(सदर कथानक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर असले तरी कोणत्याही ऐतिहासिक सत्याचा दावा करत नाही. सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे)
मागील भागात आपण पाहिले की शिवजीराजांची मुद्रा असलेल्या जखमी स्वाराला मोहनाने मदत दिली. त्यानंतर सगळे पुढच्या खेळाला निघाले. आजवर सुंदराच्या फडावर हात टाकणाऱ्याला तिने सोडलं नव्हतं. आता पाहूया पुढे काय होणार?
सुंदराला सारख काहीतरी अघटित घडेल असं वाटत होतं. गाड्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्या. सर्वांनी जेवण खाण उरकलं. त्यानंतर सगळे आराम करत असताना एक हरकाम्या निरोप घेऊन आला.
त्याने सुंदराला सांगितलं,"बाहेर सावकार आलेत."
सुंदरा हसत म्हणाली,"बरं मग?"
तो म्हणाला,"त्यांना तुम्हाला भेटायचं आहे."
असे सांगून तो बाहेर गेला. सुंदराने बाहेरच्या तंबूत पाहुण्यांना बसवा असं बकुळामावशीला सांगितलं. सुंदरा बाहेर आली.गावातले तीन चार तालेवार भेटीला आले होते. सुंदराने विड्याचे तबक पुढे करून नमस्कार केला.
तसा एकजण पुढं झाला," सुंदराबाई,ह्ये आमचे सावकार जगन्नातराव,पाटील,देशमुख आणि काही गावातली मंडळी."
सुंदराने सर्वांना हसून बसायला सांगितले. विडा घेतल्यानंतर सावकार बोलू लागला,"सुंदराबाई,ह्या गावात तमाशाच्या खेळानंतर आमच्या घरी खाजगी बैठक होते. तसा रिवाज आहे."
सुंदरा हसत म्हणाली,"रितीप्रमाणे सगळं होईल,काळजी करू नका."
तेव्हा सावकार मांडीवर हात चोळत म्हणाला,"आम्हाला खुश करा,भरपूर बिदागी देऊ."
सुंदराने सर्वांना वाटेला लावलं. सावकाराची नजर तिला बैचेन करत होती. ही बैठक काय आहे? शोधायला हवं.
सुंदरा आणि मोहना थोडावेळ आराम करून वेष बदलून बाहेर पडल्या. नेहमीप्रमाणे पुरुषी वेष न करता यावेळी ग्रामीण शेतकरी महिलेच्या वेशात त्या यात्रेत मिसळल्या. देवीचं दर्शन घेऊन मग दोघी बांगड्या भरायला बसल्या.
कासारीन बंगड्यां भरत असताना मोहना हळुच म्हणाली,"बया!किवडी मोठी यात्रा,आन थाटमाट बघा."
तशी सुंदरा म्हणाली,"आग असणारच या गावच सावकार लै तालेवार हायेत."
हे म्हणत असताना तिचे लक्ष कासारीन आणि आजूबाजूच्या बायकांच्या प्रतिक्रियेकडे होत. कासारीन हळूच म्हणाली,"त्याच नावबी घिऊ नगस,आग किती जणींचं तळतळाट घेतल्यात मेल्याने."
तशी मोहना भोळा चेहरा करून म्हणाली,"म्हंजी व? आस काय केलंय त्यानं?"
तशी ती कासारीन जवळ आली,"दरवर्षी तमाशाच्या फडातली बैठकीला गेलेली बाई परत येत न्हाई,तिला तिथंच ठिवून घेतो त्यो आणि नंतर सा महिन्यात ती बाई गायब."
सुंदरा म्हणाली,"गायब म्हंजी?"
तस ती हळूच म्हणाली,"तिला मुबारक खानाच्या जनान्यात देत्यात आन नाय ऐकलं तर मारून टाकट्यात. गावातल्याबी कितीतरी पोरी,बायका गायब झाल्यात."
तस मोहना हासून म्हणाली,"आक्का देवी आईच्या आशीर्वादाने यंदा आस न्हाय हुणार."
तशी ती कासारीन म्हणाली,"माझे बाय तस झालं तर म्या खणा नारळाण वटी भरील देवीची. माझी लेक बी आडसाली गायब झाली बघ."
मोहना आणि सुंदरा उठून तंबूकडे आल्या त्या मनात एक निर्धार करूनच.
सुंदरा काळजीत पडली. ते पाहून मोहना तिच्याकडे गेली,"आक्का नको काळजी करू,वाघिणीला लांडग्यांच काय भय? ती मरतानासुद्धा चार लांडगे संपवूनच जाणार."
तशी सुंदरा म्हणाली,"मोहना,हे गाव त्यांचं आहे. वाड्याभोवती पहारा असेल. सावधगिरी बाळगून लढावं लागेल."
मोहना आणि सुंदराने सगळ्या जणींना बोलावलं.मोहनाने कामगिरी सांगितली. सगळ्याजणी तयार झाल्या.
तेव्हा सुंदरा म्हणाली,"तुम्ही मला प्रश्न विचारला होता ना,राधिका कुठं गेली? ती अशीच एका कामगिरीवर असताना गेली."
बिजली म्हणाली,"आक्का! वाघावानी लढाईत मेलेलं काय वाईट. राधिका कशी गेली."
तेव्हा मालू पुढं झाली,"आजची कामगिरी होऊ द्या,मग आम्ही नारायणगावात कसे पोचलो? राधाचं काय झालं? सगळं सांगू." सगळ्या तयारीला लागल्या.
संध्याकाळी खेळ सुरू झाला. गणरायाला आळवून सुरुवात झाली. लावण्या सुरू झाल्या. सगळ्या गावाने खेळ डोक्यावर घेतला. पहाटे खेळ संपला. सगळे विसावले. उजाडले असतानाच सावकाराची माणसं निरोप घेऊन आली.
सुंदराने त्यांना आत बोलावलं. अदबीने ती म्हणाली,"सावकारांना सांगा संध्याकाळी असा खेळ करू की त्यांचं भान हरपेल."
माणसं उलट पावली निरोप घेऊन गेली.
सगळे जेवायला बसले. सुंदरा बोलायला लागली,"यावेळी आपली गाठ बलाढ्य शत्रूशी आहे."
मोहना म्हणाली,"आम्ही माहिती काढलीय,ह्या सावकार आणि त्याच्या लोकांनी गावातल्या कित्येक पोरीबाळी नासवल्या आहेत. तमाशाच्या फडातली एकतरी पोरगी या गावात गायब होते. कायमची."
तशी बिजली म्हणाली,"आजवर त्याला आपण भेटलो नव्हतो.आक्का आणि मोहना आता याला धडा शिकवायचा."
मोहनाने सगळी योजना आखली. फडात काम करणारे पुरुषसुद्धा विश्वासू होते. सर्व काही ठरलं. बिजली,तिच्याबरोबर आणखी दोन पोरी आणि गाणारे तयार झाले. सावकाराचा वाडा आला. दरवाजावर वर्दी दिली. आत जाताना सुंदराला अडवलं.
तशी बिजली म्हणाली,"आक्का नसलं तरी आम्ही आत येणार न्हाय." आतून परत वर्दी आली. सगळे आत गेले.
इकडे मोहना,पारू आणि मालती यांनी सगळी जय्यत तयारी केली. वाड्याचे सगळे बुरुज हेरले. पहारेकरी पाहून ठेवले. आत बैठक सुरू झाली. बाहेर नयना तयार होऊन आली.
ती कोतवालाला म्हणाली,"आत सावकाराची करमणूक व्हतीय, बाहेर तुमची करमणूक आम्ही करू."
नयनाच्या इशाऱ्याने कोतवाल खलास झाला. दोन्हीकडे गाणं बजावण सुरू झालं. मोहना आणि पारू हुशारीने सर्वांना दारू पाजत होत्या.
मध्यरात्र उलटून गेली. तशी बीजलीने गाणं थांबवलं. तिने आवरायचा इशारा दिला. तस सावकार जवळ आले,"बिजली इथं कडाडली पण.."
बिजली साळसूदपणे म्हणाली,"पण आणि काय ओ, बिदागी द्या म्हंजी आम्हाला जायला."
तसा सावकार हसत म्हणाला,"देतो की बिदागी,पण इथं नाही."
असे म्हणून सावकाराने बिजलीचा हात धरला. तस सुंदरा पुढं झाली,"सावकार! सोडा तिला. नाहीतर..."
तसा सावकाराने इशारा करताच दालनात असलेले आठ पहारेकरी पुढं झाले. त्यांनी सगळ्यांना पकडलं.
सावकार मोठ्याने हसत म्हणाला,"ह्या बिजलीला इथं सोड,बाकीच्यांना जाऊ देईल मी."
तसे सुंदरा हसली,"आजवर तू फक्त अबला पाहिलीस, कालीच रूप तुला दिसलच नाही."
असे म्हणून सुंदराने इशारा केला. त्यासरशी तलवारी बाहेर आल्या. बीजलीने खंजीर काढला आणि क्षणात सावकाराचा हात मनगतापासून अलग झाला. सावकार मरणप्राय वेदनेने कळवळला. तो जोरात ओरडला,"मारा,सोडू नका."
पहारेकरी धावले. आतल्या आठही पहारेकऱ्यांची मुंडकी उडवली. सावकार रक्ताच्या थारोळ्यात पडला. इकडे बाहेर मोहना सावध होती. तिने शिताफीने सगळ्यांना बांधलं होत. सावकाराचा वाडा गावाच्या बाहेर होता. सुंदरा आणि बिजली बाहेर पडताच मोहनाने इशारा केला. वाडा पेटला. सगळे मागच्या बाजूने गावात पोहोचले.
आगडोंब उसळलेला पाहून गावकरी मळ्यात धावले. सावकार आत जळून गेला. मोहना आणि सुंदरा गर्दीत मिसळले. गर्दीत तीच कासारीन उभी होती.
तिने आभाळाकडे हात केले,"देवी आई पावलीस. राक्षस मारलास. तुला उद्याच पूरणावरणाचा निवद करते."
सगळ्या गावातल्या आयाबाया आनंदी होत्या.
इकडे सगळी रडारड सुरू होती. सावकाराचे काही खास उर बडवून रडत होते. एवढ्यात घोड्याच्या टापा वाजू लागल्या. सुभेदार आले!सुभेदार आले! सगळे ओरडू लावले.गावातल्या आयाबाया पांगल्या.
आता सुंदरा आणि मोहना पुरुषवेशात उभ्या होत्या. मुबरकखान खाली उतरला.समोरचा आगीचा डोंब पाहून तो ओरडला,"या अल्ला! या खुदा! ये क्या हो गया?"
सावकाराने मुबारकखानाला नवीन माल चाखायला बोलावलं होतं. पण सावकार जळून खाक झाला होता. जळता वाडा मुबारकखानाच्या डोळ्यात दिसत होता. थोडावेळ भयाची छाया त्याच्या डोळ्यात गडद झाली होती. मुबरकखान आणि त्याची नजर पाहून सुंदरा पुन्हा अस्वस्थ झाली. मोहना आणि सुंदरा तिथून निघाल्या.
सुंदरा फडावर पोहोचली. तिच्या डोळ्यासमोर सारखा मुबरकखान दिसत होता. तेच खुनशी डोळे. तीच विकृत झाक. तिला अजिबात झोप येत नव्हती. आता इथून लवकर बाहेर पडायला हवं. कारण जर उशीर झाला तर धोका आहे हे मोहनाने ओळखले.
तिने सर्व गाड्या तयार करायला सांगितलं. बिजली आणि मोहना पुढे झाल्या. गाव जाग व्हायच्या आता गाड्या जंगलाच्या रस्त्याने चालू लागल्या.
दुपार होईपर्यंत गाड्यांची पाच सहा मैल अंतर तोडले. आता सगळी खात्री करून मोहनाने थांबायचा इशारा दिला. पोटात भूक पेटली होती. गाड्या थांबताच बकुळामावशी चूल मांडायला धावली. तिच्या मदतीला पारू आणि मालू पुढं झाल्या. नदीकाठी सगळ्या फडातली लोक थोडी विसावली. सुंदराच्या डोळ्यासमोर मात्र मुबरकखान सतत दिसत होता. त्याबरोबर आठवणीच वादळ आणि हैबती,लहानगा महादेव,तारा आणि सुनंदा सगळं सगळं समोर दिसत होतं.
मुबरकखान आणि खविसखान यांचं काय नात असेल? सुंदरा पुढे काय करेल?
क्रमशः