असेच एके दिवशी,
लीना मार्केटमध्ये गेली असता, तिथे तिला आपल्या बिल्डींगमध्ये राहणारी वीणा भेटली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर वीणाने बोलता बोलता लीनाला मीनलबद्दल सांगितले.
"मीनल एका गरीब कुटुंबातील होती. तिला खरी आई नव्हती. सावत्र आईचा खूप त्रास होता. मीनलने सावत्र आईचा त्रास सहन करत आपले शिक्षण पूर्ण केले होते. लग्न करून सुखी संसाराची तिने स्वप्न पाहिले होते. मुलगा मुंबईत नोकरीला आहे, दिसायला चांगला आहे. त्यामुळे मीनलच्या आई बाबांनी तिचे लग्न ठरवले. मीनलही खूप आनंदी होती. लग्न झाल्यावर सासरी आल्यावर सुरुवातीला तिला सर्व छान वाटत होते. तिची इच्छा म्हणून त्यांनी तिला नोकरी करू दिली. पण तिचा नवरा तिला शारीरिक सुख देऊ शकत नव्हता. हे तिला जाणवत होते. आपली ही समस्या माहेरी सांगून काही होणार नव्हते. माहेरी सावत्र आई आणि आपले दुःख वडिलांना सांगून अजून ते दुःखी होतील. त्यामुळे तिने माहेरी न जाण्याचे ठरवले. पण आता घर सोडून जाणार तरी कुठे? म्हणून ती मन मारून इथेच राहत होती. कामात आपले मन रमवत होती. लग्न झाल्यानंतर तिलाही मातृत्व हवे होते व तिच्या नवऱ्याला, सासूबाईलाही घरात मूल हवे होते.
ओळखीच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने, त्यांनी आय.व्ही.एफ. करण्याचे ठरवले.
सुरुवातीला मीनलचा या गोष्टीला विरोध होता ; पण सासू व नवऱ्यापुढे तिचे काही चालले नाही.
एक दोन प्रयत्नानंतर मीनल गरोदर राहिली व तिने श्लोकला जन्म दिला.
मीनाला नोकरीची आवड आहे म्हणून तिचे मन सांभाळण्यासाठी तिच्या नवऱ्याने व सासूने तिला नोकरी करू दिली होती. बाळंतपणाची रजा संपल्यावर ती पुन्हा कामाला जाऊ लागली होती.
आता सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. असे मीनलच्या सासुला व नवऱ्याला वाटत होते; पण मीनलचे ऑफिसातील एका पुरुषाबरोबर प्रेम आहे. असे तिच्या नवऱ्याला कळल्यापासून घरात वाद,भांडणे सुरू झाली होती.
'मी बरोबर.. तुम्ही चुकीचे.' असे मीनलचे म्हणणे होते.
तर
'आम्ही बरोबर... तू चुकीची.'
'आम्ही बरोबर... तू चुकीची.'
असे तिच्या सासूचे व नवऱ्याचे म्हणणे होते.
प्रत्येक जण आपल्या स्वतःचा विचार करत होते.
'माहेरी सावत्र आईचा त्रास आता लग्न झाल्यावरही मनातील इच्छांना मारून जगायचे का? आपल्या वाट्याला सुखाचे क्षण नाहीच का?'
असा मीनल विचार करायची.
ऑफिसात तिची विशालसोबत ओळख झाली. पुढे मग मैत्री व त्यानंतर प्रेमात रूपांतर होत गेले. 'नवऱ्यानेही आपली फसवणूकच केली आहे ना? आपण करत आहोत ते चूक की बरोबर?' हा विचार तिच्या मनात यायचा.
शेवटी तिने आपल्या मनाला जे योग्य वाटले ते केले. विशालचेही कुठे लग्न जमत नव्हते. शिक्षण, नोकरी त्याचे चांगले होते आणि तो मीनलच्या मुलाला वडिलांचे नावही देणार होता, त्याला स्वीकारणार होता. सर्व काही अनुकुल वाटल्यावरच मीनलने तिच्या नवऱ्याशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला."
वीणाने मीनलविषयी हे सर्व सांगितल्यावर लीनाला तिच्याविषयी वाईट वाटले.
"तुम्हांला हे कोणी सांगितले?"
लीनाने वीणाला विचारले.
"ती यायची माझ्याकडे तिचे मन मोकळे करायला. तिला इथे जवळच असं कोणी नव्हतं. मलाही वाईट वाटायचे तिचे हे सर्व ऐकून."
वीणाने सांगितले.
"एक स्री म्हणून आपल्याला मीनलविषयी सहानुभूती वाटते. तिच्या आयुष्यात तिने काय करावे? हा निर्णय तिचा होता. तो बरोबर की चूक? हे आपण काय सांगणार? पुढे तिच्या आयुष्यात ती सुखी राहावी. एवढीच देवाला प्रार्थना करू शकतो."
लीना वीणाशी बोलली व नंतर दोघीही एकमेकांचा निरोप घेऊन आपल्या कामासाठी निघून गेल्या.
'दिसतं तसं नसतं.. खरंच आपल्याला लोक जशी दिसतात.. तशी नसतात.
वागण्याबोलण्यातून प्रेमळ, आनंदी दिसणाऱ्या लोकांच्या आयुष्यात काय सुरू असते? त्यांचे स्वभाव, गुण किंवा इतर परिस्थिती याचा काही अंदाजही करता येत नाही.
किती लोक चांगुलपणाचा मुखवटा धारण करून आपले खरे रूप लपवत असतात?
मीनलसारखे लोक दु:ख सहन करत आनंदीपणाचा मुखवटा धारण करून जगत असतात.
तिच्या आनंदी चेहऱ्यावरून मला तिच्या दु:खाची कधी जाणीवही झाली नाही.
तिची सासू व नवरा चुकले. त्यांनी असे करायला नको होते. असे माझ्या मनाला वाटते आहे. कारण मी एक स्री म्हणून मीनलचा विचार करत आहे.
आपल्याला अशा घटना कळल्यावर वाईट वाटते. पण काही दिवसांनी आपण त्या विसरूनही जात असतो.
पण जगात असेही अनेक मुखवटे असतील... ज्यांच्या मागचे खरे रूप आपल्याला माहित नसेल.'
या विचाराने लीना घरी पोहोचली व आपल्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली.
समाप्त
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा