मी तुझी
----------------------
माझे प्रेम किती तुझ्या वर
तुला कधी कळेल का रे ?
राती किती त्या जागल्या ,
त्या आसवांनी भरल्या उशी किती
तुला दिसतील का ? ॥१ ॥
संग तुझ्या चालताना कण नाही टोचला,
तुझ्याविना अंधारल्या वाटा किती पायदळी गेल्या ,
रुतले किती काटे पायात ?
तू पाहशील ना ?
हसले खुप तुझ्या सोबतीस राजा ,
रडले किती विरहात तुझ्या ,
तू ऐकशील ना ? ॥ २ ॥
बाहुपाशात तुझ्या सूर्याची किरणे ही सुखावती ,
तू नसताना चंद्राची छाया किती रे तापली ।
मृगजळ पाहून तहान भागवू किती ,
चातका सारखी मी, तू सावन बनून बरसशील ना ?
पानझडी सारखे झाले रे जीवन ,
तू येऊन श्रावणा सारखा जीवन बहरशील ना ? ॥ ३ ॥
ओटीत माझ्या तू भरलेली कळी ,
पाहा ना ती आहे किती हळवी ;
गर्दीत ती या शोधते रे तुझा हात ,
निरागस प्रश्न तिचा आई कुठे आहे माझा गं बाप ?
दादा म्हणुनी तोच आता मोठा,
धरुनी हात बहिणीचा सांगतो तिला ,
बाप त्यांचा दूर नाही तो कसा? ॥ ४ ॥
वीरचक्र घेताना हातात , हात किती ते थरथरते ,
मग हळूच मनात कुठेतरी वीरपत्नी तू असे स्वतःलाच समजावते ,
तरी काही रुढीत मीच का दोषी व्हावे?
तू शहीद असताना , कुलक्षणी म्हणून मला का बर हिणवावे ? ॥ ५ ॥
लाल रंग तो कपाळी चा माझ्या ,
सीमेवर तू वाहिलास ,
तुझ्या चितेवरील रंग तो पांढरा ;
माझ्या अंगावर तू न पाहिलास ,
वचनं सारी तुझी , तुझ्या सोबत राख झाली,
आठवणींनी जरी भरले जीवन ,
इच्छा मात्र कायमची रिती झाली ॥ ६ ॥
सख्या आज आठवणीने आले मन भरून ,
समस्त ईरा परिवाराने दिली आदरांजली डोळे भरून ।
आज्ञा घेते तुझी मी शेवटचे प्रश्न विचारून ।
स्वप्नातुनी तू निघूनी पुन्हा येशील ना ?
तुझ्या फुलांना छत्र बापाचे देशील ना?
पुन्हा नव्याने सुरु करू आपल जीवन , तू मला साथ अशीच देशील ना ? ॥ ७ ॥
कर्तव्य देशाचे प्रथम तू निभावले ,
तुझ्या मिठीत तरी सख्या मी सुखावले ,
तू पुन्हा येशील ना?
या वेळेस तरी तू फक्त
'माझा होशील ना?' ॥ ८ ॥
----------------------
कवियित्री (रचना): शगुफ्ता ईनामदार