प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ,प्रसंग,जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
स्थळ,प्रसंग,जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
शीर्षक: मनोभूमीतले युद्ध भाग -४
लग्नाची तारीख लवकरच जवळ येत होती आणि त्यामुळे लग्नाची तयारी करण्यासाठी विपुलने शुभाला फोन केलेला होता.
साखरपुडा, हळद आणि लग्न एकाच दिवशी असल्याने कपडे घेण्यासाठी विपुलने शुभाला आणि तिच्या घरच्यांना बोलावले होते.
तिच्या घरच्यांना त्यांनी एका मोठ्या शोरूममध्ये त्यांच्या आवडीनुसार कपडे घेण्यासाठी सांगितले. शुभाला घेऊन तो एका वेगळ्या कपड्यांच्या विभागामध्ये जाऊन तिला तिच्या पसंतीनुसार कपडे घेण्यासाठी त्याने सांगितले.
एक एक कपड्याची किंमत पाहून शुभाला दडपण यायला सुरुवात झाली होती. ती प्रत्येक साडीची प्राईस टॅग बघून नको म्हणून नकार देत होती.
त्यामुळे विपुलने त्यातील एका सेल्समनला सर्व साड्यांचे प्राईस टॅग काढायला लावले.
"तुला हवी तशी तू साडी घे. तसेच तुझ्या कपड्यांच्या रंगाला मिळत्या जुळत्या रंगाला अनुसरूनच मला माझे कपडे घ्यायचे आहेत. त्यामुळे तुझे कपडे घेतल्याशिवाय मी घेऊ शकत नाही." असे त्याने तिला सांगितले.
त्यामुळे शुभाने त्याला दाखवून दोघांच्या पसंतीने कपडे घेतले.
त्यानंतर दागिने घेण्यासाठी ते ज्वेलर्सकडे गेले. विपुलने ज्या ठिकाणी गर्दी जास्त होती तिथे न जाता त्यांच्यासाठी एक स्वतंत्र खोलीमध्ये त्यांना दागिने दाखवण्यासाठी सांगितले. तसेच इथे सुद्धा शुभाला पैशांचा विचार करू नकोस असे पुन्हा विपुलने सांगितले.
विपुलला तर आपल्या बायकोसाठी काय घेऊ आणि काय नको असेच झाले होते पण फक्त एक मंगळसूत्र तिने निवडले तेही खूपच छोट्या आकाराचे होते. मग मात्र विपुलने तिच्या काकीला सोबत घेऊन हार, मोठे मंगळसूत्र, नथ, हातातल्या बांगड्या, कानातले आणि कोल्हापुरी साज विकत घेतला.
तसेच नवरीसाठी अजून कोणते दागिने घेऊ शकतो हे काकूंना विचारून त्याने जोडवी, बिचवा, पैंजण अशा सर्व गोष्टीसुद्धा विकत घेतल्या.
त्यानंतर त्याने थोडावेळ तिच्यासोबत घालवायचा आहे असे म्हणून तिच्या घरच्याकडून रीतसर बाहेर सोबत नेण्याची परवानगी त्यांनी मागितली. त्यांनीसुद्धा विपुलवर विश्वास ठेवून त्या दोघांनाही बाहेर फिरून झाल्यावर लवकर शुभाला घरी सोडण्यास सांगून संमती दिली.
दोघेजण एका बागेत गेले तिथे विपुल काही प्रश्न विचारत होता आणि शुभा शांतपणे उत्तर देत होती.
तेवढ्यात तिथे एका ओळखीच्या व्यक्तीने आवाज दिला,
"शुभा ss"
"शुभा ss"
"कशी आहेस तू ? खूप दिवसांनी दिसत आहेस. त्या व्यक्तीने शुभाला विचारले.
"ते बाबांच्या तब्येतीमुळे मला जास्त बाहेर येता येत नाही." तिने हसून उत्तर दिले.
तिचे त्याच्याशी हसून बोलणे पाहिल्यावर विपुलच्या भुवया उंचावल्या.
" हे कोण आहेत?" रितेश म्हणजेच शुभाचा मित्र त्याने विचारले.
"मी शुभाचा होणारा नवरा आहे. आमचे लवकरच लग्न होणार आहे." विपुलने शुभाच्या खांद्यावरती हात ठेवून तिला जवळ घेतच सांगितले.
"अरे वा ! खूपच छान. अभिनंदन!" त्याने शुभासोबत हात मिळवण्यासाठी हात पुढे केला तर विपुलने स्वतःच्या हातामध्ये हात घेऊन त्याच्याशी हस्तांदोलन केले.
" आम्हाला थोडे बोलायचं आहे. त्यामुळे आम्ही इथे आलो आहोत." शुभाच्या शेजारी उभे राहतच त्याने रितेशला सांगितलं.
" ठीक आहे. मघ मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. मी येतो." असे म्हणून शुभाकडे एक नजर बघून रितेश तिथून निघून गेला.
" तू कधीपासून त्याला ओळखतेस ?" त्याने विचारले.
"आमच्या कॉलेजमध्ये होता." तिने सांगितलं.
