“आई काय स्वयंपाक केला आहे आज?”
नितीन किचन मध्ये कढई वरचे झाकणं उघडून बघत सुधाताईंना म्हणजे त्याच्या आईला विचारत होता.
“ आज तुझ्या आवडीची मटकीची उसळ आणि अळूच्या वड्या आहेत बरं नितीन.”
“अरे वाह मग आई मला टिफीन दे ना आज समिधाचा सुद्धा टिफीन दे. मी येतो जरावेळात बाहेरून.” असं बोलत नितीन पटकन निघून गेला.
सुधाताई त्याला जाताना बघत होत्या. गेल्या वर्ष भरातल्या घटना त्यांच्या डोळ्यांसमोर येत होत्या. त्या त्यांच्याच विचारात मग्न झाल्या.
सुधाताई आणि दिनेशरावांची नितीन आणि आभा ही दोन मुले. छोटंसं सुखी कुटुंब. आभा नितीनपेक्षा आठ वर्षांनी लहान होती. त्यामुळे नितीनचे लग्न आभाच्या आधी झाले. त्यात त्यांचं लव्ह मॅरेज.
सुधाताई आणि दिनेशराव हे खुल्या विचारांचे असल्यामुळे लगेच लग्नाला होकार दिला. थाटामाटात लग्नं झालं. नवीन सून समिधा घरात आली.
दिसायला सुंदर, नाजूक, उच्चशिक्षित, लाडात वाढलेली. नितीनच्या आधीच्या ऑफिसमध्ये काम करायची. समिधा घरात आल्यापासून घरात नवीनच उत्साह होता.
“आई मला स्वयंपाक येत नाही हो.” समिधाने अगदी प्रामाणिकपणे सुधाताईंना सांगितले. तिला थोडं ऑड वाटत होतं सांगताना पण खरं काय ते आधीच सांगितलेलं बरं. उगाच आपली फजिती नको व्हायला म्हणून तिने सांगितले.
“ माहीत आहे गं मला, नितीनने आधीच सांगितले होते. तू काळजी करू नकोस. मी शिकवेल तुला सगळं फक्त तुझी तयारी असली पाहिजे शिकायची.” सुधाताई आधी गालातल्या गालात हसल्या आणि मग समिधाला अगदी प्रेमाने समजावून सांगीतले.
सुधाताईंच्या बोलण्याने समिधाला खूप बरं वाटलं. ती लगेच म्हणाली.
“ हो आई मी शिकेल नक्की. अगदी आवडीने शिकेल.”
त्यांचं हे बोलणं आभा पण ऐकत होती. समिधाच्या बोलण्याला दुजोरा देत आभा लगेच म्हणाली.
“ हो वहिनी मला पण काही येत नाही आपण दोघी क्लासेस लावू आई कडे आणि रोज प्रयोग करत जाऊ.”
तिच्या ह्या बोलण्यावर तिघीजणी एकदम हसल्या. त्यांनतर आभा आणि समिधा रोज एक पदार्थ शिकत होत्या. सुट्टीच्या दिवशी संपूर्ण स्वयंपाकाची जबाबदारी आभा आणि समिधावर असायची. बघता बघता दोन तीन महिन्यात दोघी सगळा स्वयंपाक शिकल्या. पण तो पर्यंत सगळ्यांनी कधी कच्चा, खारट, तिखट, तेलकट असेल तसा स्वयंपाक आवडीने आणि कौतुकाने खाल्ला.
नितीन समिधाच्या लग्नाला आता सहा महिने झाले होते. सुधाताईंच्या असं लक्षात आलं की समिधाला आता एकत्र राहणं आवडतं नाहीये. समिधा राहते आहे, चांगली बोलते सुद्धा. पण तरी ती हवी तितकी खुश नाहीये. कामाचा, स्वयंपाकाचा कंटाळा करते. तिला तिचं वेगळं घर हवंय पण हे ती बोलूशकतं नव्हती. त्यामुळे दिनेशरावांशी बोलून त्यानी एक निर्णय घेतला.
एक दिवस त्यांनी नितीन आणि समिधाला अगदी प्रेमाने सांगितले की.
“ तुम्ही तुमचं वेगळं घर घ्या. तुमची स्वप्नं पूर्ण करा. जबाबदारी सांभाळायला शिका. आम्ही आहोतच तुमच्या पाठीशी.”
नितीनने आधी विरोध केला पण नंतर तयार झाला. ठरल्या प्रमाणे त्यानी थोड्या दूर पण काही अडी अडचणीला लवकर पोहोचता येईल इतक्या अंतरावर घर घेतलं.
समिधा आणि नितीनच्या संसाराला नव्याने सुरुवात झाली.
दर शनिवार रविवार नितीन घरी येत असे. समिधा कधी यायची तर कधी तिच्या माहेरी जायची असं सुरू होतं.
नंतर नितीन आठवड्यातून कधीही घरी चक्कर मारायचा.
“ आई काय केलं आज?” असं विचारायचा आणि दोघांना डब्बा घेऊन जायचा. सुधाताईंना आता ह्या गोष्टीची सवय झाली होती.
