मार्तंड.. एक अनोखी प्रेमकथा.. भाग ९

ही कथा एक शूरवीर मावळ्याची.. त्याच्या अनोख्या प्रेमाची..


मार्तंड.. एक अनोखी प्रेम कथा..


भाग ९


मेहर वाड्यातून निघून गेली पण मनात मात्र मार्तंडचे शब्द घुमत होते. मार्तंडला तिच्याविषयी वाटणारी आत्मीयता तिला जाणवत होती. विजापुरात आल्यानंतर तिच्या कळत्या वयापासून आज पहिल्यांदा त्याच्या प्रेमळ शब्दांनी तिच्या मनात कोणा पुरुषाबद्दल इतकी ओढ निर्माण केली होती. रात्रभर मेहर मार्तंडचाच विचार करत होती. त्याने तिला दिलेला शब्द तिच्या मनात पुन्हा पुन्हा रेंगाळत होता. त्याच्याच विचारात असताना पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला.

झुंजूमुंजू झालं. अजानाची वेळ झाली. जवळच्या मस्जिदीतून येणाऱ्या अजानच्या आवाजाने मेहरला जाग आली. ती उठून बसली. दोन्ही तळहात एकमेकांशी जोडून तिच्या नजरेसमोर धरले. डोळे मिटून ती मनातल्या मनात अल्लाहचं नामस्मरण करत होती. पण आज तिचं मन स्थिर नव्हतं. पुन्हा पुन्हा मार्तंडचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर येत होता. ती मन एकाग्र करण्याचा कसोशीने प्रयत्न करत होती पण त्यात तिला यश येत नव्हतं. दोन्ही तळहात आपल्या चेहऱ्यावरून फिरवत तिने डोळे उघडले.

“ये हमें क्या हो रहा है? या अल्लाह आज हमें माफ कर दे.. पता नही क्यूँ आज इबादत में ध्यान नहीं लग रहा था. न जाने क्या हुआ के हर तरफ मार्तंड हूजुर का ही चेहरा दिखाई दे रहा है. कही ये इश्क तो नही? या मेरे मौला. शायद यही प्यार है. जी हाँ हुजूर, हम आपसे बेइंतेहा मुहब्बत करते हैं..”

ती स्वतःशीच पुटपुटली आणि लाजून मखमली ओढणीने स्वतःचा चेहरा लपवू लागली. रात्रभर तिला मार्तंडचीच स्वप्नं पडत होती. त्याचं लाघवी बोलणं, त्याच्या स्वभावातला तो प्रेमळपणा, सच्चेपणा मनात रुंजी घालत होता. ती त्याच्याकडे आपोआप ओढली जात होती. मनात अनामिक हुरहूर दाटून येत होती.

“जी हाँ, हमे मार्तंडसे इश्क है.. बेपनाह चाहते है हम उन्हे.. अब उनके बिना जिना नामुमकीन है..”

तिच्या मनाने कौल दिला. नकळत उमलणाऱ्या प्रेमाच्या भावनेने ती हरखून गेली पण दुसऱ्याच क्षणी तिचा चेहरा दुःखाने भरून गेला.

“ये कैसे मुमकीन है? हम जैसो के नसीब में किसी का प्यार कहाँ? वो एक तवायफसे क्यूँ इश्क करेंगे? नही मेहर ये नामुमकीन है..”

ती हिरमुसली पण दुसऱ्या क्षणी तिचं मन तिच्याशी बोलू लागलं.

“पर हम तो उनको दिल दे बैठे हैं.. अब इसमें हमारे दिल का क्या कसूर? जरुरी तो नही की उनको भी हमसे मुहब्बत हो? इक तरफा इश्क भी तो इश्क ही है और उसे हम तहे दिलसे निभायेंगे.. चाहे कुछ भी हो जाये, उन्हे हमसे मुहब्बत हो ना हो, पर हम पूरी ज़िंदगी उनसे इश्क करते रहेंगे..”

तिच्या मनाने आयुष्याचा साथीदार म्हणून मार्तंडचा स्वीकार केला होता. तिकडे सकाळ झाली तरी मार्तंड शांत झोपला होता. सकाळची न्याहारी घेऊन मेहर त्याच्या वाड्यात आली. तिला उगवतीच्या सज्जातून कोवळी सूर्यकिरणं मार्तंडच्या पलंगावर पडताना दिसली त्यामुळे मार्तंडची झोप चाळवली. तो दुसऱ्या कुशीवर झाला. मार्तंडला सूर्यकिरणांचा त्रास होऊ नये म्हणून मेहर पटकन सज्जावरचे पडदे सोडू लागली. त्या चाहुलीने मार्तंडला जाग आली. बिछान्यातून उठून बसत तो म्हणाला,

“मेहरबाय, तुम्ही हितं? आमास्नी उठाय लई येळ झाला काय?”

“नही हुजूर, हम आपसे सारी रात गुफ्तगू करते रहे.. नींद अच्छेसे नही हो पाई ना?”

तिने मार्तंडला प्रश्न केला. त्याने हसून मान डोलावली. हळूहळू मेहर आणि मार्तंड यांच्यातला प्रेम, जिव्हाळा वाढत होता. दोघांत एक अनामिक सुंदर नातं फुलत होतं. अमीनाबाईने मेहरला मार्तंडवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. त्याची माहिती काढायला सांगितली होती. त्यामुळे मेहरच्या मार्तंडशी वागण्या बोलण्यावर, त्याच्या सोबत असण्यावर अमीनाबाई फारशी बंधन घालत नव्हती. तो एक साजिशचा भाग आहे असा समज होऊन मेहरला मार्तंडसोबत मनमोकळेपणे हसण्या बोलण्याची मुभा दिली होती. मार्तंड हा पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या सुर्वेवाडी गावचा आहे. इतकीच माहिती ती देऊ शकली होती. मेहरकडून मिळालेली माहिती हेरांकरवी बाजी घोरपडे यांच्यापर्यंत पोहचली होती. मार्तंड एक विश्वासू चाकर आहे यावर सर्वांचा विश्वास बसू लागला होता. मार्तंड अजून रंगमहालातच थांबला होता. बाजींनी सोपवलेली कामगिरी अजून यशस्वीरित्या पार पडली नव्हती. कुठलीच महत्वाची बातमी हाती लागत नव्हती पण मार्तंडने प्रयत्न सोडले नव्हते. तो बारकाईने सगळ्या गोष्टी हेरून ठेवत होता. हळूहळू मार्तंडच्या मनातही मेहरविषयी ओढ निर्माण होऊ लागली होती. त्याला मेहर आवडू लागली होती. तिचं लाघवी बोलणं, खळखळून हसणं, तिचे खट्याळ मादक डोळे मनाला त्याच्या भुरळ पाडत होते. म्हणतात ना, सहवासाने जीव लावला तर जनावर पण माणसाळतं मग तो तर हाडामासांचा जिवंत मार्तंड होता. मेहरच्या प्रेमळ वागण्याने त्याच्या मनातही प्रेमाचं बीज उमलू पाहत होतं. अगदी अलवारपणे त्यांचं नातं रुजत होतं फुलत होतं. मार्तंड तिला नव्याने तिची मूळची दख्खनची बोलीभाषा शिकवू लागला. ती बोलण्याचा प्रयत्न करू लागली. कधी कधी मार्तंड मेहरसोबत त्याच्या अबलक घोड्यावरून रपेट मारायचा. तिच्यासोबत बागेत, तळ्याकाठी जायचा. तिच्या केसांत माळलेल्या गजऱ्यांचा गंध, तिचा हळुवारपणे होणारा स्पर्श त्याला मदहोश करत होता. पण शेवटी मर्द मराठा मावळाच तो.. आधी कर्तव्य मग बाकीच्या गोष्टी.. कर्तव्यात त्याला अजिबात कुचराई नको होती. ध्येय गाठणं महत्वाचं होतं. कर्तव्याच्या पुढे बाकी गोष्टी त्याच्या दृष्टीने नगण्य होत्या. कर्तव्य आणि प्रेम यांत सर्वप्रथम त्याने कर्तव्यालाच प्राधान्य दिलं होतं. त्यामुळे कितीही त्याच्या मनात मेहरविषयी प्रेम असलं तरी त्याने बोलून दाखवलं नव्हतं. मनातलं प्रेम मनातच राहिलं होतं.

एक दिवस मेहर मार्तंडच्या कक्षेत त्याच्यासाठी रात्रीचं जेवण घेऊन आली. समोरच्या मंचकावर तिने जेवणाचं ताट ठेवलं.

“बिस्मिल्लाह किजीये हुजूर..”

मेहर म्हणाली. मार्तंडने हसून तिच्याकडे पाहिलं आणि मिश्किलपणे म्हणाला.,

“मेहरबाय, आमच्यासंगट जेवा की वाईच..”

“नही हुजूर, आप शुरू किजीये..”

मेहर उत्तरली. मार्तंडने जेवायला सुरुवात केली. तुकडा मोडून एक घास तोंडात घालणार इतक्यात रंगमहालाचा एक शिपाई तिथे आला आणि तो म्हणाला.

“सरदार बाजींचा निरोप घेऊन एक हुजऱ्या आलाय.”

“भेज दो उसे अंदर.. ”

मेहरच्या वाक्यासरशी त्या इसमाने मान डोलावली आणि तो बाहेर निघून गेला. हुजऱ्या आत आला. त्याने बोलायला सुरुवात केली.

“हुजूर, तुमास्नी बाजी सरकारांनी परत विजापूरला बोलीवलं हाय.. तातडीनं यायला सांगिटलंय..”

“आरं पर..”

मार्तंड आश्चर्याने अस्पष्टपणे म्हणाला. अचानकपणे मिळालेल्या परतीच्या बाजींच्या आदेशाने त्याला खूप नवल वाटलं. त्याने मेहरकडे पाहिलं. तिचे पाण्याने डबडबलेले डोळे त्याच्या नजरेतून सुटले नाहीत. त्याचाही जीव कासावीस झाला. इतके दिवस मेहरने त्याची घेतलेली काळजी, आपुलकीने केलेलं आदरातिथ्य, तिच्या नजरेतलं त्याच्यासाठी असलेलं प्रेम त्याला आठवू लागलं. तिला सोडून जाणं त्याच्याही जीवावर आलं होतं पण सरकारांचा हुकूम ऐकायला हवाच ना! त्याने हुजऱ्याला जायला सांगितलं. हुजऱ्या बाहेर निघून गेला. मार्तंड मेहरकडे पाहत म्हणाला,

“मेहरबाय, आमास्नी तातडीनं निघाय पायजे. आमच्या साथीदारास्नी बी कळवाय पायजेल. सरकारांचा हुकूम हाय. आसंबी कदी ना कदी जायला तर लागणारच हुतं. कशापाई डोळ्यात पाणी आनतासा?”

मेहरच्या डोळ्यातल्या आसवांनी पापण्याचा उंबरठा कधीच ओलांडला होता. तिनं गालावर आलेले डोळ्यातल्या पाण्याचे ओघळ आपल्या ओढणीने पुसले आणि उसनं हसू ओठांवर आणत म्हणाली.

“हुजूर, आप अपना खाना खत्म किजीये. हम आपके साथीदारोको भी ये खबर दे देंगे और आपकी सफर का पूरा इंतजाम भी कर देते है.. आप बिलकुल भी फिक्र मत किजिये..”

मार्तंडने जावं असं तिला अजिबात वाटत नव्हतं. आणि तिला सोडून जाणं मार्तंडच्याही जीवावर आलं होतं. त्याचं जेवण झाल्यावरही मेहर तिथेच घुटमळत होती. तिच्या मनाची अस्वस्थता मार्तंडला जाणवत होती.

“काय जालं मेहरबाय? काय बोलायचं हाय काय?”

मार्तंडने प्रश्न केला. मेहर अडखळत म्हणाली.

“हुजूर, एक दरख्वास्त थी, आज की रात आप रंगमहल में ठहर जाईये ना. आपके साथ चंद लम्हे बिताने की तमन्ना रखते है.. पता नही फिर कब मुलाकात हो? शायद वही यादगार पल हमारे जिने का सहारा बने?”

तिच्या बोलण्याने मार्तंडला गलबलून आलं. तिचा शब्द, तिची इच्छा मोडून त्याला जाऊ वाटत नव्हतं. खरंतर निरोप वाईटच आणि त्यात जर आपल्या जिवलग माणसाला द्यायचा असेल तर त्या दुःखाची कल्पनाच करता येणार नाही. त्याने मेहरचं म्हणणं ऐकलं आणि पुढच्या प्रवासाची सगळी आकडेमोड करून ती एक रात्र रंगमहालात मुक्काम करण्यास तयार झाला.

“हम आते है हुजूर, आप आराम फर्माईये.. हम आपके लिए शरबत लेके आते है..”

असं म्हणत मेहर लगबगीने तिथून बाहेर पडली. तिने नोकरांकरवी छावणीत असलेल्या मार्तंडच्या साथीदारांना उद्या परत विजापूर दरबारी निघण्याचा मार्तंडचा निरोप पोहचवला. मार्तंड आणि त्याच्या साथीदारांच्या सफरीचा पूर्ण इंतजाम केला. मुदपाकखान्यात जाऊन तिथल्या जेवण बनवणाऱ्या आचाऱ्यांना मार्तंडच्या सकाळच्या न्याहारी आणि सोबत घेऊन जाण्यासाठी शिदोरीच्या पदार्थ बनवण्याची सूचना देऊन आली.

“का परत बोलीवलं आसल? काय डाव आसल? काय बी कळना..”

मार्तंड विचारमग्न झाला. आपल्या कक्षेत येरझऱ्या घालू लागला. इतक्यात मेहर शरबत घेऊन तिथे आली. तिला मार्तंड कसल्या तरी चिंतेत गढलेला दिसला. चांदीच्या प्याल्यातले सरबत त्याच्या समोर धरत ती म्हणाली.,

“हुजूर, किन खयालोंमे डुबे हैं? क्या बात है हुजूर.. आपके चेहरे पर ये फिक्र कैसी?”

“काय नाय मेहरबाय, उद्या लय येरवाळीच निगावं लागल नव्हं.. त्योच इचार करत हुतो.”

तिच्या हातातून सरबताचा प्याला घेत मार्तंडने उत्तर दिलं.

“आप बिल्कुल भी फिक्र मत किजिये हुजूर, हमने आपके सफर का पूरा इंतजाम कर दिया है..”

मेहर किंचित हसून म्हणाली. सरबताचे घोट घेत मेहरकडे त्याने एक कटाक्ष टाकला. तिचे डोळे सारखे झरत होते. ती मुसमूसत होती. रडून रडून लालसर झालेले तिचे डोळे पाहून मार्तंडचा जीव कळवळला. रिकामा केलेला सरबताचा प्याला तिच्या हातात देत तो म्हणाला,

“शुक्रिया मेहरबाय.. तुमी आमची जी खातीरदारी केली. पाहुणचार केल्यात.. आमी कदी बी नाय इसरायचो. चला जरा येळ हाय तर तुमच्या बागेत जाऊन येऊ. तेवढंच पाय मोकळं व्हत्याल..”

मेहरने मान डोलावली आणि ते दोघेही महालाच्या बाहेर आले. महालाच्या प्रवेशद्वारापाशी सैनिक उभे होतेच. ते दोघे बागेजवळ आले. विविध फुलांनी बाग सजली होती. रातराणी, जाईजुईचा सुगंध दरवळत होता. बागेच्या मधोमध एक छोटं पाण्याचं तळं होतं. तळ्यात फुललेली कमळं चांदण्यात अजूनच खास दिसत होती. थंडीचे दिवस असल्याने हवेत थोडा गारठा जाणवत होता. आकाशात टिपूर चांदणं पडलं होतं. चंद्राचं प्रतिबिंब तळ्यातल्या पाण्यात पडलं होतं. फेरफटका मारून झाल्यावर मेहर बागेतल्या पायरीवर बसली. मार्तंडही तिच्या शेजारी येऊन बसला. आकाशातल्या चंद्राकडे पाहून मेहर म्हणाली,

“हुजूर, कितना खूबसूरत है ना वो चाँद? नीले नीले आसमान मे चमकते सितारों के साथ सैर कर रहा है.. कितना अजीब सफर है ना..”

पर या चंद्रापरीस खूबसूरत नाय. ह्यो चंद्रावानी मुखडा कुटं बी घावायचा न्हाय. तुमी लई देखन्या हायसा बगा मेहरबाय..”

तिच्याकडे पाहत मार्तंड म्हणाला. पहिल्यांदाच मार्तंड तिच्यासाठी तिच्या सौंदर्यासाठी कौतुकाचे दोन शब्द बोलला होता. लाजेची गाली तिच्या चेहऱ्यावर पसरली. त्याच्या त्या सच्च्या मनातून आलेल्या त्या कौतुकाने ती मोहरली.

पुढे काय होतं? पाहूया पुढील भागात..

क्रमशः
©निशा थोरे (अनुप्रिया)



🎭 Series Post

View all