"मग तू त्याच्या संपर्कात अजूनही आहेस का ?" त्याने विचारले.
"आमचे जास्त बोलणे होत नाही आणि बाबांच्या तब्येतीची काळजी घेण्यामध्येच जास्त वेळ जात असल्याने एवढे काही माझा त्याच्याशी जास्त संपर्क नाहीये." ती सांगत होती.
रात्रीचे जेवण बाहेरच करून विपुलने तिला तिच्या घरी सोडले.
घरी आल्यावर तिच्या बाबांनी त्याच्याबद्दल विचारले.तसेच त्यांना काकूंनी जेवण दिले होते आणि औषधे शुभाने दिल्यावर ते झोपी गेले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघून तिलाही बरे वाटत होते.
विपुलच्या बोलण्याने आणि वागण्यावरून तो आपल्याबद्दल जास्त विचार करतो हे शुभाला समजले होते. तसेच अजून तरी तिला त्याच्यामध्ये काही वेगळे जाणवले नव्हते म्हणून तिने सुद्धा त्याचा जोडीदार म्हणून स्वीकार केलेला होता.
लग्नाचा दिवस उजाडला आणि जड अंत:करणाने शुभाने आपले घर वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्यासाठी मागे सोडले.
काकूंनी काही जरी वाटले तरी तिला फोन करण्यासाठी सांगितले आणि तयार होऊन शुभा लग्नाच्या हॉलच्या ठिकाणी पोहोचली.
तिच्यासाठी फुलांच्या पायपाड्या घालण्यात आलेल्या होत्या तसेच काही मेकअप आर्टिस्ट वगैरे यांना आधी तर घरी पाठवले होते पण तिथेही विपुलने तिच्यासाठी बोलावले होते.
साखरपुडा त्याच्यानंतर हळदीचा कार्यक्रम झाला आणि दोघेही लग्न बंधनात अडकले गेले.
विपुलने शुभा लग्नमंडपात आल्यापासून तिच्यावरून एकदाही नजर त्याने बाजूला केली नव्हती. कित्येक वेगवेगळ्या पोजमध्ये त्याने तिचे त्याच्यासोबत आणि तिच्या एकटीचेही फोटो काढायला सांगितले होते.
त्याच्यापेक्षा तिचेच फोटो जास्त काढण्यात आले होते. शुभा सुद्धा आनंदी दिसत होती आणि मध्ये त्याच्याशी बोलतही होती.
विपुलने त्याच्या कंपनीतील काही मोजक्याच कर्मचाऱ्यांना लग्नासाठी बोलावले होते. कमी लोकांमध्येच लग्न होणार होते. तसेच शुभाच्या बाजूने सुद्धा काही ठराविकच नातेवाईक आले होते.
जेव्हा शुभाने तिचा मोठा भाऊ आणि वहिनी यांची ओळखही लग्नात करून दिली होती तेव्हा विपुलला थोडेसे वेगळेच वाटले. कारण लग्नाच्या कोणत्याच गोष्टींमध्ये शुभाचा भाऊ आणि वहिनी त्यांना दिसले नव्हते पण पुन्हा असेल काही कारण म्हणून त्याने जास्त काही विचारले नाही.
पाठराखीण म्हणून काही दिवस काकी शुभा सोबत राहणार होत्या म्हणून शेवटी पाठवणीच्या वेळी शुभा आपल्या वडिलांना मिठी मारून खूप रडत होती. तेव्हा शुभाचा नुकताच झालेला नवरा विपुल ह्यालाही तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू बघून खूप वाईट वाटत होते.
जाताना तिच्या वडिलांनी तिची काळजी घ्या म्हणून सांगितले. त्यानेही तुम्ही काळजी करू नका म्हणून शुभाच्या बाबांना आश्वस्त केले आणि गृहप्रवेशासाठी निखिलला पुढे जाऊन तयारी करायला सांगितली.
सासरच्या घरी जाताना गाडीमध्ये वडिलांना सोडून जात आहोत ह्या भावनेने शुभा मुसमुसत रडत होती.
त्याने तिचे डोळे पुसले आणि रडू नकोस म्हणून सांगत होता.
पुढे बसून त्यांचे मागे चालणारे बोलणे काकी ऐकत होत्या तसेच या सर्व गोष्टी समोरच्या आरशातून त्यांना दिसतही होत्या. विपुल शुभासाठी योग्य आहे याची खात्री आता त्यांनाही पटली होती. कारण शुभाने लहानपणापासून खूप काही भोगले होते आणि आता जोडीदार चांगला असेल म्हणून त्यांनी देवाचे मनोमन आभार मानले.
शुभाचा गृहप्रवेश करण्यात आला. काकींनी पुढे सर्व रीती समजावून माप ओलांडून त्यांना घरामध्ये घेतले.
अशाप्रकारे शुभाने गृहप्रवेश करत विपुलच्या जीवनामध्ये प्रवेश केला होता.
क्रमशः
वैवाहिक जीवन दोघांचे कसे असेल ?
© विद्या कुंभार
कथेचा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगा.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा