maze maher

its all about the memory of a married woman about her childhood

Print all

In new window

(no subject)

Inbox

x

https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/profile_mask2.png

Rakhi Bhandekar <rbhandekar26@gmail.com>

2:27 PM (10 minutes ago)

 

https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif

https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif

to me

https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif

          लोक डॉन मुळे यावर्षी माझ्यासारख्या अनेक सासुरवाशीन ना माहेरी जाता आलं नाही, त्यामुळं अनेकींच्या मनाचा पूर्ण हिरमोड ही झाला असेल. माहेर-प्रत्येक विवाहित स्त्रीची आपलं मन, भावना, दुःख, वेदना व्यक्त करण्याची हक्काची जागा. जणू प्रत्येक विवाहित स्त्रीच्या मनाचा सुंदर, नाजूक हळुवार कोपरा   

           माहेर म्हटलं की मन कसं पाखरू होतं अन क्षणात माहेरच्या अंगणात जाऊन अनेक आठवणींच्या फुलांवर स्वैरपणे हुंदडत, उडत राहत “एका जनार्दनी शरण, येते माहेरची आठवण” यातले ‘माहेरची आठवण’ हे शब्द पंडित भीमसेन जोशींनी इतक्या हळुवार, आर्त अन कासावीस होऊन म्हटले आहेत की त्या ओळी सतत मनात रेंगाळत राहतात अन मन कातर होतं .

“कोणीतरी वाट पाहत आहे मनातून म्हणूनच जाण्यात अर्थ आहे,

 कोणीतरी ऐकत असतं हृदयातून म्हणूनच गाण्यात मजा आहे”

आज लग्नाला एक दशक झाल्यावरही मन माहेरच्या  आठवणीने अगदी “वढाय वढाय” होतं. आई पण सतत विचारत असते तू केव्हा येणार?. मुलांना घेऊन ये ना ग एकदा. मग माझ्याही मनाला आनंदाचे पंख फुटतात अन क्षणात ते माहेरी जाऊन पोहोचतं असं वाटतं, जणू आई उंबऱ्याशी माझ्या वाटेवर डोळे लावून बसलेली आहे बाजूलाच तांब्याभर पाणी आणि भाकरीचा तुकडा ठेवला आहे-मला आणि मुलांना ओवाळण्या करता, वडीलही अस्वस्थ फेऱ्या मारतात, नाहीतर दिवाणखान्यात पेपर वाचण्याचं नाटक करतात पण तेही माझ्यासाठी अन नातवंडांसाठी अधीर झालेले असतात. फाटकाजवळ ऑटो थांबला की आईची लगबग सुरू होते आम्हाला ओवाळून तुकड्यांनी नातवंडांचं लिंबलोन करते, मुलांच्या डोक्यावर हात फिरवून ती दाही बोटं कांशी ला जवळ नेऊन त्यांची नजर काढते. पण क्षणातच मी वर्तमानात येते आणि माझ्या डोळ्यांच्या कडा अचानक ओल्या झाल्या असतात.

 यावर्षी कोरोनामुळे माहेरी जाता ना आल्यानं सारखं वाटतं की आईच्या अंगणातली आंबा, पेरू, चिकू चीझाड, सायली, चमेली चा वेल, मोगरा, कुंडाची झुडपं क्षणभर तरी माझ्यासाठी चुकचुकली असतील का? उन्हाळ्याची बेगमी करताना आईने माझी अन माझ्या मुलीची म्हणजेच तिच्या लाडक्या नातीची किती आठवण काढली असेल! नाती ला आवडतात म्हणूनच मी मी शेवया, पापड, बिबड्या करते बरं असं फोनवर सांगताना ही समाधानानं किती तृप्त झाली हे नुसत्या तिच्या आवाजावरून च लक्षात येतं.

माझं माहेर एक निमशहरी गाव घराच्या अंगणात पेरू, आंबा आणि चिकूच्या झाडाच्या सावल्या आजही मनाला गारवा देतात. चमेली, सायली, पारिजात आणि मोगऱ्याची फुलं देवाचा आणि मनाचा गाभारा सुगंधित करतात. आणि सहजच इंदिरा संत यांच्या ओळी आठवतात “कुठुन कसा आला वारा, गेला अंगाला वेढून, अंग उरले न अंग गेले अत्तर होऊन” आईच्या घरासमोरच्या मैदान ने माझ्या लहानपणीच्या लंगडी, डिगर, लगोरी, आणि आंधळी कोशिंबीर खेळाच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत. आजही मैदानात असलेल्या राम मंदिरात राम जन्म, कृष्ण जन्म, हनुमान जयंती, आणि अनेक धार्मिक उत्सव साजरे केले जातात. माझ्या लहानपणी राम नवमीला मंदिरात कैरीचं पन्ह द्यायचे आणि हनुमान जयंतीला भंडारा ही व्हायचा. आई सांगते यावर्षी हे काहीच झालं नाही-कोरोनामुळे.

रात्री मुलीला माझ्या बालपणीच्या आठवणी सांगताना उन्हाळ्यातली भर दुपारची कैरीच्या पन्ह्याची, कोकम सरबताची, आणि लालेलाल, थंडगार, गोड टरबुजाची आठवण सांगताना तीच क्षणभर माझ्याही जिभेवर रेंगाळली. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मैत्रिणींशी केलेल्या गप्पा, पत्त्यांचे रंगलेले डाव, आणि अष्ट चंग खेळताना झालेली चिडाचिडी आजही आठवते. श्रावणात सोमवारी ग्रामदैवत असलेल्या माझ्या गावच्या महादेवाच्या देवळात पायी पायी चालत जाऊन केलेली पूजा ही आठवली. हे महादेवाचे मंदिर आईच्या घरापासून दोन तीन किलोमीटर अंतरावर आहे बरं का!  गणेशोत्सव, हरतालिकेच्या एकत्र पूजा आणि जागरण, दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटून मोठ्यांचा घेतलेला आशीर्वाद, भुलाबाईची म्हणजेच भोंडल्याची गाणी म्हणून जागवलेली रात्र, कोजागिरी पौर्णिमेचे आटवलेले घट्ट केशरी दूध आठवलं. दिवाळीत उजळलेले घरातले आणि अंगणातले दिवे मनालाही उजळवून गेले.

दिवाळीत मी आणि माझे वडील किल्ला बांधायचं, बहिणी घरकुल करायच्या. मोठ्या बहिणी आणि त्यांच्या मैत्रिणी भातुकलीच्या खेळात वांग्याची भाजी आणि पोळ्या असा खास वऱ्हाडी स्वयंपाक करायचा. तो स्वयंपाक करताना किती मजा यायची वांग्याच्या भाजी  आणि पोळ्या अजूनही आठवतात. गौरी गणपती मध्ये गौराईच्या हळदीकुंकवासाठी आईसोबत शेजारच्या काकूंकड गेल्यावर, गौरीच्या बाळाकडे पाहून मी आईला म्हणायची “गौरी ची बाळ किती गोंडस आहेत गं” तेव्हा शेजारची काकू “तुलाही गौरी अशीच गोड मुलं देईल”, असं म्हणून तोंडभर आशीर्वाद द्यायची. शेजारच्या काकूंचा तो आशीर्वाद आजही मला आठवतो आणि माझ्या दोन गोंडस मुलांकडे बघून जीव सुखावतो. “

संक्रांतीची हळदी कुंकू आणि उखाण्यांचा आग्रह हे लहानपणी कळत नव्हतं, आणि समजण्याचं ते वयही नव्हतं. पण आज असं वाटतं सासर, माहेर, नवरा, मुलं-बाळं, यांच्यावरच प्रेम व्यक्त करण्याचं गृहिणींचा “उखाणा” हे फक्त एक माध्यम होतं, मनातल्या प्रेम , नाजूक भावना, व्यक्त करण्यासाठी गृहिणी, विवाहीत तरुणी, शब्दांचा साज शृंगार घेऊन या साऱ्यांचं कौतुक करायच्या, आणि स्वतःची प्रतिभा ही दाखवायच्या. किती साधं सोपं होतं लहानपणीच सारं.

पावसाळ्यातली जांभळं, कणस, हिवाळ्यातल्या चिंचा, बोरे, आवळे आणि उन्हाळ्यातल्या कैऱ्या, टरबूज, आणि द्राक्ष ,याशिवाय पिकलेल्या आंब्यांच्या नुसत्या वासाने ही मन तेव्हाही तृप्त व्हायचं आणि आजही समाधान होतं.

 आजच्या पिझ्झा, बर्गर, पास्ता, नूडल्स, यांना आईच्या-आजीच्या लोणच्याची, सांडग्या-दही मिरचीची, कुरडई आणि पापडाची सर येणार नाही. शेजारच्या देशमुख काकूंशी माझ्या आईचा घरोबा होता. नवलाईची भाजी किंवा एखादा पदार्थ वाटीभर का होईना, आई आवर्जून त्यांना द्यायची आणि त्यांच्या शेतातली रान भाजी चाकवत, मुगाच्या शेंगा, हरभरे न चुकता आमच्याही घरी यायचे. ह्या वाटीभर देण्या घेण्यात केवढं प्रेम, जिव्हाळा होता ते आता समजतंय.

अजूनही आईकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही बहिणी “माहेरी” जमतो, बालपणीच्या आठवणी ताज्या होतात. संसारातली रुसवे-फुगवे, ताण-तणाव, मतभेदाचे प्रसंग सांगितल्या आणि ऐकल्या जातात, मन मोकळं करता येतं. मुल अंगणातल्या आंबा पेरूच्या झाडावर चढतात आई अजूनही उन्हाळ्यात मठातल्या पाण्यात मोगऱ्याचे” फूल टाकते आणि ते सुगंधी, थंडगार पाणी गळ्याची आणि मनाची तलखी तृप्त करतो.

रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावताना आईच समंजस, समाधानी, सोज्वळ चेहरा आठवतो. हा चेहरा बघतांना लहानपणी मला नेहमीच प्रश्न पडे ‘देवाजवळ दिवा लावताना, दिव्याच्या प्रकाशामुळे आई इतकी सुंदर दिसते की? ती मुळातच सुंदर आहे’ परंतु आज माझ्या वैवाहिक जीवनाच्या एका दशकाच्या अनुभवानं मला असं वाटतं आई सुंदर तर आहेच, पण काटकसरीने आणि निगुतीने केलेल्या तिच्या संसाराचं सच्चे पणाचं तेज तिच्या मुखावर आहे. देवाला मी नेहमी हात जोडून विनंती करते की “माझ्या आईला शतायुषी” कर अन माझं माहेर असंच औक्षवंत राहू दे. आपण गृहिणी कितीही मोठ्या झालो तरी आपल्याला हे माहेरपण हवंच असतं कारण बालपणीच्या आठवणींचा अनमोल ठेवा या माहेरानच् आपल्याला दिलेला असतो.

https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/no_photo.png

ReplyForward

   

🎭 Series Post

View all