माझे हळदीकुंकू

हळदीकुंकू


        "तृप्ती.. ए तृप्ती, झाली का ग तयारी उद्याच्या संक्रातीची."
जोशी काकू लांबूनच बोलत बोलत माझ्याजवळ आल्या .
मी माझ्या सोसायटीमध्ये खाली मैत्रीणींसोबत गप्पा मारत बसले होते. मी, सारिका, नमिता, प्रिती, स्वाती, शीतल असे आम्ही पाच सहा जणी मिळून गप्पा मारत होतो आणि बाजूलाच आमची मुले खेळत होती. तेव्हड्यात जोशी काकू बहुतेक बाजार करून आल्या होत्या. त्या सगळ्यांनाच विचारत होत्या,
"पोरींनो, झाली का ग तयारी संक्रांतीची, हळदीकुंकूची.. आणि कोणी काय काय ठरवलंय. मग काय काय देणार आहात वाण, वाण लुटायला सगळ्या जणी तयार आहात ना!"
तश्या आम्ही सगळ्या म्हटलो,"उद्याची संक्रांतीची तयारी तर झाली आहे. म्हणजे साफसफाई झालीये तीळगुळ, सुगड वैगरे खरेदी झाली आहे, पण वाण लुटायला काय आणावे हेच ठरेना अजून!"
         
  पण माझी तयारी झाली होती आणि मी वाण लुटण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, तिळगूळ, तिळाचे लाडू, रंगीत बडीशेप असे सगळे तयार होते. पण मी हे कोणालाच सांगितले नव्हते, ते सरप्राइज होते सगळ्यांना. माझी तर सगळीच तयारी झाली होती. कोणती साडी नेसायची, त्यावर दागिने कोणते घालणार, दोन डझन हिरव्या बांगड्या, मोत्याची नथ, सोन्याचे कडे, चांदिचा छल्ला, बाजूबंद, जोडवी मासोळ्या, कानातील झुबे, गळ्यातले मोठे मंगळसूत्र, कुंकुवाचा चांदीचा करंडा, अत्तरदाणी सुद्धा स्वच्छ करून ठेवली होती. इतकी सगळी जय्यत तयारी करायची होती.

अगदी मेकअप काय करायचा, हेयर स्टाईल कोणती करणार हे सुध्दा ठरवले होते मी आधीच. कोणालाही न सांगता; त्यामुळे सगळ्यांमधे मी मात्र गप्प उभी होते. कारण सगळ्या जणी वाण काय घ्यायचे हे ठरवत होत्या म्हणजे घरात उपयोगी वस्तू देऊयात असे म्हणत होत्या. मी पण तसेच आणले होते, वाण देण्यासाठी ओव्हण मध्ये लागणारे काचेचे मोठे बाऊल. अगदी सगळ्यांना उपयोगी असे आणि सगळ्यांना आवडेल असे.


       संक्रांतीचे हळदीकुंकू हे रथसप्तमी पर्यंत असते. म्हणजे तोपर्यंत आपण कधीही करु शकतो हळदीकुंकू. ज्याची जशी तयारी होईल तसे तो एक एक करत होता हळदीकुंकू. सोसायटीमध्ये काही सात आठ जणी मिळून करत असे. पण माझी सगळी तयारी झाली होती म्हणून मी संक्रांतीच्या दिवशीच हळदीकुंकू करणार होते आणि त्याच दिवशी दुपारी सगळ्यांना आमंत्रण द्यायचं म्हणून सांगायला जाणार होते आणि हे पण माझे आधीच ठरलेलेच होते.
           
आमच्या सोसायटीमध्ये देशपांडे काकू, चव्हाण काकू, पाटिल काकू आहेत. त्यांचे पती या जगात नाहीये पण त्यांना हे सगळे किती आवडायचे हे मी सांगु शकत नाही. कारण प्रत्येक बाईला हळदीकुंकू म्हणजे एक सवाष्ण असल्याचा मान असतो आणि निसर्गाने तोच तर त्यांच्याकडून हेरावून घेतला होता. पण त्यांची यात काय चुक; म्हणून मी ठरवले ह्या वर्षी हळदीकुंकूला त्यांना सुद्धा बोलवायचे.
         
मी गुरुवारचे उद्यापण केले. अगदी त्या दिवशी सुद्धा त्यांना बोलावले होते, काकू निदान प्रसाद घ्यायला तरी या, पण त्या काही आल्या नाही. उलट मलाच बोलल्या,"
तुम्ही करा हळदीकुंकू, मी नंतर येते कधी तरी असेच."

