मंतरलेले अंतर (भाग 9)

एक हलकी फुलकी प्रेमकथा
मंतरलेले अंतर भाग-९

बाबांना घरी आणले. बाबांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली होती. ते आता घरातल्या घरात फिरू शकत होते. मयूरीचा वेळ आता बुटीक, बाबांची सेवा यातच जात होता. जाणीवपूर्वक तिने वाचनालयात जाणे बंद केले होते.

कायम उत्साहाचा झरा असणारी मयूरी सुकलेली होती. अबोल झाली होती. गप्प गप्प होती. मयूरीतला हा बदल आई-बाबांन जाणवत होता घरातला आनंदच हरवला होता.

बाबांना मनापासुन या गोष्टीचे मनापासून वाईट वाटत होते. समीर खूप चांगला होता एक उच्चशिक्षीत होता. सभ्य होता मयूरीच्या बाबांना श्रीमंत जावाईच पाहिजे अशी काही अट नव्हती.

तो स्वजातीयच हवा अशीही अपेक्षा नव्हती. परंतु समीरचा भूतकाळ काय आहे, आई -वडील कोण आहेत याचीही माहिती नसणे त्यांना खटकत होते.
मयुरी च्या आईची अवस्था ही खूप

वेगळी नव्हती. समीर मित्र म्हणून चांगला होता परंतु त्याच्यासोबत आयुष्य काढायचे ही कल्पना सहन होण्यासारखी नव्हती.

समीरला आज कोणाचा आधार नाही मग अशी व्यक्ती आपल्या कुटुंबाचा आधार कसा बनणार? त्याला समाज काय म्हणेन या विचारांनी मयुरीच्या आईचे चित्त थार्‍यावर नसे.

या घटनेला जवळपास महिना उलटला होता. मयुरी आणि समीर एकमेकांसोबत एकदाही बोलले नव्हते. पण दोघांचेही आयुष्य वाळवंटा सारखे झाले होते. मयुरी ची तब्येत खराब झाली होती. तिच्या पाणीदार सतेज बोलक्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार झाली होती. नजरेत उदासीनता आली होती. अशा निस्तेज मयुरीला पाहिले की आई बाबांच्या पोटात गोळा येत होता.


त्या रात्री जेवण झाल्यावर मयुरी लगेच तिच्या खोलीत झोपायला गेली. आई बाबा अंगणात झोपाळ्यावर बसले होते. मयुरी ची ही अवस्था पाहून दोघांनी एक निर्णय घेतला.


त्यांनी गुरुजींना कॉल करून दोन दिवसानंतर घरामध्ये सत्यनारायण पूजा ठेवली. त्यानिमित्ताने घरावर आलेली मरगळ दूर होणार होती. घरातले वातावरण बदलणार होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रमंडळीं नातलग यांच्या समीर,मयुरीबाबतचा निर्णय जाहीर करता येणार होता.

पूजा मुळे घरात उत्साहाचे वातावरण तयार झाले. सामानाची यादी स्वयंपाकी ठरवणे, निमंत्रणे या धावपळीत दोन दिवस गेले. पूजेच्या दिवशी मयुरी च्या आईने मयुरीला एक सुंदर साडी दिली आणि तयार होण्यास सांगितले.


आई बाबा जोडीने पूजेसाठी बसले. काही नातलग मित्रमंडळी पूजेसाठी आलेली होती. सर्वजण हास्यविनोदात रंगले होते.


तेवढ्यात साडी नेसून मयुरी बाहेर आली. गडद जांभळ्या रंगाची, लाल काठ असलेली साडी मयुरी वर खुलून दिसत होती. हातात बांगड्या, गळ्यात नाजूकसा पांढरा खड्यांचा हार शोभून दिसत होता. आज खूप दिवसानंतर मयुरी छान तयार झाली होती. केसांचा मानेवर रुळणारा अंबाडा. त्यावर मोगऱ्याचा मळलेला गजरा, कानात मोत्याची झुमके, सगळे काही आखीव रेखीव. मयुरीचे सौंदर्य खुलून दिसत होते , पण डोळ्यात उदासी होती. यांत्रिकपणे ती सर्वांशी बोलत होती. तिचे डोळे मात्र कोणालातरी शोधत होते. पूजा संपली आरतीला सुरुवात झाली तसा मयुरीचा हिरमोड झाला.


