मुलायम माती...!!

हृदयस्पर्शी कथा..!

कथेचे नाव : मुलायम माती

विषय : काळ आला होता पण

फेरी : राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा

बाहेर कोंबड्यांची जोरदार झुंज सुरू झाली आणि राधाआईची तंद्री तुटली. कुठल्या संकटाची चाहूल तर नाही; राधाआई मनातच म्हणाली.
दहा बाय बाराची झोपडी. चारी बाजूंनी शेणानी लिपलेली. कोपऱ्यातल्या मातीच्या चुलीपाशी राधाआई बसली होती. आज पाटलाच्या शेतात दिवसभर राबून, थकून गेली होती. आज तिच्याबरोबर तिचा मुलगा अर्जुन देखील मदतीला होता; परंतु पाटलांनी त्याला थांबवून ठेवले होते.


पावसाळ्याचे दिवस असल्याने बाहेर रिमझिम सुरू झाली होती. आपला मुलगा अजून घरी परतला नाही, म्हणून राधाआई ची चिंता वाढत होती. सात मुलींच्या पाठीवर नवस करून अर्जुनचा जन्म झाला होता. त्यातील तीनच मुली जगल्या होत्या. तिघींची लग्न होऊन सासरी सुखाने नांदत होत्या. एवढ्या वर्षांनी, सात जणींच्या पाठीवर अर्जुन चा जन्म झाल्याने राधाआईनी त्याला अगदी तळहाताच्या फोडा प्रमाणे जपले होते, अजुनही जपत होती.


राधाआई कायम सगळ्यांच्या मदतीला धावून जात असे. कष्टाने राधाआई चे शरीर कृश झाले होते. अंगाचा सापळा झाला होता. मजबूत बांध्याचा पंधरा - सोळा वर्षाचा अर्जुन राधाआई ला शोभत देखील नव्हता. पतीच्या निधनानंतर राधाआई ला एकुलता एक आधार राहिला होता; पण त्याला ना बोलता येत होतं ना ऐकता. त्यामुळे राधाआईचं आयुष्य मुलाप्रमाणे मूकबधिर झालं होतं!
त्यातच अर्जुन च्या मूकबधिरपणाचा फायदा गावातील सगळे लोक घेत होते. दिवसभर त्याला राबवून घेतं.
आजही तेच झालं होतं. दिवस मावळला तसा पावसाचा जोर वाढत होता. राधाआई ला येऊन बराच वेळ झाली तरी अर्जुन अजुनही आला नव्हता.
राधाआई ने लेकाची वाट पाहून कोंबड्या टारल्याखाली डालल्या अन् चारही शेळ्या दाव्याला बांधल्या. रोज हे काम अर्जुन करायचा म्हणून शेळ्या देखील राधाआईवर गुरगुरत होत्या. आज मनी राधाआईच्या पायात घोटळत होती. पदर ओढत तिला काही तरी सांगू पाहत होती परंतु राधाआईला तिची भाषा कळतं नव्हती. राधाआई च्या लक्षात आले की, आपला मोती (कुत्रा) पण आज अजून घरी नाही. कारण रोज यावेळी अर्जुन बाहेर च्या बाजेवर आणि मोती त्याच्या पायाशी निवांत पहुडलेला असतो.
अर्जुन मूकबधिर असल्याने गावातील, वस्तीतील मुलं त्याच्याबरोबर खेळत नसतं. त्याने काही हातवारे केले की हसून, त्याला चिडवत उत्तर देतं. त्यामुळे कोंबड्या, शेळ्या, मोती, मनी यांच्यातच अर्जुन रमायचा. त्यांना जणू अर्जुनच्या वेदना उमगायच्या. अर्जुन नुसता दिसला तरी मोती, मनी धावत त्याच्यापाशी जायचे. तो मायेने सगळ्यांना जवळ घ्यायचा आणि त्यांच्याबरोबरच आपला वेळ घालवायचा. घरी असलेल्या या प्राण्यांबरोबर अर्जुनचे मैत्रीचे घट्ट नाते तयार झाले होते. समोरील प्रेमळ दृश्य पाहून राधाआईच्या डोळ्यात पुनवेचं दहीदाट चांदणं उतरायचं!
अर्जुनची भाबडी भाषा फक्त राधाआईलाच समजत असे. तो आपल्या आईशी हावभाव करत बोलताना कोणी पाहिले तर लगेच म्हणायचे,
"राधाआई, काय म्हणतोय तरी काय तुमचा ल्योक? तुम्हाला कळतयं म्हणून तरी बरं हायं.नायतरं... "
राधाआईने रागाने कटाक्ष टाकला की बोलणारी व्यक्ती गपगुमान निघून जात असे. राधाआई शक्य तेवढ्या लोकांना तोंड देत होती.
अर्जुन आईला हावभाव करत म्हणायचा,
"आई, आपल्याला जशा वेदना आणि भावना आहेत तशाच या प्राण्यांना देखील असतील. हेच मला संकटात नक्की मदत करतील.. बघ तू!"

विचार करत कोंबड्या, शेळ्यांचं आवरून डोक्यावरचा पदर नीट करत हातात कंदील घेऊन राधाआई अर्जुनला शोधायला बाहेर पडली.
"अर्जुना... अय अर्जुना... आरं बाबा, कुठं हाय तू?"
राधाआई ची आर्त जिव्हाळ्याची, मायेची हाक अर्जुनला कशी ऐकू जाईल, तो तर...!!

पावसाचा जोर वाढत होता तशा राधाआई झपझप पाऊले टाकत होती. चालत चालत राधाआई गावातील भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत पोहचली. वडीलांच्या निधनानंतर वडीलांचा दिनक्रम अर्जुन कोणीही न सांगता पाळत होता. देवाच्या दर्शनासाठी अर्जुनचे वडील दररोज मंदिरात जात असतं. एखाद्या दिवशी सकाळी काम असेल तर संध्याकाळी जात परंतु दररोज न चुकता देवदर्शन घेतं.
आज अर्जुन सकाळी मंदिरात गेला नाही म्हणून आता शेतातून येताना गेला असेल म्हणून राधाआई मंदिरात गेल्या; परंतु अर्जुन तिथे नव्हता.
मंदिरापासून थोड्या अंतरावरून एक ओढा वाहत होता. पावसाळ्याचे दिवस असल्याने पाणी होते; परंतु माणूस आरपार जाऊ शकत होते. राधाआईला आपल्या मोती कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला तशी ती आवाजाच्या दिशेने धावली. अर्जुनला आवाज देत पुढे निघाली तोच पाय चिखलात घसरला आणि ओढ्याशेजारच्या काळ्या कठीण कातळावर राधाआईचा मणका आदळला.
कंदील खाली पडला तसा विझला.
राधाआई वेदनेने विव्हळत लेकराला आवाज देतच होत्या,
"अर्जुना... अय अर्जुना..."
तेवढ्यात राधाआई जवळ मोती आला.. मोतीच्या भुंकण्याने पावसातून घरी जाणारे, राधाआईचे शेजारी अशोक तात्या थबकले;
"हा आवाज तर अर्जुनच्या घरच्या राखणदाराचा.."
अशोक तात्या धावतचं राधाआई जवळ आले.
विव्हळत राधाआई उठण्याचा प्रयत्न करत होती; पण तिला उठताच येईना. राधाआई क्षीण आवाजात म्हणाली,
"अशोक तात्या अगदी देवावानं आलासी.. आमच्या मोत्याच्या मागं मागं जा बरं..."
अशोक तात्या घाईघाईने मोत्याच्या मागे गेले आणि अर्जुनाला चिखलात बरबटलेले पाहून घाबरून गेले. पावसाचा जोर वाढल्याने ओढ्याचं पाणी गढूळ झालं होतं आणि हळूहळू वाढत होतं.
पाटलांच्या शेतात दिवसभर राबून घरी येताना ओढ्यातून घरी यायला जवळ पडेल म्हणून अर्जुनने वाट वाकडी केली होती. ओढा पार झाला; परंतु त्याचा पाय घसरला. मातीत पाय रूतल्यामुळे आणि दिवसभराच्या कष्टामुळे अर्जुनाला चक्कर आल्यासारखे झाले. मोती बरोबर होता म्हणून निभावले!
घाबरलेल्या अर्जुन ला राधाआईने घट्ट धरून ठेवत म्हणाली,
"आज जर तुला काही झाले असते तर मी एकटी घरी गेलेच नसते. मी ही इथेच जलसमाधी घेतली असती!"
अर्जुनाला ऐकू आले नाही परंतु आईच्या चेहऱ्यावरील भाव त्याला सगळं काही सांगून गेले.
अशोक तात्यांनी घाई करून दोघांना जवळच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
आज चार दिवसांनी दोघेही सुखरूप घरी परतले तर स्वागताला मोती आणि मनी झोपडीच्या दाराशी येऊन बसले होते. राधाआई ने अशोक तात्यांसारख्या देव माणसाचे आभार मानले.
पाण्याखालच्या मातीपेक्षा ममतेची माती आज जास्त मुलायम ठरली होती. एक आई आपल्या मुलाला मरणाच्या दारातून बाहेर काढण्यासाठी काहीही करू शकते. तिच्या मदतीला आज अर्जुनचा प्रिय साथीदार मोती होता. निष्ठावान आणि प्रेमळ मोतीमुळे आज दोघेही संकटातून बाहेर पडू शकले.काळ आला होता पण मोतीने वेळ येऊ दिली नाही..!!!
प्रत्येक व्यक्तीने जर पशू पक्ष्यांशी प्रेमाने व्यवहार केला तर जग अजून सुंदर होईल, यात शंका नाही.

समाप्त.
लेख आवडल्यास like, comment and share करायला विसरू नका.
©® आरती संभाजी सावंत
जिल्हा पुणे