Login

मनोभूमीतले युद्ध भाग-१

आपल्याच मनोभूमीत खऱ्या नि खोट्याचे युद्ध छेडल्यावर कोण जिंकेल? ती व्यक्ती का विचार? हेच सांगणारी ही कथा!
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ,प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: मनोभूमीतले युद्ध भाग-१

"मला आता काही माहीत नाही. माझ्या डोळ्यांसमोर लवकरात लवकर तुझे लग्न झालं पाहिजे." शुभाचे वडील बोलत होते.

शुभाच्या वडिलांना मरण्याच्या आधी आपल्या मुलीचे डोळ्यांसमोर लग्न झालेले बघायचे होते म्हणून त्यांनी आपल्या मुलीचे एकवीस वर्षे पूर्ण झाल्यावर वधूवर सूचक मंडळामध्ये नाव नोंदवले होते.

शुभाला अजून शिकायचे होते तसेच नोकरी सुद्धा करायची होती परंतु वडिलांच्या हट्टामुळे नाईलाजाने तिने लग्न करण्यासाठी संमती दर्शवली.

सगळं लहानपणापासून ती त्यांच्या म्हणण्यानुसार करत होती पण आता लग्नही बाबांच्या म्हणण्यानुसारच करावे लागणार त्यामुळे जो नवरा होईल तो तरी मला समजून घेईल का असा विचार शुभाच्या मनात येत होता.

" हे बघा, मला मुलगी नोकरी करणारी किंवा न करणारी हवी अशी माझी काही अट नाहीये. मुलगी ही मला सुसंस्कृत आणि महत्त्वाचे म्हणजे चांगल्या घरातील असावी हीच माझी अपेक्षा आहे."  तो म्हणाला.

शुभाला लग्नासाठी मुलांची स्थळ येत होती आणि काही मुलांना तिच्या घरातली परिस्थिती पाहून त्यांना सोने-नाणे मिळेल का नाही ह्याची शंका होती त्यात तिच्या वडिलांची तब्येत ठीक नसायची. त्यांचेही पुढे करावे लागेल म्हणून शुभाला नकार येत होते.

मधुमेहाचा आजार आणि एक मूत्रपिंड शुभाच्या बाबांचे निकामी झालेले होते आणि तसेच ते सतत आजारी असल्याने त्यांनी लवकरात लवकर आपल्या मुलीचे लग्न व्हायला हवे असे सारखे बोलून त्यांची इच्छा सांगत.

....

ऑफिसमध्ये एक मीटिंग चालू झाली होती त्यामुळे सगळेजण ती आटोपल्यानंतर एक प्रोजेक्ट यशस्वी झाला म्हणून टाळ्या वाजवत होते.

सर्वजण मीटिंग संपली म्हणून निघणार तेवढ्यात सर्वांना प्रोजेक्टर वरती काही चित्रे दिसली. काही लोकांचे डोळे विस्फारले गेले कारण कंपनीमध्ये घोटाळा झालेला त्याबद्दल काही फोटो समोर येत होते. फोटोमध्ये काही गोष्टी त्यांना दाखवण्यात आल्या होत्या.

" आता सर्वांना सगळ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या असतील. म्हणून यात जे सामील आहेत त्या चार जणांनी उद्यापासून माझ्या कंपनीमध्ये येण्याची गरज नाही."  तो अगदी थंड नजरेने त्या लोकांकडे बघून म्हणाला.

"प्लीज सर, हे फोटो... हे.. सर्व खोटे आहेत. तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेल्या दिसतो आहे. सर,प्लीज तुम्ही मला कामावरून काढू नका. नाहीतर मी रस्त्यावर येईन. मला फक्त एक संधी द्या. मी तुमचा झालेला गैरसमज दूर करेन. या फोटोमध्ये दिसत आहे त्यात काहीतरी गल्लत झाली आहे." त्या चौघांपैकी एक व्यक्ती त्याच्या गयावया करत म्हणत होता.

" हे सर्व तुम्ही चुकीचे करताना विचार करायला हवा होता. आता मला कोणत्याही गोष्टीचे स्पष्टीकरण नको आहे. तुम्हाला या कंपनीमध्ये जागा नाही. तुम्हाला काढण्यात आले आहे. तुम्ही येऊ शकता." तो कडक आवाजात म्हणाला.

सर्वजण त्या चौघांना दोषी समजत होते. त्याच्या नजरेतही ते अपराधी होते. ते चौघे पाया पडत होते, पण त्याने त्यांना पायाने उडवून स्वतःची सुटका करून घेतली आणि सुरक्षारक्षकांना बोलवून त्यांना बाहेर काढण्यात आले.

रात्री सर्व कर्मचाऱ्यांना कंपनीचे नियम पाठवण्यात आले आणि ज्यांना ते मान्य असतील त्यांनीच उद्या कामासाठी ऑफिसमध्ये यावे हा संदेश प्रत्येक  कर्मचाऱ्याला ई-मेलद्वारे पाठवण्यात आला होता.

'जो कोणी माझ्याशी चुकीचा वागेल त्याला मी सोडणार नाही.' असे स्वतःशी म्हणून तो त्याच्या घरातल्या जिम मध्ये निघून गेला.

थोड्या वेळाने त्याच्या मोबाईल वरती एक नाव झळकू लागले. त्याला कॉल येत होता आणि त्याने त्यावरचे नाव बघून फोन न घेता त्याकडे त्याने दुर्लक्ष केलं.

...

सकाळ झाली आणि त्याने आपल्या जीममध्ये जाऊन कसरत केली. सकाळच्या बातम्या तो ऐकत होता आणि त्यानंतर तो ऑफिससाठी तयार व्हायला गेला.

शुभाला साडी घालून तयार रहावे लागायचे. दररोज कोणता ना कोणता तरी मुलगा तिला बघायला यायचा. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन ती थकली होती परंतु वडिलांच्या इच्छेखातर ती तयार होऊन बसायची.

शुभाच्या आईचा काही वर्षांपूर्वी एका दुर्धर आजाराने मृत्यू झाला होता. तिचे काका- काकी मुले बघायला आले की मदतीसाठी यायचे. काकी तिला मुलीसारखी मानायची त्यामुळे तिचा शुभावर खूप जीव होता.

शुभाचा भाऊ हा तिच्यापेक्षा वयाने मोठा होता आणि त्याने लग्न झाल्यावर स्वतःचा वेगळा संसार थाटला. त्याच्या बायकोला शुभा आणि आपल्या नवऱ्याचे वडील आवडत नव्हते म्हणून ती त्यांच्यात सामील होत नव्हती. तसेच नवऱ्याला सुद्धा ती त्यांच्याजवळ जायला विरोध करायची. त्यामुळे शुभाने वहिनीकडे कधीच मदत मागितली नव्हती.

शुभा घरातच काही शालेय मुलांची शिकवणी घ्यायची. तसेच फ्री लान्सिंग करून स्वतःचा खर्च भागवायची.

"तुम्हाला किती वेळा सांगितले की नीट तपासून तुम्ही मला मुलींचे स्थळ पाठवत जा. ती मुलगी बिल्कुल बरोबर नव्हती आणि तिचे बाहेर लफडे होते हे मला तिने भेटल्यावर सांगितले. फक्त पैशासाठी ती लग्न करते आहे. हेच ती मला बोलली. जर तुम्ही मला एक चांगली मुलगी शोधून देऊ शकत नाही तर कशाला वधू-वर सूचक मंडळ काढले
आहे?" तो रागात म्हणाला.

"तुम्ही शांत व्हा सर. एक-दोन मुली आहेत मी त्यांची माहिती आणि फोटो पाठवतो." हे ऐकून झाल्यावर त्याने पुढे न बोलता फोन बंद केला.

'एक काम कोणी धड करत नाही. काय उपयोग आहे ह्या माणसांचा?' तो बडबडत ऑफिससाठी निघाला.

"सर, हे आजचे शेड्युल आहे." असे म्हणत त्याचा सेक्रेटरी त्याला सांगू लागला.

त्याने सर्व ऐकून झाल्यावर त्याला एक प्रश्न विचारायचे ठरवले.

"मला सांग निखिल, आजच्या काळात लग्नासाठी मुलगी शोधणे एवढे कठीण का आहे? एकही मुलगी अशी नाही की तिचे आधी प्रेमप्रकरण नाही. नैतिकता आणि प्रामाणिकपणा खूप कमी लोकांमध्ये बघायला मिळतो." कारच्या बाहेर बघत तो म्हणाला.

"तुम्ही जर काही श्रीमंत मुलींच्याबाबत असे म्हणत असाल तर ठीक आहे पण शक्यतो मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबात जन्मलेल्या लोकांना जाण असते. त्यांना स्वतःची इज्जत खूप जास्त महत्त्वाची असते. त्यावर डाग लागू नये म्हणून ते खूप जपतात." गरीब कुटुंबातून पुढे आलेला निखिल आपले अनुभव सांगत होता.

"म्हणजे चुकीच्या दिशेने शोध घेत असताना काही प्राप्त होत नाही त्यामुळे आपण दिशा बदलायला हवी. आता मला समजले." तो खूश झाला.

तेवढ्यात निखिलच्या मोबाईलवर पुढच्या दहा मिनिटांत बोनस म्हणून एक रक्कम जमा झाली असा संदेश आला.

त्याच्या सरांनी पाठवलेली आहे हे त्याच्या लक्षात येताच त्याने त्याला धन्यवाद म्हंटले.

आज ऑफिसमध्ये सगळीकडे कालच्या घटनेने शुकशुकाट होता. सगळेजण आपापल्या डेस्कवर बसून काम करत होते. तसेच आज कोणी सुद्धा अनुपस्थित नव्हते.

कालच्या वागण्याचा हा चांगला परिणाम त्याला दिसून येत होता त्यामुळे आपोआपच त्याच्या ओठांची किनार दोन्ही बाजूंनी सरकली होती.

निखिलने एक एक करत जसे त्याचे शेड्युल होते त्यानुसार सांगितले आणि तसेच दुपारची मिटींग आणि बाकीचे कामे करून घेतली.

तेवढ्यात त्याला एक गोष्ट आठवली म्हणून त्याने जेवणासाठी जेव्हा सगळ्यांची सुट्टी झालेली तेव्हा त्या वेळेचा फायदा घेत वधू-वर सूचक ऑफिसमध्ये फोन केला.

" हे बघा, मला आता काही करून एक चांगली मुलगी हवी आहे आणि ती लवकरात लवकर जर मिळाली नाही तर जेवढे मी तुमचे नोंदणीसाठी पैसे भरले आहेत त्याच्या दहापट पैसे मी परत मागेन आणि तसेच तुमची जास्तीत जास्त कशी बदनामी होईल याचा सुद्धा मी विचार करेल त्यामुळे आता तुम्ही जे शोधकार्य सुरू केले आहे, ते तिथेच थांबवा आणि आता मी सांगतो तसेच मला सर्व हवे आहे." असे म्हणत त्याने त्यांना कशी मुलगी हवी हे सांगितले.

हे त्याने सांगताच समोरची व्यक्ती खूप घाबरली आणि तुम्ही म्हणाल तसेच होईल असे म्हणून त्यांनी फोन ठेवला.

'बघूया निखिलची तरी कल्पना यशस्वी होते का नाही. नाहीतर मघ मला वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल.' असे स्वतःशी म्हणून तो पुन्हा आपल्या केबिनमध्ये गेला.

संध्याकाळ होत आली होती. आजही एका मुलाने शुभाला नकार दिला होता कारण फक्त मुलगी आणि नारळ हेच आम्ही देऊ शकतो असे शुभाच्या वडिलांनी सांगितल्यावर  त्यांनी तिथल्या तिथे नकार दिला होता.

जेव्हा एखादा नकार येतो आणि त्यातल्या त्यात मुलांकडून लग्नासाठी नकार येतो, तेव्हा एका मुलीची जशी मनस्थिती होते तशीच शुभाची झालेली होती त्यामुळे तिने तिचे मन शांत करण्यासाठी एका मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला होता.

मंदिरात त्यावेळी भजन चालू होते. तिथे तिने डोळे मिटून मंत्रमुग्ध होत हळू टाळ्या वाजवत त्यात गुंग होऊन गेली. नंतर थोड्या वेळाने जेव्हा तिला वेळेचे भान झाले तेव्हा ती तिथून उठून आपल्या घरी निघून गेली.

क्रमशः

कोण असेल तो?

© विद्या कुंभार

पुढील भाग लवकरच.

कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा.

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.