तेव्हा मला खुप वाईट वाटले. पण आता मी त्यांना नक्कीच आग्रहाचे आमंत्रण देणार.
          
हळदीकुंकूच्या निमित्ताने तर आम्ही सगळ्या जणी एकत्र येतो. छान सजुन, नटून आणि खुप साऱ्या गप्पा होतात. कोणी काय नवीन खरेदी केली किंवा कोणाची साडी छान तर दागिने आणि आजूबाजूला काय चाललेय, बातम्या वैगरे.. अश्या गप्पा असतात. हाच तर दिवस असतो आमचा सगळ्यांना एकत्र येण्याचा भेटण्याचा, नाहीतर इतर दिवशी सगळ्या आपाआपल्या कामात गुरफटून असतात आणि सगळ्यांनाच प्रत्येक वेळी टाईम असेलच असे नाही होत. आम्ही दोघी तिघी असतो तर चौघी जॉब वाल्या आहेत त्यामुळे त्यांना संध्याकाळी लवकर येऊन घरातले काम असते, मुल असतात, त्यांचा अभ्यास असतो त्यामुळे रोज कोणालाच सवड नसते.
     
   हळदीकुंकूच्या निमित्ताने आम्ही सगळ्या जणी जरासा वेळ काढतो स्वतःसाठी, सजण्यासाठी, मुरडण्यासाठी, खेळ खेळण्यासाठी, वाण लुटण्यासाठी.. म्हणजे आनंदाला अगदी उधाण असते. कोण काय काय वाण देणार याकडे सगळ्यांचे लक्ष असते.
         
  संक्रांतीचा दिवस उजाडला, मी सकाळी लवकरच आवरून देवाची पुजा करून घेतली. सुगड पुजले, तिळगूळ ठेवले आणि एका बाजूला पुरणाचा स्वयंपाक पण चालूच होता. वर्षातला पहिलाच सण म्हणून पुरणपोळी. माझ्या आईला तसेच सासूबाईंना फोन करून संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. आज कामं जराशी लवकरच संपवत होते.


           मी सगळ्यांना दुपारीच बोलावण्यासाठी गेले होते प्रत्येकाच्या घरी, की संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान घरी हळदीकुंकूला या म्हणून. लवकर जरी सांगितले तरी आम्हां बायकांचे माहितीच आहे की तुम्हांला, किती वेळ घेतो आम्ही तयारी करायला नटायला.

देशपांडे काकू, चव्हाण काकू, पाटील काकू या तिघींना पण सांगितले खुप विनवणी केली की या तुम्ही, पण देशपांडे काकू खुप केविलवाण्या सुरात बोलल्या,"अग हा हळदीकुंकूचा कार्यक्रम तुमचा सवाष्ण बायकांचा. आम्ही काय करणार त्यात, तुम्ही करा की मजा. आम्ही येतो नंतर."
पण मी त्यांना बोलले की,"काकू काही बिघडत नाही, काही फरक पडत नाही आणि मी काहीही ऐकून घेणार नाही तुमचं, तुम्ही यायचं म्हणजे यायचच."

तश्या त्या बोलल्या,"बर बाळा येईन मी, माळी काकू आणि पाटील काकूंना पण सोबत घेऊन नक्की येईन हो."

मी खुप खुश झाले तसे त्यांनी माझ्या डोक्यावरून त्यांचा मायेन हात फिरवला आणि बोलल्या,"झाली का मग तयारी सगळी."
  "हो काकू झालीये सर्व तयारी, आता फक्त माझा मेकअप तेव्हढा बाकी आहे." तश्या त्याही हसल्या आणि मी पण.

               घरी येईपर्यंत माझ्या दोन कन्यारत्नांनी चांगलाच पसारा मांडला होता. मग लगेच त्यांना आवरून ठेवायला सांगितले आणि मी पण पुन्हा सगळे नीट करू लागले. दोघी पण मला आवरायला मदत करत होत्या, कारण त्यांना आधीच सांगितले होते की संध्याकाळी आपल्याकडे हळदीकुंकू आहे तर सगळ्या माझ्या मैत्रीणी येणार आहेत. त्याही खुप खुश झाल्या होत्या. तिळगूळ, लाडू आणि बडीशेप मी देणार म्हणून दोघी भांडत बसल्या. म्हणून मी दोघींना काम वाटून दिली.

        आधी त्या दोघींना छान तयार केले आणि मग नंतर मी तयार झाले. म्हणजे मी तयार होत असतांना त्यांची मध्ये मध्ये लुडबुड नको. नाहीतर घाई गडबडीत मला विसरायला होत.

सगळ्या जणी एक दोन करून ग्रूपने येत होत्या. जवळ जवळ वीस ते बावीस जणी येणार होत्या मग वेळ तर लागणारच होता. घरी येणाऱ्या माझ्या मैत्रीणी म्हणत होत्या की,"घर खुप छान आवरले आहे ग तृप्ती!"

मी बाहेर छानशी रांगोळी काढली होती. देवासमोर दिवा अगरबत्ती लावली होती, तिचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. खाली छान गालिचा अंथरला होता, सोफा होताच बसायला आणि डायनिंग टेबलच्या चार खुर्च्या पण होत्या बसायला. बाजूलाच टिपॉय वर छोटेसे तांब्याचे घंघाळे, त्यात फुले शोभून दिसत होती. सगळी स्पेशल इफेक्टची लाईट्स लावली होती आणि त्यात आणखी भर म्हणून छान असे हळू आवाजात संगीत लावले होते; त्यामुळे सगळे वातावरण कसे अगदी प्रसन्न वाटत होते.
      
माझ्या मैत्रीणींचा घोळका आला तश्या सगळ्या जणी बोलल्या,
"काय ग सगळे एकटीने आवरले, एव्हढे छान.. आणि आम्हांला सांगितले पण नाही."
असे म्हणून सगळ्या जणी हसल्या, मी सगळ्यांना हळदीकुंकू लावत होते. माझ्या मुली तिळगूळ, लाडू, सरबत वैगरे देत होत्या आणि मी त्यांना आधीच सांगून ठेवले होते की तिळगूळ देताना म्हणायचे,"तिळगूळ घ्या गोड गोड बोला" लाजायच नाही.

माझी छोटी तर अगदी बाहुलीच दिसत होती, गोड एकदम. सगळे खुप कौतुक करत होते दोघींच आणि माझे सुद्धा. मी पण छान दिसत होते असे सगळ्याच म्हणत होत्या. मी वाण देताच सगळ्या जणी बोलल्या,"खुप छान निवडले ग वाण."
खुप आवडले सगळ्यांना, सगळ्यांनी फर्माइश केली की चल बर आता एक उखाणा होऊन जाऊदे. मग काय मला घ्यायलाच लागला आणि मला आवडते उखाण्यात आमच्या ह्यांच नाव घ्यायला.
 
 पारीजातकाच्या झाडाखाली, सुवासिक फुलांच्या राशी
अहोंच नाव घेते संक्रांतीच्या हळदीकुंकवाच्या दिवशी.

 तेव्हड्यात देशपांडे काकू, चव्हाण काकू, पाटील काकू पण आल्या. मला खुप छान वाटले आणि आनंद ही झाला. सगळ्या जणी बघतच राहिल्या, मी त्यांना हाताला धरून घरात आणले आणि खुर्चीवर बसवले. सरबत दिले, मुलींनी तिळगूळ दिले. मी वाण द्यायला गेले तेव्हा काकू बोलल्या,
"तृप्ती, आम्हांला हळदीकुंकू वाण देताना त्यालाच लावून दे."

मी पण त्यांचे ऐकले, कारण त्या माझ ऐकून इथवर आल्या होत्या मग मी त्यांच एव्हढ म्हणन ऐकल आणि त्यांना वाण देऊन त्यांच्या पाया पडले. तसे तिघींनी ही माझ्यावरुन बोट मोडली कडाकडा आणि खुप सुंदर दिसतेस म्हणून माझी दृष्ट ही काढली. 
     
  बाकीच्यांनाही हे बघून खुप छान वाटले की त्या तिघी पण यात सामिल झाल्या. बाकिच्या माझ्या मैत्रीणी पण बोलल्या त्या तिघी काकूंना, की आमच्याकडे पण यायचं हं काकू. 

खरचं कस असतं ना बाईच.. नवरा असला तरच सगळा साज शृंगार, आणि नवरा नसला की कसे जीवन होऊन जाते. सगळ्या ईच्छा असूनही आपण त्या मनातच दाबून ठेवतो. कुठेही न जाणे, सवाष्णच्या कामात मधेमधे न जाणे, शुभ कार्यात कायम मागे उभे राहणे पण आता नाही. आता हे आपणच हळूहळू हे बंद केल पाहिजे. त्यांनाही अधिकार आहे या सगळ्याचा, यात त्यांची तरी काय चुक. सांगा तरी मला कुणी. समाजाची मानसिकता आता खरचं हळूहळू बदलतेय आणि त्याला आपणच आपल्यापासूनच तर सुरुवात केली पाहिजे. काय बरोबर बोलतेय की नाही मी!