मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा..
(हि कथा इतिहासातील सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक प्रेमकथा आहे. या कथेत नमूद केलेली पात्र, घटना, प्रसंग काल्पनिक आहेत. इतिहासातील कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. कथेतील मार्तंड, शहजादी, मेहर आणि इतर पात्रं केवळ वाचकांच्या मनोरंजन हेतू दाखवण्यात आलेले आहेत. इतिहासाच्या कोणत्याही गोष्टींशी त्यांचा काहीही संबंध नाही. कथेतील घटना. प्रसंग, पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. काही साधर्म्य आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.)
ईसवी सन १६०० चा काळ होता. संपूर्ण हिंदुस्थानावर परकीय सत्ता राज्य करत होत्या. दक्षिणेत असणाऱ्या निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही तर उत्तरेस मोगलशाही यांनी संपूर्ण हिंदुस्थानात धुमाकूळ घातला होता. इस्लामी आक्रमकांच्या सतत कारवाया सुरू होत्या. हिंदुस्थानावर इस्लामी सत्तेची हुकूमत होती. त्यामुळे सोळाव्या शतकात एकही स्वतंत्र हिंदू राज्य नव्हतं. आदिलशहाचं राज्य महाराष्ट्र व कर्नाटकात पसरलं होतं. कर्नाटक, महाराष्ट्रातील डोंगराळ प्रदेश, सह्याद्रीच्या विस्तारलेल्या उंचच उंच पर्वतरांगा, सह्याद्रीच्या पश्चिमेस असलेली समुद्र किनारपट्टी आणि पूर्वेस विस्तीर्ण पसरलेला पठार सगळं आदिलशहाच्या अधीपत्याखाली होतं. या इस्लामिक सत्ता एकमेकांत वैर असल्याने सतत लढाया करत. जो तो स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी, सत्ता प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांत लढत होता. त्यासाठी रयतेवर अत्याचार करत होता. त्यात भर म्हणून की काय! वतनदार, सुभेदार आपापसात वतनासाठी भांडत होते. वतनाचं आमिष दाखवून आदिलशहा, निजामशहा आणि मोगलांनी त्यांना आपल्या पदरी चाकरीस ठेवून घेतलं होतं. वतनासाठी लढण्यात त्यांची सारी शक्ती खर्ची होत होती. युद्धात मारणं वा मरणं इतकंच त्यांना ठाऊक होतं. चार दिवस आदिलशहाच्या पदरी, चार दिवस निजामशहाच्या पदरी, कधी मोघलांच्या पदरी अशी अवस्था होती. ‘मिळेल तिकडे चांगभलं’ अशी त्यांची स्थिती झाली होती. कोणी एक वाली नव्हता. स्वतःच्या स्वार्थासाठी जो तो हपापला होता. कोणालाही रयतेच्या सुख दुःखाशी घेणंदेणं नव्हतं. दिवसेंदिवस रयतेवरचा अत्याचार वाढत होता. रयतेला लुटून आदिलशाह हुकूमत गाजवू पाहत होता. आया बहिणींची अब्रू लुटली जात होती. रयतेचं धन-धान्य, जनावरं, आया बहिणीही ओढून नेली जात होत्या. रयत खूप त्रासली होती. दिवसेंदिवस दरोडेखोरांचा सुळसुळाट वाढला होता. रयतेवर अत्याचार करून आदिलशहा आपली दहशत टिकवून ठेवू पाहत होता. त्याच्या भीतीने, अत्याचाराने रयत हैराण झाली होती. त्यावेळीस शहाजीराजे विजापूरला आदिलशहाच्या दरबारी होते. त्यांनी स्वतंत्र हिंदू राज्य स्थापनेसाठी खूप प्रयत्न केले पण तेंव्हा त्या बलाढ्य सामर्थ्यशाली सत्तेपुढे त्यांचा निभाव लागला नाही. स्वतंत्र हिंदू राज्य स्थापन करण्यात त्यांना यश आलं नव्हतं. मग कोणाच्या एकाच्या दरबारी राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा मार्ग उरला नव्हता.
आणि मग अशा कठीण परिस्थितीत हिंदवी स्वराज्याचा सूर्योदय झाला. शिवबाच्या रूपाने रयतेला आशेचा किरण दिसला. शिवाजीराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. हिंदवी स्वराज्याचं वारं वाहू लागलं. स्वराज्याच्या स्थापनेचा पाया रचला गेला. रयतेचा राजा गोरगरीब जनतेसाठी झटू लागला. शिवरायांनी आदिलशाही मुलखातील, मावळ प्रदेशातील एकेक गड सर करत स्वराज्य स्थापनेस सुरवात केली. यामुळे आदिलशहा बिथरला. शिवाजी राजांनी आदिलशाही सल्तनतच्या विरुद्ध बंड केलं शिवाजीराजे आपली वेगळी सत्ता प्रस्थापित करत आहेत असं आदिलशहाला वाटलं. आजवर प्रस्थापित केलेलं आपलं वर्चस्वाला शिवरायांच्या या कृत्याने खिळ बसेल, निर्माण केलेला दबदबा कमी होईल अशी भीती आदिलशहाला वाटू लागली. त्यात भरीस भर म्हणून आदिलशाही दरबारी असलेली लोकं आदिलशहाचे शहाजीराजांविरुद्ध कान भरू लागले.
“शहाजीराजे स्वतंत्र राज्य करण्यासाठी आपल्या मुलाला, शिवरायांना तयार करत आहे. आदिलशाही सल्तनतविरुद्ध बगावत करत आहेत. मुलांना हाताशी धरून स्वतःची वेगळी हिंदू सत्ता प्रस्थापित करण्याचा त्यांचा मनसूबा आहे.”
अशा चर्च्यांना ऊत आला होता त्यामुळे आदिलशहा खूप भडकला. त्यांनी शहाजीराजांना जाब विचारला. तेंव्हा “आदिलशाही साम्राज्य वाढवण्यासाठीच शिवाजी राजांनी गड घेतले आहेत” असं उत्तर दिलं पण त्याचा शहाजीमहाराजांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही आणि आदिलशहाच्या कटकारस्थानांना सुरुवात झाली. त्याने शहाजीराजांना कैद करून शिवाजी महाराजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण शिवबाराजे त्याच्या कारस्थानांना घाबरले नाहीत. मोठ्या युक्तीने त्यांनी शहाजीराजांची सुटका केली आणि आपली मोहीम सुरूच ठेवली. इ. स १६५६ साली महंमद आदिलशहाचा मृत्यू झाला. त्याची पत्नी बडी बेगमने आपल्या आवडत्या मुलाला अली आदिलशहा यांस विजापूरच्या गादीवर बसवलं आणि स्वतः राज्यकारभार पाहू लागली. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खबरी विजापूरच्या दरबारी धडकू लागल्या. जावळीच्या मोऱ्यांचा बंदोबस्त केल्यानंतर आणखीनच आदिलशाही दरबारात संकटाचं, भीतीचं सावट पसरलं होतं. काय करावं? कसा बंदोबस्त करावा? कोणालाच समजत नव्हतं. अशा विवंचनेत असताना एक दिवस भर दरबारात बडी बेगम हिने दरबारात जमलेल्या लोकांना सवाल केला.
“क्या है कोई ऐसा सुरमा, क्या है कोई ऐसा मर्द, जो उस नमकहराम, बगावतखोर को हमारे सामने पेश करे. कौन उठा सकता है ये विडा? सिवाको पुरी तरहसे कौन मिटायेगा? कौन है इस दरबारमे जो सिवाको हमारे सामने पेश करे? बोलो कौन तैयार है! किसमे हिम्मत है?”
सर्वजण मान खाली घालून बसून होते. शिवाजी महारांच्या पराक्रमाचा डंका सर्वत्र वाजत होता. कोणीही विडा उचलण्यास पुढे येत नाही हे पाहून बडी बेगम हताश झाली. ती उठली तसे सगळे दरबारी उठून उभे राहिले. सगळ्या दरबाराकडे तिने एकवार नजर फिरवली, अन फिरून आपल्या महालामध्ये जाण्यासाठी निघाली. पण त्या स्मशान शांततेला कापत एक कर कर आवाज सगळी कडे घुमू लागला, सगळे दरबारी त्या दिशेने पाहू लागले. अंगात भरजरी कपडे घातलेले, त्याहूनही रुबाबदार असा त्याचा किमॉंश त्याच्या डोक्यावर उठून दिसत होता. तो साडे सहा सात फूट उंच धिप्पाड देह आपली दमदार पावले टाकत दरबाराच्या मधोमध आला. दरबारामध्ये किंचित कुजबुज चालू झाली होती पण बडी बेगम काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती हळुवार आपली पावले टाकत आसनावरून उठून निघालीच होती कि एक जबरदस्त, दमदार आवाज दरबारामध्ये घुमला.
"मैं लाऊंगा उसे ।"
"जिन्दा या मुर्दा, जैसा आप कहेंगी मैं पेश करूँगा उसे इस दरबार में। वरना ये खान आपको अपनी शक्ल नहीं दिखायेगा। ये कसम है इस खान की, और खान अपनी कसम अपनी जान से ज्यादा मानता है।"
सर्वांच्या नजरा त्या भारदस्त आवाजाच्या दिशेने वळल्या आणि त्याच्यावर खिळून राहिल्या. तो आवाज होता दरबारातल्या एका कर्तृत्ववान, मुत्सदी सरदाराचा,अफजलखानाचा. अफजलखान अतिशय धूर्त आणि कपटी होता. निर्दयी होता. शिवाजी महाराजांना नेस्तनाबूत करण्याचा त्याने जणू विडाच उचलला होता. शिवाजींमहाराजांना जिवंत अगर मृत पकडून आणण्याची प्रतिज्ञा केली. बडी बेगमला आनंद झाला. अफजल खान विजापूरहुन मोहिमेवर जाण्यासाठी निघाला.
वाटेत दहशत बसावी म्हणून त्याने काही हिंदू मंदिरे व देवदेवता उद्ध्वस्त केल्या. रयतेला लुटत, गोरगरिबांना त्रास देत तो पुढे पुढे येत होता. रयतेत भीतीचं वातावरण पसरलं होतं. शिवरायांना त्याच्या चाल करून येण्याची खबर लागली होती. पण त्याचं सैन्य, दारुगोळा, शस्त्रे, तो कुठे तळ ठोकणार याची काहीच कल्पना नव्हती. पुढची युद्धाची खेळी डोक्यात तयार होऊ लागली. वरचेवर एकमेकांना उत्तर प्रतिउत्तर देऊ लागले त्यामुळे दोन्ही सैन्यात चिंतेचे सावट पसरलं होतं.
विजापूरच्या गगन महालातही या लढायांच्या चर्चेला रंग चढला होता. बडी बेगम, शहजादी, राजघराण्यातील इतर बायकांत कुजबुज होती. शत्रूच्या सैन्याच्या भीतीचं सावट पसरलं होतं. कोणीही स्त्री महालाबाहेर एकटी बाहेर पडत नव्हती. बडी बेगम साहिबा आणि शेहजादी सोबत कायम अंगरक्षकांचा पहारा होता. महालातल्या राजघराण्यातल्या स्त्रियांच्या रक्षणाची त्यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी होती. कायम पहारा ठेवण्यात आला होता. एक दिवस शहजादीची सहेली रुकसारचा निकाह ठरला. तिला तिच्या शादीमध्ये जायचं होतं. महालात सतत बंदोबस्तात राहून ती कंटाळली होती. कित्येक दिवस ती महालातून बाहेर पडली नव्हती. मोकळ्या हवेत श्वास घेतला नव्हता. तिने बडी बेगमची परवानगी घेण्याचं ठरवलं आणि बडीबेगमच्या कुशीत शिरत तिने लाडाने तिला म्हणाली.,
“बडी बेगम साहिबा, हम रुकसार की शादीमे शामिल होना चाहते है! वैसेभी हम महलमे बैठे बैठे बहुत उब गये है! हम थोडे समय के लिये बाहर सैर करना चाहते है! हम जाये बडी बेगम? सिर्फ थोडे समय के लिये.. मान जाईये ना..”
शहजादी मिन्नते करू लागली मग सुरुवातीला नाही हो म्हणत अखेर बडीबेगमने तिला रुकसारच्या लग्नाला जाण्याची परवानगी दिली पण सोबत शिपायांना घेऊन जाण्याची अट घातली. मोठ्या आनंदाने शहजादीने तिची अट मान्य केली आणि आपल्या सहेलींसोबत, विश्वासू दासीना घेऊन ती रुकसारच्या निकाहमध्ये सामील झाली. सोबत मोजके सशस्त्र सैन्य, शंभर एक घोडेस्वार, बड्या लवाजमासह ती मेण्यात बसून ती तिच्या सहेलीच्या शादीमध्ये आली. तिच्यासाठी उंची उपहार तोहफ्यात देत शहजादीने तिला शुभेच्छा दिल्या. सर्वांचं शाही भोजन झालं. रुकसारची बिदाई झाल्यानंतर ती परत आपल्या घरी निघाली. मेणात बसून ती बाहेरच्या निसर्ग सौन्दर्याचा आस्वाद घेत होती. ती मेण्यातून खाली उतरली. हिरवीगार वनराई छान नटली होती. पक्षांचा थवा मध्येच आकाशात विहार करत होता. कुंद वारा प्रफुल्लित करत होता. कोकीळेचा गोड स्वर मनाला धुंद करत होता. तिने अजून आत जंगलात जाण्याची इच्छा आपल्या मैत्रिणींना बोलून दाखवली. शिपाई नको नको म्हणत असताना ती हट्ट करू लागली मग सैनिकांचा नाइलाज झाला. मोजक्या दहा पंधरा सैनिकांना घेऊन शहजादी आत जंगलात जाऊ लागली. चालत चालत शहजादी एका तळ्याजवळ आली. तिने सैनिकांना थोडं दूर थांबायला सांगितलं आणि मैत्रिणींसोबत तळ्यातल्या पाण्यात उतरली थोडा वेळ तिथे पाण्यात मैत्रिणींसोबत मौज केल्यानंतर शहजादी बाहेर आली. तिच्या मैत्रिणीही बाहेर आल्या. मलमली वस्त्राने त्यांनी तिचं अंग पुसलं. तळ्याकाठी पाण्यात निवांत पाय सोडून बसली होती. तिच्या दासीनी तिला तबकात फलाहार करण्यास दिला. सर्वांनी मिळून गोड आंबट फळांचा फडशा पाडला. गप्पांचा ओघ वाढला. हसत खेळत छान वेळ जात होता.
इतक्यात तिला घोड्यांच्या टपाचा आवाज आला. तो आवाज अगदी तिच्या जवळ येऊ लागला. वाऱ्याच्या वेगाने एक घोड्यावर स्वार असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीने त्यांना घेरलं. शहजादी आणि तिच्या मैत्रीणीची भीतीने गाळण उडाली. त्यांनी मोठमोठ्यांनी ओरडायला सुरुवात केली. एकच कल्लोळ माजला. त्यांच्या आवाजाने दुरवर उभे असलेले शिपाई धावतच तिथे आले. त्यांनी दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या सामर्थ्या समोर सैन्याचं काहीच चालेना. त्यांनी सर्व शिपायांना ठार केलं. दरोडेखोरांनी शहजादी आणि तिच्या मैत्रिणींच्या अंगावरचे दागिने हिसकावून घेतले. त्या टोळीचा म्होरक्या पुढे आला. शहजादीकडे वखवखलेल्या नजरेने पाहत म्हणाला.,
“ उठा लो इसको..बहुत खूब शिकार हात लगा है!”
जोरात गर्जना करत तो शहजादीच्या जवळ येऊन तिच्या हाताला पकडून तिला ओढत नेऊ लागला. त्याच्या बरोबरचे सरदारही तिला पकडून ओढू लागले. शहजादी प्रतिकार करत होती पण त्यांच्या ताकतीपुढे तिची शक्ती अपुरी पडत होती. शहजादी रडत होती, ओरडत होती. इतक्यात कुठून तरी ‘सू..‘ आवाज करत वाऱ्याच्या वेगाने एक भाला त्या म्होरक्याच्या पुढ्यात येऊन पडला. सर्वजण इकडे तिकडे पाहू लागले.
“खबरदार.. त्यास्नी हात लावाल तर! बाय माणसावर हात घालता व्हय. हिंमत आसल तर माज्या संगट दोन हात करा मंग दावतो तुमास्नी. एकेकांचा मुडदा बसविल्याशिवाय राहणार नाय. सोडा म्हंतुय नव्हं.. सोडा..”
घोड्यावर स्वार होऊन एक राजबिंडा तरुण म्होरक्याच्या दिशेने येत होता. त्याच्या आवाजात इतकी जरब होती की नुसत्या त्याच्या आवाजाने दरोडेखोरांची भीतीने गाळण उडाली. तरीही उसणं अवसान आणून त्यातल्या दोघांनी त्याच्यावर हल्ला केला पण मोठ्या शिताफीनं त्या युवकानं स्वतःचा बचाव केला आणि घोड्यावरून खाली उतरत असतानाच धावत्या घोड्यावरूनच त्याने हातातला दुसरा भाला फेकून मारला. म्होरक्या जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत पाहून बाकीच्या त्याच्या साथीदारांचं अवसान गळून पडलं. म्होरक्या तसाच जखमी अवस्थेत धडपडत पळत सुटला. त्याच्या साथीदारांनी सापडेल त्या रस्त्यानं हातातला चोरलेला ऐवज तिथेच टाकून धूम ठोकली.
त्याचा पराक्रम पाहून शहजादी त्याच्याकडे थक्क होऊन पाहतच राहिली.
कोण होता तो युवक? पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..
नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मी आपली शब्दसखी निशा थोरे (अनुप्रिया) पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहे एक नवीन ऐतिहासिक काल्पनिक प्रेमकथा घेऊन. ‘मार्तंड’ हि एक आगळी वेगळी प्रेमकहाणी.. शिवरायांच्या काळातली.. एका अनोख्या मावळ्याची..
तुम्ही माझ्या ‘स्पर्श’ या कथेला भरभरून प्रेम दिलंत. आशीर्वाद दिलात. त्यासाठी मी कायम तुमच्या ऋणात. या कथेलाही तसंच प्रेम मिळेल अशी आशा करते. तुमच्या प्रतिक्रिया मला लिखाणास नवी उर्मी देतील यांत शंकाच नाही.
धन्यवाद
आपली शब्दसखी,
© निशा थोरे (अनुप्रिया)