राघव, तू शिकलास काय आणि नाही काय... कोणाला काय फरक पडणार आहे? एवढी प्रॉपर्टी आहे, बिझनेस आहे, पैसा आहे..यार.. मस्त आरामात आयुष्य जगू शकतोस..तू. कॉलेजच्या कट्ट्यावर बसून राघवच्या मित्रांची गंभीर चर्चा चालली होती. इतक्यात समोरून मीरा येताना दिसली तशा सगळ्यांच्या हातातल्या सिगारेटी पटापट विझल्या..
मीरा सरनाईक, राघवच्याच वर्गातली लास्ट इयरची 'टॉपर स्टुडंट' म्हणून कॉलेज मध्ये प्रसिद्ध होती. ती प्रिन्सिपल सरांनी राघवला बोलवल्याचा निरोप घेऊन आली होती.
तसा नाईलाजाने राघव उठून प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये गेला. त्याला माहित होते सरांची फायरींग खूप वेळ चालणार होती, कारण गेले कित्येक महिने त्याने एक ही लेक्चर अटेंड केले नव्हते. अनेकदा वॉर्निंग देऊनही राघव ने आपल्या वडिलांना निरोप दिला नव्हता, त्यामुळे प्रिन्सिपल सरांनी लास्ट वॉर्निंग देत त्याला सोडून दिले, ते उद्या डॅड ना घेऊन येण्याच्या अटीवरच.
इतका वेळ मीरा केबिन बाहेरच उभी राहून आतील सारे बोलणे ऐकत होती. इतक्यात राघव बाहेर आला आणि मीराकडे रागाने पाहात निघून गेला.
काही मिनिटांतच राघव ची बाईक एका मोठ्या कारखान्यापाशी येऊन थांबली. तिथे उभ्या असलेल्या गार्डकडे किल्ली देऊन तो तडक आपल्या डॅड च्या केबिन मध्ये बेफिकीरपणे घुसला. तिथे महत्वाची मीटिंग सुरू होती. तरी प्रिन्सिपल सरांचा निरोप देऊन तो आपल्या मॉम च्या केबिन मध्ये आला. आज बऱ्याच दिवसांनी तो कंपनीत आला होता. त्याला पाहून मिसेस नुपूर नी आपल्या हातातले काम बाजूला ठेऊन राघवचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. राघवला आपल्या मॉम चा हा स्वभाव आवडत होता.. ती त्याच्या सगळया गोष्टी शांतपणे ऐकून घेत असे. नाहीतर डॅड.. राघवला बोलण्याची एकही संधी सोडत नसत.
तुझे डॅड नाही आले तर मी येईन उद्या कॉलेज मध्ये...मिसेस नुपूर राघव ला म्हणाल्या.
राघवने हलकेच हसून मॉम चा हात हातात घेऊन किंचित दाबला.. थँक्यू म्हणून..
मिसेस नूपुर राघवकडे एकटक पाहात म्हणाल्या..
राघव उद्यापासून सिगारेट बंद व्हायला हवी..! ही लास्ट वॉर्निंग आहे... तुझ्या डॅडा ला कळाले ना तर.. काही खरे नाही...पुढचे वाक्य ऐकण्याआधीच राघव केबिन चे दार जोरात लावून बाहेर निघून ही गेला होता..
दुसऱ्या दिवशी मिसेस नूपुर घाईघाईने प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये आल्या आणि पाठोपाठ राघवही. त्यांनी राघवच्या वागण्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि या राहिलेल्या दोन - तीन महिन्यात तो सगळा अभ्यास पुर्ण करेल आणि चांगल्या मार्कने पास होऊन दाखवेल असा शब्द ही दिला.शिक्षणानंतर राघवने आपला पिढीजात घरचा व्यवसाय सांभाळावा, पुढे न्यावा..ही मिसेस नूपुर आणि मिस्टर रेगे यांची इच्छा असणे अगदी स्वाभाविकच होते.. राघवने निदान पदवी तरी चांगल्या मार्कने पूर्ण करावी अशी अपेक्षा होती त्यांची.
साधारण चाळिशीच्या, नाकी- डोळी अत्यंत सुंदर, बोलण्यातून झळकणार आत्मविश्वास, पाठीवर रुळणारे लांब केस आणि अंगावर सिंपल कॉटन ची साडी.... इतका वेळ राघवच्या आईचे निरीक्षण करत असलेली आणि आधीपासूनच सरांच्या केबिन मध्ये असलेली मीरा राघवच्या आईला पाहून फारच प्रभावित झाली. अचानक सरांचे लक्ष मीराकडे गेले तसे सरांनी मीराची मिसेस नूपुर सोबत ओळख करून देत मीराला राघवला अभ्यासासाठी मदत करण्यास सांगितले. तसा मिसेस नूपुर मी मीराला आपल्या घराचा पत्ता दिला आणि आजपासूनच घरी येण्यास सांगितले आणि सरांचा निरोप घेऊन त्या निघून गेल्या.
'रेगे ' नाव असलेल्या मोठया बंगल्या समोर मीरा भांबावलेल्या अवस्थेत उभी होती. तिथल्या सुरक्षा रक्षकाने दोन -तीन वेळा विचारून ही तिचे आत जायचे धाडस होत नव्हते. इतक्यात मिसेस नूपुर तिथे आल्याने त्यांनी मीराला पाहून तिचे छान स्वागत केले. मनावरचे दडपण थोडे दूर झाल्याने मीरा मिसेस नूपुर सोबत आत गेली. आपल्या साऱ्या कुटुंबाशी तिची ओळख करून देत ती का आली आहे याची कल्पना ही दिली.
राघव नाईलाजाने अभ्यासाला बसला खरा.. पण अगदी कमी वेळातच त्याने खूप साऱ्या कन्सेप्ट समजून घेतल्या. बराचसा पोर्शन ही पूर्ण केला. मीराचे शिकवणे इतके छानच होते, त्यामुळे राघव ही मनापासून अभ्यासात लक्ष देऊ लागला.
हळू हळू मीराची राघवच्या घरच्या साऱ्या मंडळीं सोबत ओळख झाली. साऱ्यांचे स्वभाव खूप छान होतेच..तिला खास करून मिसेस नूपुर चा स्वभाव जास्त आवडायचा. मिस्टर रेगे स्वभावाने थोडे कडक होते. पण राघवचा स्वभाव तसा शांत होता. कमी, मोजकेच बोलायचा.. वागण्यात, बोलण्यात बेफिकिरी जरा जास्तच होती.
तो मीरासोबत कायम अंतर ठेऊन वागायचा.
पण मीराच्या मनमोकळ्या स्वभावामुळे थोडयाच दिवसांत अवघडलेपण दूर होऊन मीरा आणि राघव मध्ये छान मैत्री झाली. अभ्यासा सोबतच इतर अवांतर गप्पा ही होऊ लागल्या दोघात. एकमेकांची खूप सवय झाली दोघांना..मीराचे परदेशी उच्च शिक्षण पूर्ण करण्याचे ध्येय, तिची जिद्द पाहून राघव ही प्रेरित झाला. आता कॉलेजला ही नियमितपणे हजर राहू लागला. राघवचा पोरकटपणा, बेफिकिर वृत्ती कमी होऊन त्याचा स्वभाव मीराच्या सानिध्यात जास्तच खुलून आला आणि मीरा नकळत राघवच्या कधी प्रेमात पडली तिचे तिलाच कळले नाही..
क्रमशः