मानसिक घटस्फोट भाग दोन

शरीरापेक्षा मनाने घेतलेल्या घटस्फोटाची कहाणी.
दुसऱ्या दिवशी तिने तिच्या आईला फोन लावला.आईच्या कानावर ही गोष्ट घातली.आईने तिला चार समजुतीच्या गोष्टी सांगून फोन ठेवून दिला.
नऊ महिने पूर्ण झाले आणि विभाने एका गोंडस मुलाला जन्म दिला.निशांतच्या येण्याने घरात आनंदी आनंद झाला.सासूबाईंच्या अपेक्षाप्रमाणे नॉर्मल डिलिव्हरी झाली होती.नऊ महिने सासूबाईंनी माहेरपणाला जाऊ दिलं नव्हतं.विभाला वाटलं कमीत कमी डिलिव्हरी झाल्यावर तरी सासूबाई माहेरी जायला सांगतील.पण सासूबाई विभाला हॉस्पिटल मधून परत सासरी घेऊन गेल्या.किती वाजता उठायचं,किती वाजता झोपायचं,बाळाला कसं घ्यायचं,दूध किती पाजायचं,कसं पाजायचं सगळ्या गोष्टी सासुबाईंच्या देखरेखी खाली व्हायला लागल्या.विभाची कुठल्या गोष्टीत ना नव्हती.पण कमीत कमी बाळाला तरी मनोसोक्त घ्यायलाभेटावं एवढी माफक अपेक्षा होती तिची.पण सासुबाई फक्त दूध पिण्यापुरतं निशांतला तिच्याकडे द्यायचा बाकी वेळी स्वतःच सगळं करायच्या.विभाला वाटायचं आपण आपल्या हाताने निशांतला न्हाउमखु घालावं.गंध काजळ करावं.पण सासुबाई कधीही निशांतला तिच्या हातात देत नव्हत्या.दिवसभर निशांतला घेऊन बसणाऱ्या सासुबाई रात्री अपरात्री जेव्हा निशांत उठायचा आणि रडायचा त्यावेळी मात्र विभा कडे देवुन मोकळ्या व्हायच्या.रात्रभर जागायची जिम्मेदारी मात्र विभाची असायची.पुढे निशांत दोन वर्षाचा झाला आणि विभाला परत दिवस गेले.यावेळी मुलगी झाली.घरात परत आनंदी आनंद झाला.यावेळी ही विभाला कामाला लावून सासूबाई दोन्ही मुलांना घेऊन बसायच्या.आणि विभाचं काम झालं की तिच्याकडे सोपवून मोकळ्या व्हायच्या.वर्षा मागून वर्ष निघून गेली.मुले आता मोठी होऊ लागली.पण अजूनही मुलांच्या बाबतीतले कुठलेच निर्णय घेण्याचा अधिकार विभाला नव्हता.मुले कुठल्या शाळेत जाणार इथपासून ते डब्याला काय द्यायचं इथपर्यंत नवऱ्याचे आणि सासूचे होते.हळूहळू मुलंही समजती व्हायला लागली.आपल्या आईचं घरातील स्थान त्यांना समजलं.त्यांनाही आईच्या कुठल्याही गोष्टीने फरक पडत नव्हता.दोन्हीही मुलं विभाची कुठलीच गोष्ट ऐकत नव्हते.एक दिवस अचानक सासुबाई चक्कर येऊन पडल्या.हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं.डॉक्टरांनी त्यांना अर्धांगवायू झाल्याचे सांगितलं.त्यावेळी निशांत बारावीला आणि नेहा नववीला शिकत होती.सासूबाईंना कुठल्याच प्रकारची हालचाल करता येत नव्हती.सासूबाईंची पूर्ण जबाबदारी विभाने स्वतःच्या अंगावर घेतली.ती अगदी मन लावून सासूबाईंचं सगळं करायची.त्यांना पेज करून भरवायची.कपडे बदलून द्यायची. केसांची वेणी घालून द्यायची.सासूबाईंना बोलता यायचं नाही.पण तरीही त्या विभागाकडे बघून डोळ्यातून पाणी गाळायच्या.कदाचित त्यांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होत असावा.तब्बल सहा वर्ष विभाने मन लावून सासूबाईंची सेवा केली.एक दिवस सासूबाईंची तब्येत खूपच बिघडली आणि त्यातच त्यांचं निधन झाल.सासुबाई गेल्या तेव्हा अंगदराव आणि मुले खूप रडली.पण विभाच्या डोळ्यातून पाण्याचा थेंबहीआला नाही.शांत आणि निश्चलपणे तिने सर्व सोपस्कार उरकण्यासाठी मदत केली.आल्या गेलेल्या प्रत्येकाला तिच्या शांत बसण्याचं आश्चर्य वाटत होतं.
सासुबाईंना जाऊन महिना होत आला.एक दिवस विभाची मैत्रीण अनुराधा तिलाा भेटायला आली.चाळिशीत असणाऱ्या विभाचा अवतार बघून तिला खूप वाईट वाटल.खोल गेलेले डोळे डोळ्याखाली मोठे मोठे काळी वर्तुळे.विरळ झालेले आणि अर्ध्यापेक्षा जास्त पांढरे झालेले केस.निस्तेज चेहरा बघून तिला गालबलून आलं.
"काय ग विभा, काय अवस्था करून घेतलीस स्वतःची?"
मैत्रिणीच्या आपुलकीच्या बोलण्याने विभाचे डोळे भरून आले.आणि तिने अनुराधाला तिची कर्मकहानी सांगितली.
त्यावर अनुराधा बोलली,
"अगं एवढंच ना?बघ आता मुलंही मोठी झाली आहेत.सासुबाईंचही तू सगळं व्यवस्थित केलं.त्याही बिचाऱ्या गेल्या आता.आता जरा बाहेर पड.तुम्ही दोघे एकमेकांसाठी वेळ द्या"
"म्हणजे काय करायचं?" विभा
"काय करायचं म्हणजे?तुला आठवते का तू आणि भाऊजी शेवटचं कधी फिरायला गेलात." अनुराधा
विभाने आठवुन बघितलं, खरंच ती आणि अंगदराव कधीही फिरायला गेले नव्हते.
लग्न झाल्यावर महिन्याभरात मित्राच्या घरी पार्टी आहे असं अंगदरावांनी विभाला सांगितलं.
त्यादिवशी संध्याकाळी ती छानशी तयार झाली.अंगदरावांची आवडती गुलाबी कलरची साडी नेसली.हलकासा मेकअप केला.मुळातच सुंदर असणारी विभा तेवढ्या तयार होण्याने ही खूपच सुंदर दिसू लागली.तिला तयार झालेलं बघून अंगद रावही खूप खुश झाले.दोघेजण पार्टीला जायला निघालेच तेवढ्यात सासूबाई आडव्या आल्या.
"कुठ निघालात तिन्ही सांजाला? काही सांगून जायची पद्धतआहे की नाही"
"आई, मित्राच्या घरी पार्टी आहे म्हणून विभाला घेऊन जातोय." अंगदरावांनी सांगितलं.
"म्हणजे म्हाताऱ्या आईला घरात टाकून राजा राणीची जोडी निघाली मस्त फिरायला."
"अग आई फिरायला असं नाही मित्राने आग्रह केला वहिनीला घेऊन ये म्हणून जातोय दोघ."
"बाई,बाई,बाई महिन्याभरातच काय पट्टी पढवली बायकोने की आईला उलट उत्तर द्यायला लागला."सासुबाई तणतणतच आत निघून गेल्या.
विभाला तर काय बोलावं काही सुचत नव्हतं.
विभा आणि अंगदराव जातील का फिरायला?अंगदराव आईचा गैरसमज दूर करतील का?बघूया पुढच्या भागात.
क्रमशः

🎭 Series Post

View all