मातृभूमीच्या उद्धारास्तव देह दिला करवती,
तयाला तुरुंग भिवविल किती ?
सुममालेसह लोहशृंखला मानिलं जो सर्वदा,
तयाला काय करील कायदा ?
स्वातंत्र्यस्फूर्तीचे सिंचूनि अमृतकण
मृत मानवतेला आणिलं संजिवन .
जम्मू काश्मीर आणि हिमालयाच्या पर्वतरांगांपासून दाट जंगले,
निसर्गसौंदर्याने नटलेल्या दक्षिणेकडील प्रांतापर्यंत आपल्या देशाला
विविधतेची मोठी परंपरा लाभली आहे. अरबी समुद्राला
अंगावर खेळविणाऱ्या पश्चिम किनारपट्टी पासून ते आसाम,
अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, मिझोरम...
अशा विविध संस्कृतींनी नटलेल्या आपल्या देशात अनेक भाषा
बोलणारे, अनेक चालीरीती पाळणारे लोक राहतात. सर्व
धर्माच्या व्यक्तींना समानतेची वागणूक देणारा आपला देश
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून ओळखला
जातो. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर
सावरकर अशा अनेक नेत्यांनी सातत्याने ब्रिटिशांविरुद्ध दिलेला
लढा आणि नेताजी सुभाष चंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर
आझाद अशा अनेक क्रांतिकारकांनी केलेले बलिदान यामुळे
आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या
जोखडातून मुक्त झाला. पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या
देशाचे पहिले पंतप्रधान आणि डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र
भारताचे पहिले राष्ट्रपती बनले.
हातात तिरंगा धरूनि ते कोसळतांना वदले...
'हा आहे देश महान'अन् विझता विझता हसले...
हा उत्सव स्वातंत्र्याचा हा बलिदानाचा आहे.
हा विजय सोहळा सारा त्या समर्पणाचा आहे...
त्या अनाम वीरांसाठी हा दिवा लावीत आहे...
त्या स्मृती वरील शूरांच्या ही फुले ठेवित आहे .
कुणा कविवर्यांच्या या सुंदर ओळी.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १५ ऑगस्ट २०२२
त्यानिमित्ताने हा छोटासा लेख.
धन्यवाद.
सौ. रेखा देशमुख