****************************
"बरं...भरते पण कपडे बदलून येऊ का परवानगी असेल तर?"
"हो ये ना...आणि आईला सांग चहा कर जरा."
"अहो एवढ्या रात्री चहा!"
"हो... अगं जरा काम राहिली आहे. झोप यायला नको."
"काय बाई? ...काय करायचं ह्या माणसाचं!"
"काहीही करू नको फक्त एक कप भर चहा कर."
" हम्मम!!!"
"बाबा चला द्या तो फॉर्म."
"नाव ..गाव...बापरे! दोन पान भरायचे आहेत."
"अगं काही नाही, मागच पण फक्त आपल्याला कसा जोडीदार अपेक्षित आहे ते लिहायचं आहे."
मैथिलीने सगळी माहिती फटाफट भरली...
"बाबा करू सबमिट?"
"अगं बघू तर दे...काय काय लिहलं आहे."
"हा घ्या चहा अजून गार व्हायचा आता मी परत गरम करून आणणार नाही."
"हो....हो...आण तो चहा आधी."
बाबांनी मनसोक्त चहा पिला आणि फॉर्म बघायला सुरुवात केली.
"अरे वा!!! मस्त माहिती भरली काहीही विचारायची गरज नाही पडली.आता बघू नवरा कसा हवा? काय अपेक्षा आहेत तुझ्या??"
"हे काय? मला आदर्श सासू हवी! अगं नवऱ्याबदल लिहायचे होते इथे."
"हो माहीत आहे बाबा!! पण नवऱ्या मुलाला मी भेटणार तेव्हा कळेल की तो. खरं तर मी बऱ्याच ठिकाणीं बघितलं आहे नवऱ्याचा काहीही त्रास नसतो. मात्र सासुमुळे बरेच संसार तुटले आहेत म्हणून लिहलं आहे."
आई तेवढ्यात ओरडली,
"अगं हा काय बालिशपणा ? लहान नाही तू आता."
"लहान नाही, माहित आहे मला. पण माझा निर्णय मी नाही घेऊ शकत का?"
"बाळा घेऊ शकते, मी नाही म्हणत नाही पण अगं त्यात काही तथ्य नाही. हे जर कुणी वाचल तर आणि कार्यक्रमाच्या दिवशी बोलली तर हसतील सगळे."
"का हसतील? जेव्हा एक मुलगा म्हणतो त्याला आदर्श बायको पाहिजे ,एक सासू म्हणते तिला आदर्श सून पाहिजे मग मी म्हटलं तर एवढं काय झालं?"
"अगं इथे मुलीच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. आईवडिलांनी लग्न करून द्यायचं त्याचं कर्तव्य संपलं आणि सासरी जाऊन तिने त्याच्या मर्जीप्रमाणे वागायचं हे तिचं कर्तव्य."
"अरे वा!!!!...मग तिच्यासाठी कुणाचं कर्तव्य नाही का?"
"चल जा झोपायला... खूप रात्र झाली आहे."
"हो ....हा फॉर्म सबमिट करू दे फक्त."
"ही पोरगी त्या मेळाव्यात जायच्या लायक नाही ठेवणार आपल्याला असं वाटत आहे."
"असं काहीचं होणार नाही मी पटवून देईल सगळ्यांना मी चुकीचं नाही म्हणून. माझं आयुष्य आहे मी कसं जगायचं हा निर्णय केवळ माझाच राहील."
मैथिलीने फॉर्म सबमिट केला.
ती बेडरुममधे निघून गेली.तिच्या मनात एकच विचार घोळत होता. लग्न म्हणजे ही काही बेडी नाही की ,आपण आपली स्वप्न...आपलं जगणं... विसरून सासरच्या लोकांच्या स्वाधीन व्ह्यायचं. आपण जसं प्रेमा खातर जर आपली मर्जी बाजूला ठेऊन त्यांच्या मनासारखं वागायचं तर कधी तरी त्यांनी आपल्यासाठी जगलं तर बिघडलं कुठे?
विचार करता करता ती झोपी गेली. सकाळी उठून ती कामाला गेली.आज घरातलं वातावरण जरा शांत होत. बाबा पण रेडी झाले ऑफिसला जायला तेवढ्यात दारावरची बेल वाजली बाहेर तिचे काका उभे होते.
"अरे ये..ये.. ....मी निघालो होतो ऑफिसला."
"मी पण निघालो पण वाटलं तुमच्या कानावर घालावं."
"काय झालं?"
मैथिलीने जो बायोडाटा पाठवला त्यामुळे तिचे तर लग्न होणार नाही पण टिनाच्या लग्नाला सुद्धा प्रॉब्लेम होईल जरा समजवा तिला. दोन दिवसांनी मेळाव्यात जायचं आहे."
काय होईल मेळाव्यात? बघू या पुढच्या भागात तुम्हाला मैथिली चुकीची वाटली का? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद!
©®कल्पना सावळे
©®कल्पना सावळे