Login

मनोभूमीतले युद्ध भाग-८(अंतिम)

आपल्याच मनोभूमीत खऱ्या नि खोट्याचे युद्ध छेडल्यावर कोण जिंकेल? ती व्यक्ती का विचार? हेच सांगणारी ही कथा!
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग,जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: मनोभूमीतले युद्ध भाग-८(अंतिम)

थोड्या वेळाने डॉक्टर तिथे आले आणि त्यांनी विपुल शुद्धीवर आला आहे असे सांगितले.

शुभा त्याला भेटायला जाऊ की नको हा विचार करत होती तसेच थोड्या वेळापूर्वी तिने जे काही ऐकले होते त्यामुळे आता काय करावे हे तिला समजत नव्हते.

निखिल त्याला भेटायला गेला पण विपुलची नजर मात्र आपल्या बायकोला शोधत होती.

" मॅम, तुम्हाला सरांनी बोलावले आहे." निखिल शुभाला म्हणाला.

मनामध्ये पुन्हा शुभाला थोडीशी भीतीच वाटत होती. कारण जे तिने ऐकलं होतं ते खूपच भयानक होते.

ती त्याला जिथे ऍडमिट केलेले होते त्या खोलीमध्ये गेली आणि त्याच्या बाजूला असलेला स्टूल ओढून बसली.

"आता तुम्हाला कसं वाटतंय ? काही त्रास होतोय का?"  तिने दबकतच त्याला विचारलं.

" नाही, आता मला ठीक वाटत आहे." तो तिच्याकडे बघून नंतर समोर नजर करत म्हणाला.

" ठीक आहे. मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं."  थोडी हिंमत करून ती बोलली.

" हा बोल. तुला काय बोलायचं आहे?"  बोलताना त्याचा स्वर लहान होता.

" मला तुमच्यापासून घटस्फोट हवा आहे." तिने असे म्हणताच त्याने तिच्याकडे विस्फारलेल्या नजरेने बघितलं.

"शुभा, तुला कळतंय तू काय बोलतेस ते? "

" हो, मला कळत आहे मी काय बोलत आहे ते." ती न डगमगता म्हणाली.

" असं आहे तर ! म्हणजे माझा तुझ्यावरती जो संशय होता तो खरा आहे. तुझे आणि त्या रितेशचे बाहेर काहीतरी चालू आहे. बरोबर ना पुन्हा?"  त्याचा राग उफाळून आलेला होता.

"प्रत्येक वेळी घटस्फोटाचं कारण हे विवाहबाह्य संबंधचं असते असे नाहीये."  ती त्याच्याकडे बघून ठामपणे म्हणाली.

" मग काय कारण आहे ? मला तर आणखी कोणते दुसरे कारण दिसत नाहीये." तो आवाजात जरब आणत म्हणाला.

" हे असे तुमचे वागणे पुढे पण चालू राहणार आणि मी प्रत्येक वेळी माझ्या चारित्र्यावर कोणालाही बोट ठेवू देणार नाही. त्यामुळे आत्ताच आपण वेगळे झालो तर बरे होईल." ती त्याच्या डोळ्यांत डोळे घालून म्हणाली.

"ठीक आहे. मी तुला घटस्फोट देतो.किती पोटगी हवी आहे ते सांग." तो निर्विकारपणे म्हणाला.

' माझ्या आईसारखे पैशासाठीचं शुभानेही लग्न केलेले आहे.' तो मनातल्या मनात म्हणाला.

" मला दुसरे काही नको पण माझ्या पोटामध्ये वाढणाऱ्या बाळावरती तुमचा काहीच हक्क राहणार नाही. बस फक्त मला एवढेच हवे आहे. तुमचे नाव त्याला लागणार नाही आणि तुमचा त्याच्याशी इथून पुढे कोणताही संबंध राहणार नाही."

बाळाबद्दल ऐकून विपुलला आनंद झाला पण त्याच्यापुढे जे आपली बायको बोलली ते ऐकल्यावर त्याला अजून एक आश्चर्याचा धक्का बसला.

" म्हणजे तू गरोदर आहेस?" त्याने आनंदाने विचारले.

"हो बरोबर, पण हे मूल फक्त माझे आहे. कारण पुढे तुम्ही हे बाळ कोणाचे आहे असा प्रश्न विचारण्याच्या आधी मला तुमच्यापासून वेगळे राहायचे आहे आणि तुमची सावलीही माझ्या बाळावर पडू द्यायची नाहीये." ती रागात म्हणाली.

" एकट्या मुलाला सांभाळणे सोपी गोष्ट नाहीये."  तो हातातली चालू सलाईन काढून तशीच बाजूला फेकून म्हणाला.

" ज्या मुलाचे वडील स्वतः मानसिक आजारातून बाहेर पडू शकत नाही आणि स्वतःला सावरू शकत नाहीत. त्या मुलाला ते कसे काय सांभाळू शकतात?"  तिने त्याच्यासमोर प्रश्न मांडला.

"तुझ्या पोटात वाढणारे बाळ जसे तुझे आहे ना तसेच ते माझे सुद्धा आहे. हे तू विसरू नकोस."  हातातून रक्त येत असतानाही त्याच्यावरती त्याने हात ठेवून ती वेदना सहन करून तिच्या पुढे येऊन तो तावातावाने म्हणाला.

" पण तुम्हाला तर थोड्यावेळापूर्वी असेच वाटत होते ना की तुमच्या बायकोचे बाहेर प्रेमसंबंध आहेत. कशावरून हे बाळ तुमचेच असू शकते? " तिने त्याला खडे बोल ऐकवत विचारले.

" शुभा ... " म्हणत त्याने संतापाने तिच्यावरती हात उगारला आणि नंतर हात मागे घेतला.

" तू तशी नाहीयेस मला माहिती आहे आणि तुझ्या पोटातील वाढणारे बाळही माझेच आहे." तो म्हणाला.

" कशावरून तुम्ही म्हणताय ते खरे आहे?"  तिने विचारले.

" कारण तू माझ्या व्यतिरिक्त फक्त तुझ्या घरच्यांशी
बोलतेस आणि तुझी एक मैत्रीण आहे फक्त तिच्याशी मेसेजद्वारे संपर्कात आहेस. फक्त आजच तू रितेशशी बोलत होती. मी सर्व तुझे मेसेजेस वाचलेले आहेत. त्यामुळे मला माहिती आहे. माझ्याकडे त्याचा पुरावाही आहे." तो ठामपणे सांगत होता.

"म्हणजे तुम्ही तुमच्या बायको वरती नजर ठेवत होता ? बरोबर तरीच मला वाटतं होतं की मी वाचायच्या आधीच नेहमी ते मेसेजेस वाचलेले का दिसतात. आता मला समजले की तुम्ही मला तुमच्या ऑफिसमध्ये कामही माझ्यावर नजर ठेवण्यासाठीच करायला सांगितले."  तिला त्याचा रागही येत होता आणि काय बोलावे हे न समजून ती बोलत होती.

" शुभा, मला माहिती आहे. माझी चूक झाली. तू मला सोडून जाऊ नकोस. मी तुला घटस्फोट नाही देऊ शकत. तुझ्याशिवाय मला आहेच कोण ?" तो तिच्या जवळ जात तिचा हात पकडून बोलला.

तिने त्याचा हात झटकला आणि ती बोलली, "माझ्या काही अटी आहेत त्या मान्य असतील तरच मी तुमच्या सोबत राहणार."

"तू जे म्हणशील ते सर्व मला मान्य आहे पण मला सोडून जाण्याचा निर्णय घेऊ नकोस." विपुल तिचा हात पकडून भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला.

"ठीक आहे."  असे म्हणून तिने नर्सला बोलावून त्याच्या हातातून येणारे रक्त थांबवण्यासाठी मलमपट्टी करण्यासाठी सांगितले.

तसेच त्याच हॉस्पिटलमध्ये एक प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ होते त्यांच्याकडे विपुलला घेऊन गेली.

विपुलला त्याच्या आजोबांनी वाढवले होते. कारण त्याच्या आईचे विवाहबाह्य संबंध समजल्यामुळे त्याच्या वडिलांनी नैराश्यात आत्महत्या केली होती. तसेच आजोबांचे निधन काही वर्षांपूर्वी झाल्याने तो एकटा पडला होता. त्यापासून त्याच्या मनामध्ये सर्व मुली या धोका देणाऱ्याच असतात असे वाटायचे आणि त्या मानसिक आघातामुळे त्याला "संशयात्मक/शंकेखोर व्यक्तिमत्त्व विकार"(पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर) हा रोग जडला होता.

ह्या मध्ये ती व्यक्ती कधीच कोणावरती पटकन विश्वास ठेवत नाही आणि मनातल्या मनातच ज्या गोष्टी झाल्या नसतील त्या झाल्या असतील असा ते ग्रह करतात. स्वतःच कल्पना करून असेच असेल म्हणून ते गैरसमज करून विचार करायला लागतात. कधी त्यांना पुरावे दाखवले तरी ते त्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि सतत संशय त्यांच्या मनात येत राहतो. जास्त कोणात ते मिसळत नाहीत आणि कधी कधी भयंकर राग येऊन समोरच्या व्यक्तीला इजासुद्धा ते पोहोचवू शकतात. आपल्या जवळच्या माणसांबद्दल खास करून जोडीदार आणि कुटुंब यांच्याबद्दल सतत त्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण होऊन ते अनेकदा त्यांचा पाठलाग करणे किंवा त्यांच्यावर नजर ठेवणे हेही काम करतात. रागात त्यांच्याकडून नको त्या चुका होत राहतात. हे सर्व निखिलने शुभाला थोड्या वेळापूर्वी सांगितले होते.

त्याला हा रोग आहे आणि तो त्याबद्दल उपचार घेत नाही हे सुद्धा निखिलने सांगितले म्हणूनच थोडे सुद्धा त्याच्या मनाविरुद्ध झाले की त्याला त्रास होतो. त्याचा उपचार होणे महत्त्वाचे होते.

त्याला सतत आईचे फोन यायचे पण त्याने आपल्या वडिलांच्या मृत्यूला आईच जबाबदार आहे म्हणून तिची माफी धुडकावून लावली होती.

जेव्हा शुभाला त्याच्या मानसिक आजाराबद्दल समजले तेव्हा तिला फसवले गेल्याची भावना मनामध्ये आली होती. हे सर्व तिच्यापासून लपवून ठेवल्याचा रागही आला.

एकदा  डॉक्टरांशी बोलून जर त्याचा आजार बरा होऊ शकतो तर ते प्रयत्न करायलाही ती तयार होती.

उपचार पूर्ण करणे आणि एक चांगले बाबा बनण्यासाठी प्रयत्न करणे ह्याच अटी शुभाने विपुलला घातल्या होत्या आणि तो तिच्यावरती प्रेम करत होता म्हणून त्याने त्या मान्य केल्या.

मानसोपचार तज्ज्ञांनी त्याला आधी त्याच्या मनातील गोष्टी जाणून घेतल्या. अतिविचार ह्याने तो स्वतःच असे बोलले किंवा केले असणार असे स्वतः ठरवायचा त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी ध्यान धारणा आणि त्याचे लक्ष विचलित होणार नाही ह्यासाठी प्रयत्न केले. तसेच कित्येक वर्ष मनातील साचलेले बाहेर काढण्यासाठी त्यांनी संभाषणाद्वारे ते मळभ दूर केले.

नीट झोपयेण्यासाठी आणि रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरुवातीला त्याला काही औषधे देण्यात आली नंतर ती बंदही केली गेली.

विपुल हा मनोविकाराने ग्रस्त होता. त्याला उपचाराची गरज होती. हे शुभाने जाणले आणि लगेच त्यावर उपाय हा उपचार आहे म्हणून त्याला त्यासाठी अट घालून तयार केले.

विपुलच्या मनोभूमीत भूतकाळामुळे विचारांचे युद्ध सतत सुरू असायचे. आजोबा आणि निखिल सोडून त्याने थोडा शुभावर विश्वास ठेवला पण समोर जे घडत होते त्या अर्ध्या सत्याला त्याने चुकीच्या पद्धतीने पूर्ण सत्य मानून मनातच अनेक चुकीच्या विचारांना थारा त्याच्या विकारामुळे द्यायला सुरुवात केली होती.

त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय शुभाने घेतला होता कारण व्यक्ती म्हणून तो वाईट नव्हता. त्याच्या बालमनावरील आघात त्याचे पडसाद त्याच्या मनावर खूप खोलवर उमटले होते.

हळू हळू त्याच्यात सुधारणा होत होती. त्यामुळे शुभाला बरे वाटत होते.

लवकरच आपल्या घरी आपले बाळ येणार म्हणून आपण फक्त शारीरिकरच नाही तर मानसिकरीत्याही स्वस्थ आणि सुदृढ असायला हवे हे त्याला पटले होते.

पुढेही हा विकार डोकावू नये म्हणून दोघांनी काळजी घेण्याचे ठरवले. मनोभूमीतले युद्ध हे शुभाच्या साथीने लढण्याचा निर्णय विपुलने घेतला होता.

मानसिक आरोग्य ठीक असणे ही काळाची गरज आहे. सोबतच त्या व्यक्तीला समजून घेणारी माणसे असतील तर नक्कीच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

बरेच जण समाज वेडे म्हणेल म्हणून डॉक्टरांकडे जायचे टाळतात पण स्वतःसाठी, सुदृढ भविष्यासाठी आणि आपल्या जवळच्या माणसांसाठी नक्कीच मानसिक आरोग्य हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यावर उपचार होणेही तेवढेच गरजेचे आहे.

समाप्त.

© विद्या कुंभार

कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा.

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५

🎭 Series Post

View all