतूक केले गेले नव्हते..सोबतच पाळण्यात टाकले होते दोघांना पण तो मुलगा म्हणून, वंशाचा दिवा म्हणून किती कौतुक झाले होते त्याचे, त्याला सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्यांनी सोन्याचे पदक, बाळ्या, चैन आणल्या होत्या...पण तुला साधे पैंजण ही कोणी आणले नव्हते हो...पण वाईट तर वाटत होतेच...मला तर रडू आले होते...तुझ्या बाबांनी मग तुझ्यासाठी एक मोठा पाळणा आणला होता, त्याला किती तरी फुलांनी सजवला होता...त्यांच्या ऑफिस मधील सगळ्या कर्मचाऱ्यांनी तुला किती तरी खेळणी आणली होती...तुझ्या साठी खास बाबांनी तेव्हाच एक पोलिसी काढली होती...मिहीर पेक्षा आता तुझ्याकडे सगळे येत होते...ज्यांनी काही आणले नाही त्यांनी पैसे ठेवले होते तुझ्या हातात... तुझ्या बाबांसाठी तू त्यांची परी होतीस...तुझ्या एका छोट्या गोड हास्याने बाबा त्यांचे सगळे ताण तणाव विसरून जात होते, ते लवकर घरी येऊ लागले होते... मग त्यांना तुझ्या पायगुणामुळे प्रमोशन ही मिळाले... त्यात आता सरकारी घर ही मिळाले... आणि आपले दिवस पालटले.... पण जो वंशाचा दिवा म्हणून ज्याचा गाजावाजा केला होता तो लाडात वाढल्याने बघडत गेला...त्याला नको ते व्यसन जडले....घर विकायची वेळ त्याने घराच्यांवर आणली.... लक्ष्मी केली....म्हणून मला माझ्या मुली नशीबवान वाटतात....कोणाला हे सत्य पटो न पटो मला आणि बाबांना पदोपदी हा अनुभव येतोच... ह्या वेळी ही येईल...सांगू का तुला तू तुझ्या पहिल्या मुलीचे स्वागत खूप आनंदाने केलेस ,तुझ्या सासरच्यांनी ही केले ,ती ते खूप जीव ही लावतात...किती लाड पुरवतात ,मी तर म्हणते देव ह्या वेळी तुला मुलगाच देईल हे नक्की.."

आईचे बाकीचे बोलणे तिला पटत होते पण शेवटचे बोलणे तिला नाही पटले , तिला ही मुलगाच अपेक्षित आहे का ?? आणि ह्या वेळी मुलगी नकोय का तिला..? जर मुलगी झाली तर आईचे ही मन दुखावले का ?? पण काही असो मुलगा व्होवो की मुलगी मी तर आई म्हणून दोघांचे ही आनंदाने स्वागत करणार आहे...मी आई आहे मला दोघे ही हवेत...भले ही सासरच्यांनी मुलीचे स्वागत नाही केली तरी मला ह्या वेळी मुलगीच हवी आहे...मी माझ्या मनाची तयारी केली आहे...माझे भाग्य मी टळणार नाही.....माझ्या बाबांनी तर दोन्ही मुलींचे आनंदाने स्वागत केलेच होते ना मग ,माझ्या मुलींचा बाबा तर ह्या युगातला आहे...त्याचे विचार ही बाबांसारखेच असतील...तो नक्कीच इतरांसारखे वागणार नाही...


थोड्या वेळात विचार करता करता स्मिताला गुंगी लागली...

इकडे सासूबाईला म्हणजे स्मिताच्या आईला जावई बापू यांचा फोन आला ," हॅलो आई ,स्मिता कशी आहे...तिला डॉक्टर ने आराम करायला सांगितला आहे तर तिने सध्या काही विचार न करता ,कसलाच विचार न करता फक्त आराम करावा...मी तर निघालो आहेच...पण तरी तुम्ही ही तिला सक्त आरामाची ताकीद द्या...आम्हाला दुसरे अपत्य मुलगी किंवा मुलगा ह्या फांदात पडायचे नाही....कारण पहिल्या मुलींमुळे माझे नशीब खूप उजळले आहे ,आणि ह्या वेळी ही मुलगीच झाली तरी माझी आणि माझ्या घरच्यांची काही एक हरकत नाही...स्मिताने आईच्या कालच्या बोलायचे जास्त मनाला लावून घेऊ नये.....तिला बाळाची काळजी घ्याची आहे...बाकी मी कायम तिच्या सोबत आहे..."

जावई बापूचे बोलणे ऐकून स्मिता च्या आईचा जीव भांड्यात पडला होता ,आता त्या बिनधास्त झाल्या होत्या ,एक खुललेल्या चेहऱ्याने त्या स्मिताकडे आल्या होत्या . आईला असे निर्धास्त पाहून लेक ही खुश होती...

स्मिता, "काय ग ,अशी एकदम टेन्शन नसल्यासारखी छान हसतेस, काय झाले असे अचानक तुला "

आई, "जावई बापूंचा फोन होता ,ते येत आहेत, आणि तुला निरोप आहे, ते म्हणाले ह्या वेळी ही मला मुलगीच हवी आहे "

स्मिता ही खूप खुश झाली होती ,तिच्या मनावरचे ओझे आता कमी झाले होते... आता तर मुलीच्या स्वागताला तिचे बाबा ही तयार झाले होते...