मंतरलेले अंतर (भाग 5)

एक हलकी फुलकी प्रेमकथा
मंतरलेले अंतर

भाग 5:

खोलीत आल्यानंतर मयुरीने हातातील पुस्तक पाहिले. आणि तिचा राग आणखीच वाढला , ' अरे देवा त्या बावळट मुलाने परत गोंधळ घातला . मूर्ख कुठचा .... मला या इकॉनॉमिक्सच्या पुस्तकाचे काय करायचे आहे? दोन्ही पुस्तके उचलली त्याने पण देताना मात्र त्या वेंधळ्या ने माझे पुस्तक घेतले आणि त्याचे पुस्तक मला दिले . शी.. काय करू आता मी? फक्त रेगे काकांमुळे वाचला तो. नाहीतर चांगला इंगा दाखवला असता त्याला...' मनातल्या मनात बडबड सुरू होती. पण तिच्या आवडत्या शिऱ्याचा वास आला आणि तिचा राग दूर पळाला.

आई हळूच शिऱ्याची वाटी घेऊन खोलीत आली. मयुरीने झटकन ती वाटी आईच्या हातातून घेतली आणि म्हणाली , " जगातली नंबर वन आई, तुला चांगलेच माहित आहे की तुझ्या हातचा शिरा म्हणजे माझा जीव की प्राण! आणि हा खाताच मी तुला तू विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार. " असे म्हणत मयुरी शिर्‍याचा घास खाल्ला आणि म्हणाली , " मासाहेब, आता आपण आम्हास काय जाब विचारणार आहात याची आम्हास कल्पना आहे, त्यामुळे तुमचा अधिक वेळ न घेता आम्ही घडलेला प्रसंग आपणास कथन करतो.'"

" गप गं, आली मोठी राजकुमारी... आज काय उद्योग करून आली आहेस? " आईने मयुरीला दटावले.

मयुरीने वाचनालयातील किस्सा सांगितला. पुस्तकांची बदल झालेली सांगितली. परत तो मुलगा भेटल्यानंतर त्याला चांगले ऐकवणार असल्याचे तिने आईला सांगितले.

सरोजला आपल्या लेकीचा स्वभाव माहित असल्यामुळे ' देवा रक्षण कर रे त्या मुलाचे.' असे म्हणत तिने खोलीतून काढता पाय घेतला.

मयुरीला आज बऱ्याच प्रतीक्षेनंतर तिच्या आवडीची
'काटा रुते कुणाला ' कादंबरी मिळाली होती. परंतु त्या मुलाच्या चुकीमुळे आणखी एक दिवस प्रतीक्षा करावी लागणार होती. त्यामुळे रात्री काही केल्या तिला झोप येत नव्हती.

समीरची अवस्था देखील फारशी वेगळी नव्हती. पण कारण वेगळे होते. गुलाबी पंजाबी ड्रेस मधील , लांब केसांची सुंदर मुलगी त्याच्या डोळ्यासमोरून जायलाच तयार नव्हती. डोळे मिटले तरी समोर तीच ! आजवर इतकी अस्वस्थता त्याने कधीच अनुभवली नव्हती .

अभ्यासू, हुशार,समंजस ,आणि सभ्य असल्यामुळे बऱ्याच मुली समीर बोलत असत. तोही सर्वांशी मोकळेपणाने बोलत असे . वह्या पुस्तकांची देवाण-घेवाण , सोबत अभ्यास, गप्पा टप्पा सर्व काही त्याच्या नित्य परिचयाचे होते . पण आज मात्र काहीतरी विपरीतच घडत होते.

हृदयात चाललेली धडधड काही केल्या कमीच होत नव्हती. तिच्या नुसत्या विचारानेच समीरला या गुलाबी थंडी दरदरून घाम फुटला होता. तिच्या केसांची उडणारी बट त्याच्या काळजाचा ठोका चुकून गेली होती.

त्याच्याकडे रागाने बघणाऱ्या त्या मुलीच्या डोळ्यांनी समीरला घायाळ केले होते. तिचा मधाळ पण आत्मविश्वास पूर्ण आवाज अजूनही त्याच्या कानात रुंजी घालत होता.


' आपण असा भलताच विचार करतो आहोत.' हे लक्षात येऊन देखील समीरला तिच्या शिवाय दुसरे काहीच सुचत नव्हते. त्याचे आज ना जेवणात लक्ष होते ना अभ्यासात!

रोज आपल्या सोबत खेळणारा , गोष्टी सांगणारा , लाड करणारा समीर दादा आज गप्प गप्प आहे , हे अनाथालयातील छोट्या दोस्तांच्या लक्षात आले होते .

" काय झाले आहे रे दादा तुला आज? " असे छोट्या अनिकेत ने विचारलेच.
तेव्हा, " काही नाही जरासं डोकं दुखते आहे. " असे म्हणत समीरने तेथून पळ काढला.

पण त्याचे मन मात्र वाचनालयातून बाहेर निघायला तयार होत नव्हते. त्याने अभ्यासात मन रमवीण्याचा प्रयत्न सुरू केला. पण छे!! मन त्याचे काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हते .

बहिणाबाईंच्या,

" मन वढाय वढाय
उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येत पिकावर "

या कवितेसारखी मनाची अवस्था झाली होती. त्यातही आज पुस्तकांची ही बदल झाली होती. त्याच्या अभ्यासाचे पुस्तक तिच्याकडे आणि तिचे ' काटा रुते कुणाला ' समीर कडे!

त्या पुस्तकाकडे बघताना समीरला प्रकर्षाने जाणवले कि, त्यालाही कुठेतरी काटा रुतत होता. छोटीशी जखम होऊ पाहत होती. हवीहवीशी जखम !

हे काही चुकीचे घडते आहे याची जाणीव समीरला झाली .
त्याने कुठेतरी वाचलेला ,
" चुकणे ही चूक नाही तर ती चूक पुन्हा पुन्हा करणे ही महाचूक आहे. "

हा सुविचार त्याला आठवला. आणि चुकूनही मनामध्ये काही चुकीचा विचार येऊ द्यायचा नाही असा ठाम निश्चय केला.

उद्या कामाला जाण्याच्या आधी वाचनालयात जाऊ पण बदल झालेले पुस्तक घेऊन येऊ. असा विचार करून समीर निवांतपणे झोपला.


काय होईल समीरच्या आयुष्यात? दोघांचे सूर जुळतील की विस्कटतील ? पाहूया पुढच्या भागात....

क्रमश :.....

गीतांजली सचिन

🎭 Series Post

View all