ती समीर ची वाट बघत होती. बाबांनी त्याला आमंत्रण दिले असेल का? कसा आला नाही तो? हा विचार तिच्या डोक्यात चालू असताना समीर आत आला. आत गेलेले गाल, वाढलेली दाढी, त्यामुळे समीर कसा तरीच दिसत होता. त्याचीही अवस्था पाहून मयुरीच्या डोळ्यात पाणी,आले तिने निग्रहाने ते थोपवले आणि स्वयंपाक घरात निघून गेली.

मयुरीच्या बाबांनी सर्वांना उद्देशून एक घोषणा केली त्यांनी सांगितले की ते मयुरी आणि समीर च्या लग्नाची तारीख काढणार आहेत आणि त्यांनी या दोघांचा साखरपुडा ठरवला आहे . मयुरी ने समीरने ते ऐकले मात्र त्यांच्या आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता.


बाबांनी समीरला हात धरून त्याला पूजे समोर आणले आईने मयुरीला आवाज दिला तशी धावतच मयुरी बाहेर आली आणि बाबांना बीलगली. अचानक मिळालेल्या या बातमीमुळे समीर गोंधळून गेला होता. आनंद कसा व्यक्त करावा हेच त्याला कळत नव्हते. तेवढ्यात मयुरीच्या आईने अंगठ्या आणल्या आणि साखरपुडा संपन्न झाला.


गुरुजींनी फेब्रुवारी महिन्यातील मुहूर्त लग्नासाठी उत्तम असल्याचे सांगितले. लग्नाचा मुहूर्त ठरला. साखरपुडा ही पार पडला पण बाबांनी एक अट ठेवली होती की, लग्नानंतर समीरने मयुरीला त्याच्या कुटुंबासहित, घरा सहित स्वीकारावे.

समीर साठी हा धक्का न सावरता येण्यासारखा होता. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन या म्हणीप्रमाणे त्याची अवस्था झाली होती.

बाप्पाने त्याची झोळी आज भरून दिली होती एवढी वर्षें जी गोष्ट मिळत नव्हती, जे सुख त्याने अनुभवले नव्हते ते सगळे आज स्वतः होऊन त्याच्याकडे आले होते.
विधिवत समीर मयुरी चे लग्न पार पडले. त्यांच्यामध्ये असणाऱ्या अंतराची जागा आता सांधली गेली होती. समीरला कुटुंब मिळाले आणि मयुरीच्या कुटुंबातील एक सदस्य वाढला. दोघांचा संसार खूप सुखाचा सुरू होता. सगळे कसे दृष्ट लागण्यासारखे. त्यांच्या या संसाराला दोन फुले उमलली आरव आणि रेवा.


दरम्यान या चार-पाच वर्षांच्या कालावधीमध्ये समीरने नोकरी सोडून स्वतःची फोन सुरू केली. त्यातही त्याला जोरदार यश मिळाले मयुरीने ही तिच्या व्यवसायात चांगला जब बसवला होता. समीरला तर कुटुंब मिळालेच होते परंतु तो ज्या अनाथालयात लहानाचा मोठा झाला होता त्या अनाथालयातील मुलांना देखील कुटुंब मिळाले होते.


आजी आजोबा, समीर दादा, मयुरी ताई आणि आरव, रेवा नियमितपणे अनाथालयात जात असत. मुलांची काळजी घेत.


पण सर्वांनीच ओढ असे ती दिवाळीची. दिवाळीला मात्र अनाथालयातील सर्व मुले तीन चार दिवसांसाठी समीरच्या घरी येत मुलांनाही कुटुंबात घरी गेल्याचे समाधान मिळे आणि समीर मयुरीलाही घराचे गोकुळ झाल्यासारखे वाटे..फराळ फटाके आकाश कंदील किल्ला नवीन कपडे मस्ती सगळे काही उत्साहात साजरे होई.


पण ही दिवाळी होईल का अशी साजरी? समीरला येता येऊ शकेन का भारतात? हाच विचार मयुरी करत होती कारण दिवाळी फक्त दोन महिन्यांवर आली होती त्यामुळेच आज मयुरीला समीरची प्रकर्षाने आठवण येत होती. विरहाचे हे क्षण जरी प्रेम वाढविणारे असले तरीही आता ते सहन होत नव्हते.

तेवढ्यात मयुरीचा मोबाईल वाजला तिने पटकन कॉल घेतला समीरच्या मोबाईल वरून कॉल होता. समीर चे तिकीट कन्फर्म झाल्याचे सांगण्याकरिता कॉल असेल असे तिला वाटले "हॅलो.. हा...काय कधी? " म्हणतच तिच्या हातून मोबाईल खाली पडला.......


काय झाले असेल समिरला????


पाहूया पुढच्या भागात....


क्रमश :

गीतांजली सचिन.

🎭 Series Post

View all