आईबा(लघुकथा)

एकल पालकत्वाची कहाणी


"अरे शरद काय?आईबा,आईबा, करतोस रे,आता लग्न झालं ना?,मग कर कि सुखाचा संसार, म्हाताऱ्याला सवय आहे ना एकट राहायची, राहिलं तो आताही,नहाकच तुझ्या संसारात लुडबुड".

"असं कस म्हणु शकतात,काका तुम्ही,अहो,आईबाशिवाय माझ्या आयुष्यात काही आहे का?,"

"अरे ते बरोबर आहे,पण तुझ्या बायकोला चालेल का?तो म्हातारा,अरे त्याचा संसार नाही झाला, तुझा तरी संसार मार्गी लागू दे बाबा , आजकालच्या मुलींना नाही आवडत आपल्यात तिसरं त्यात तुझे वडिल काही बाई पेक्षा कमी आहे काय?,वहिणीगेली तसा तो फक्त तुला वाढवत बसला ".

शरद व काकांचं बोलणं,आजी ऐकत होती,जरा संतापलीच ती.. म्हणाली,"जगन काय?बोलतो ते कळत का?अरे ,सरू गेली तेव्हा सदाने शरदच सुख व त्याच भविष्य बघितलं रे,सावञ आई चा जाच नको म्हणून तो दुसऱ्या लग्नाला तयार झाला नाही कि आपल्या कोणाला शरदचा ञास होईल असाही वागला नाही...त्याच कर्तव्य त्याने केलं..आता त्याच काय? करायचं ते ठरवू दे कि त्यांच्या पोराला,बापाची कदर असेल तर वागेल मनाजोगता..".

काका आईच बोलणं ऐकून शांत बसला खरा व काही वेळातच म्हणाला,"अगं आई हे दोन पुरूष मंडळी कोणी पोर लग्न करायला तयार नव्हती,त्या पाहुण्यांना समजवलं तेव्हा ते तयार झाले व आज होकार आला...तेच शरदला समजतो ना आई..".

"अरे,पण तो त्याचा बाप आहे,हे विसरतो आहेस तु".

आजी व काकांच्या बोलण्यातून शरदला कळलं कि ,येणार स्थळही बाकीच्या स्थळांसारखच आई , मुलीला आईबाची अडचण नको आहे ती शंका आताच दूर करायला हवी..

शरद काकांना म्हणाला,"काका मला एक स्पष्ट सांगा हो.. तुम्ही मला अधिच का? नाही बोललात त्या लोकांची अशी अट आहे ते,मला मुलीशी बोलाव लागेल तोवर मी कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही..".

"म्हणजे हे वर्षही तु असंच घालवणार का?लोक नाव ठेवायला लागली रे.. तुझ्या बापानेही तसंच केलं आता तु..घाला काय?गोंधळ घालायचा ते मी नकार कळवतो तिकडे".

आता आजीचा संताप अनावर झाला,"अरे जगन मुलीशी बोलायचं म्हणतो ना?मग तुला काय?रे मिरची लागली .आजच काय?तो सोक्षमोक्ष लागू दे ना?अरे काय?चुकलं सदाच ,पोरासाठी बिना बायकोचा राहिला तो.. एकवेळ आई पोराला वाढवू शकते रे पण नऊ महिन्याच लेकरू सांभाळत आजवर शरदला त्याने लहानाचं मोठं केलं.कळू दे ना त्या पोरीलाही".

शरदचे डोळे भरून आले,"काका अरे काय?करू लग्न करून,सुखाचा संसार कसा रे करू मी आईबाशिवाय,माझ्या बा ने केलेला त्याग काय?आहे हे तुला नाही कळणार रे ,रातरात जागला असेल,अरे भाकरीचे चटके बाई सोसते ,पण माझ्या आईबाने भाकरी शिकता शिकता,हाताला ते चटके सोसले रे,लोक बायल्या म्हणायची आईबाला,पण डगमगला नाही,मला आईच्या पदराची सवय होती,आईबा आईच्या साडीचा पदर डोक्यावर घेत मला चमच्याने दूध भरवायचा.आजवर बायको गेली कि तीच्या जागी दुसरी बाई आणुन माणसं जबाबदारी झटकतात आईबान तस नाही केल.तोच जबाबदार झाला.बाईला पूरूषाची जबाबदारी निभावणं सोपं जातं रे पण आईबाने खुप कष्ट घेतली "आई "बनण्यासाठी म्हणून तर तो ,"आईबा"बनला रे..मला नाही करायचं लग्न जी पोरगी माझ्या आईबाला सांभाळणार नाही तिच्याशी ..जीला ह्या गोष्टीची जाण आहे, आईबाचा मानसन्मान जपनार तीच्याशीच मी लग्न करेन नाहि तर आईबाने मला सांभाळलं..आता मी सांभाळेल आईबाला ".

शरद बोलत होता हे सारं ऐकून आजीचे डोळे पाण्याने भरून वहात होती..काका तर शांतच झाला.खरच सदाकाकांच शरदप्रती प्रेम निराळच होतं..कोणता बाप बिनाआईच लेकरू मोठं करतो पण सदा काकांनी ते करून दाखवलं होतं.बायकात वावरत ,लोकांची बोलणी खात, समाजाच्या विरोधात जात, घरच्यांच्या विरोध पत्करून शरदच एकल पालकत्व निभावलं होतं.त्याची जाणं मुलगा कसं बरं नाही ठेवणार..ती जान शरदला होतीच.आईबाने त्यांच्यासाठी केलेला त्यागाची तो शिक्षा कसा बरं देणार.ती दोघच तर एकमेकांची होती.बायको करून बापाला विसरण कसं जमणार होतं शरदला.

शरद म्हणाला,"काका तुम्हाला काय?वाटतं त्यापेक्षा मला मुलीला काय?वाटत हे जाणून घ्यायचं आहे बघं,ते शक्य असेल तर गोष्टी पुढे जातील हो..".

आजी व शरदच्या बोलण्यावरून काकाने शरदला मुलीला भेटायची परवानगी दिली व तसं तिच्या घरच्यांनाही कळवलं आता सारं काही दोघांच्या विचारविनिमयाने होणार होतं..

दुसरा दिवस उजाडला.शरद ठरल्याप्रमाणे मुलीला भेटला.त्याने त्यांच्या "आईबा"ची पुर्ण माहिती मुलीला सांगितली.मुलीनेही शांत ऐकून घेतली.सार बोलून झाल्यावर शरद म्हणाला,"माझे आईबा माझं सर्वस्व आहे,जी मुलगी माझ्यासोबत आईबाचाही स्विकार करेल तिच्याशी मी लग्न करेल,तुला ते मान्य नसेल तर तु नकार देऊ शकतेस,पण सारी परिस्थिती तुझ्यासमोर मांडण माझं काम होतं,मला कुणाला अंधारात ठेवायचं नाही.आजवर ज्या व्यक्तीने मला सर्वस्व दिल,त्या व्यक्तीला विसरण मला ह्या जन्मात तरी शक्य नाही..."

मुलगी तशी विचारी होती.तीलाही शरदच म्हणणं पटलं.
शरद परतीला निघनार तर ती म्हणाली,"मलाही आवडेल आईबांसोबत आपला संसार सुखाचा करायला... त्यांनी तुम्हाला इतके चांगले संस्कार दिले त्या माणसाची संग लाभण माझं भाग्य समजेल मी..".

हे वाक्य ऐकून शरदचा चेहेराच खुलला.आता त्याला कोणतंच टेन्शन नव्हतं.कारण त्यांच्यासोबतच आईबाची काळजी घेणारी त्याला साथ देणारी सोबत त्याला मिळणार होती...

शरद घरी पोहचला तसा मुलीकडून होकार आला.काका ,आजी व आईबा सारेच आनंदी होते.मोठ्या धुमधडाक्यात शरदच लग्न झालं.आजवर दोन पुरूषांच्या संसारात लक्ष्मीचा वरदहस्त लाभणार होता.सदाकाकाला शरद व सूनबाईचा संसार डोळेभरून बघायचा होता.जे सुख सदा काकाने नाही अनूभवल ते शरदच्या वाट्याला येऊ नये म्हणून सदा काकांनी शरदच्या लग्नानंतर स्वतःला भगवंताच्या सेवेत वाहून घेतलं पण शरदच्या जीवनात "आईबा"ची किंमत हि त्यांच्या जीवनाहूनही अनमोल होती.कारण जे सुख व जे काही सदा काकांनी शरदला दिलं होतं ते जगावेगळ होतं.. म्हणुन तर सदा काकाला शरद "आईबा"ह्या जगावेगळ्या नावानेच हाक मारत होता.


समाप्त

©® वैशाली देवरे..

धन्यवाद