Login

मी कात टाकली भाग -12

मुक्ताच्या संघर्षात्मक आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास म्हणजे मी कात टाकली ही कथा.

मी कात टाकली भाग -12

©®राधिका कुलकर्णी.


 

संधीप्रकाश संपुन दिवेलागणीची वेळ झाली.

मालतीबाईंनी देवघरात केलेल्या दिवाबत्तीचा सुगंध घरभर पसरला.त्या परीमलानेच मुक्ताला जाग आली.डोळे उघडताच बाहेर दाटलेला काळोख जाणवुन मुक्ता धडपडत उठली.काम करायला म्हणुन ह्या घरात आलो आणि आपण असे मालकासारखे काय पहुडलोय ह्या विचारांनी आता मालतीबाई/रूस्तमशेठ काय बोलतील ह्याची तिला भीती वाटू लागली.

भेदरलेल्या चेहऱ्यानेच तोंडावर पाणी मारून ती बाहेर आली.दोघेही हॉलमधेच बसले होते.

मालतीबाई कोचावर बसुन कसलासा जप करत होत्या डोळे मिटुन तर रूस्तमकाका जमिनीवर कपडा अंथरून नमाज पढत होते.दोघांच्याही प्रार्थना चाललेल्या.दबकत दबकतच मुक्ता हॉलमधे आली.

तिच्या चाहुलीने मालतीबाईंनी डोळे उघडले.

मंद स्मित करत त्या म्हणाल्या,"झोप नीट लागली का?"तिने नुसतीच मान हलवली परंतु मनातुन अपराधी वाटत होतं की आपण असे कितीवेळ लोळत पडलो.मालतीबाईंनी हातातली जपाची माळ बाजुला ठेवुन मुक्ताला डायनिंग हॉलमधे नेले.ती खूर्चीवर जाऊन बसताच मालतीबाईंनी तिला मस्त वाफाळलेला चहा सोबत काही बिस्कीट्स खायला दिली.

तिला तर बापजन्मी इतके लाड करून घेणे माहित नव्हते.घरात अठराविश्व दारिद्र्य.दूपारी भाकरी मिळाली तर रात्रीची भ्रांत.कष्टाला तर सीमाच नव्हती.कधीकधी तर कामाने शरीर इतके मोडुन निघे पण विश्रांतीचा पर्यायच नसे.आणि इतके कष्ट सोसुनही मामीकडुन मायेचा एक शब्द कधी नशीबात पडायचा नाही त्याउलट इकडे आल्यापासुन रूस्तमकाका आणि मालती काकी तिला पोटच्या पोरीसारखे जपत होते.तिची काळजी घेत होते.इतकी काळजी करवुन घेण्याची तिला सवयच नव्हती.सगळेच खूप विचित्र वाटत होते.नेमके इथे राहुन आपण करणार तरी काय आहोत हेही तिला समजत नव्हते.दूपार उलटून आता दिवस मावळला तरी मालतीबाईंनी अजुनही मुक्ताला काय काम करायचे हेही सांगितले नव्हते.त्यामुळे मुक्ता मनातुन अस्वस्थ झाली होती.नुसतेच बसुन खाणे तिच्या रक्तातच नव्हते.मनात हे विचार चाललेले असतानाच तिने चहा संपवला आणि भीतभीतच मालतीबाईंना विचारती झाली,"काकी एक विचारू का?"

प्रसन्न मुद्रेने त्या म्हणाल्या,"अगंऽऽ विचार की,त्यासाठी परवानगी कसली मागतेस?विचार काय विचारायचे ते?"

त्यावर धीर करून ती बोलली," रूस्तमकाकांना मी विनवणी केली की रहायला निवारा द्या,त्या बदल्यात मी तुमच सगळं काम करेन पण तुम्ही अजुनही मला माझे काम संगितले नाहीये.मी खरच खूप कामसु आहे.माझ्या ह्या जखमांमुळे तुम्ही मला काम देत नाही आहात का?"

"पण मला आता बरयं.मी आता खरच दिलेल कोणतही काम करू शकते.मला नुसते बसुन खायला बरं नाही वाटत आहे.काकी कृपा करून मला काहीतरी काम द्या."

बोलता बोलता गळा दाटुन आला मुक्ताचा.

मुक्ताचे बोलणे ऐकुन मालतीबाई भावूक झाल्या.

त्या दोघींतले सर्व संवाद बाहेर नमाज पठण करणाऱ्या रूस्तमशेठच्या कानावर पडले तसे

नमाज आटोपुन तेही डायनिंगरूममधे आले.

कालपासुन मुक्ताशी मनमोकळ्या गप्पाच झाल्या नव्हत्या.ती कोण,कुठली,इकडे कशी आली? तिचा भूतकाळ काय?आणि सगळ्यात महत्त्वाची बाब जी डॉक्टरांच्या सांगण्यानुसार लवकरात लवकर माहित होणे आवश्यक होते त्यासाठी तिला बोलते करणे गरजेचे होते.विषय तसा नाजूक आणि तिच्यासाठी वेदनादायक असला तरी सत्य जाणणे गरजेचे होते.

आत्ता ती जरा सावरली असेल तर आताच बोलावे ह्या उद्देशाने रूस्तमशेठ डायनिंग हॉलमधे आले.त्यांना बघुन मुक्ता थोडी घाबरली.मान खाली घालुन ती उभी राहीली तिथेच.

रूस्तमशेठही खुर्ची ओढुन तिच्या बाजुला येऊन बसले.मालतीबाईंकडे एक कप चहा मागुन घेतला.मालतीबाईंनी त्यांना पुन्हा चहा दिला.चहा घेता घेताच ते मुक्ताकडे बघुन म्हणाले,"मुक्ता बेटी तुमसे बात करनी थी।क्या अभी कर सकते है?"

मुक्ताने आश्चर्याने रूस्तमशेठकडे बघितले.ह्यांना काय बोलायचे असेल आपल्याशी? तिच्या मनात विचार चाललेले.विचारांनी आलेला ताण आपसुक तिच्या चेहऱ्यावरही उमटला.

मालतीबाई आणि रूस्तमशेठनी तो अचुक टिपला तसे तिला सहज करण्या करता रूस्तमशेठ म्हणाले,"बात करनी है मतलब जबसे आयी हो कुछ बात ही नही हुई ना ठिक से।मै देख रहा हुँ तुम बहोत सोच रही हो।मै,मेरा घर सबके बारे मे तुम्हारे मन मे बहोत से सवाल है जिसे मैने पढ लिया है तुम्हारे चेहरे पर।तुम्हे ये भी लग रहा होगा की मै तुम्हे अपने घर मे क्यु लेके आया हुँ??

तो चलो आज गपशप लडाते है। पहले मै तुम्हारे सारे सवालों के जवाब दुंगा लेकीन बाद मे

तुम्हे भी अपने बारे मे कहना होगा,कबुल? ??" "इस बहाने हम एक दुसरे को जान भी लेंगे और पहचान भी लेंगे और मन मे जो कुछ भी शंकाए है वो भी खत्म हो जाएेंगी,ठिक कह रहा हुँ ना मै?"

रूस्तमशेठनी आपल्या मनातले किती अचुक ओळखले हे जाणुन मुक्ता चकित झाली.ह्यांना कसे कळले की माझ्या मनात खूप सारे प्रश्न उभे राहीलेत आल्यापासुन?"

आता हे ही त्यांना कळेल का? असा विचार करून तिने जीभ चावली आणि मनातल्या विचारांना तिकडेच थोपवले.

मुक्ताही होकारार्थी मान डोलवुन रूस्तमकाकांच्या प्रस्तावाला कबुली दिली.

दोन मिनिट पूर्ण शांतता झाली.रूस्तमशेठचा चेहरा जरा गंभीर झाला आता.कदाचित भूतकाळातले काही कटू प्रसंग ज्याचा गेल्या काळात विसर पडला होता त्या जखमा पुन्हा ताज्या होणार होत्या म्हणुन असेल कदाचित.

मग घसा खाकरून मनाची पुर्वतयारी करत रूस्तमशेठ तीस पस्तीस वर्ष पाठीमागे आपल्या भूतकाळात गेले.

जेव्हा रूस्तमशेठ शेठ नव्हता तर फक्त एक लहान मुलगा 'रूस्तम' होता.

रूस्तम तेव्हा फक्त दहा वर्षाचा होता.त्याचे वडील हमीद शितला माता मंदीराच्या खाली रस्त्यावर एका कोपऱ्यात चांभारकी करायचे.

हमीदची बायको रूस्तमला जन्म देताच मरण पावली तेव्हापासुन हमीदच पोराचा मायबाप बनला होता.आईविना पोरक्या लेकराला आपल्या परीने वाढवत होता.

परिस्थितीमुळे मुलाला शाळेत शिकायला पाठवता येत नसे हेच दु:ख सलत होत त्याला.

मंदिरात खूप भाविक यायचे त्यामुळे तिकडे धंदा छान चालायचा.कधी कधी ओळखीचे चेहरे त्याच्याच दुकानाजवळ चपला सोडून मंदिरात दर्शनाला जात त्यापैकीच एक म्हणजे दत्तोपंत गुरूजी.दत्तोपंतांचा रोजचा नियम होता.घरी जाण्याआधी ते मंदिरात दर्शन घेऊन मगच घरी जायचे.घरही मंदिराला लागुनच होते गुरूजींचे.

फार काही अंतर नव्हते.

दहा वर्षाचा रूस्तम पण हमीदबरोबर तिकडेच खेळत बसायचा.कधी बापाच्या मदतीला चप्पल शिवायलाही शिकायचा.हमीद त्याला मुद्दाम गर्दी नसेल तेव्हा चपला शिवायला लावायचा.कारण पुढं हे काम त्यालाच तर करायचे होते.

आत्तापासुन शिकुन तयार झाला तर भविष्याच्या रोजी रोटीची चिंता नाही हीच काय ती त्याची मनिषा.

कधीकधी काही भाविक लोक चप्पल राखायच्या  

बदल्यात रूस्तमला पैसा/आणा द्यायचे त्यातच रूस्तम खुष व्हायचा.पण मग हमीद लगेच सांगायचा,"बेटा अल्लाह के दरबार मे इबादत करनेवालोंसे पैसा लेना पाप है। फिर कभी कोई पैसे देने लगे तो लेना नही हाँ।जाओ ये पैसे वापस मंदिर के दानपेटी मे डालकर आओ। छोट्या रूस्तमला कधी कधी रागही यायचा बापाच्या अतिसदाचारी वर्तनाचा पण तो बापाचा शब्द टाळायचा नाही.असेच एकदा त्याला समजावत असतानाच दत्तोपंत गुरूजी तिकडे आले.हमीदचे इतके सुंदर विचार ऐकुन ते भारावुन गेले.पैशांनी गरीब असुनही त्याचे विचार इतके उच्च होते ह्याचे त्यांना फार कौतुक वाटले.मग ते स्वत:हुन हमीदशी बोलू लागले.दोघांमधे रोजच्या संवादातुन आपसुकच रूणानुबंध निर्माण झाले.दत्तोपंत गुरूजी आता रूस्तमचे दत्ताचाचा झाले.हमीद चप्पल राखायचे पैसे रूस्तमला घेऊ देत नाही म्हणुन दत्तोपंत रोज त्याला एक आणा असाच देत असत आणि हमीदला निक्षुन सांगत असत,"देखो ये पैसे मैने अपने भतीजे को प्यार से दिये है।उसे उसका जो भी मन है खरीदने दो।उसे डाँटना मत।"

रूस्तम समोरच हे सांगितल्याने मग रोज त्या आण्याची कधी गोडीशेव तर कधी गूडफुटाणे घेऊन तो खात असे.

एक दिवस दत्तोपंत गुरूजींनी देवीला चढवायला बरेच सारे सामान आणले होते.एका हातात हाराची पिशवी तर दुसऱ्या हातात साडी नारळ,ओटी वगैरे सामान आणि गरीबांना वाटायला अँगुर.

दत्ताचाचाच्या दोन्ही हातात सामान पाहुन छाेटा रूस्तम लगेच चाचाची मदत करायला धावला.त्यांच्या हातातली फुल/ओटीची पिशवी पायऱ्या चढुन वर जाईपर्यंत तो धरून मागोमाग गेला.हे दोघे वर दर्शन करून येईपर्यंत कसलीशी भगदड झाली.अचानक परीसरात भाविकांची पळापळ सुरू झाली.कोणालाच काही कळेना काय झाले.दत्तोपंत गुरूजी रूस्तमला हाताशी धरून वरच थांबले.जराशी धावपळ शांत झाल्यावर दोघे खाली आले.

हमीदच्या दुकानात हमीद नव्हता.दुकानातले सगळे सामान चपला इतस्त: विखुरले गेलेले दिसत होते.

दत्तोपंतांना काय झाले काहीच कळेना.त्यांनी पलिकडेच एका हार विकणाऱ्या दुकानात चौकशी केल्यावर कळले की दोन हिंदू मुसलमान गटात बाचाबाची झाली.त्यातच प्रकरण चिघळले आणि दोन्ही गटांत मारामारी सुरू झाली.हमीद आपल्या मुस्लीम बांधवांना वडिलकीच्या नात्याने समजवायला गेला तर त्यातल्या एकाच्या हातातले धारदार शस्त्र थेट हमीदच्या पोटात घुसले आणि अतिरक्तस्त्रावामुळे तो मुर्छित पडला.ते पाहुन ते दोन्ही गटातले लोक घाबरून पळुन गेले.आत्ताच पोलीसांची गाडी येऊन त्याला शासकीय रूग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असे कळले.दत्तोपंत लगेच रूस्तमला घेऊन सरकारी दवाखान्यात गेले.चौकशी केल्यावर कळले की त्याचा हॉस्पीटलला पोहोचेपर्यंत मृत्यु झाला होता.दत्तोपंताना कळेचना काय करावे.छोट्या रूस्तमला कसे सांगावे की तुझे वडिल देवाघरी गेले.त्यांनी रूस्तमला आपल्या घरी हे सांगुन सोडले की हमीद खूप आजारी आहे.हॉस्पीटलमधे लहान मुलांना परवानगी नसते म्हणुन तु आजच्या दिवस इकडेच रहा असे सांगुन त्यांनी रूस्तमला आपल्या बायकोच्या स्वाधीन केले आणि पुढील सोपस्काराच्या तयारीसाठी बाहेर पडले.हमीदला नात्यागोत्याच कोणीच नव्हते रुस्तम सोडता.मग पोलीसांत जाऊन सगळ्या लीगल फॉर्मॅलिटीज पुर्ण करून दत्तोपंतांनी बॉडी ताब्यात घेतली.

मशिदीतल्या ईमामांना त्यांची रितसर पद्धत विचारून त्याप्रमाणे विधीवत हमीदचा अंत्यसंस्कार केला.छाेट्या रूस्तमला तर बाप गेल्याचे इतके दु:ख झाले की तो पुढे कित्येक दिवस खाणे पिणेच सोडला.दत्तोपंत पोटच्या लेकरासारखी त्याची काळजी घेत असुनही रूस्तमला त्यांच्या हिंदू संस्कारी घरात परक्यासारखेच वाटत होते.पण दत्तोपंतांनी त्याची मायेने काळजी घेतली.हळुहळु नव्या मातीत हे रोपटेही रूजु लागले.त्याचे मन रमावे म्हणुन गुरूजींनी त्याला आपल्याच शाळेत घातले.दत्तोपंतानाही एकुलती एक मुलगी होती.आता ते दोघेही एकत्रच शाळेत जाऊ लागले.रूस्तम शाळेत जात तर होता पण म्हणावे असे शाळेत मन काही रमेना.मग कधीकधी गुरूजींची नजर चुकवुन मधल्या वेळात शाळेला दांडी मारून तो आपल्या वडिलांच्या दुकानात जाऊन चपला शिवायचे काम करू लागला.एक दोनदा दत्तोपंतांनी त्याला पाहिले.त्याला समजावुनही सांगितले पण मग त्याचे शाळेत मनच लागत नाही म्हणल्यावर त्यांनी त्याला आपल्या जमा पुंजीतुन एक नविन दुकान थाटून दिले जिकडे तो स्वत:च चपला पण बनवु लागला.

त्याला त्या कामात रसही होता आणि गतीही उत्तम होती.हळुहळू तो त्याच्या कामात इतका तरबेज झाला की त्याच्याकडुन जोडे शिवुन घ्यायला लोकांची गर्दी होऊ लागली.एव्हाना चार पाच वर्ष उलटली आणि छोटा रूस्तम आता तरूण झाला.दिसायला रूबाबदार,कामात चोख आणि प्रेमळ वाणी ह्यामुळे त्याचे गिऱ्हाईक पुन्हा त्याला सोडून दुसरीकडे जातच नसे.हळुहळु परीस्थिती बदलु लागली रूस्तमची.धंदाही छान चालत होता.सगळी घडी नीट बसत होती तोवरच दत्तोपंतांच्या पत्नीचे अचानक देहावसान झाले.आता घरात तीनच लोक राहिले.

दत्तोपंत,त्यांची मुलगी मालती आणि रूस्तम.

मालती पुढे शिकली मोठी झाली.वयात आल्यावर आता दत्तोपंतांना तिच्या लग्नाची चिंता भेडसावु लागली.पण घरात एका मुस्लीम मुलाला ठेवुन धर्मभ्रष्ट केला म्हणुन इतकी सुलक्षणी सुंदर शिकलेली असुनही कोणीही तिला स्वीकारायला तयार होईना.मालतीलाही कोणाशीच लग्न करायची इच्छा नव्हती कारण ती मनोमन रूस्तमला पसंत करत होती.

रूस्तमलाही मालती आवडत होती परंतु आपल्यातील जाती धर्माची भिंत आड आली तर उगीच गुरूजींना त्रास होईल आणि हे व्हायला नको होते म्हणुन मनातले विचार त्याने कधीही तोंडावर येऊ दिले नाहीत.आता गुरूजींचेही वय झाले होते.जीवंत असेपर्यंत पोरीच्या डोक्यावर अक्षदा पडाव्यात अशी त्यांची दृढ इच्छा होती.परंतु त्यातल्या अडचणी जाणुन ते मनोमन दु:खी होत.त्या काळजीने ते खूप खंगले होते.अताशा तब्ब्येतही वारंवार बिघडू लागली त्यांची.रूस्तम गुरूजींची पित्या प्रमाणे काळजी घेत होता.आता धंदा चलतीत असल्याने आर्थिकदृष्ट्याही तो पुर्ण सक्षम होता त्यांची देखभाल करायला.चांगल्यात चांगले  दवाखाने झाले डॉक्टर झाले.देवा धर्माचेही सर्व करून झाले पण गुरूजींच्या तब्ब्येतीत सुधार होत नव्हता.एक दिवस त्यांची तब्ब्येत जरा जास्तच बिघडली.डॉक्टरांनी तपासले पण त्यांना शरीराचे दुखणेच नव्हते तर डॉक्टर तरी काय करणार होते.त्यांच्या मनात काहीतरी दु:ख आहे ते शोधुन काढले तर कदाचित काही सुधार झाला तर होईल असे सांगितले तसे मालती खूप हवालदिल झाली.तिला माहित होते बाबांना कसली व्यथा सतावतेय पण त्याचा उपाय म्हणजे तिचे लग्न जे तिला रूस्तम खेरीज इतर कुणाशी मान्य नव्हते आणि रूस्तमशी लग्नाची इच्छा बोलुन दाखवताच बाबांचे उद्याचे मरण कदाचित आजच व्हायचे हा विचार करून ती सगळे माहित असुनही तोंडाला कुलूप घालुन गप्प होती पण आज बाबांची तब्ब्येत जास्त झाल्यावर तिचा बांध सुटला.रूस्तम घरी येताच आजवरचा मनावर ठेवलेला संयम सोडुन ती रूस्तमच्या गळ्यात पडुन रडू लागली.

रूस्तमलाही तिचे अचानक असे गळ्यात पडुन रडणे विचित्र वाटले.तिच्या मनातल्या त्याच्याविषयीच्या भावना आजवर त्याला कधी माहित नव्हत्य.त्याला स्वत:च्या भावनाही एकतर्फी आहेत असे वाटुन त्याने कधी जाणवु दिले नव्हते पण आजचे मालतीचे असे अचानक गळ्यात पडणे त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे देवुन गेले.तिच्या मनात काय आहे हे कळल्यावर त्याने शितला मातेला मनातल्या मनात स्मरण करून हा विषय गुरूजींजवळ बोलायचा धाडसी निर्णय घेतला.रात्री दुकान बंद करून तो घरी आला.जेवणे उरकली तसे हात धुवुन तो गुरूजींपाशी आला.गुरूजींचा हात हातात घेऊन तो शब्दांची जुळवाजुळव करू लागला.त्याच्या चेहऱ्यावरची बेचैनी पाहुन गुरूजी त्याला म्हणाले,"बाळ रूस्तम...बापाशी बोलण्यासाठी विचार करायची गरज कधीपासुन पडायला लागली रे तुला??"

त्यावर रूस्तम धीर एकवटुन म्हणाला

,"चाचा….! आज जो बात मै बोलने जा रहा हुँ,शायद वो आपको पसंद ना आये इसलिए सोच रहा था कहुँ या नही लेकीन अब नही कहुँगा तो शायद फिर कभी कह ना सकुँगा। इसलिए आज कह ही देता हुँ लेकीन अगर वो बात पसंद ना आये तो आपको हक है की आप उसे तुरंत नकार दे।कहिए.....आप आपका जवाब बताएंगे ना?"

गुरूजी हसतच म्हणाले,"नमनाला घडाभर तेल कशालाऽऽऽ रे?काय ते बोल चटकन."

मग रूस्तमने चूप्पी तोडत म्हणाला,"चाचा मै जानता हुँ आपको मालती की बहोत चिंता है। उसकी शादी की फिक्र खाये जा रही है आपको। तो मैने एक रिश्ता ढुंढा है मालती के लिए।लडका आपके नजर मे का ही है। मालती भी उसे पहचानती है और उसे भी लडका पसंद है लेकीन वो डरती है की कही आप इस रिश्ते से नाखुष हुए तो? इसलिए आजतक उसने अपने मन की बात किसीसे नही कही। मुझे भी आज ही पता चला इसलिए आपसे बात कर रहा हुँ।

इतके बोलुन रूस्तम थोड्यावेळ थांबला तसे गुरूजींनी पुढे विचारले,"कोण मुलगा आहे मालतीच्या मनात?काय नाव?"

त्यावर घसा खाकरत रूस्तमने मालतीला हाक मारली.इतक्यावेळ आतल्या खोलीतुन सगळे संभाषण ऐकणारी मालती रूस्तमच्या बोलावण्याने जरा घाबरतच बाबांसमोर येऊन ऊभी राहीली. रूस्तमने खुणेनेच तिला अजुन जवळ बोलवत तिचा हात स्वत:च्या हाती घेत गुरूजींना म्हणाला,"चाचा लडका आपके सामने है।

दत्तोपंतांनी विस्फारल्या डोळ्यांनी आधी रूस्तमकडे नंतर मालतीकडे पाहीले.वडिलांशी नजरानजर होताच शरमेने मालतीने नजर जमिनीकडे वळवली परंतु रूस्तम मात्र अत्यंत आत्मविश्वासाने तिचा हात आपल्या हाती धरून गुरूजींच्या नजरेला नजर देऊन त्यांच्याकडे पहात राहीला.गुरूजी काय बोलतात ह्याची दोघेही वाट पहात होते परंतु काहीही न बोलता त्यांनी कुस वळवुन दोघांकडे पाठ करून डोळे मिटले.

रूस्तमला खूप वाईट वाटले.जे व्हायची भीती वाटत होती तेच घडले.जन्मदात्या वडिलांपेक्षाही जास्त माया करणाऱ्या पित्याला आज त्याने दुखावल्याची सल त्याला स्वस्थ बसु देईना.डोळ्यातले पाणी टिपत तो मालतीचा हात सोडून तिकडून निघुन गेला.मालतीही निमुटपणे काहीही न बोलता आपल्या खोलीत गेली.

घरातल्या तिनही व्यक्ती वेगवेगळ्या मनस्थितीत

आपापल्या जागी निराशेच्या गर्तेत घुसमटत होत्या.प्रत्येकजण स्वत:ला दुसऱ्या दोघांच्या दु:खासाठी जवाबदार मानुन मनातल्या मनात स्वत:वरच आगपाखड करत होते.

कशीबशी रात्र सरली.पहाटे अचानक गुरूजींच्या खोलीतुन काहीतरी पडल्याचा आवाज झाला तसे मालती आणि रूस्तम दोघेही आपापल्या खोलीतुन धावत गुरूजींच्या खोलीत गेले.गुरूजींची तब्ब्येत जास्त वाटत होती.रूस्तमला उगीचच त्यांच्या त्रासाला आपण कारणीभूत वाटुन अपराधी वाटत होते.जे घडू नये म्हणुन इतके दिवस मनातली गोष्ट मनात ठेवली तीच आज गुरूजींच्या जाण्याला कारणीभूत ठरतेय की काय वाटुन रूस्तमच्या डोळ्यातुन आश्रु वाहु लागले.मालती गुरूजींच्या जवळ बसुन त्यांच्या पाठीवर हात फिरवत होती.त्यांच्या घशाला कोरड पडल्यासारखे वाटत होते म्हणुन त्यांनी खुणेनेच पाणी आणायला सांगितले मालतीला.मालती पाणी आणायला स्वैपाकघरात गेली तेवढ्या वेळात गुरूजींनी रूस्तमचा हात आपल्या हाती घेऊन एक कागद त्याच्या हाती सरकवला.तो उघडणार तोच त्यांनी त्याची मूठ दाबली आणि आत्ता पाहु नकोस हे सुचवले.त्यांना पाणी पाजायला मालती जवळ येताच त्यांनी तिला खुणेनेच रोखले आणि रूस्तमला ते फुलपात्र त्याच्या हाती घ्यायला सांगितले.रूस्तमने लगेच स्वत:च्या हाताने त्यांना पाणी पाजले.पाणी पिताच गुरूजी उशीवरून मान वर उचलुन बसायचा प्रयत्न करू लागले तसे रुस्तम त्यांच्या पाठीला आधार देऊन बसला.

गुरूजींनी मालतीला आपल्या जवळ बोलावले.

मालती जवळ आली तसे त्यांनी तिचा हात आपल्या हाती घेतला.दुसऱ्या हाताने रूस्तमचा हात दुसऱ्या हाती घेतला.नंतर दोन्ही हात एकमेंकात मिळवुन एक मंद स्मित केले.रूस्तम आणि मालती दोघांनाही कळेना नेमके बाबा काय सुचवु इच्छिताएत!!

तेवढ्यात त्यांच्या चेहऱ्यावर अचानक वेदना जाणवली.त्यांनी चेहरा कसनुसा केला.रूस्तम आणि मालती दोघेही घाबरले.रूस्तम मालतीला बाबांच्या जवळ आपल्या जागी बसवुन डॉक्टरांकडे जायला निघणार तोच गुरूजींनी त्याचा हात जाेरात पकडला.त्या हिसक्याने तो मागे फिरला.गुरूजी मानेनेच त्याला कुठेही जाऊ नको म्हणुन सुचवत होते.रूस्तमला कळुन चुकले गुरूजींचा अंत समय जवळ आला आहे.

तो त्यांची शेवटची इच्छा प्रमाण मानुन त्यांच्या जवळच बसला.एका हाताला मालती आणि दुसऱ्या हाताला रूस्तम.ते दोघांचा हात हाती घेऊन डोळे मिटुन पडुन राहीले मान रूस्तमच्या खांद्यावर टेकवुन.

जरावेळाने हाताची पकड सैल झाल्यासारखी वाटली.रूस्तमला शंका आली.त्याने नाकाशी हात नेऊन श्वास मोजला पण गुरूजींनी प्राण सोडला होता.

दोघांनाही दु:ख अनावर झाले.मृत्युनंतर खरी कसरत सुरू झाली.गुरूजी रूस्तमला आपला मुलगा मानत होते परंतु आजुबाजुचा समाज नेमक्यावेळी येऊन जाती धर्माची काठी बडवत रूस्तमला गुरूजींचे अंत्यसस्कार/ दशक्रीयाविधी

सगळ्यापासुन वंचित ठेवायला पाहू लागला.

त्याला दु:खावेग आवरत नव्हता परंतु गुरूजींच्या आत्म्याला अजुन क्लेश नको म्हणुन तो निमुटपणे दूर जाऊन ऊभा राहीला.डोळे टिपायला खिशातला रूमाल काढत असतानाच गुरूजींनी दिलेला कागद रूमाला सहित बाहेर आला.त्याने कागद बघताच त्याला आठवले की गुरूजींनी तो नंतर वाच असे सांगितले होते.त्याने कागद घाईघाईनेच उघडला.ते गुरूजींनी रूस्तमसाठी लिहीलेले पत्र होते..

प्रिय चि. रूस्तम ,

                    अनेक आशिर्वाद.

रात्री तु मालती करता एक प्रस्ताव घेऊन आलास.तेव्हा मी काहीच बोललो नाही.तुला वाटले असेल की माझा ह्या प्रस्तावाला विरोध आहे पण कारण ते नव्हते.मला माझ्या स्वत:वर राग आला होता.

त्याचे पहिले कारण म्हणजे,

इतके दिवस/वर्ष मी सतत ज्या गोष्टीचा विचार करून त्रास करून घेतला त्याचे उत्तर माझ्या इतक्या जवळ असुनही मला ते का दिसले नाही?हा तो राग होता.

आणि दुसरं म्हणजे,

मी माझी मुलं माझी मुलं म्हणत आलो पण मला माझ्या मुलांचीच मने का वाचता आली नाहीत?

बाप म्हणुन मी खरच कमी पडलो.

कधी तुला दुकानातुन यायला उशीर झाला तर तु आल्या शिवाय मालतीही जेवायची नाही.ह्या पाठीमागचे कारण मी कधीच का समजु शकलो नाही? ह्याचा राग आला.

आणि तिसरं म्हणजे, 

ज्या समाजाने केवळ ह्या करता मालती सारख्या गुणी मुलीला लग्नासाठी नाकारले की तिच्या बापाने एक निराधार आई-बापाविना पोरक्या मुलाला आधार दिला,वाढवला मोठा केला.

त्यांना त्या मुलाचे प्रेम,कर्तबगारी,त्याने माझ्या फाटक्या संसाराची उचललेली जवाबदारी नाही दिसली,दिसली ती फक्त त्याची जात/धर्म/कुळ..

आणि अशा ह्या तकलादू विचारांच्या नेभळट समाजाने माझी सोन्यासारखी मुलगी नाकारल्याचे दु:ख करत मी कुढत बसलो पण सोन्यासारखा मुलगा माझ्या डोळ्यासमोर माझ्याच घरात असताना मला ही गोष्ट का सुचली नाही जी तुम्हाला मला सांगावी लागली??ह्याचा राग आला.मी अपराधी आहे तुम्हा दोघांचा.खरच मला माफ करा पोरांनो.

आज आत्ता ह्या क्षणापासुन मी दत्तोपंत जोशी गुरूजी तुला माझी मुलगी मालती करता होणारा पती म्हणुन पसंत करत आहे.दोघेही सुखाने संसार करा.तुम्हाला माझे अनंत आशीर्वाद.आज माझी ही जवाबदारीही तु पुर्ण केलीस आणि खऱ्या अर्थाने मला पितृ ऋणातुन  मुक्त केलेस.

वडीलांनी सोडलेले अर्धवट काम पूढे मुलगा चालवतो अशी वहीवाट आहे आता मी गेल्यावर माझ्या मुलीची काळजी मी तुझ्यावर सोडून जात आहे.मी जेव्हा कधी हा देह सोडेन तेव्हा मुलगा म्हणुन तुच माझे सर्व अंतिमविधी पार पाडावेस हीच माझी अंतिम इच्छा आहे.

मला काही होऊ नये म्हणुन आजपर्यंत तुम्ही दोघांनीही आपली मने मारून आपल्या भावना जाळुन माझ्या जीवाची ज्याेत जागवत राहीलात आता ह्याच ज्योतीचा प्रकाश करून तुम्ही तुमचे आयुष्य एकमेकांसहीत प्रज्वलीत करा ह्याच माझ्या तुम्हा दोघांना कोटी कोटी शुभेच्छा आणि आशिर्वाद..!!!

इतक्या वर्षात काही उणे दूणे वागलो असेन तर बाप समजुन माफ कर..

तुझाच बाबा,

दत्तोपंत जोशी गुरूजी.

पत्र वाचुन तेवढ्या दु:खातही रूस्तमला आनंद झाला.ते पत्र म्हणजे गुरूजींनी सरळ सरळ दिलेली कायदेशीर परवानगीच होती.डोळे पुसतच रूस्तम पोलीसात गेला.ते पत्र पोलीसांत दाखवुन मला अंत्यसंस्काराची परवानगी द्या अशी विनंती केली.पोलीसांनी सर्वांसमक्ष ते पत्र वाचुन दाखवले त्याबरोबर सगळे चिडीचूप झाले.

अशाप्रकारे गुरूजींचे सर्व विधी यथोचित पार पडल्यानंतर मी मालतीशी विवाह केला.हेच कारण आहे की मालती हिंदू,मी मुस्लीम तरीही आम्ही पती-पत्नी आहोत.

मालती तिच्या धर्माचे पालन करते तर मी दोन्ही संस्कारात वाढलेलो असल्याने मी जितक्या श्रद्धेने नमाज पढतो त्याच श्रद्धेने शितलामातेला साडीचोळी,ओटी भेट करतो.दर मंगळवारी तिथे अन्नदान करतो.ज्या शितला मातेच्या कृपेने मला दत्ताचाचा सारखे पित्याचे छत्र मिळाले त्या मातेला मी कसा विसरू.?

म्हणुन गेली तीस वर्ष माझा हा नेम अव्याहत चालू आहे.

लग्नानंतर बाबांच्या आणि शितला मातेच्या कृपेने मी धंद्यात पण खूप तरक्की केली.आधी छोटे दूकान,मग मोठे दूकान.मग फुटवेअर फॅक्टरी असा माझा प्रवास उंचावतच गेला.ह्या सगळ्यात मालतीने मला हर प्रकारे साथ दिली पण आमचे दोघांचे एक स्वप्न अपुरेच राहीले.

मला फार इच्छा होती मालती सारखीच गोड सुंदर मुलगी व्हावी पण ते सुख आमच्या नशिबात नव्हते.

पण ज्या दिवशी तु माझ्या गाडीखाली आलीस तो दिवस मंगळवार होता.कदाचित शितला मातेनेच आमची अपुर्ण ईच्छा पुर्ण करायला तुला आमच्या आयुष्यात पाठवले असेल.हाच देवीचा संकेत समजुन मी तुला आमच्या घरी आणले.

"तो यही है हमारे जीवन की कहानी।शायद तुम्हारे मन मे उठे सारे सवालों के जवाब तुम्हे मिल गये होंगे,,मिले ना?"

रुस्तमशेठ आता बोलायचे थांबले.

त्यांनी आपले डोळे पुसले.मालतीबाई पण भावुक झाल्या होत्या.त्याही डोळे पुसत होत्या.मुक्ताचेही डोळे पाणावले होते.सगळेच काही क्षण नि:शब्द झाले.

काहीतरी आठवुन रूस्तमशेठ खुर्चीतुन उठले.आपला गळा साफ करत मुक्ताला म्हणाले,"यहाँ आओ।चलो तुम्हे कुँछ दिखाना है। त्यांच्या मागोमाग मुक्ता हॉलमधे आली.

रूस्तमशेठ हॉलमधल्या त्याच दोन तसबिरींसमोर ऊभे होते ज्यांना पाहुन मुक्ता विचारात पडली होती की हे फोटो कुणाचे?

त्यातल्या पांढरे भस्म लावलेल्या फ्रेमकडे बोट करून रूस्तमकाका म्हणाले," ये तस्वीर दत्ताचाचा की है।वो रोज सुबह पूजा के बाद खुद को और बाद में मुझे ये तिलक लगाते थे। बचपन से आदत हो गयी है। इसलिए मै भी उनकी याद मे रोज पूजा के बाद ये भस्म तिलक माथे पे लगाकेही बाहर निकलता हुँ।मुझे लगता है जैसे वो कही से मुझे आशीर्वाद दे रहे हैै और ये दुसरी फोटो मालती की माँ की है।वो बहोत जल्दी चल बसी।लेकिन जाते जाते इस अनाथ को माँ की ममता दे गयी।

तो यही वजह है की मेरे घर मे पूजाघर है।यही वजह है की मेरे घर के प्रवेशद्वार पर ॐ चिन्ह अंकीत है। ओर मेरे माथे पे भस्म तिलक है।

मुक्ताच्या मनात उमटलेल्या प्रश्नांमागे इतकी मोठी कहाणी असेल असे तिला वाटलेच नव्हते.

प्रत्येक आयुष्यात संघर्ष आहे.संघर्षाशिवाय तुम्हाला यशाची वाट कधीच मिळत नाही हे परत एकदा रूस्तमकाकांच्या कहाणीने पटवुन दिले.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणतात त्या प्रमाणे

"IF You want to shine like a sun

First you have to burn like a sun…. " 

हे सर्वथा सत्य आहे...…त्रिकालाबाधित सत्य!!!

--------------------(क्रमश:-12)---------------------------

क्रमश:-12

©®राधिका कुलकर्णी.

रूस्तमशेठच्या आयुष्याचा पटही आज उलगडला.प्रत्येक व्यक्तीची आपली अशी एक कहाणी असते.आपले संघर्ष असतात आणि एक ना एक प्रेमाचा दूवा ह्या काटेरी वाटेत परमेश्वर प्रत्येकाला देत असतो फक्त तुम्हाला तो दुवा कळला पाहिजे.त्याला गवसणी घालता आली पाहिजे.मुक्तालाही आज तो दूवा गवसला आहे.आता रूस्तम प्रमाणे तिचीही काटेरी वाट सुलभ कशी होते हे पुढील भागात बघु.

कसा वाटला हा भाग?तुमच्या प्रतिक्रीया नक्की कळवा.

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत कथा नक्की शेअर करू शकता.

धन्यवाद.

@राधिका.

🎭 Series Post

View all