माहेरपणाच सुख ( भाग 4 )

About Married Life Of Woman


माहेपणाच सुख ( भाग 4 )




सुखाची अपेक्षा करता करता

दुःखचं पदरी पडत असतं

सुखदुःखाच्या या खेळात 

दुःखचं वाट्याला येत असतं



असेचं मनिषाला वाटत होतं.बाळाच्या येण्याने नवरा सुधारेल व सुखाचे दिवस येतील ,असेच तिला व माहेरच्यांना वाटत होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेचं होतं. दारू पिऊन गाडी चालवत असलेल्या मनिषाच्या नवऱ्याचा अपघात होतो व त्यातच तो मरतो.



काय स्वप्न पाहिली होती, आणि काय नशिबी आले.. असेचं मनिषाला वाटत होते.

मुलगा जिंवत असतानाही आपली जबाबदारी झटकणारे सासरचे लोक मुलाच्या मृत्यूनंतर तर मनिषा व तिच्या मुलाशी आपले काही नाते आहे,त्यांच्या बद्दल आपले काही कर्तव्य आहे , हे सर्व विसरून गेले होते.

मनिषा आपल्या मुलासह माहेरी राहू लागली. आता सासर वगैरे काही नव्हतेचं . आपले लग्न झाले व
आपल्याला मुलगा आहे आणि त्या मुलाला वडिलांचे नाव व आडनाव एवढेचं सासरकडून मिळाले. बाकी मुलाला वडिल, आजी- आजोबा, काका-काकी,आत्या हे सर्व काही कळलेचं नाही. जबाबदारी नाही पण साधी विचारपूसही नाही. याचे मनिषाला वाईट वाटत होते.
आता मनिषा माहेरी राहत असली तरी , माहेपणाचा जो आनंद मिळायला हवा ,तो तिला वाटत नव्हता.
काळजी घेणारे,प्रेम करणारे सर्व होते. सर्व काही तेचं होते..पण जे झाले होते आणि ज्यामुळे मनिषा माहेरी राहत होती. यात आनंदापेक्षा दुःखचं जास्त होते.
लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी जेव्हा जेव्हा माहेरपणासाठी माहेरी येते, त्यासाठी तिला जी माहेराची ओढ असते आणि माहेरच्यांनाही ती येण्याची जी आतुरता, उत्सुकता असते.
हे सर्व मनिषा यापुढे कधीही अनुभवणार नव्हती. माहेरी असूनही माहेरपणाचा तो आनंद घेऊ शकत नव्हती.
आता ती माहेरच्यांसाठी सासरहून माहेरपणासाठी आलेली माहेरवाशीण नसून ती आता फक्त मुलगी, बहीण ,नणंद या नात्याने एक जबाबदारी म्हणून राहणार होती.

आपल्या सारख्या अशा कितीतरी मुली असतील, ज्या कोणत्या तरी कारणाने सासरी न राहता माहेरी राहत असतील . त्या सर्वांच्या मनात माहेराबद्दल काय वाटत असेल ?
आपल हक्काचं घर की आता फक्त आश्रयाचं स्थान!

दुसरे लग्न करण्यासाठी मनिषाला विचारले गेले. पण पहिल्या वेळी फसवणूक झाली असल्याने आता कोणावरही विश्वास ठेवायला मन तयार होत नव्हते.
नोकरी करून स्वावलंबी होण्याचे मनिषा ने ठरवले होते व घरात सर्वांना तसे सांगितले होते.

मनिषाचे शिक्षण ही चांगले झालेले होते. नोकरीशी संबंधित एक दोन छोटे कोर्स केल्यानंतर तिला नोकरी मिळाली. माहेरी आपण ओझे म्हणून, जबाबदारी म्हणून न राहता आपणचं आपली व आपल्या मुलाची जबाबदारी स्वतः स्विकारावी . असे तिला वाटू लागले.
आईवडील,भाऊ- वहिनी कितीही चांगले असले तरीही त्यांना त्यांचा संसार असतो. कितीही झाले तरी आपण व आपला मुलगा ही त्यांची जबाबदारी नाही आहे, ही जबाबदारी तर सासरची पण ते कसे आहेत ,हे त्यांनी दाखवून दिले होते.
माहेरच्यांना आपल्या मुळे त्रास नको. त्यांनी आपल्या साठी जे काही केले व करत आहेत ,तेचं आपल्यासाठी खूप आहे. या भावनेने मनिषाला माहेरच्यांविषयी आपुलकी व प्रेम वाटत होते. आणि आपणही त्यांच्या सुखासाठी काही केले तर ..याच प्रयत्नात मनिषा असायची.
व छोट्या छोट्या गोष्टींत माहेरपणाच सुख नव्याने शोधण्याचा प्रयत्न करायची.


समाप्त


नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all