“ वाह आज सुद्धा वहिनीने स्वयंपाक केला नाही वाटतं.”
आभाच्या बोलण्याने सुधाताईंची तंद्री तुटली.
आभा पुढे बोलत होती.
“ काय गं आई आता वेगळे राहतात तरी स्वयंपाक करायला काय होतं तिला.? आता तर दोघांचा स्वयंपाक असतो फक्त. नेहमी नेहमी काय तू दादाला डब्बा देतेस? सांगना त्याला की तुझ्या बायकोला सांगत जा स्वयंपाक करायला.”
सुधाताई आभाकडे बघत होत्या. तिचं बोलणं बरोबर असलं तरी त्या काही बोलू शकत नव्हत्या नितीनला.
“ नाही आभा. त्यांना त्यांचा संसार करुदेत. आपण नाही बोलायचं त्यांच्यात.” सुधाताई आभाला म्हणाल्या.
“पण त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या कळाव्यात म्हणून तर तुम्ही त्यांना वेगळं. राहायला सांगितलं ना? मग असे लाड का? कसं कळेल त्यांना?” आभा सुधाताईंना विचारत होती.
“ आभा असं म्हणतात की मुलीचं लग्नं झाल्यावर आई वडिलांनी तिच्या संसारात बोलू नये. तिला तिचा संसार करु द्यावा. तोच नियम इथे पण लागतो. त्यांना त्यांचा संसार करुदेत. हळू हळू नितीन आणि ती शिकतील कसं करायचं मॅनेज. ते काढतील त्यांचा मार्ग शोधून. “ सुधाताई बोलत होत्या.
“परवाच नितीन सांगत होता की. त्यांनी समिधाला तू स्वयंपाक करत जा रोज, आई कडून नेहमी असं डब्बा आणायला मला नको वाटतं, असं सांगितलं आहे. आपण वाटत बघू जरा. नाहीच झालं काही तर मग मी बोलेल की नितीनला.”
काही दिवस असेच गेले तरी परिस्थिती काही बदलली नाही. एक दिवस सुधाताईंनी आणि दिनेशरावांनी नितीनला चांगलेच खडसावले. तो त्यांचे बोलणें ऐकून घेत होता.
“ आई बाबा तुमचं बरोबर आहे. मी खूप वेळा समिधाला समजावलं पण तिच्यात काही बदल होत नाही. तिला घरकाम जमणार नाही असं तिने मला स्पष्ट सांगितलं. कारण प्रवासाने ती खूप थकून जाते. त्यावर उपाय म्हणून आम्ही एक स्वयंपाकीण शोधत आहोत. म्हणजे तिला आणि मला रोज घरचं जेवण मिळेल.” नितीनने त्यांना सगळी परिस्थिती सांगितली.
काही दिवसांनी नितीनला स्वयंपाकीण बाई मिळाली. ती चांगला स्वयंपाक करायची. समिधा आणि नितीन आता हळू हळू जबाबदार बनत होते. घरातील काही कामं त्यानी वाटून घेतली होती. सुट्टीच्या दिवशी समिधा आवर्जून स्वयंपाक करायची. कधी सासू, सासरे, नणंद ह्यांना डब्बा द्यायची तर कधी त्यांना जेवायला बोलवायची. कधी घरी जाऊन आभा आणि ती जेवण बनवत असे. तरी अधून मधून आईच्या हातच्या जेवणाची आठवण आली की नितीन यायचा. दोघांचा डब्बा घेऊन जायचा.
एक दिवस असाच नितीन आला. समिधा माहेरी गेली होती आणि संध्याकाळी परत येणार होती. सुधाताईंनी खूप प्रेमाने दोघांचा डब्बा दिला. सोबत घरी केलेला चिवडा,गुलाबजाम पण दिले. आभा हे सगळं पहात होती.
“ वाह चांगले लाड करतेस गं मुलाचे.” आभा बोलली.
“असुदेत गं माझा मुलगा माहेरी येतो. हे माझ्या मुलाचं माहेर आहे, तर त्याचं माहेरपण करायला नको का? घालमेल होते त्याची कोणाला सांगत नाही बिचारा. 'इकडे आड, आणि तिकडे विहीर' अशी परिस्थिती आहे त्याची. म्हणून तो आला की त्याचं माहेरपण करते मी. तुला नाही कळणार अजून. तुझं लग्न झालं की कळेल माहेर काय असतं ते. पण नवऱ्याला असं माहेरपण नको देऊस हा.”
सुधाताई बोलत होत्या पण त्यांच्या डोळ्यांत पाणी होतं..
खरंच माहेर काय फक्त मुलीलाच असतं? जी मुलं लग्ना नंतर वेगळी राहतात. कोणतही करणं असो त्यामागे. अशा मुलाचं पण तर माहेर असतं ना? मग त्यांचं माहेरपण केलं तर काय हरकत आहे.?
धन्यवाद.
तुम्हाला माझी कथा कशी वाटली नक्की सांगा.. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका