मिली शहरात राहणारी मॉडर्न मुलगी. तिचे विचार वागणे अगदी तिच्या स्वभावाप्रमाणे. मिली सुट्ट्या काढून मामाच्या गावी तिच्या आई म्हणजेच उमा सोबत आली. खरं तर तिला यायचे नव्हते कारण गावातल्या सोयी, राहणं सगळं तिच्या राहणीमानाचा अगदी विरुद्ध असेल असे तिला वाटायचे. पण गावात घरी आल्या आल्या तिचा विचार मनातच राहिला. मामा म्हणजे सुशांत गावातील सधन व्यक्ती. घर अगदी सगळ्या सोयींनी युक्त होते जसे की मॉडर्न च. मामाचे घर असून ती आयुष्यात पहिल्यांदा येत होती इथे. मामाला एक मुलगी होती.सुमन नाव तिचे. मिली ने तिच्याशी जुळवून घेतलं. ह्या गोष्टीचे उमालाही नवल वाटले.
दुसऱ्या दिवशी मामा आणि आई गप्पा मारत बसले होते…'मिली कुठे चाललीस?' उमाने विचारले. आत्या मी आणि मिली गावात फेरी मारून येतो, सुमन म्हणाली.
मामाने लगेच सुमानला सांगितले, ' सुमन ती पोर नवीन आहे, तुला गावाच्या सगळ्या गोष्टी माहित आहेत. तेव्हा तिला सांभाळून ने. पोरी तू सुद्धा तिचे ऐक. गावात आणि शहरात फरक पडतो. तुम्ही तिथे बिनधास्त फिरता पण इथे तसे नाही..'. मिली आणि सुमन मान डोलवत निघतात. तेवढ्यात उमा तिच्या पाठी येते आणि सांगते, ' मिली बाळा, आपल्या घरी तुला परिसरात तुला फिरण्याची मनाई नाही. इथलं सर्व वेगळे असते. लवकर घरी ये आणि सुमन सांगेल ते ऐक. उगाच हट्टीपणा करु नकोस.' मिली हो म्हणते पण तिच्या स्वभावाला काही ते फारसं पटलेलं नसतं. दोघी जणी बाहेर निघतात..
सगळ्यात पहिले सुमन तिला गावातले सगळ्यात जुनं शंकराचे मंदिर दाखवते. मिली जरी मॉर्डन असली तरी तिची देवाला नमस्कार करण्याची कधी ना नव्हती. त्यामुळे दर्शन घेऊन दोघी बाहेर येतात. मंदिराजवळ नदी असते. दोघी तिथे जाऊन पाण्यात पाय बुडवून बसतात… दिवसभर खूप फिरतात, रानमेवा, आइस्क्रीम खातात. सुमन काही मैत्रीणीना तिची ओळख करून देते. अश्यात सुमन चे लक्ष घड्याळाकडे जाते. ६.४० झालेले असतात. ती मिलीला म्हणते चल आता घरी जायला हवे. थांब ग, इतकी काय घाई आहे. मी पहिल्यांदा असं गाव एन्जॉय करते आहे… मिलीचे हे बोलणे ऐकून सुमन तिला आत्या आणि मामाने काय सांगितलं त्याची आठवण करून देते… मिली तिला खूप आज्ञाधारक म्हणून चिडवत असते पण सुमन मुकाट्याने तिला घरी घेऊन येते..
रात्रीच्या जेवणानंतर मिली बाहेर फिरायला जायला म्हणुन सुमनला विचारते. बाहेर त्या अंगणात फेऱ्या मारत असतात. दोघींचे बोलणे चालू असताना मिली तिला विचारते ,काय ग सुमन इथे ट्रेक करता येईल का? छान डोंगर आहे इथे.. सुमन म्हणते नको बाबा नाही पाठवणार. तेव्हा मिली तिला खूप चिडवते. ती म्हणते नको जाऊया पण नुसते फिरून तर येऊ..
मामा आणि आईची परवानगी घेऊन त्या दोघी सकाळीच बाहेर पडतात. परत त्या मार्गाने जातात. आज सुमनच्या दोन मैत्रिणी पण सोबत असतात. शंकराच्या देवळा मागे टेकडी कडे जाणारी वाट असते हे मिलीने पाहून ठेवले असते. बाकी सगळ्या देवळात गेलेल्या पाहून मिली त्यांना चुकवून टेकडी मार्गाने वर चढायला लागते. थोड्या वेळाने सुमन च्या लक्षात येते की मिली नाहीये. त्या तिघी मिलीचा शोध घेतात. पण ती कुठेच सापडत नाही. त्या जिथून आल्या गेल्या त्या सगळ्या जागा शोधून होतात. सुमन आता फक्त रडायची बाकी असते. एकतर गावात नवीन, आणि तिची जबाबदारी असते मिली. आत्या आणि बाबा काय करतील ह्या भीतीने तिला रडूच फुटतं. पण मैत्रिणी तिला धीर देऊन घरी नेतात.. घरी आल्यावर सगळा प्रकार उमा आणि सुशांतला कळतो. सुशांत तर सुमन वर हात उचलतो पण उमा त्याला थांबवते. तिची काय चूक? अक्कल माझ्या मुलीला नाही आहे. सुमन सकाळ पासून त्यांचे बोलणं, फिरणं ह्या बद्दल सगळं सांगते तेव्हा लक्षात येते की मिली नक्की टेकडी वर गेली असणार… आता मात्र त्या दोघांना काळजीने घाम फुटतो.. सुमन ला काहीच कळत नसतं. सुशांत ताईकडे पाहून म्हणतो ‘ ताई घाबरु नकोस. तू जसा विचार करते आहेस तसं काही होणार नाही ,परत त्याच गोष्टी घडतील असे नाही. कदाचित ती त्या जागी जाणार नाही. येईल पोर घरी. मी माणसांना घेऊन तिला शोधून येतो.' असे म्हणून सुशांत लगेच बाहेर पडतो. उमा मात्र मी आधीच मीलीला कल्पना का नाही दिली असे म्हणून डोक्याला हात लाऊन बसते……
क्रमशः
(आता पुढे काय होईल? मिली सापडेल का? कुठली काळजी सुशांत आणि उमाला लागली आहे? असं काय झालं आहे त्यासाठी कथेचा पुढचा भाग लवकरच घेऊन येईन.)
(कथा काल्पनिक आहे. मोठी असल्यामुळे भागात देत आहे. चूकभूल माफ असावी. नवोदित लेखिकेला सांभाळून घ्याल अशी आशा आहे. कथा आवडली तर कमेंट करा, आणि नाही आवडली तरी कमेंट करा. तुमच्या सुचनेमुळे लिहायला हुरूप येतो)
© स्वराली सौरभ कर्वे