नेहमीप्रमाणे यावेळीही आईने अनघाला समजावून सांगितले.
"तू कितीही राग करून घेतलास तरी, सासूबाईंच्या व नणंदबाईंच्या वागण्यात काही बदल होणार आहे का? उलट तुलाच त्रास जास्त होतो. त्यांचा स्वभावच आहे तसा.. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करू नको. तू तुझे कर्तव्य व्यवस्थित पार पाड. आपल्याकडून काही चुका होऊ द्यायच्या नाहीत. जावईबापू चांगले आहेत ना! त्यांच्याकडे बघ. वरदकडे लक्ष दे तुझा संसार सुखाचा कर. जीवनात हे असे चालूच राहणार."
'सासू व नणंद यांच्याकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा तरी का करायची?'
हा विचार मनात ठेवूनच अनघा आपल्या सासरी गेली.
'आपल्या ताईला सासू व नणंद दोन्हीही चांगल्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे तिला सुखाने संसारही करता येत नाही. हे सर्व माहित असूनही ताई सासरी गेली. आईनेही तिलाच समजावून सांगितले. तिची सासू व नणंद या चुकीच्या वागत असूनही त्यांचेच का ऐकायचे? त्यांच्या चुकांबद्दल त्यांना कोणी बोलत का नाही? माझे लग्न झाल्यावर मला जर अशीच सासू व नणंद भेटली तर... मी ताईसारखे हे सर्व सहन करायचे का?'
असा विचार प्रीती करत होती.
आपल्या ताईच्या अनुभवावरून, लग्न, सासर, सासू व नणंद या सर्व गोष्टींबद्दल प्रीतीच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होत होती. सासरच्या नात्यांबद्दल तिचा दृष्टिकोन बदलत चालला होता. लग्नच करू नये. असे तिला वाटायचे आणि तिने घरात आपला हा निर्णय सांगितलाही.
काही वर्षात प्रीतीचे शिक्षण पूर्ण झाले व ती नोकरीलाही लागली. तिचे मन लग्न करण्यास तयार नव्हते.
"पण सर्वच व्यक्ती असे नसतात. अनघाला जशी सासू व नणंद भेटली तशीच तुलाही भेटेल असे नाही. कदाचित तुला चांगलीही भेटेल. हा विचार कर ना."
असे घरातले तिला सांगत होते.
हो नाही करत...प्रीती लग्नाला तयार झाली. एक दोन स्थळांमध्ये मुलगा चांगला असूनही फक्त सासू आणि नणंद असल्या कारणाने प्रीतीने नकार दिला होता.
घरातल्यांनी प्रीतीला खूप समजावून सांगत तिचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
असेच काही महिने गेले व प्रीतीला एक स्थळ सांगून आले.
त्या मुलाला पाहताच प्रीती त्याच्या प्रेमातच पडली. त्यालाही प्रीती खूप आवडली होती. त्याला आई-वडील व एक बहिण होती.
सासू व नणंद यांचा विचार प्रीतीच्या मनात पुन्हा सुरू झाला. एकीकडे त्या मुलावरील प्रेमाची भावना व दुसरीकडे सासू, नणंद यांचा विचार, यांचे द्वंद्व प्रीतीच्या मनात सुरू होते. शेवटी प्रेमाचाच विजय झाला व प्रीती लग्नाला तयार झाली. पण मनात सासू व नणंद यांच्याशी पूर्ण लढण्याची तयारी ठेवूनच! नणंदचे लग्न झालेले होते पण ताईच्या नणंदसारखी असली म्हणजे स्वतःच्या संसारापेक्षा भावाच्या संसारात जास्त लक्ष ठेवणारी!
असे प्रीतीला वाटत होते.
क्रमश :
नलिनी बहाळकर
नलिनी बहाळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा