प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
शीर्षक: मनोभूमीतले युद्ध भाग-५
गृहप्रवेश झाल्यावर दोघांना थोडा वेळ हॉलमध्ये बसण्यासाठी सांगितले. त्यानंतर काकींनी विपुलला त्यांना आणि शुभाला दुसऱ्या खोलीमध्ये रहावे लागेल म्हणून कोणती खोली आहे ते त्यांनी विचारून घेतले.
रात्री सोबतच सर्वांनी जेवण केले. नवीन घर आणि सर्वच नवीन असल्यामुळे शुभाला थोडेसे वेगळे वाटत होते.तसेच थोडी वडिलांबद्दलची काळजीही तिला लागून राहिली होती.
सत्यनारायणाची पूजा होईपर्यंत दोघांना एका खोलीत झोपता येणार नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे आधी तर त्याला या असल्या आपल्या बायकोपासून दूर करणाऱ्या रीतीभातींचा रागच आलेला होता पण ठीक आहे. आजनंतर उद्या ते एकत्र खोलीत असतील म्हणून त्याने मनाला समजावले.
निखिलसुद्धा तिथेच एका खोलीत थांबलेला होता. कारण पुन्हा काही काम सांगितलं तर घरातून त्याच्या घरात येई पर्यंत त्याच्या सरांना धीर नसायचा हे माहीत असल्याने तो कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर त्यासाठी तिथेच थांबलेला होता.
घरातील दररोजची साफसफाई आणि जेवणासाठी काही नोकर माणसे नीट चौकशी करूनच विपुलने आधीच ठेवलेली होती. त्यामुळे जास्त काही करण्याची गरज नाही हे काकींना समजून आले होते.
दुसऱ्या दिवशी पूजा असल्याने सर्व लवकर झोपण्यासाठी खोलीत गेले.
विपुलला मात्र आपले लग्न होणे हे पूर्ण न होणारे स्वप्नच वाटतं होते पण आता प्रत्यक्षात झाल्यामुळे त्याला आनंद झाला होता.
आज साखरपुड्यात तिच्या हातात अंगठी घालताना झालेला तिच्या कोमल हाताचा स्पर्श. होम आणि विधी करताना तिचे त्याच्या बाजूला असलेले अस्तित्व ह्यामुळे त्याला नवीन आणि वेगळीच भावना जाणवत होती. पुन्हा पुन्हा ते सारे क्षण आठवणींच्या रूपात त्याच्यासमोर तरळत होते.
जेवताना तिला भरवताना तिचे लाजणे आणि त्याला सुद्धा तिच्या हातातून एक घास खाताना त्याला छान वाटत होते आणि ही सुंदर अनुभूती आहे असे मनातच तो म्हणत होता.
शुभा आता त्याची बायको म्हणून त्याची कायमची हक्काची व्यक्ती झाली होती. ह्या विचाराने त्याला खूप छान वाटत होते. गालातल्या गालात तो हसत होता. त्यामुळे विपुलने शुभाला सर्व सुख देण्याचा प्रयत्न करायचा असा विचार करून तो रात्री झोपून गेला.
दुसऱ्या दिवशी लवकर उठून तो नेहमीप्रमाणे आपल्या जीममध्ये व्यायाम करण्यासाठी गेला. त्यानंतर बाहेर गडबड चालू होती आणि काम करणाऱ्या नोकरांचे आवाज त्याच्या कानी पडत होते. तेव्हा त्याच्या लक्षात आले की आज तर घरामध्ये सत्यनारायणाची पूजा आहे. काल सारखेच दोघांना सुद्धा देवासमोर जोडीने बसून पूजा करावी लागेल. त्या विचाराने पुन्हा त्याचे अंतरंग प्रफुल्लित झाले होते. कारण काल होम आणि सात फेरे आणि सप्तपदी वेळी शुभाने त्याच्या हाताला हात लावून सर्व विधी पार पडल्या होत्या.
सकाळपासून विपुलला त्याची बायको काही नजरेस पडली नव्हती. कारण बाहेर फक्त पूजेची तयारी चालू होती. त्यामुळे प्रत्येकाने आपला चहा-नाष्टा आपल्या खोलीत केलेला. एकदा तिला पाहण्यासाठी त्याने तिच्या खोलीत डोकावण्याचा असफल प्रयत्न केला. ती त्याला न दिसल्याने तो रागातच आपल्या खोलीत गेला.
पूजा करण्यासाठी एक भटजी आलेले होते. त्यांनी दोघांना पूजेसाठी बोलावले. विपुल तर लगेच पडत्या फळाची आज्ञा पाळायची म्हणून लगेच हजर झाला.
त्याच्या निमगोऱ्या रंगावर पांढरा शुभ्र रंगाचा सदरा आणि पायजमा उठून दिसत होता. पैंजणांची चाहूल लागताच आपोआप त्याची मान मागे वळली. गव्हाळ रंगाची शुभाने आंबा रंगाची पैठणी साडी त्यावर हिरव्या रंगाचा ब्लाऊज घालून छान साजशृंगार करून ती त्याच्याजवळ आली. तिचे गोजिरे रूप बघून त्याच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले.
ती बाजूला बसली तरी त्याने तिला बघणे सोडले नव्हते. ती बाजूला बसल्यावर पूजा करणाऱ्या भटजींनी त्याला दोन-तीन वेळा आवाज दिला पण त्याचे लक्ष नव्हते. शुभाने त्याला हलवून त्यांच्याकडे बघायला सांगितले तेव्हा कुठे विपुल समोर बघू लागला.
निखिल आणि काकी त्याचे भान हरपलेले पाहून गालात हसले.
पूजा थोडा वेळ सुरू होती. काकींनी पूजेच्या प्रसादासाठी स्वतः तयारी केलेली होती. थोड्या वेळाने पुरण पोळ्या, श्रीखंड, भजी आणि बऱ्याच पदार्थांचा देवाला नैवद्य दाखवल्यावर भटजींनी पूजा संपन्न झाल्याचे सांगितले.
दोघांनीही जोडीने भटजींच्या आणि काकींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. तिचे बाबा आणि काका सुद्धा पूजेसाठी उपस्थित होते.
थोड्या वेळाने सर्व एकत्रच जेवण करणार होते त्यामुळे त्याच्या आधी काही नोकर लादी पुसण्याचे काम करत होते.
आता पूजेच्या कार्यक्रमासाठीही त्याने फोटोग्राफरला बोलावले होते आणि खूप फोटो काढून झाल्यावर त्याचे मन भरले.
एवढे सगळे दागिने आणि जड साडी घालून शुभा थकलेली होती. त्यामुळे त्याने तिचा थकलेला चेहरा दिसताच तिला साधी साडी किंवा ड्रेस घालायला सांगितले.
जेवण झाल्यावरती थोड्या वेळाने बाहेर जाणार होते म्हणून तिने तेव्हा वजनाने हलकी असलेली साडी घालेन असे सांगितले.
जेवणासाठी एक नोकर त्यांना बोलवायला आलेला होता तेव्हा एका ठिकाणी थोडेसे पाणी राहिल्याने शुभा चालत असताना त्यावरून तिचा पाय घसरला.
"आई गं ss" करून घाबरून ती ओरडली.
ती खाली पडणारच होती की तेवढ्यात तिच्या हाताला त्याने पकडले आणि कमरेत हात घालून पडण्यापासून वाचवले.
"ठीक आहेस ?" त्याने विचारले.
ती हो म्हणून त्याचा हात सोडून बाजूला उभी राहिली.
विपुलने तिथे काम करणाऱ्या सर्व नोकरांना मोठा आवाज देऊन बोलवले. त्याच्या उच्च स्वरात आवाज दिल्याने सर्व घाबरले. तिथे कोण पुसत होते म्हणून त्याने त्या नोकराला समोर यायला सांगितले. तो समोर आल्यावर त्याने बोलायला सुरुवात केली.
" काय रे तुला काम नीट करायचं नाही का ? आता माझी बायको पडली असती आणि तिला लागले असते तर ? तुला कळत नाही का? " त्याला खूप राग येत होता त्यामुळे मोठ्या आवाजात आणि नोकराला पकडून तो बोलत होता.
त्या नोकराने त्याची हात जोडून माफी मागितली पण विपुलने त्याला हाताने बाहेरचा रस्ता दाखवत उद्यापासून इथे यायची गरज नाही असे सांगितले आणि सरळ कामावरून काढून टाकले.
त्याचा हा रुद्रावतार पाहून शुभा मात्र घाबरून गेली. बाजूलाच असलेल्या काकीचा हात तिने घट्ट पकडून धरला.
सर्वांनाच विपुलचे असे भडकणे अनपेक्षित होते. कारण तो कधी एवढ्या रागात त्यांच्यासमोर बोललेलाच नव्हता.
निखिलने त्याला हात पकडून त्याच्या खोलीमध्ये नेले. थोड्यावेळाने तो बाहेर आला तेव्हा मात्र तो शांत झालेला दिसत होता.
सर्वजण शांतपणे जेवण करत होते. शुभा मात्र कमीच जेवली होती. कारण मघाशी त्याचा पाहिलेला राग पाहून आता तिला त्याची भीती वाटत होती म्हणजे उद्या चुकून आपल्या कडूनही काही चूक झाली तर आपल्याला सुद्धा असा ओरडा मिळेल का असा सहज प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला.
विपुल सुद्धा सर्वांशी शांतपणे आणि हसून बोलत होता म्हणजे आता कोणी हाच का तो मघाशी रागावलेला विपुल होता का असे विचारल्यावर कोणीही नाहीच म्हंटले असते.
आजच्या दिवशी कुलदेवतेच्या दर्शनासाठी गावाला जाऊन लगेच घरी येणार होते. त्यासाठी सुद्धा जास्त वेळ नको जायला म्हणून शुभाच्या नवऱ्याने आधीच विमानाची तिकीटे काढून ठेवलेली होती.
शुभासोबत फक्त तिची काकी येणार होती. तिच्या वडिलांनी आणि काकांनी आधीच आम्ही येणार नाही म्हणून सांगितल्याने त्यांची तिकिटे काढली नव्हती. ते त्यांच्या घरी गेले.
कुलदेवतेचे दर्शन झाल्यावर काकी त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाल्या. तसेच दोन दिवसांनी शुभाला मांडव परतपाणीसाठी माहेरी पाठवण्याबद्दल सांगितले.
काकी सोडून जाणार म्हणून शुभाला थोडेसे वाईट वाटत होते. विपुल चांगला आहे आणि त्याला राग येण्यासारखं काही करू नकोस असे काकी समजावून घरी निघून गेल्या.
क्रमशः
पुढे काय होईल ?
© विद्या कुंभार
कथेचा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगा.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा