Login

मोगरा असा हा फुलला : भाग ९

उद्ध्वस्त झालेल्या नात्याची पुन्हा प्रेमाने फुललेली गोष्ट!
घनश्याम मीराच्या नजरेत घालून विचारू लागला पण मीराने नजर चोरली.

"मीराss.... बोलं गं प्लीज" घनश्यामने मीराला आर्जव केली.

"कायं बोलू?"

"ते सगळे काही जे इतके दिवस मनांत साठून ठेवले आहेस ते. तुला आत्ता या क्षणी जे काही वाटतयं ते बोलं पण अशी गप्प नको राहूस." घनश्यामने मीराच्या प्रश्नावर उत्तर दिले.

"मला आत्ता तुझा या क्षणी तितकाच राग येतोय जितका त्यावेळेस आला होता तीन वर्षांपूर्वी. कुठल्या नवरा बायकोच्या नात्यात भांडण घडतं नाही म्हणून कायं ते प्रत्येक लोक वेगळे होण्याचा एकच पर्याय निवडतात कायं?

त्या दिवशी मला खूप बोलायचं होतं, भांडायचं होतं की तू असं कसं म्हणू शकतोस आपण वेगळे होऊया म्हणून, पण परत वाटलं मीच का? तू ज्या अर्थाने वेगळे राहूया म्हटलास त्या अर्थाने तू तुझ्या मनाची तयारी केली आहेस असंच वाटलं.

हो खूप भांडणं करायचो आपण, मलाही वाटायचं की
'आपण का एकत्र राहतोय ते? ', पण ज्या ज्या क्षणी मला हा प्रश्न पडला त्या प्रत्येक क्षणी मला 'प्रेम', हे एकच उत्तर मिळायचे.
हो आपल्यातले प्रेम मला कायमचं तुझ्यापासून वेगळे न होण्यासाठी प्रवृत्त करत रहायचे पण तू मात्र अगदी सहजपणे त्या दिवशी मला वेगळे होऊयात असे बोललास.

खरंतर हादरले होते मी. तुझ्या बोलण्याने खूपच धक्का बसला होता पण म्हटलं मगं मीच का माघार घ्यायची दरवेळी? तूला ही आपल्या नात्याबद्दल काहीतरी वाटायला हवं आणि खरं सांगायचं तर अगदी बॅग भरेपर्यंत वाटलेलं श्याम की तू रागांत बोलला असशील हे सगळे, तू मला थांबवशील, म्हणूनच मी निघायचे ठरवले पण तू मला जाताना थांबवले नाहीस आणि त्या क्षणी मला वाटतं असताना मी ही थांबले नाही कारण त्या क्षणी आपण थांबलो तर माघार घेतल्यासारखे होईल असे मला वाटले.

तुझ्या आईने तरी मला एक दोनदा थांबवायचा प्रयत्न केला होता पण तू मात्र तटस्थ उभा होतास त्या दिवशी अगदी. मी बॅग धरून सरळ दादाच्या फ्लॅटवर गेले मला वाटलेले खरोखर की काही दिवसांत तुझा फोन तरी येईल कमीतकमी किंवा तू येशील कल्याणला इकडे दादाच्या घरी मला न्यायला पण तिथेही फक्त निराशा होत गेली.

आपल्या नात्यात माझा वाट पाहण्याचा कालावधी वाढत गेला आणि शेवटी मगं वहिनीचे म्हणणे पटायला लागले, असेही आपण पुन्हा एकत्र येण्याची काहीही शक्यता दिसत नव्हतीच म्हणून मगं मी घटस्फोट घ्यायची नोटीस दिली मला त्यावेळी सुद्धा मनातून एक आशा होती की तू कमीत कमी जाब विचारशील मला आपल्या घरी न्यायला येशील पण तू आलाच नाहीस मला दादाच्या घरी मिळाले ते तुझे सही केलेले घटस्फोटाचे कागद.

हो ज्या दिवशी कोर्टात आपण भेटलो त्या दिवशी मनापासून तूला विचारावसं वाटलं की, 'का नाही आलास तू न्यायला मला? कसं राहू शकतोय तू माझ्याशिवाय?' पण तूला कोर्टात पाहिलं आणि तुझ्या चेहर्‍यावर मात्र मला अगदी निर्विकार भाव दिसले ते पाहून माझे सगळे शब्द ओठांवरून माघारी फिरले.

खूप त्रास झाला काही महिने. ऑफिसमध्ये ही लक्ष नाही लागायचं कामात कारण मुंबईतले काही रस्ते मला तुझी आठवण द्यायचे सारखी शिवाय दादा वहिनींसोबत राहत असताना कधी त्यांचा नुकताच नव्याने फुलत जाणारा संसार पाहताना, त्यांचे प्रेमाने एकमेकांकडे चोरटे कटाक्ष देताना पाहून मला एकटेपणाची जाणीव व्हायची म्हणून मगं मी आई बाबांकडे पुण्याला शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. बदली मिळायला थोडी अडचण झाली खरी अगदी पगार इथे मिळतो त्यापेक्षा थोडा कमी मिळणार असे सांगितले गेले पण त्यावेळी मला फक्त हे शहर सोडायचे आहे एवढेच डोक्यात होते आणि मी शिफ्ट झाले आई बाबांसोबत.

सुरूवातीला तिथे सगळे ठीक वाटले खरे पण नंतर सोसायटी मधल्या बायकांची सहानुभूती दाखवणं, आईचं त्यावर माझी उगाचचं काळजी करत बसणं आणि घरांत पुन्हा तोच तोच विषय. कंटाळून गेले होते मी. त्यात सतत दुसर्‍या लग्नाची बोलणी, तुझ्यामुळे खूप मानसिक त्रास होतोय असं वाटून तुझ्या बद्दल असलेला राग वाढत गेला आणि अशातचं एक दिवस ऑफिसमधून ऑफर आली आणि मला पुन्हा पुण्यातून सुटका करण्याचा मार्ग मिळाला.

मी बँगलोरला शिफ्ट झाले. नवीन शहर, नवीन लोक, नवी भाषा सुरूवात थोडी अवघड होती पण तिथे एक बरे होते की मला कोणी जाब विचारायला नव्हते. दिवसभर ऑफिस आणि रात्री फ्लॅटमध्ये मी माझ्या एकांतात खूश होते खूप. त्याच ऑफिसमध्ये मला आदित्य भेटला. खूप छान मित्र झाला अगदी काही दिवसांत. खरंतर तो ही पुण्यातल्या कंपनीत कामाला होता आणि बँगलोरला एका प्रोजेक्टसाठी आलेला.

माझं आयुष्य छान सुरू होते पण एक दिवस आदित्यने मला लग्नासाठी विचारले तेव्हा मात्र मी पुन्हा गोंधळले. अगदी स्पष्टपणे मी आदित्यला तुझ्या माझ्या नात्याबद्दल सगळे सांगून मोकळे झाले होते पण तो मात्र तरीही लग्न करायला तयार होता, त्याचे खूप प्रेम आहे माझ्यावर असे म्हणायचा. बँगलोरमध्ये ही पुन्हा नकोसं वाटायला लागलं कारण आदित्यचा चेहरा दिसायचा रोजच मगं पुन्हा पुण्याला तब्येतीची कारणं देऊन बदली करून घेतली.

आई बाबांचे रोजचे चालूच होते पण मी गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते. आदित्यपासून सुटका झाली असं वाटायला लागलं होतं मला पण एकेदिवशीsss " मीरा बोलता बोलता अचानक थांबली.

क्रमशः

आज कुठे दोन मने अगदी मोकळी होतं आहेत आणि तीन वर्षांचा मनाचा तो बांध अखेर फुटला आहे. नक्की कायं घडले असेल मीराच्या आयुष्यात हे जाणून घेण्यासाठी कथा वाचत रहा.

©®ऋतुजा कुलकर्णी

🎭 Series Post

View all