प्रीतीच्या सासूबाई व अंकिता दोघी हौशी होत्या. प्रीतीची लग्नानंतरची पहिली संक्रांत होती. त्यासाठी त्या तयारी करत होत्या. प्रीती जॉब करत होती; त्यामुळे तिला सर्व तयारी करायला वेळ मिळत नव्हता. त्या दोघी तिला विचारूनच सर्व काही करत होत्या. त्यांचा हा उत्साह व आनंद पाहून प्रीतीच्या मनात विचार सुरू झाले.
'माझ्या मनात सासू व नणंद यांच्याविषयीचे जे मत तयार झाले आहे, तसे या दोघींना पाहून कधी वाटले नाही. या दोघी माझ्याशी किती प्रेमाने व आपुलकीने वागतात! ताईच्या सासूप्रमाणे व नणंदप्रमाणे कधीही मला त्रास देत नाही. सासू,सासरे, प्रसाद व अंकिता या सर्वांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि हे सर्वही माझ्यावर खूप प्रेम करतात. सासूबाई अंकिताशी जशा मुलीप्रमाणे वागतात तशाच माझ्याशीही वागतात आणि अंकिता ही मला कोणत्या गोष्टीबद्दल चुकीचे ठरवत नाही. दोष देत नाही. अगदी बहिणीप्रमाणे वागवते.
तू असेच का केले? तू तसेच का केले?... वगैरे कधी विचारत नाही.
तू असेच का केले? तू तसेच का केले?... वगैरे कधी विचारत नाही.
सासूबाई व अंकिताच्या बोलण्यात माझ्याबद्दल किंवा माझ्या माहेरच्याबद्दल कधी अपशब्द ऐकलेले नाही. प्रसादलाही माझ्याविषयी कधी काही चुकीचे सांगत नाही. उलट प्रसादला व मला फिरण्याची व हौसमौज करण्याची परवानगी दिली आहे.
अंकिताची मदत असली की ती मदतीला नेहमीच येते पण घरातील सर्व निर्णय सासू-सासरे व प्रसादच सर्व मिळून घेतात व माझेही मत विचारतात आणि गरज वाटली तर अंकितालाही विचारतात.
अनघा ताई माहेरी आली की तिच्या बोलण्यात नेहमी हेच असते, " माझी नणंद अशी, माझी नणंद तशी. तिने हे केले...तिने ते केले"
आणि खरंच तिची नणंद वागते ही तसेच. ती तर तशी वागतेच पण आपल्या आईलाही ताईच्या विरोधात शिकवत असते. हे सर्व ऐकून व पाहून माझ्या मनात नणंद या नात्याबद्दल तिरस्कार वाटू लागला होता. त्यामुळेच मी माझ्या नणंदशी परक्यासारखी वागत होती.
ताईच्या व माझ्या स्वभावात खूप फरक आहे म्हणा! ताईला ऐकायची सवय आहे त्यामुळे कदाचित तिच्या ह्या कमजोरीचा तिची सासू व नणंद गैरफायदा घेत असतील. ताईला मी अनेकदा सांगितले की, त्यांना त्यांच्या चुका सांगत जा ; पण ताई काही ऐकतच नाही.
मला असे ताईसारखे ऐकून घ्यायची सवय नाही. माझी सासू व नणंद अशा असत्या तर मी लगेच त्यांना बोलली असती. पण माझे नशीब खरंच चांगलेच म्हणावे लागेल कारण मला सासू व नणंद दोन्ही खूप चांगल्या भेटल्यात.'
या विचाराने प्रीतीने सासूबाईंशी व अंकिताशी स्वच्छ मनाने व प्रेमाने वागण्याचे ठरविले,
प्रीतीच्या पहिल्या संक्रांतीचा सण छान साजरा झाला. काळ्या साडीत व हलव्यांच्या दागिन्यात प्रीती खूप छान दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता व मनातील कटूता जाऊन सासूबाई व अंकिता यांच्याबद्दल गोडवा निर्माण झाला होता आणि तो गोडवा त्या दोघींनाही जाणवत होता.
प्रीतीची पहिली संक्रांत खऱ्या अर्थाने गोड व आनंदाने साजरी झाली होती आणि प्रीती माहेरी अभिमानाने सांगू लागली की, "माझी नणंद खूप चांगली आहे. मी खरंच खूप भाग्यवान आहे."
एक दोन वर्षांनी प्रीतीच्या भावाचे लग्न झाले,वहिनी आली आणि प्रीती नणंद झाली. तेव्हा प्रीतीने ठरवले की, वहिनीशी असे वागायचे की तिनेही म्हटले पाहिजे, 'माझी नणंद खूप चांगली आहे.'
समाप्त
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा